अन् लक्ष्मीची गंमत लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
अन् लक्ष्मीची गंमत लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

गुरुवार, १० नोव्हेंबर, २०२२

कथा वाकाटखोर्याची भाग १२

 कथा वाकाटखोर्याची भाग १२

१२) सागवणीवरील भूत व लक्ष्मीची गंमत.

लेखक : निशिकांत हारुगले.

रविवार उजाडला त्या दिवशी महादेवाचा पाळक होता. शेतातील कामाला सुट्टी होती. तसेच शाळेलाही. त्या दिवशी स्त्रिया घरातील सडासारवण तसेच दळप कांडप करतात. त्या दिवशी वज्रा व शांती घरीच होत्या. वज्रेला तिच्या आईने हाक मारली. व तिला तट्यातिल भात काढायला सांगितले. तट्ट्या म्हणजे बांबूच्या कांबट्टयापासून बनवलेलं जाड तगडासारखे साधन ज्याचा उपयोग भात व धान्य ठेवण्यासाठी केला जातो. तसेच कणुगले ही वापरत.

वज्रेस भात काढणीस सांगितले. तेव्हा ती नाखुशिने तट्टयाजवळ गेली. तेथे खूप अंधार होता. आईने दिवा दाखवला तरच मी भात काढणार असे तिने सांगितले.

तेव्हा आई म्हणाली, “ तुला काही कोणी तिथे खाणार नाही चल गप्प उतार आत. मला कांडाप करायचं आहे. उगाच नखरे करू नकोस?”

तिने आईला दिवा आणायला सांगितला. तशी आई चिमणी लावून घेऊन आली. चिमणीच्या उजेडात वज्रा माळीतील तट्टयाजवळ आली. तिने आईला दिवा दाखवायला सांगितला. तसा आईने दिवा वर धरला. त्याच्या प्रकशात वज्रा चटकन स्टूलावर पाय ठेवून दिवळीत दुसरा ठेवून भींतीच्या खुंटिच्या सहाय्याने ती तट्टयात चढली. तट्ट्यात अंधार असलेने. तिने आईस दिवा दाखवनेस सांगितला. तस आई म्हणाली, “ काढ गपचुप.”

वज्रा छोट्या बुट्टीच्या साहाय्याने भरभर भात काढू लागली. भाताचा बुस्सा उडून नाका तोंडात जात होता. तिचा वेग पाहून आई म्हणाली, “ अग, हळू काढ. काय कुत्र बित्र पाठी लागलय काय?”

पण तिच्या बोलण्याकडे लक्ष न देता ती झपझप काढत होती. तिने पहाता पहाता दोन हारे भात काढले. तेव्हा आई म्हणाली, “ बास बाई. सगळा तट्ट्या उपसाशिल चल बाहेर पड आता. “ आईचे बोलणे ऐकून तिने लगबगीने खालचे राहिलेले भात सरळ लावून ती बाहेर उतरली. बाहेर उजेडात आल्यावर तिला बरे वाटले. तेव्हा आई तिला म्हणाली, “ एवढी कसली घाई लागली होती.”

वज्रा बोलली, “ मागच्या महिन्यात त्या सदू पाटलाच्या कणगीत साप सापडला. तेव्हापासून मला बाई अंधारात भात काढायला भीती वाटते. आपला तट्ट्या पण माजघरात आहे. सगळा अंधार, जर एखादा साप असता तर मला चावला असता ना? म्हणून मी तुला दिवा आणायला सांगितला.”

तेव्हा आईने कपाळावर हात मारला. ती म्हणाली, “ शहाणी आहेस. त्या पाटलाच घर भरलय आसकाटान भोवताली वाढलेल गवत, तिथे साप सापडला म्हणून तुझ्याघरी नाही सापडणार.” तेव्हा वज्रा हसतच परसदारी अंग झाडत गेली. तिने न्हाणी घरात जाऊन भूस्याने माखलेले तोंड व हात पाय खसाखसा धुतले. तेव्हा आईची हाक आली. “वज्रा कांडप करून ठेवते. थोड्या वेळाने माझ्या बरोबर चल.”

तेव्हा वज्रा येतो म्हणाली. व परसदारी गेली. परसातील पेरवनीवर चढून तिने पेरू काढले. दोन चार लालेलाल पेरू तिला मिळाले. ते घेऊन माजघरात गेली. व तिने मीठ लावून ते पेरु खाऊ लागली. इतक्यात थोडया वेळाने तिला आईची हाक आली. व आईने तिला गिरणीला जाण्यास बोलावले होते. ती तिझ्याबरोबर गिरणीला निघाली. त्या गिरणीत पोहोचल्या. पाळक असल्याने सर्व आया बाया गिरणीत जमा झाल्या होत्या. शांती सुद्धा जोंधळे घेऊन आली होती. गिरणीचा मालक फुशारकी मारत होता. वज्रेन व तिच्या आईने शिंद्यांच्या लक्ष्मीच्या मदतीने डोक्यावरील हारा उतरून घेतला. वज्राच्या आईने वज्रेला जायला सांगितले. पण शांती गिरणीत असल्याने तिचा पाय काय निघता निघेना. ती गिरणीच्या दारात कोपऱ्यात उभा राहिली. तिला बघून नंबरच्या पाळीत आपले दळप ठेवून शांती तिच्याजवळ आली. सगळ्या बायका आपल्या आपल्या दळपा कांडपा जवळ बसल्या. होत्या.

इतक्यात शिंद्याची लक्ष्मी गिरणीत दळाप टाकत शेजारच्या मालूला म्हणाली, “ काय सांगू बाई, आता भगटायला उठायचे दिवस नाही राहिलेत.”

तिचं हे बोलण ऐकताच शेजारच्या बायका तिच्याकडे आश्चर्याने टक्का मक्का बघु लागल्या. इतक्यात शिंप्याची बायक्का म्हणाली, “ काय ग, काय झालं, ते सवन सांग की.”

तशी ती म्हणाली, “ काय सांगू बायाक्का मावशी, काल रोजच्याप्रमाणे कोंबडा अरावला. तवा शेण काढायला उठले होते. परसदराची बुट्टी आणायला गेले. तवा पाटलीनीच्या परड्यात मला दिसलं.”

“ काय दिसलं ग लक्ष्मी.” जना पाटलीन म्हणाली, “ अव बाईसाब, काय सांगू तुम्हाला पाटलीनीच्या मेसाजवळ, ते सागवणीच झाड आहे ना, ते गारीजवळ, तिथं मला बाई बसलेली दिसली बघा. मला काकणांचा आवाज पण ऐकू आला बघा. तिन माझ्याकडे पण बघितलं”

“ मग काय झाल ग?” बायक्का म्हणाली.

“ मग मी झटकन मागे फिरले. व घरात येऊन दार झटकन लावलं. बघा तवापासून सूर्याचं किरण दिसल्या शिवाय मी शेणच काय धार बी काढत नाही. म्या नवर्याला स्पष्ट सांगितलं, मला भगाटल्याशिवाय शेण काढायला जमणार नाय. नांदण गेलं तरी चाललं.” लक्ष्मी म्हणाली.

 तेव्हा मालू गुरवीन म्हणाली, “काय ग बाई, हे आणि नवीनच म्हणायचं, कलयुगच नव्ह का? अशी दिसाची भूत फिराय लागली. तर माणसानं कसं जगावं म्हणायचं.”

शांता व वज्रा सगळ कान देवून ऐकत होत्या. वज्रा रामरक्षा मनात पुटपुटू लागली. ते बघून शांती म्हणाली, “ हे बघा, खुळ लागलं बडबडायला. वज्रे भूतबित काही नसतं. त्या लक्ष्मीच्या अंगात शिरलाय आळस, काम नको करायला. कोकण याड नुसतं. कोकण्या कडगावची आहे ना ती. असल्या कल्ड्या पिकवल्यावर नवरा कशाला उठवतोय, शेण काढायला. चांगली सूर्याची उन्ह येईतोपर्यंत घोरत पडत असेल नुसती म्हशीसारखी.”

शांतीच बोलणं लक्ष्मीने ऐकलं. ती लगेच म्हणाली, “खुट्टयातन वर आलीस काय ग? मला म्हैस म्हणतीस काय सोनारणी. एवढं मी कलड्या पिकवतोय अस वाटत ना तुला, तर जा की त्या पाटलीनीच्या परड्यात रात्रीला.बाजल टाकून झोपून दाखीव बघू. अन् मग बोल मला कल्डया पिकवतोय म्हणून.” लक्ष्मीचा आवेश पाहून पार्वती म्हणाली, “शांते गप्प बस की, थोरा मोठ्यांच्या बोलण्यात आपण अस काही नाही बोलू नये. मोठ्या माणसांनी चार ध्याड पाहून अनुभव घेतलेला असतोया. तेच ते बोलतात. तू गप्प बसत जा.”

तशी शांती गप्प बसली. तशी वज्रा कावरी बावरी झाली. व म्हणाली, “शांते तू गप्प बस की. उगीचच मधी मधी नाक खुपसतेस.”

इतक्यात मालूबाई पाटलाच्या रखमाला म्हणाली, “ रुक्मिणीबाईसाब जरा जपून जावा परड्यात.”

तेव्हा रुक्मिणी पाटलीन बोलली, “माले तुला पण काय याड लागलंय. तू शांत बस, तुला काय पण ठाव नाय.”

तिचं बोलणं ऐकून लक्ष्मीला राग आला.ती म्हणाली,

“ एवढं माझ म्हणणं खोटं वाटतंय तर तू व ती शांती दोघीजणी जावा त्या सागवनीखाली बांधा झोपाळा व येत्या पूनवेला जागर करा म्हणजे माझा विश्वास पटलं. तुम्हाला त्या शिवाय माझं म्हणणं पटायचं नाही.” असं बोलून तिने गिरणी खालच दळप काढल. व दंडाच्या धडीतील दोन रुपड्या काढून गिरणीवल्यांच्या हातावर टेकवल्या. व ती टाचा आपटत गिरणीतून बाहेर गेली.

तेव्हा मालू रुक्मिणीला म्हणाली, “का हो रुक्मिणी बाईसाब तुम्ही असं लक्ष्मीला बोलल्यासा.”

तेव्हा रुक्मिणी म्हणाली, “ काय सांगू बाई तुला त्या दिवशी गारव्याच्या भेटीची पोळी अन भाकरी पवारांच्या शोभीन आणून दिली होती. तिचा भाऊ केंबळीसंन घेऊन आलता नव्ह. त्या भेटीची पोळी नको म्हणताना सासून खायला लावली. व लागला की पहाटे पोटात मुरडा मारायला. सासूला कशी उठवायची. नवऱ्याला उठवायला गेले तर नाही म्हणाला. व लागला भिंतिकडं तोंड करून घोरायला. तवा शेवटी भित भित उठले. रकेल तेलाची चिमणी पेटवली. अन् गेले परसात.आमचं परड म्हणजे कोकणातली हर तऱ्हेची झाड आमच्या अज सासऱ्यान लावलेली. घुडूपच नव्ह अंधाराचा. तवा त्या सागवणीच्या जवळच्या पायदानात निघाले. पायदाण्यात जायच्या आधी मेल कुठून वार आल् अन् चिमणी विझली. कळ आवरली नाही, म्हणून गारीवरच बसले. तवा शिंद्याची लक्ष्मी दार उघडून बाहेर आलती. तिने माझ्याकडे बघितल अन् माग वळून झपकन दार लावून घेतलं. तेव्हाच मी समजले की लक्ष्मी मला बघून भ्याली. म्या मघाशी उगाच बोलले नाही. कारण राबतय ढोरासारख. त्या निमित्तान का असेना सूर्य उगवतोवर झोपायला तरी मिळत तिला, नाहीतर रोजचा प्रपंच आहेच की. खुरपं, चूल, बांध अन् शेण पाचवीलाच पुजलेल आम्हा बायकांच्या. मागल्या शनिवारी नवऱ्यानं बाई कोळपा वढायला येत नाही म्हणून पायावर इसकी मारली, अजून पायावर वळ आहेत बघ तिच्या. आमच्या घाट कोकणच्या पोरी शेवाटी साऱ्या राबण्यास देसोऱ्यासनी सुद्धा नाही कामाला बदायच्या. तिच्या बापाच्या घरात कधी कोळपा बघितला नाही. रोपची रान तेंची. तिची निपाणीची सासू आपलाच तोरा मिरवती असती. कोळपा वढला तर शेत काम आलं नव्ह. हिंमत असेल तर ये म्हणावं आमच्या नाळीत, मग बघू गुडघाभर चिखलात रोप टवायला तवा बघते. लक्ष्मी पुढं जाती का ती ते. माळा मुर्डाच्या रानाच्या भांगलनीच कवतिक सांगती.

राबाय तेवढी पाहिजे  व खायला घालायला माग का सरती. मला तर बाई लई राग येतोय. तिला बघितलं तर खाऊ की गिळू वाटतंय. मी तर परवा धूणं धुयाला गेल्यावर जाताना लुगड्याच्या धडितन भाजी भाकरी चोरून नेऊन दिली. कशी वर्षाची भुकेली असल्यासारखी तिन खाल्ली.  डोळ्यातन पडणार पाणी सगळ काही सांगत होत. तिची सासू मला कशी म्हणती की तूझीच फूस हाय तिला. तिच्या भागातील आहे ना मी. म्हणती कशी सासूला सांगून तुला चांगलीच निपाणी दाखवाय लावते. तेव्हा मला पण तिचा राग आला. मी पण वाटच बघते, ही बया कवा  मला बोलतीया याचे. मी पण म्हंटले मला काय निपाणी दाखवतीय. ज्या नदीचं पाणी पिवून तू वाढलीस त्या नदीच्या उगमाच्या व्हळीची मी हाय. तुलाच चांगल कडगाव पाटगावच पाणी दाखवीन, चांगल वेताच्या बेटातल.  माझी पण आई निपणीची व ही पण बया, खरं दोघित जमीन अस्मानाचा फरक आहे.  तवा मला  म्हणती कशी. सासू गरीब गावलिया म्हणून टेंबा मिरवू नकोस. तुला चांगली माझ्यासारखी मिळाय पाहिजे होती. चांगली नालाची वेसण घालणारी. मलापण राग आला. मी म्हटलं वाटेवरची आक्कूबाईची विहीर बघून पवायला येतय का? तेव्हा म्हणती कशी पवायला यायला बाप्याची जात नव्ह माझी, तवा मी पण म्हटल गुमान वाटण जा, नाहीतर अक्कुबाईच्या विहिरीत ढकलिन. कुणाच्या बाला पण कळणार नाही. तवा गेली गप्प मांजरागत. मी म्हटल पडल्या झडल्यावर लक्ष्मीचं पाहिलं तुझ. तुझी लेक येणार नाही निस्तरायला तेव्हा गपचूप घरला गेली.”

तेव्हा मालू गुरवीन म्हणाली, “ बर झाल हान्न मोडलस म्हातारीच. लई नाटकं करतिया. भांगलायला स्वतःच्या शेतात दोन्ही हातांनी रान वरबाडती. अन् दुसऱ्याच्या शेतात गेल्यावर नवशिक्या  पोरींच्या मागच, कामचुकार मेली.”

वज्रा व शांता शांतपणे हे सार बोलण ऐकत होत्या. वज्रेन ते ऐकूण  रामरक्षा म्हणायचं विसरली. व शांतीकडे बघत खुदकन हसू लागली.

शांतीला पण आपण लक्ष्मी काकूंना असं बोलल्याच वाईट वाटल. थोड्या वेळाने त्या दोघींनी आपापली दळप कांडप आटोपली.  व वज्रा आपल्या आईसोबत व शांती आपल्या घरला गेली. घरी आल्यावर वज्रेन आपल कांडप ठेवलं. व ती बाहेर शांतीसवे खेळायला निघून गेली.

…. ….. ….. …..

क्रमशः पुढे….




कथा वाकाटखोर्याची भाग २५

 २५)दादाची सायकल लेखक :  निशिकांत हारुगले. व्यंकू आता खूप मोठा झाला होता. तो कॉलेजला जात असे. घराच्या गरीब परिस्थितीमुळे वज्रेला शाळा सोडावी...