कथा वाकाटखोर्याची भाग १३
१३)शांतीचा भाऊ
लेखक : निशिकांत हारूगले.
वज्रा व शांतीची दहावी झाली. वज्रेच्या घरची परिस्थिती गरीब असल्याने यापुढचे शिक्षण वज्रा घेऊ शकत नव्हती. त्यामूळे तिने शाळा सोडणेचा निर्णय घेतला. कारण व्यंकू व तिचे, दोघांचे शिक्षण घरच्यांना पेलणारे नव्हते. शेती भरपूर असली तरी उत्पन्न कमी येत असे.
गावातील माणसे जास्त करून गावच्या पाटलाकडे कामाला जात. गावचा उमाजी पाटील शिवानंदाच्या विहिरीच्या शेतावर डोळा ठेवून होता. त्यासाठी त्याने भांडण देखील केले होते. घरचं व शेताच काम करण्यासाठी वज्रेन स्वतः शाळा सोडली. शिवानंदाला वाईट वाटत होत. शांतीला पण खटकले. तीन समजूत घालण्याचा प्रयत्न केला. पण वज्रेनच नाही म्हणाली. शिवानंदाची इच्छा होती पण नाईलाज होता. व्यंकू किरकोळ कामे करून शाळा शिकत होता. वज्रा सोबत नसल्याने शांतीला पण नकोस वाटू लागले. कसेतरी पाच सहा महिने ती शाळेला गेली. नंतर मात्र तिनेही शाळेस रामराम ठोकला. व वडीलांसवे ती सोनारकामात लक्ष देवू लागली. तिने त्यात कौशल्य हस्तगत केले. ती त्यात तरबेज झाली. दामाजी पण खुश होता. तो तिला म्हणायचा, “अस काम करू लागलीस तर एक दिवशी मोठी सोनारीन होशील. दुसऱ्याची चाकरी करण्यापेक्षा हे चांगल.”
दामाजीला शांतीच्या पाठीवर लवकर मूल झाले नव्हते. दहावीत गेल्यावर तिचा भाऊ तिन वर्षाचा झाला होता. आपण मोठी व भाऊ लहान हे तिला आवडायचं नाही. तिला लाज वाटायची.
एके दिवशी सकाळी महादेवास जाताना आई म्हणाली,की बाळाला घेऊन जा. तेव्हा तिच्या कपाळावर आट्यांचे जाळे पडले. शेवटी नाईलाजाने तिने त्याला घेऊन ती देवाला गेली. तेव्हा देवदर्शनाला वाडीच्या बायका येत. त्या दिवशी पण आल्या होत्या. लहान गोंडस बाळ पाहून म्हणाल्या, “ कोणाचं बाळ ग हे?”
तेव्हा शांतीची पंचाईत झाली. व ती ताडकन बोलली, “ आमच्या काकींच.”
वज्रेन तिच्याकडे पाहिले तेव्हा तिने डोळे लिंबावानी मोठे करुन पाहिले.”
देवदर्शन झाले. थोड्या वेळाने त्या दोघी घरी निघाल्या. तेव्हा वज्रा वाटेत तिला म्हणाली, “ शांते खोटारडे खोटं का ग सांगितलस काकांचा मुलगा म्हणून.”
“ अगं, वज्रे तुला कळत कसं नाही. मी एवढी मोठी व हा किती लहान बायका नाही का हसणार मला, हा माझा लहान भाऊ आहे असं म्हंटल्यावर. पण तू यातील एखादा शब्द पण कोणाला सांगू नकोस. तुला महादेवाची शपथ आहे.” शांती बोलली.
“ वा ग वा, तू कर कुरघोड्या व मला शपथ घाल. मी काही सांगणार नाही. पण आभाळातून पडली गोठी शांतीची शपथ खोटी.”
पण शांतीचे बोलणे पुजाऱ्याने देवळात ऐकलं होत. घरी जाताना त्यानें शांतीच्या आईला सगळ काही सांगितल. तेव्हा शांतीवर आई चिडून होती. संध्याकाळी शांती घरात आलेली पाहून तिची आई तिच्या मागे लाकूड घेऊन मागे लागली. व म्हणाली,
“ कारटे काकूंचा मुलगा म्हणतीस होय का? उद्या मामांचा म्हणशील. थांब दाखवते. तुला असे म्हणताच शांतीने चांगलीच धूम ठोकली. व थेट वज्रेच्या घरी गेली. तेव्हा वज्रा अंगण झाडत होती. तिला पाहून शांती ओरडली, “ वज्रे लगेच चोंबडे पणा केलीस. शपथ घालून पण घरी सांगितलस. काय गरज होती. रामायण सांगायची. जा बघ माझ्या माग अर्जुनासारखे लाकडाचे पेटते बाण घेऊन लागलीय. चांगलच महाभारत होणार.”
वज्रा लगेच म्हणाली, “ मी काही सांगितले नाही. दुसऱ्या कुणीतरी चुगली केली असेल.”
तेव्हा शांतीने कशीबशी आईची समजूत काढली. व हे प्रकरण निभावून नेले. सांजेला शांता वाण्याच्या दुकानात खरेदीला गेली. तेव्हा तिथे पुजारीबुवा तिला चिडवून म्हणाले, “ काय म्हणतोय काकांचा मुलगा.”
तेव्हा शांतीच्या लक्षात आलं. की या पुजाऱ्यानच आग लावली. ती म्हणाली, “ म्हणजे तुम्हीच काडी टाकली तर. देह देवळात चित्त मात्र पायतानात. तुमचं. पूजाअर्चा सोडून वस्तरा केव्हापासून चालवायला लागलात.”
तेव्हा पुजाऱ्याला थोबाडीत मारल्यासारखे झालं. तेथील कट्ट्यावरील बसलेली टवाळ पोर खिदळायला लागली. दुकानातील माल घेऊन घरी जाताना तिचे लक्ष पुजाऱ्याकडे गेले. त्याचे डोळे लाल होते. ते पाहून ती म्हणाली, “तुमच्या डोळ्यांना बघून घाबरायला मी तुमची लग्नाची बाई नव्ह. परत पुजारपण सोडून माझ्या नादाला लागलं तर पुजारपण सोडाच मी नारळाची शेंडी पण कढण्यालायक सोडणार नाही.”
असे बोलून घरला परतली.
क्रमशः पुढे……