लेखक :निशिकांत हारुगले.
एम.ए बी एड.
दर वर्षी सण समारंभ चालून येत असतात. नित्य नेमाने आश्विन महिन्यात दसरा आला. गावातील लोकांचा मुख्य व्यवसाय शेती. त्यातून येणाऱ्या पैशावरच उदरनिर्वाह चालत असे.दसरा म्हटल की खारकांडाचा बेत ठरलेला असे. पण मटण महाग असलेने सर्व सामान्य गरीब कुटुंबांना त्याचा खर्चं परवडत नसे.तेव्हा या मासाहाराची गरज भागवण्याचे काम पेठच्या शिवारातील नदी वेदगंगा व तिच्या व्हळी म्हणजेच ओढे करत असत.
पेठच्या गावात होऊन गेलेलं प्रसिद्ध त्रिकुट म्हणजे पाटलाचा हणमंता, कुंभाराचा शंकऱ्या व येसाक्काचा बाजीराव. ही तिघे पेठच्या रानात पाखराप्रमाने लहानाची मोठी झालीत.
शाळा शिकणे म्हणजे डोक्याच काम ते जमणार छे छे वेड व्हायला होतंय असे समजत असत. त्यामुळे शाळेत कमी व गावच्या शिवारात जास्त हुंदड्या मारतच हे लहानाचे मोठे झाले.
लहानपणी शाळेला जर मुले बोलवायला आले की कधी कणुगल्यात तर कधी पोटमाळ्यावर लपून बसत. तर कधी शिवारात दडी मारत.
येसाक्का तर आपल्या बाज्याला फुकणीन बडवत असे.की शाळेला का जात नाहीस.
“भाड्या नुसता खादाड बोका खातोय व खोंडावाणी हुंदडतोय नुसता.” असे म्हणत असे.हा शाळा शिकावा व या त्रिकुटाच खेळ मोडावा म्हणून येसुबाईन बाजीरावाला त्याच्या मामाच्या गावी भोगावतीला पाटीवला.पण काय घरातील मांजर पिल्ली धरतय म्हणून रानात सोडावं व ते फिरून परत यावे तसा हा चांगल महिनाभर खादडून महिन्यान चालत घरला आला. तवा आईनं डोचक्यावर हात मारून घेतला व म्हणाली, “ काय बाई करावं या पोराला आता ह्यो भाड्या व याचं नशीब मी काय करणार.” अस म्हणून तिने त्याचा नाद सोडला.
शेतातून येणारे चार तांदळाचे दाणे व म्हशीचे दूध ढेरीला घालून मिळणाऱ्या दहा दिवसाच्या बिलावर घर कसे बसे चालत असे.
डोंगरातील जंगलातील लाकडाच्या मोळ्या घरच्या सरपणाची गरज भागवत असत.पैशाची वानवा अशीच परिस्थिती हणमंत पाटलाची होती.
शंकर कुंभाराच्या बापाचा मडकी तयार करायचा.पावसाळ्यात चिखल रांधून गणपती करायचे व ते विकायचे. शंकरला गणपतीतला ग सुद्धा येत नव्हता. एकदा त्याच्या बापानं मारून मुटकून त्याला गणपती करायला बसवला. तर त्याने गणपतीचं धड एका बाजूला व तोंड मागल्या बाजूला. केले. गणेश चतुर्थीला जो तो हसू लागला. तेव्हा शंकर्या सगळ्यांना सांगे. की हा नवसाला पावणारा गणपती आहे.कारण त्याचे तोंड पाठीमागे होते.घरला जाताना तुमच्याकडे बघून आशीर्वाद देणारा व तुम्ही त्याला बुडवता तो मात्र तुम्हाला तारणार. तारल्या वाचून राहणार नाही.
पण एवढं सांगून पण तो गणपती घ्यायला कोणीच तयार नव्हते.
शेवटी शंकऱ्यान त्या गणपतीला उचलले व हनमाच्या गळ्यात घातले. व म्हणाला, “ मला तुझी पई नको, पण माझ्या श्रमाचा गणपती आवंदा तरी खपुदेत. पुढचं पुढं बघू.शेवटी हणमंतानं मैत्रीखातर तो गणपती घरी नेला.
घरात आणल्यावर हणमाच्या आजीनं घर डोक्यावर घेतलं व म्हणाली,
“ भाड्या फुकटात मिळालं म्हणजे शेण पण आणशील.तुला मोडून बसवला नदीवर त्यो. रेड्या आसला कसला गणपती आणला.”
तेव्हा हणमंत म्हणाला, “ म्हातारे गप्प बस उगाच कालवा करू नकोस, बघ नवसाला पावतो की नाही हा गणपती.”
तेव्हा म्हातारी म्हणाली, “ तो आधीच पावलाय व तुझ्यासारखं कारट आमच्या पदरात टाकलय काय कामाचं ना धामाचं.”
तेव्हा तो म्हणाला, “ कामाचं नाही कस तू खपलीस तर तुझ्या लेकाला नाहीतर मलाच तिटव धरायला देतील लोक तवा म्हणशील काय कामाचं ना धामाचं.”
तेव्हा म्हातारीनं काठी घेतली व त्याला म्हणाली, “ भाड्या माझ्या मरणावर उठलाय.”
तेव्हा हणमाच्या आईनं कशीबशी समजूत काढली. व म्हातारीला शांत केली. तेव्हा तो म्हणाला , “ तिला म्हणावं जा माहेरला गवर खेळायला.”
तेव्हा ती म्हणाली, “ ये वळू या म्हातारपणी मला पाठवतो व्हय रं मेल्या या दावणीला डोकं फोडून मरेन पण माहेरला जाणार नाही.”
अस म्हणून ती आत गेली. पण पाठमोरा गणपती हाणमाला पावलाच म्हणायचा. त्यावर्षी हाणमाच्या शेतात धान्य भरपूर पिकलं, म्हैस दुधाला सरळ लागली. व हणमाचं लगीन पण झालं. तेव्हा तो म्हातारीला म्हणाला, "का गणपतीला नावं ठेवती नव्हं आता बघ कसा पावला गणपती शिखरासकट मला.” म्हातारीने त्याचे पटापटा मुके घेतले.
अशा प्रकारचे हे त्रिकुट दसऱ्याला एकत्र न आले तर नवलच. या त्रिकुटाने देव उठल्यावर ठरवलं काही नाही आज रात्री शिकारीला जायचं पाण्यातल्या. यांची शिकार म्हणजे मासेमारी हाणमानं त्या दिवशी माळ्यावरली बत्ती काढली. व इकडल तिकडल उसन रॉकेल आणून कशीबशी तयारी केली. येसू पाटलिनीच्या बाज्यानं माळ्यावरल्या मच्छरदाणीची जाळी कापून घेऊन आला. व कुंभाराचा शंकऱ्या विळा घेऊन तयार झाला.तिघेजण अंधार पडल्यावर बाहेर पडले. तेव्हा म्हातारी ओरडली, “हाणमंता काठी घेऊन जा माझी रातीची वेळ हाय, उगाच शंका नको.”
तसा हणमंत ती काठी घेऊन ती तिघ नदीच्या वाटेला लागली. नदीच्या वाटेवर ओढा लागला. त्या ओढ्यात अलगत घुसली. व पाण्याच्या वाटेनं निघाली. अंधाऱ्या रात्री किर किर आवाज करत किड्यांचा कालवा चालला होता. गप्पा मारत यांनी मासळ्या व किरवी धरायला सुरवात केली अंधाऱ्या रात्री अनेक किरवी बाहेर पडत असत. खुरप्याने पटापट टिपत आणलेल्या पोत्यात किरवी टाकत पुढे चालली होती. शंकर कुंभार हाणमाल म्हणाला, “ तुझी आजी लई वांड हाय रं, लई बोलती म्हातारी, हाड म्हातारी झाल्यात पण जीभ काय तिची म्हातारी झाली नाही बघ.आशी बोलते की समंद गावच हादरायला पाहिजे. तुझ्या आईचं कस ध्याड गेलं असतील र तिच्या हाताखाली.”
तेव्हा हाणमा म्हणाला, “ म्हातारी बडबडतीया पण पोटात लई माय बघ, तुळशी काठाची असली तरी तुळशिगतच हाय बघ. आता मी जोपतोर घरात जाईत नाही तोपर्यंत झोपली तर शपथ माझ्या लग्नाचा खर्च तिनच केला नव्ह, साठवलेल्या पैशातून. नाहीतर आमचा बा काय आडगा पन्नास पैशाला पाच रुपये व पाच रुपयाला पन्नास पैसे म्हणतोय. तो काय व्यवहार करणार दगड. म्हातारी हाय म्हणून सगळ चाललय नाहीतर आमचं वाळवणं कवाच लागलं असतं. आमच्या आसल्या भावकीत तिचा आवाज ऐकला की आजुन हादरतिया.
आमच्या भावकितल्या किशाच्या बापानं आमच्या बाला दमदाटी करताच व शिव्या देताच किशाच्या बापाला आमच्या म्हातारीनं गोरणीत घालून बडवला.
अशा गप्पा मारत ओढ्याचे पात्रातून ते मासे धरत ते पुढे चालले.भरपूर मासे जमले. टिक्क उचलना झालं, तेव्हा शंकर म्हणाला, “आता बास, पुढल्या वळणावर बाहेर पडू.”
तसे ती तिघे पुढल्या वळणावर बाहेर पडू लागली. वळणावरून बाहेर पडताना अचानक हणमाला पायात काय तरी चावल्या सारखं वाटल.
माग वळून बत्तीच्या उजेडात त्याला सापाची शेपटी दिसली. तिचे दात त्याच्या पायात लागले होते. व बारीक मुंग्या मारू लागल्या होत्या.
शंकर व बाज्या चांगलेच घाबरले होते.
शंकर म्हणाला, “ आता काय करायचं र.”
बाजीराव, “काय करायचं म्हणजे याला पाटकोळीवर घे व रस्त्याला ये. व ही पिशवी तिथ व्हळीत लपव. मी बैलगाडी आणतो.”
बाज्या पळत घरला गेला व त्यानं परसदरातील मांगरातील बैलं सोडली. व छकड्याला जुंपली..खीलार बैलांना दोन चाबूक लगवताच डीरर्क्या फोडत पळाली. इतक्यात शंकर हाणमाला घेऊन वाटेला आला होता. बैलगाडी येताच त्यानं हाणमाला छकडा गाडीत टाकल. हाणमाला मात्र काहीच वाटत नव्हते. त्याने आपल्या पायाला दोराने घट्ट बांधले होते. गाडी तालुक्याच्या सडकला लागली.थोड्याच वेळात बघता बघता बैलांनी वेग धरला. दणक्यात बाजीरावानं गाडी तालुक्याला रेटली. हणमाला घेऊन तालुक्याच्या सरकारी दवाखान्यात आलीत.
बैलगाडी तशीच उभा करून त्यांनी दवाखान्याच दार ठोठावले रातपळीला आलेली नर्स उठून आली. व म्हणाली, “काय हाय येवढ्या रातीच,जरा कुठं डोळा लागतोय तोपर्यंत कलमडलित.” अस म्हणतच तीन दार उघडलं.तस धापा टाकत शंकर म्हणाला, “हणमाला पायाखालच झालय.”
तवा ती नर्स म्हणाली, “एवढ्या रातीच कशाला गेलता वारुळाकड जीव द्यायला काय?”
“ बोला काय होत ते नासकवणी की फुरस .”
तेव्हा बाजीराव म्हणाला, “ सापटोळी होती.”
तेव्हा ती नर्स म्हणाली, “ काय साप टोळी मी नवीनच नाव ऐकतेय.”
“केवढी होती लांबीला.” नर्स म्हणाली.
तेव्हा हणमंता म्हणाला, “ बाई जर ती दिसली असती तर तुम्हा पुढे आणून टाकली असती.”
तेव्हा त्या बाईन जास्त वाडाचार न लावता एक इंजेक्शन घेतल. व हाणमाला टोचत म्हणाली, “ मी आता हे जे इंजेक्शन देते. ते सर्व सापांवर चालते. जर एवढी रात्र ढकलली तर समजा हा वाचला नाहीतर चचला.”
असे म्हणून तिने त्याला वार्डात एका खाटेवर जागा दिली. व ती निघून गेली.
हणमाला बाजीराव व शंकऱ्यान आणून त्या खाटेवर झोपवला. व बाजीराव गाडीची बैल सोडायला निघून गेला.
शंकर मात्र खाली गार फरशीवर बसला. आधीच ओढ्याच्या पाण्यात भिजल्यांन थंडी वाजत होती. त्यात सरकारी हॉस्पिटल मधील गार फरशी याने चांगलीच हुडहुडी भरली.
थोड्या वेळानं बाजीराव तिथे आला, व म्हणाला, “ काय झालं र.”
तेव्हा शंकर म्हणाला, “काय नाही इथे फरशीवर आणखी दोन तास बसलं तर मलाच दाखल व्हावं लागलं दुसऱ्या खाटेवर.”
थोड्या वेळानं हाणमा डाराडूर झोपला ते दोघे मात्र त्याच्या पहार्याला रातभर जागे होते.सारखं आंगाला हात लावून बघत असत. व म्हणत, “ हाय, हाय, आजूनं जित्ता हाय म्हणायचा.”
रातभर जागून जागून डोळ पांढर व्हायची वेळ आली होती.भगटायला कुठे यांचा जरा डोळा लागतोय तोच हाणमंता उठला. व म्हणाला, “ ये चला लवकर रातभर नुसती झोपा काढत्यात, घरला जायचं की नाही.”
त्यावर शंकर म्हणाला, “ हे आपल बर हाय की तू झोप डाराडूर व तुझ्या काळजीनं रातसारी जाग आम्ही. व आम्हालाच म्हण झोपा काढत्यात.”
बाजीराव म्हणाला, “ मेला असतास तर लई बर झाल असत, तुझी काळजी करून जागं आम्ही व तूच तोरा दावतोस व्हय रं.”
तेव्हा हाणमा म्हणाला, “ खेकडी मास्यांची पिसवी कुठाय.”
ती दोघं म्हणाली असल शिवारात व्हळीत ठेवलीय.”
ती उठून जायला निघाली.बाजीराव बैलगाडी जुंपली.रातभर बैलांना झाडाखाली चांगलंच चीलटानी खाल्ल होत.जुंपताना डूरक्या बैलान शिंग दाखवली. तशी त्याने वेसण धरली व गाडी जुंपली . इतक्यात रातपाळीची नर्स डुटी संपल्यावर घरला निघाली होती. “ काय हाईस व्हय मला वाटल… …”
तेव्हा शंकर म्हणाला, “ तुमच्या सारखी सावित्री असताना हाणमाचा जीव न्यायची काय बिशाद त्या यमदेवाची.”
असे म्हणताच ती नर्स चिडली. व म्हणाली, “ देव करो व आज तुला साप चावू दे, व तू इथे येवो, नाही तुला वरती पाठवला ढगात तर बघ.मला सावित्री म्हणतोस व्हय रे डूचक्या आणि हा तुझा सत्यवान काय. घाणेरडी किती दिवसांनी आंघोळ करत्यासा देवाला ठाऊक, तुमच्या आंगाचा वास बघून तो यम म्हणाला असेल की आधीच नरकात हाईसा आणि उगीच कशाला नेऊ.”
असे ऐकल्यावर व तिचा अवतार बघून बाजीरावाने गाडी गडबडीने जुंपली. व ती तिघे गावच्या वाटेला लागलीत.गावात यायला घराजवळ चांगलीच गर्दी उसळली होती. आजू बाजूच्या बायका जमल्या होत्या. म्हातारीनं घर चांगलच डोक्यावर घेतलं होत.ती चांगलीच सुर लावून रडत होती.
“ कशाला गेला मासळ्या धरायला.”
शेवटी हाणमाला बघितल्यावर म्हातारीचा जीव भांड्यात पडला. व म्हणाली,
“ हाणमा नको आम्हाला मासे ते तू घरात बसून रहा म्या आजुन धट्टीकट्टी हाय राबायला.तुला कायबी कमी पडू देणार नाही.तू तेवढा चांगला रहा बाबा.”
जो तो येऊन चौकशी करू लागला.
व शंकर व बाज्याला म्हणू लागले, “ काय अक्कल हाय की नाही कशाला गेलत्यासा मासळ्या धरायला. जीव गेला असता तर.दिसाचं जाता इत नाही.”
तेव्हा बाज्या व शंकर त्यांच्या तोंडाकडे बघून विचार करू लागले. “हे आपल बर हाय देणं नाही घेणं आणि कंदील लावुन येणं. हाच घेऊन गेला माश्याला , याच्यासाठी एवढं रामायण केलं. थंडीनं कुडकुडलो. रातभर जागे राहीलाव व सगळे आम्हालाच बोलत्यात.”
कसे बसे सात आठ दिवस गेले. हाणमा परत बाजीराव व शंकरकडे गेला. व म्हणाला, “ काय जायचं काय आज रात्री मासळ्या धरायला.”
तेव्हा हे त्रिकूट पुन्हा मासे धरायला जाण्याच्या तयारीला लागले.
लेखक. : निशिकांत हारुगले


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा