कथा वाकाटखोर्याची भाग ९
९) वज्रा व शांतीची बोलाबोली
लेखक : निशिकांत हारुगले.
दिवस सरत चालले होते. व्यंकू आता मोठा झाला होता. तो आता नववीत होता. पेठत फक्त सातव्या इयत्तेपर्यंत शाळा होती. तिथून पुढे शिक्षणासाठी तालुक्याला जावे लागत असे. शिवानंदाने त्याचे नाव आठवीतच घातले होते. तो नियमित जात असे.
आता मोठा होऊ लागल्याने शिवानंदाने त्याची मुंज करायचे ठरवले. जास्त खर्चात न पडता शयनग्रामला मुंज करू असे बोलताच त्याचा मेव्हणा अडूनच बसला. की ते काही नाही वाडीला जाऊन करायची. पण आपल्यावर कर्जाचे ओझे आहे व आपल्याला ते काही जमणार नाही असे म्हणताच तो मवाळला. व शेवटी शयनग्रामला त्याने मुंज केली. जेवणावळ झाली. अनेक पंगती जेवण झाल. मुंजिमुळे व्यंकूची हालत बघण्यासारखी होती. त्याला गावातील मुले चिडवत असत. शांती या सगळ्यात पुढे होती. ती सर्व त्यास शिवानंद बामनाची चक्की म्हणू लागले.शांती त्यास दुकानातील शेंगदाण्याची चिक्की दाखवी व चिडवी. व वाकुल्या दाखवीत असे. तेव्हा तो रागाने पाही. पण याचा तिच्यावर काही परिणाम झाला नाही. तेव्हा त्याने महिनाभर घरातून बाहेर न पडायचे ठरवले.
उन्हाळ्याचे दिवस आले. एके दिवशी शांती व साकरी नदीला धुणे धुवायला गेल्या. वज्रेने घरातील काम आटोपले. आईने म्हशीला फिरवून आणायला सांगितले. म्हैस गाभण असल्याने तिला फिरवले की तिचा व्यायाम होतो. व्यंकूस बोलावले. पण त्याने नकार दिला. कारण मुली त्याला हसतात. व चिडवतात.
वाटेत तिला राधाबाई भेटली. ती तिला म्हणाली, “एवढ्या सकाळी म्हस घेऊन कूठे निघालीस.”
“ नदीवर जरा घेऊन जाते तिचं पाय जरा हलके होतील.”
“पण घरात बाव असताना तिथेच धुवायची. अन् अंगणात फिरवायची.सकाळी गावची जनावरे असतात. तेव्हा झुंज लागायची.”
वज्रा म्हणाली, “ मी काठी आणली आहे.”
असे बोलून ती पुढे नदीवर गेली. नदीवर धुणे धुवायला अनेक स्त्रिया जमल्या होत्या. अनेक जनावरे असलेने नदीचं पाणी ढवळल होत. ते तांबडभडक दिसत होत. वज्रेला म्हस घेऊन येताना पाहून पवाराची सावित्री म्हणाली, “ तू आणि कोठून उगावलिस पाणी खदळायला. घरच्या बावीच पाणी सिंदून म्हस धुवायची सोडून तुला बरी नदी गावली.”
तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून वज्रेन पलकराचा काचा खोवला. व ती पाण्यात उतरली. तिने म्हसीच्या अंगावर पाणी मारले. तसं त्या पाण्यात जाऊन बसल्या. रेड्की मात्र तिच्या भोवताली गोल गोल फेऱ्या मारू लागली. तिने म्हसीला एका पाठोपाठ एक धुवायला सुरुवात केली. म्हशी धुवून झाल्यावर तिचं लक्ष धुणे धुणाऱ्या शांती व साकरीकडे गेले. ती साकरीला म्हणाली, “ काय साकरे हल्ली माझ्याबरोबर जास्त नस्तीयास.”
तिचे ते बोल साकरीला लागले. ती तिला म्हणाली, “ वज्रे तुझे टोमणे कळतात. रोज शाळेला तुझ्यासंगे जाते. व मला म्हणतेस की तुझ्याबरोबर नसते म्हणून. तुझ्यासारख प्रत्येक गोष्ट मनाला लावून धरल, म्हणजे झालंच की चांगभलं.”
वज्रा म्हणाली, “ एवढं कशाला बोलतीयास. मी काही तुला सुळावर चढवले नाही.”
“ हो तर तू शांतीसंग बोलत नाहीस म्हणून मी काय मूग गिळून बसू होय. मला सगळी सारखीच.”
वज्रेस आपण नागिनीच्या बिळावर पाय ठेवल्यासारखं वाटू लागलं. तिचं लक्ष शांतीकडे गेले. ती गपचूप धुणे धूत होती. वज्रेन काही पुढे न बोलता आपल्या म्हशी पुढे दामटल्या. म्हशी नदीचा गोंड चढून वर आल्या. व वाटेला लागल्या. वज्रेन उगवत्या सूर्याला नमस्कार केला. नंतर वेदगंगेला नमस्कार करून ती वाटेला लागली. पुढे वाटेला रेडकी शंकर आबाच्या शेतात डोकावताना तिला दिसली. तस वज्रेन धावत जाऊन एक काठी लगावताच. ती उड्या मारत पळाली. ती मागोमाग निघाली. इतक्यात मागून हाक आली. “ वज्रे थांब, वज्रे थांब.”
तिने मागे वळून पाहिले तर तिला साकरी बोलावताना दिसली. तिचे डोळे पाणावले होते. ते पाहून साकरी म्हणाली, “ काय झालं रडायला.”
तेव्हा वज्रा म्हणाली, “ मी काय तुमची शत्रू आहे काय? एवढं घालून पाडून बोलायला.”
“ हे बघ तू वेड घेऊन पेडगावला जाऊ नकोस. तू जशी बोललीस तसच मी पण बोलले. सोड तो विचार, चल आपण जाऊ.”
शांती तोपर्यंत तिथे आली होती. तिचे मुकेपण तिला खटकत होते. ती म्हणाली, “ बघितलंस किती ताटतेय. चांगल सहा सात महिने झाल असतील कशी मूग गिळून बसलेय.”
तेव्हा साकरी म्हणाली, “ तूच बोलतीस म्हणून बरं, आधी आपण बेडकासारखं फुगायच व नंतर कांगावा करायचा.”
तेव्हा ती म्हणाली, “ होय तर मी कांगावा करतेय. पिंपळावर बसलेली हाडळच नाही का?”
साकरीला राहावलं नाही. ती शांतीला म्हणाली, “ शांते बोल की वज्रेसंगे.”
तेव्हा शांतीला त्या दोघींचा राग आला. ती म्हणाली, “ही काय महाराणी आहे. चांगल महिनाभर हिच्यामाग बोलण्यासाठी हिंडलो. कधी मागून काही न आणणारी मी हिच्यासाठी मी मोग्रीचा गजरा पण गुंफला. पण या बयेला माझी किंमत नाही. हे सगळ माहीत असून देखील तू मला बोलतेस होय.”
तेव्हा वज्रा म्हणाली, “ होय माझेच चुकले, माफ कर मला. की पाय धरू तुझे.”
शांती म्हणाली, “ नको धरुस.”
त्या दोघींच्या डोळ्यातून अश्रु पडू लागले. शांतीने आपल्या डोक्यावरील धुण्याची बुट्टी बाजूला ठेवली. व तिने गच्च जाऊन वज्रेस मिठी मारली. व आपला खूप दिवसाचा अबोला संपवला.”
थोडा वेळ झाल्यावर साकरी म्हणाली, “ तुम्हा सोनार बामणीनीच्या एकित मला मात्र बाजूला ठेवू नका म्हणजे झाल.” तेव्हा त्या हसल्या. व डोळे पुसत घरी निघाल्या. या तिघींना एकत्र येताना पाहून म्हस धुवायला गेलेल्या जानबान पाहिलं. तो म्हणाला, “ काय दोन ओहोळ एकत्र आले वाटत.”
तेव्हा साकरी त्याला म्हणाली, “तुला काय वाटले तू बांध घातलास, म्हणून काय फुटायचा राहतोय का? जा की गपगुमान मुकाट्याने तुझ्या कामाला.” तेव्हा तो खाली मान घालून निघाला. त्याला शांती जाता जाता म्हणाली,” त्या दिवशीचा प्रसाद विसरलास वाटत. तेव्हा तो मुकाट्याने निघून गेला.” आज त्या तिघी आनंदात घरी गेल्या.
क्रमश : पुढे....