पितृ पंधरवडा व सत्यवादी माणसं लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
पितृ पंधरवडा व सत्यवादी माणसं लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

रविवार, ११ डिसेंबर, २०२२

कथा वाकाटखोर्याची भाग २१

 २१)पितृ पंधरवडा व सत्यवादी माणसे

लेखक : निशिकांत हारुगले


गणपती पाण्यात पडले की पितृ पंधरवडा चालू होतो. दरवर्षी नियमाप्रमाणे यावर्षी ही तो आला. सुगिची सुरवात व पित्रांचे श्राध्द नेमाने येई. वज्राचे घरी श्राध्द असल्याने सकाळपासून लगबग होती. श्राद्धविधी करण्यासाठी शयनग्रामहून गणेश चंद्र भटाला बोलावले होते. यथाविधी श्राध्द झाले. गणेशचंद्रभट जेवायला बसला. चांगला गोलमटोल त्याचा देह, ढेरी नगार्यासारखी पुढे आलेली, गळ्यात रुद्र्माला अन् मुखात शिवनाम असा हा भट दिसायला साधापण गुण चांगले कपटी असणारा हा भट्ट पायाने लंगडत चालला की सगळे त्याला शयनग्रामचा लंगडा घोडा म्हणत. कोणाचेही लग्न, मुंज असे नाना विधी पार पाडणे व आपली खळगी भरणे यात भारी पटाईत होता. त्याची पहिली बायको नदीत बुडून मेली होती. म्हणून याने दुसरे लग्न केले होते. पण पाहिली बरी मात्र दुसरी नको अशी गत याची झाली होती. 

शयनग्रामच्या बायका त्याला कधीही नावजत नसत. वेदगंगेच पाणी उन्हाळ्यात अटायच. तेव्हा इकडल्या तिकडल्या लोकांच्या वार्या होत असत. वज्रा म्हशी घेऊन नदीला जात असे. तेव्हा लोक भेटायचे. जनाई कुंभारीण नेहमी चुली विकाय येत असे. एकदा म्हशी घेऊन जाताना जनाबाई कुंभारीण पेठला चुली विकायला आली होती. तेव्हा गणेशचंद्र भट कोणाची तरी पूजा उरकून निघाला होता. वाटेत त्याला जनाबाई कुंभारीण चूल घेऊन आलेली भेटली. वाटेत तिला पाहून हा तिला म्हणाला, “ काय, नव्हरा मेल्यापासून लई व्याप बघ तुला, काय पैशाची हाव म्हणायची. तुम्हा सारख्यांना किती जरी दिले तरी तुमची हाव काय संपत नाही.”

आधीच उन्हाचा तडाखा त्यात डोक्यावरील चूल जड झालेली, व हा असं म्हणतोय म्हंटल्यावर जनाबाईला राग आला. ती त्याला म्हणाली, “ तुझ्यासारख बायकोच्या इस्टेटीवर जगत नाही. बिचारी गेली मरून व तू डोमकावळा येऊन बसलास. तस मी नाही खात श्रमाच खाते.”

तसा तो चिडला व जनावर धावून गेला. पण वाटेल म्हशी घेऊन निघालेली वज्रा दिसताच माग फिरला व आपल्या वाटेला लागला. जाता जाता तिला म्हणाला, “ ब्रम्ह निंदेने नरकात जाशील.”

तेव्हा जनाई त्याला म्हणाली , “बघूया कोण जात ते.”

तो गेल्यावर डोईवरली चूल तिन नदीवाटच्या आंब्याखाली उतरून घ्यायला वज्रेला हाक मारली. तशी ती थोडावेळ सावलीत विसावली. व आपल्या फाटक्या दंड घातलेल्या लुगड्याच्या पदरान तिन आपल्या अंगावरील घाम टिपला. तशी वज्रा तिला म्हणाली, “ काकू, ते भटजी बोवा तुमच्या अंगावर का धावून आले होते.”

तेव्हा जनाबाई वज्रेला म्हणाली, “खर बोलणं पाप हाय या जगात. त्यो मला डिवचाय गेला. म्हणून मी त्याचे गुण गायले. म्हणून तोटक माझ्या अंगावर धावून आलत, चूल पाडत नव्ह माझी. भडवा मला म्हणतोय नरकात जाशील.”

तशी वज्रा तिला म्हणाली, “ पण ते काका चांगले आहेत. कित्येक गरीब मुलांची लग्न केलीत त्यांनी.”

वज्राचे बोलणे तोडत ती म्हणाली, “वज्राबाई तू अजून लई ध्याड बघायची हाईस. हा गेलेला दिवटा सज्जन म्हणू नकोस. देवानं लंगड उगाच केल नाही. याची बायको अगदी पार्वतीवाणी होती. पडल त्या धंद्यात उभी असायची. कोणत्याही कामास तयार. बापाला पोरगा नाही म्हणून या तोटक्याला तिच्या गळ्यात बांधला. एके दिवशी तिन या तोटक्याला वाडीच्या बाईसंग रासलीला करताना पकडला. म्हणून याने नदीच्या वाटेनं जाताना तिला पाण्यात ढकलली. व कालवा करून गाव जमा केला. बायको पाण्यात पडून मेली म्हणून गलका केला. बिचारी पोहायला येत नसल्याने वेदेच्या पाण्यात सामावून गेली. चार दिवस लोक उडकत होते. शेवटी तिचं मड तालुक्याच्या धरणाला तटलेल मिळालं. लंगड असल्याने याच्यावर कुणाचा संशय आला नाही. म्हणतात ना, मरणारी गेली मरून अन् भट राहिला दडून.” असे बोलून तिने चूल आपल्या डोक्यावर घेतली. व ती पेठच्या वाटेला लागली. 

तेव्हा पासून गणेशचंद्र भटाचा राग तिला येत असे. आज योगायोगाने श्राध्दाच्या निमित्तानं त्याला जेवाय वाढण्याचा प्रसंग वज्रेवर आला होता. ती जेवण वाढताना बरोबर आलेल्या मुलाला खुणवून गणेशचंद्रभट वज्रेविषयी बोलत होता. वज्रेला ते खटकल. वज्रा काय समजायचे ते समजली. त्याच्याबरोबर आलेला मुलगा वज्रेकडे पाहून हसत होता. वज्रा जेवण वाढून आत गेली. व नंतर तिने जेवण वाढायला आई पार्वतीला पाठवले. व परसदारी जाऊन बसली. जेवण झाल्यावर जाताना गणेशचंद्रभटाने वज्रेच्या लग्नाचा विषय काढला. तो गेल्यावर वज्रेने स्पष्ट घरातल्यांना सांगितलें त्या गणेशचंद्र भटाने आणलेल्या मुलाशी ती लग्न करणार नाही. त्यापेक्षा नदीत उडी घेऊन जीव देईन. सारे जन तिच्याकडे आश्चर्याने पाहू लागले. शेवटीं आई पार्वती म्हणाली, “ हे बघ वज्रा तुला आवडेल त्या मुलाशीच लग्न लावून देवू. तू उगाच वाईट वाटून घेऊ नकोस.”

तेव्हा वज्रा शांत झाली. व शांतीच्या घरला निघाली. जाताना तिला वाटेत गंगू सुईन भेटली. ती पुटपुटत चालली होती.तिला पुटपुटताना पाहून वज्रा म्हणाली,, काय झालं ग पुटपुटायला.”

तेव्हा गंगू तिला म्हणाली, “ काय सांगू बाळा तो उमा पाटील हाय नव्हं, आला होता माझ्या घरला बोलवायला म्हाळ घालतोय नव्हं बापाचा. मी फक्त तेला म्हटल. व्हय रं उमा जिवंत असताना म्हातार्याला धड आन घातलं नाहीस. अन् आता मेल्यावर कशाला अड्यावर कागावळी ठेवून कावळं बोलवतोयास. , एवढच म्हटल अन् मला शिवा द्यायला लागला. मी म्हटल तूझ्या जन्माच्या वेळी तूझ्या आईच बाळंतपण मीच केलं. तवा तुझ्या घाट्याला नख लावलं असत. तर त्या पाटलाच म्हातारपण चांगल गेलं असत. अन् मला शिवा द्यायला पण तू जिवंत राहिला नसतास. तसा गेला मांजरागत.”

तेव्हा वज्रा म्हणाली, “ तू तरी कशाला नको ते बोललीस. यामुळे त्याच्या घरच्या जेवणाला मुकलीस नव्ह.”

तेव्हा गंगू सुईन तिला म्हणाली, “त्याच्या चार शितापाई सतपन सोडायला मी गाव भवानी नव्ह. त्याच्या शिताणी माझं मड काय वेदगंगेवर जायचं राहणार नाही. झींज्या साराय येत नव्हत्या तेव्हापासून प्रपंच करतेय. कोंड्याचा मांडा करून खाईन. पण चार शितापाई खोटं कधीच रुचायच नाही मला. तेव्हा वज्रा तिला म्हणाली, “धन्य आहे बाई तुझी, चल आमच्या घरी जेवायला.”

गंगू म्हणाली, “ आता नाही येत रात्री येते. मला हाय बोलावंन एकीकडून सवास्नीच. तुझी म्हातारी वरडल तिला सांग रात्री येते म्हणून जेवायला.” असे बोलून ती म्हातारी काठी टेकत घरला गेली.

तिच्या पाठमोऱ्या देहाकडे बघून वज्राने नमस्कार केला. व मनात म्हणाली, “ धन्य आहे देवा तुझी. अशी सतपन असणारी मानसं तू निर्माण केलीस.जी राबून खातील पण चोरी मारी नाही करणार.”

वज्रा शांतीच्या घरला गेली. शांतीची आई दळण तयार करत होती. वज्रा तिला म्हणाली, “ काय हे काकू. तुम्ही का नाही आल्यासा. शांती तेवढी जेवायला आली.”

शांतीची आई सुंदरा म्हणाली, “बाळा आज माझा उपवास असल्याने नाही येता आलं.”

इतक्यात शांती आतून बाहेर आली. व त्या दोघी गच्चीवर गप्पा मारण्यास निघून गेल्या.

…… …… …… ……

क्रमशः पुढे…….



कथा वाकाटखोर्याची भाग २५

 २५)दादाची सायकल लेखक :  निशिकांत हारुगले. व्यंकू आता खूप मोठा झाला होता. तो कॉलेजला जात असे. घराच्या गरीब परिस्थितीमुळे वज्रेला शाळा सोडावी...