गुरुजींना शिक्षा कथा वाकाटखोर्याची भाग ८ लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
गुरुजींना शिक्षा कथा वाकाटखोर्याची भाग ८ लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

सोमवार, ३१ ऑक्टोबर, २०२२

कथा वाकाटखोर्याची भाग ८

८) गुरुजींना शिक्षा

लेखक : निशिकांत हारुगले.

दिवस सरत चालले होते. एके दिवशी आई वज्रेला व व्यंकूला म्हणाली, “ म्हशी सोडा, जरा त्यांचे पाय हलके होवू देत. व धुवून आणा.”

तसे वज्रेन थोरल्या म्हशीला लोडना बांधला. व तिचे दावे सोडून वेसणीला दोर बांधला. व दादाने दुसऱ्या म्हशीला व रेडकीला सोडलं. व बाहेर म्हशी काढल्या. ती दोघे नदीच्या वाटेला लागलीत. ओढ्याला पाणी असलेने अनेक जण जनावरे व धूणं धुवायला ओढ्याला जात असत. शांती व साकरी धूण धूत होत्या. वज्रेन आपली म्हस वरल्या कोंडीकडे नेली. तेथें जाताच म्हस फतकल मांडून बसली. त्या दोघा भनी भावंडांनी म्हशी धुतल्या. व बाहेर काढल्या. म्हस धुवून जाताना शांती न शुक शुक अशी साद दिली. पण तिने लक्ष दिले नाही. साकरी मात्र म्हणाली, “ काय वज्राबाई लवकर म्हस धुवायला आलीस वड्यावर.”

तेव्हा वज्रा म्हणाली, “ माझ्या अगोदर तूच आलीस व मला म्हणतेस लवकर कशी आलीस. तुला तर माझी गरजच नाही बघ. नाहीतर मला बोलवायच्या आधी आली नसतीस.”

वज्रेच टोचून बोलण जाणवल्यावर साकरी तिला म्हणाली, “ बघुया किती दिवस अबोला टिकतोय ते, मी पण याच गावात राहते.”

“ हो तर मग रोज भिंतीवर काठ्या

रोज ओढत जा.” असे म्हणत वज्रेन शांतीकडे भुईतून बघितलं. व ती पुढे गेली. तिच्या पाठोपाठ तिच्या भावाने रेडकी व दुसरी म्हस काढली. व तो ही निघाला. जाता जाता मात्र एक टोमणा मारून गेला. “ बिचाऱ्या मैत्रिणीत किती चांगल चाललं होत. कोण्या नारदाने कळ लावली. देव जाणे.”

व्यंकूचे शब्द कानावर पडल्यावर शांता विचार करू लागली. व तिला आठवलं. की गुरुजींच्यामुळे हे सगळ झाल. तरी देखील आपण वज्रेला बोलती करायचं तिनं ठरवले. ती वज्रा दिसेल तिथे बोलावण्याचा प्रयत्न करी. पण वज्रा तिच्याकडे लक्ष देत नसे.

संध्याकाळी शांता दुकानातून गूळ आणायला चालली होती. तेव्हा तिला वज्रा शेवग्याच्या शेंगा काढताना दिसली. तेव्हा तिने शुक शुक करत बोलावण्याचा प्रयत्न केला. तेव्हा वज्रा शेजारी असलेल्या गणूस म्हणाली, की बाळा चिचुंद्री कुठे दिसते का बघ पाहू. तेव्हा तो मुलगा झाडाच्या बुंध्याभोवती फिरून चिचुंद्री, चिचुंद्री असे बोलत फिरू लागला. शांतीचा मात्र आता चांगलाच स्वाभिमान दुखावला. ती दुकानाला गेली. व परत घरी जाताना वज्रेस तिचा लालबुंद चेहरा दिसला तिला ती रागवल्याच जाणवलं. व वाईट वाटल. आपण हा अबोला जास्तच तानतोय हे तिला जाणवल. आपण साध झाड वेलींना दुखावत नाही. अन् आपल्या जिवलग मैत्रिणीला अस बोलायचं तिला वाईट वाटल. पण यामुळे आपण जास्तच मवाळ झाल्याचं शांतीस जाणवलं. व तिने इथून पुढे ती स्वतःहून बोलल्या शिवाय आपण बोलायचं नाही असं ठरवल. व इथून पुढे तिच्याकडे बोलण सोडाच पहायचं देखील नाही असं तिन ठरवल.

त्या दिवसापासून शांती अत्यंत शांत वागू लागली. घरात आईला कामात मदत करणे. वडिलांना सोनारकामात मदत करणे. बाजारापासून झाडलोटीपर्यंत सर्व कामे ती करू लागली. शाळेला नियमित जाणे. वेळच्यावेळी अभ्यास करणे. यामुळे तिचा दिवस कसा जातो हे तिलाच कळेना.तिचे हे बदललेले वागणे पाहून दामाजीपंत व सुंदरा दोघेही खुश होते. वज्रेलाल देखील शांतेत झालेला बदल जाणवला.तिला वाटायचे हा अबोला संपवला तर तिला जाऊन गच्च मिठी मारावी व आपले हे अबोल दुःख संपवावे. पण तिच्या नजरेस नजर भिडवण्याचे धाडस मात्र आता वज्रेत नव्हते.

 शांतीचा स्वभाव जरी बदलला तरी तिच्या मनात वर्गशिक्षकाविषयी बराच राग होता. बघता बघता दिवस सरू लागले. सहामाही परीक्षा झाली. व मार्क आले. शांतीला वज्राचे तोडीस तोड मार्क मिळाले होते. वज्रेस वाटले की तिला जाऊन आपण खूप शुभेच्छा द्याव्यात. पण शांतीन आपला जर सर्वांसमोर पाणउतारा केला तर. असे अनेक प्रश्न ही तिच्या मनात उठत होते. दीपावलीच्या आनंदात पण या अबोलपनाचे विरजण जाणवत होते. सुट्टी संपली. पुन्हा शाळा सुरू झाली. एके दिवशी सकाळी सकाळी शांती आईला म्हणाली, “ मला थोडी कोराटीची फुले हवी होती. मी जाऊन आणू का?”

आईचा होकार मिळताच ती घरातून बाहेर पडली. व शिवाराच्या वाटेला लागली. पावसाळा संपला असला तरी अंधळशाहीच्या सरी अधूनमधून येत होत्या. अचानक रात्री कोसळलेल्या पावसामुळे गारवा सुटला होता. पायात झालेल्या चिखल वाटेतून वाट काढत ती शिवारात चालली होती. मोर रानात केकावत होते. ती लगेच तुकाआण्णाच्या घाळीकडे गेली. तिथे कोराटीची जाळी होती. तिथली फुले पटापट काढून तिने आपल्या पिशवीत घेतली. सकाळची वेळ असल्याने शिवारात कोणी नव्हते. ती निरव शांतता भीतीदायक व एकलेपणाची जाणीव करुन देत होती. कशीबशी तिन एका गजर्याची फुले गोळा केली व ती वाटेला लागली. जरा पुढे आल्यावर पळसाच्या झाडाची काही पाने तोडून तिने गवत काड्यांनी तिचा द्रोण केला. वाटेत सगुणाआत्तीच शेत लागत असे. त्याला वाटेकडून काळ्या मेहंदीच्या जाळीन आच्छादलेले होते. तिथं आल्यावर त्या मेहंदीत असणाऱ्या एरड मुगलीचा डहाळा तिन मोडला. तेव्हा तिचे लक्ष त्या झाडाच्या हिरव्या बियांकडे गेले. तिला आजोळच्या आजीचे बोल आठवले. की ती सांगत असे. “पोरीवो एरंडमुगळीच्या काड्या जशा दात घासायला चांगल्या. तितक्याच तिच्या बिया विषारी त्यानें विषबाधा होते. त्यांच्या वाटेला जाऊ नका हो.”

  तिला ते आठवले. तिने ती काडी घेतली. दातावरून फिरवत पुढे आली. पुढे तिला कुंपनात कावशीची वेल दिसली. तिने इकडे तिकडे पाहिले रस्त्यावर व वळणावर कोण आहे का? कोणी नाही याची खात्री पटताच तिने जाळीत हात घालून अलगद कावशी काढून पळस पानात बांधली. व आपल्या पिशवीच्या तळाला टाकली. व वाटेला लागली. पुढे वळणावर बाबू पेंटर पेंडीला निघालेला गाठ पडला. त्याचे डोळे लाल लाल कुल्फीगत होते. तो शांतीला पाहून खेकसला.

“ सकाळी सकाळी सापकिरड्याच भुतावाणी कशाला फिरतेस.”

“ थोडी कोराटीची फूल हवी होती.”

शांती उत्तरली.

“ काय गजरा घालून नव्या नवरीवाणी मिरवायला जायची आहेस का? पायाखालचं झाल असत म्हणजे. आज्जा आठवला असता.”

तेव्हा शांतीने डोळे वट्टारून त्याकडे पहिलं.

“ तुम्हा मुलींना फुलं म्हणजे सोन्याहून प्रिय बुवा.पण या वासाच्या फुलांच्या जाळ्यामध्ये भुजांगाचा वास असतो. तो डसला तर पाणीही मागू द्यायचा नाही. जा आता माघारी.”

त्याच्या बोलण्यात करडेपणा होता. पण पोटात फणसावाणी माया होती. शांती हसतच पुढे गेली. थोडया वेळात ती घरात पोहोचली. आई वाट पाहत उभी होती. तिला येताच म्हणाली, “ काय फुलं उमलायची वाट पाहत होतीस काय? मला वाटल इथ जवळ कुठेतरी गेली अससिल तर तिकडे शिवारात गेलतीस होय. चल आटप लवकर अंघोळ करून घे.”

तशी तिने ती पिशवी कणगीच्या कोपऱ्यात ठेवली. व अंघोळीला गेली. पटापट अंघोळ करून तिने आपले आवरले. व सुईदोरा घेऊन ती फुलाच्या पिशवीसवे जिन्यावर गेली. तिने पटपट गजरा विणला. व कोणी पहात नाही हे बघून आपले दप्तर काढून एका कागदात ती कावशी बांधली. व सुरक्षित तळाला ठेवून वर दप्तर भरल. व ती मांजरीच्या पायांनी खाली आली. दप्तर ठेवून तिने नट्टापट्टा केला. व गजरा माळला. आपले आवरले. जेवण केलं. व ती शाळेला गेली. शाळेत गेल्यावर तिला पाहून इतर मुली कौतुक करू लागल्या. वज्रेस वाटत होत की आपणही जावे व शांतीसी बोलावे. मात्र तिचे ताठणे पाहून तिने गप्प राहणे पसंत केले. दिवस कसा गेला हे कळलंच नाही. संध्याकाळ झाली. शाळा सुटली. सर्व मुलांनी आपापले दप्तर भरले गुरुजी ऑफीस मध्ये गेले. वज्राही साकरीसोबत बाहेर गेली. शांती मात्र हळूच शाळेजवळील मोगळात गेली.

मुले गेल्यावर ती हळूच वर्गात गेली. तिने आपल्या दप्तरातील कावशी अलगत काढून टेबल व खुर्चीवर टाकली. कागदाने ती पसरली. तिचे लव्हाळीसारखे काटे पसरले. व कुणी यायच्या आत सगळा कारभार आटोपुन ती वर्गाबाहेर पडली. व घरला गेली. घरी आल्यावर तिने परसात न्हाणीत जाऊन आपले दप्तर धुतले. व उनात घातले. 

दुसऱ्या दिवशी तिने शाळेला जाताना दुसऱ्या जुन्या दप्तरातील आपले शालेय साहित्य घेऊन ती गेली. शालेय प्रार्थना झाली. मुले वर्गात आली. गुरुजी आले. त्यांनी मुलांकडून वर्ग लोटून घेतला. व स्वतः टेबल व खुर्ची झाडून ते त्यावर बसले. थोड्या वेळाने त्यांना खाजवू लागले. ते तडक वर्गातून ऑफिसमध्ये गेले. तिथे हेडमास्तरांना सांगून ते रजा मंजूर करून गावी गेले. हेडमास्तरांनी मुलांना दुसऱ्या वर्गात बसवले. व वर्ग स्वच्छ धुवून घेतला. संध्याकाळ झाली. शाळा सुटली. मुले घरी निघून गेली. शांतीला आनंद झाला. पण तो तिने कुणालाही दाखवला नाही. वज्रेच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. तिला काहीतरी घडले आहे .याची जाणीव झाली. कारण गुरुजी खाजवतच बाहेर पडले होते. पुढे दोन दिवस काही गुरुजी शाळेला आले नाहीत. दोन दिवसानंतर गुरुजी शाळेत आले.

  वज्रेन त्यांना विचारले, “ दोन दिवस कुठे होता?”

आजारी असल्याचे कारण त्यांनी सांगितले. तिचे लक्ष त्यांच्या पायाकडे गेले. त्यांनी कोणतेतरी तेल लावल्याचे जाणवले. पुढे तिने काही विचारले नाही. वर्गात पुढे बसत असल्याने खुर्चीवर गुरुजी बसल्यावर विजार थोडी उचलल्यावर त्यांच्या पायावर ओरखडे दिसू लागले होते. जे त्यांनी खांजळल्यामुळे निर्माण झाले होते. बाकीची मुले अभ्यास करताना वज्रा मात्र विचारात गढून गेली होती. तिचे अभ्यासात लक्ष लागेना. संध्याकाळ झाली. शाळा सुटली. तसे वज्रेन आपले दप्तर भरले. व ती साकरीसोबत निघाली. नेहमी तिच्यामागे दोन पावले असणारी शांती सगळ्यांच्या पुढे होती. व ती आज आनंदात होती. तिच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद होता. तिच्यापासून दूर न राहणारी. व न करमनारी शांती आज एवढ्या आनंदात कशी याचा विचार करत ती गल्लीत आली. तेव्हा तिचे लक्ष पाटलांच्या गुलमोहराच्या झाडाकडे गेलं. गगुलमोहराची लालेलाल फुले मांडवात झालरीसाठी वापरतात. तेव्हा तिला गुरुजी रजा टाकून गेलेल्या आदल्या दिवशी शांतीन घातलेला कोराटीच्या फुलांचा गजरा घातलेला तिला आठवला. ही फुले शिवारात मिळतात. व शांतीनच खुजलीची कावशी आणली असल का? असा विचार मनात आला. कारण वर्गात असा टारगटपणा कोण करणार नव्हत. व गुरुजींनी शांतीला शिक्षा केली त्यामूळे तिनं असं केल असेल तर तिला आपण गुरुजींची माफी मागण्यास लावायच असं ठरवून ती घरी आली.

पुढे क्रमशः....

कथा वाकाटखोर्याची भाग २५

 २५)दादाची सायकल लेखक :  निशिकांत हारुगले. व्यंकू आता खूप मोठा झाला होता. तो कॉलेजला जात असे. घराच्या गरीब परिस्थितीमुळे वज्रेला शाळा सोडावी...