लेखक : निशिकांत हारुगले.
एम. ए. बी.एड.
पूर्वीच्या काळी डॉक्टरकीचे काम वैद्य लोक करत असत. राजेरजवाडे असोत. वा सामान्य माणसं निसर्गात मिळणारा झाडपाला हिरडा, बेहडा, तुळस या सारख्या औषधी वनस्पतींचा वापर करत असत. पुढे आधुनिक जगात वेगवेगळ्या रसायनांचा शोध लागत गेला. व झाडपाल्यांच्या औषधांना आयुर्वेदिक गोळ्यांचे रुप प्राप्त झाले. व उपाय म्हणून वेगवेगळ्या रसायनाने निर्माण गोळ्यांचा वापर होऊ लागला.
भारत सरकारने वेगवेगळ्या शिक्षणाद्वारे नवीन डिग्री तयार केली. त्याद्वारे नवीन डॉक्टर निर्माण झाले. पण हे डॉक्टर शहरी भागातच आपले बस्तान मांडून बसले. ग्रामीण भागात पेशंट कमी, त्या मानाने शहरी भागात पेशंट जास्त व इतर सुखसोयी त्यामुळे शिक्षणाला घातलेला पैसा पण वसूल होई. त्यामुळे डॉक्टर ग्रामीण भागात जास्त नसत. त्यामुळे ग्रामीण भागातील लोकांना उपचारासाठी एकमेव आधार असे तो तेथील नर्सबाईचा. व तिच्या जोडीला असणारा मलेरिया अधिकारी किंवा कुष्टरोग तंत्रज्ञ. हे त्रिकुटच ग्रामीण भागात जास्त राबताना दिसते.
नर्स व तिच्या बरोबर फिरणारा डॉक्टर पाहिला की त्यांच्या बाबत माणुसकी सोडून चर्चा करणारी माणसे आपण पाहतो. पण कोळशाच्या खाणीत जसे हिरे असतात. तसे आपल्या काळ्या केसांचे पांढरे पण होई पर्यंत प्रामाणिक राबणाऱ्या नर्सा अनेक आहेत.
अशा या क्षेत्रात राबणारी एक नर्स तिची ही कहाणी. माधुरी ही एक नर्स पेठत असणाऱ्या केंद्रावर तिची नेमणूक झाली. दिसायला देखणी , पश्चिम महाराष्ट्रात एका गरीब मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेली, व्यवसायाने ती नर्स होती. प्रतिकूल परिस्थितीमुळे ती या व्यवसायात पडली होती. अशा या नर्सची नेमणूक पेठच्या गावात झाली होती.
नोकरीवर रुजू झाल्यानंतर गावातील लहानापासून वृधापर्यंत सगळ्यांचे आरोग्य तपासणी , नसबंदीची कामे व इतर नेमलेली कामे करण्याची जबाबदारी तिच्यावर होती.
तिच्याकडे नवनवीन पेशंट येत असत. कधी क्वालरा कधी टायफॉइड व इतर त्यांना तपासताना तिची हसून दमछाक होत असे.
एके दिवशी ती गावातून फिरत असताना प्रत्येक घरावर नोंदणी करण्याचं व लहान मुलांच्या पोलिओसाठी नोंदीची ती काम करत चालली होती. गाव व आसपासच्या वाड्या ती फिराय लागली.
पेठतून फिरत एका घरावर ती नोंदणी करताना एक म्हातारी तिला बघून तिला म्हणाली, “ डॉक्टर बाई मला पण औषधं द्या.”
नर्स, “ काय होतंय ते सांगा.”
म्हातारी बाई, “ माझ्या की नाही पोटात तोडल्यासारख होतंय.”
नर्सन निरिक्षण केलं व ती म्हणाली, “ संध्याकाळी लावून द्या एखाद्या पोराला, देते औषध पोटावरील कळीचं.”
एका घरात तर तिला वेगळाच अनुभव आला. त्या घरातील स्त्रीचा नव्हरा नोकरीला बाहेरगावी गेला होता. त्यामुळे तिला करमत नव्हते. दारावर नोंद करताना तिने नर्सेला आत बोलावले. ती बाई नर्सला म्हणाली, “ बाई काय सांगू मला कससच होतंय.”
नर्सबाई “ कससच म्हणजे नेमकं काय होतंय.”
ती बाई, “ काय सांगू बाई मागल्या महिन्यात धनी होतं तवा झोप चांगली लागायची. पण आता झोपच येत नाही. मला करमत नाही.”
नर्स, “ अहो हे मानसिक दुःखन झाल. शारीरिक नाही. यावर माझ्याकडे इलाज नाही.”
अशा प्रकारे ती सर्व गावचा सर्वे करत गावाबाहेर एका मांगाच्या घरात आली. गावच्या खालच्या बाजूला असणारे हे मांगाचे घर म्हणजे दोन तीन सोपे. त्याला ताट बेळ्याच दार त्यावर लिहिणार कसं. म्हणून बाजूच्या भिंतीवर रंगीत खडूने तपासणी नंबर टाकला. व ती म्हणाली, “ घरात कोण आहे का?”
तेव्हा आतून एक बाई बाहेर आली. व त्या नर्सला बघत म्हणाली, “ काय हाय डागतरीन बाई.”
नर्स, “ घरात मुले किती हाईत. “
ती बाई लाजून म्हणाली, “ चार पोरी हाईत मला.”
घरामाग चामड धूणारा तिचा नव्हरा आला. व म्हणाला, “ चार पोरी हाईत, अजून पोरगा झाला नाही.”
माधुरी नर्स तेला म्हणाली, “ आव पोरगा आन पोरगी असा भेद करू नये. घरात नाही खायला आन उगाच ढीगभर पोर कशाला, शिवा आदी तिला. भारताची लोकसंख्या वाढतिया.”
तेव्हा तो मांग म्हणाला, “ वाढली तर वाढूदेत. आम्ही मेल्यावर तिटव धरायला नको का कोण.”
तेव्हा वाद न घालता ती पुढल्या घरावर गेली. अशीच ती नोंद करत पाटलाच्या घरला गेली. दारावर नोंद करत तिन हाक मारली. तेव्हा पाटलाची मुक्ताबाई बाहेर आली. व म्हणाली, “काय काम हाय हो.”
नर्सबाई, “ जरा डोसाच काम आहे. तेव्हा घरात मूल किती आहेत?”
तेव्हा पाटलीन म्हणाली, “ आमच्या घरात होय थोरल्याला दोन गंडे हाईत व धाकट्याला चार पोरी हाईत.”
नर्सबाई, “ दोन मुलांचा कायदा असताना इतकी पोर काढणं गुन्हा हाय. अशान तुमचं रेशन बंद होईल.”
मुक्ता पाटलीन म्हणाली, “ हू मला शहाणपण शिकवत्यात शाळा शिकली नसली तरी अक्कल हाय मला बाई, माझ्या धाकट्याला मुलगा नको.”
नर्सबाई म्हणाली, “ पण मावशी पुढला पोरगा होईल कशावरून. अन् पोरगी झाली तर.”
नर्सच बोलण तोडत ती म्हणाली, “ तुम्हाला काय ठाव पोरग्याच महत्त्व. पोरी पोरी काय कामाच्या आम्ही मेल्यावर वेशीतून रडत यायच्या व बारादिवसाला पातळ नेसायच्या. माझा पोरगा माझ्या मड्यावर लाथेन माती सारू दे. फिटल माझं. माझ्या माहेरच्या देवीला नवस केलाय मी. माझ्या धाकल्याला पोरगा होऊंदे, मी दंडवत घालेन म्हणून. माझी देवी मला पावल्याबिगर रहायची नाही.”
नर्स बाईला काय बोलावं ते सुचेना गुपचूप दारावर नंबर टाकला. व ती पुढल्या दाराला निघाली. मनातल्या मनात म्हणाली, “ देवा परमेश्वरा हीच्या पोराला पुढली पोरगीच होऊ दे.” व ती पुढे मार्गस्थ झाली.
लसीकरणाचा दिवस उजाडला. की तिची तारांबळ होत असे. गावातिल बायकांना दहा बारा वेळा तरी डोसला बुलवावे लागे. पावसाळ्याचे दिवस असले की साथीचे रोग थैमान मांडत. गावात कोंबड्यांना रोग आला तर लोक नर्सबाईकडे धाव घेत असत. आपल्या पोटात चावतय, डोकं दुखतंय, ताप आलाय अशी कारणे सांगून गोळ्या नेत.
पेठच्या गावात मे महिन्यात गरमीत कोंबड्यांचे रोग थैमान घालत आसत. व गोल मटोल आंडी घालणाऱ्या कोंबड्या झिंगायला लागत. तसेच बुळकायला लागत. पेठत राहणाऱ्या ज्ञानु जगतापला पण कोंबड्या पाळायची खूप हौस. गावातील कोंबड्यांच्या पाठोपाठ त्याच्या कोंबडीला पण रोगाने पकडले. त्या पाठोपाठ त्याचा कोंबडा पण झिंगायला लागला. त्याला काय करावे ते सुचेना. शेवटी त्याने नर्स बाईकडून गोळी आणायचे ठरवले. व तो नर्स बाईच्या सरकारी निवासस्थानी गेला. व म्हणाला. की आमच्या आईला ताप आलाय. व त्यावरील गोळी द्या. तेव्हा नर्स बाईने विचारले, “ केव्हापासून ताप आलाय.”
तेव्हा ज्ञानु म्हणाला, “ मघासी शेतातून आली. तेव्हापासून ताप आलाय. व त्यावर गोळी द्या.”
तेव्हा नर्सबाई तेला म्हणाली, “ रक्त लगवी तपासायला पाहिजे. मग औषध देता येईल.”
तेंव्हा तो म्हणाला, “ एवढ्याशा तापाला कशाला पाहिजे रगात, द्या की गोळी एखादी.”
तेव्हा नर्स बाईन आपल्या जवळील दोन गोळ्या त्याच्या हातावर टेकवल्या. तो घरला निघून गेला. दुसऱ्या दिवशी नर्सबाई वाडीच्या गावांना तपासणीसाठी निघाली. तेव्हा वाटेत तिला ज्ञानुची आई भेटली. तेव्हा तिने तिला विचारले. की काल तर ताप होता. व आज कुठं गेला होता. औषध घेतल्यानंतर एक दिवस तरी विश्रांती घ्यायची.”
ती म्हणाली, “ मला बरं नसायला काय झालं. चांगली हट्टी कट्टी हाय.”
तेव्हा नर्स म्हणाली, “ मग ज्ञानु काल तुमचं नाव सांगून कोणाला गोळ्या घेऊन गेला. तेव्हा ती काही न बोलता निघून गेली. सर्वेवरून येताना ज्ञान्याला खेळताना तीनं बघितला. तेव्हा ती तेला म्हणाली, “ ये ज्ञान्या काल आई आजारी आहे. म्हणून खोटं सांगून गोळ्या आणल्यास नव्हं. काय केलंस त्या गोळ्यांचे.”
इतक्यात तिथे खेळत्याला पवाराचा गणू म्हणाला, “ बाई त्यानं ती गोळी आपल्या झिंगत्याल्या कोंबड्याला घातली. त्त्यो बघा कोंबडा झाडाखाली बसलाय.”
नर्सबाई चिडली व तेला म्हणाली, “ व्हय रे गाढवा इथ माणसाना द्यायला गोळ्या मिळत नाहीत आन तुझ आपल बर चाललय. ये आता परत गोळ्या मागायला.तुला दाखवतो.” असे म्हणून ती आपल्या रूमवर गेली.
सरकारी नियमानुसार ऑपरेशन टार्गेट पूर्ण करावं लागतं असे. त्यामुळे ती इकडल्या तिकडल्या पेशंटना गोळा करत असे. पण पुरुष नसबंदी म्हंटल की आपल्या पुरुषत्वावर हल्ला समजला जात असे.
एकदा सरकारी नियमानुसार पुरुष नसबंदीची केस हवी होती.तेव्हा गावातल्या तसेच वाडीतल्या अनेक पुरुषांची चौकशी केली. पण कोण तयार नव्हता. शेवटी एक दोन मध्यमवयीन माणसाना तयार केलं. ती ऑपरेशनला घेऊन गेली. तेव्हा डॉक्टर तिला म्हणाला, “ यासनी कशाला घेऊन आल्यासा यांची काय झाड व्हायचीत , आताच मर्तुकडी दिसत्यात.”
ती डॉक्टरला म्हणाली, “ हे बघा दोन पेशंट पाहिजेत ना मग हे घ्या. नाहीतर माझ्याकडे पेशंट नाहीत.उगाच वाडाचार लावू नका.”
तेव्हा त्या डॉक्टरने त्यांची नसबंदी करायला घेतली. तेव्हा असे जाणवले की, त्यांची आधीच नसबंदी झाली होती. डॉक्टरने तिला चांगलेच धारेवर धरले.
नर्स चिडून म्हणाली, आता मी काय त्यांना तपासून आणायचं राहिलय. आधी पुरुष नसबंदीची केस मिळत नाही. व मिळाल्या तर या अशा आम्ही काय करावं. वरच्यासणी नुसतं बोलता येते. त्या अधिकाऱ्याना म्हणा आधी तुमची नसबंदी करा. व मग आमच्याकडे केसेस मागा. डॉक्टर त्यावर गप्प बसला. व त्या दोघांची नोंद घेतली. व त्याना अनुदान दिले. व रिकामा झाला. सरकारी अधिकारी म्हणजे वार वार बदल्या या ठरलेल्या त्यानं वैद्यकीय अधिकारी म्हंटले म्हणजे बदली नसेल असे होणारच नाही. सरकारी हॉस्पिटल मधील डॉक्टरची बदली झाली. व त्या ठिकाणी एक साखरदांडे नावाचा अधिकारी रुजू झाला. तो जरा रंगेल असल्याने बायकांच्याकडे पाहण्याचा त्याचा दृष्टीकोन विचित्र होता. नेहमीप्रमाणे माधुरी नर्स रिपोर्ट जमा करणेस आली. तेव्हा तिला पाहताच याच्या मनात विचित्र विचार आले. व हा रंगेल चेंडू लागला की गोंडा घोळायला. मुद्दाम एखाद्या सामान्य केसची जास्तच चौकशी करणार. त्यातून लगट करायचा प्रयत्न करायचा. कोणत्या न कोणत्या कामासाठी हा तालुक्याला बोलवायचा. याच्या बोलण्याने नर्स जाम वैतागून गेली होती. तिला अवघडल्या सारखं व्हायचं. पहिलं ज्या सरकारी दवाखान्यात अगदी आनंदात जायची तोच आता जेल सारखा वाटाय लागला होता. त्याच्या या वागणुकीमुळे सगळे डॉक्टर व इतर स्टॉप तिच्याकडे संशयाने पाहू लागला.
तिच्या बरोबर काम करणारा मलेरिया अधिकारी तिला डिवचून बोलू लागला. एकेदिवशी त्या मलेरिया अधिकाऱ्याने तिला खुणावले. तेव्हा तिने त्याच्या एक कानफटात लगावली. तिचा नाजूक हात असा जोराचा बसला की एखाद्या राकट माणसाचा बसावा. त्याने त्याला दिवसाच्या चांदण्या दिसायला लागल्या..तेव्हापासून तो तिच्या पुढ्यात एखाद्या मांजरासारखा राहायला लागला.
आपल्या शुद्ध चारित्र्यावर हा डाग पडतोय. तेव्हा या साखरदांडेचा कारलेदांडा करायचा व याचा एम बी बी एस डिग्रीचा नक्षा उतरायचा चंगच माधुरीने बांधला. एके दिवशी तिने आपल्या नव्हर्याल हे सगळं सांगितलं. व यावर उपाय काय करायचं ते ठरवू लागली. तेव्हा तिच्या ध्यानात आले. की तिच्या नव्हत्याच्या एक राकट मित्र संजय जो भांडखोर आहे त्या द्वारे याला धडा शिकवायच तिने ठरवले.
एके दिवशी तिने संजयला जेवायला बोलवून घेतले. व चांगला मटणाचा बेत केला. जेवता जेवता त्यापुढे विषय काढला. तेव्हा संजय म्हणाला, “माधुरी ताई तो डॉक्टर कधी रिकामा असतो ते सांग.”
माधुरीने आधीच माहिती काढली होती. तिने सांगितले. की तो रोज सकाळी पालीच्या घाटाकडे फिरायला जातो. तेव्हा संजू म्हणाला, “ मग काम फत्ते होणार.”
दुसऱ्या दिवशी पालीच्या राईच्या वाटेला संजू व त्याचा मित्र गाडी घेऊन भगटायला थांबले. गाडीची नंबरप्लेट काढली होती. थोड्या वेळाने धावत घाटाकडे निघालेला डॉक्टर दिसला. संजयचा मित्र मागे जाऊन त्याला म्हणाला, “ नमस्कार साखरदांडे डॉक्टर साहेब”
डॉक्टर म्हणाला, “ नमस्कार.”
तो डॉक्टर आहे याची खात्री पटताच. त्याने संजयला खून केली. तसा संजय मागून आला व डॉक्टरच्या डोक्यात टपली मारली. व रस्त्यावर कोण नाही बघून बाजूच्या झाडीत डॉक्टरला ते घेऊन गेले. डॉक्टर घाबरला, “ तुम्ही कोण आहात.”
इतक्यात संजय थोबाडात एक लगावली. व म्हणाला, “ बायकांच्या लई खोड्या काढतोस, पेशंट असो नर्स असो लई वाघटा सारख्या जिभल्या चाटतोस." असे म्हणून बडिवला. व ते निघून आले.
त्या दिवसापासून त्याचे वागणे बदलले. बायकांकडे तो नजर वरकरून बघायचे सोडाच. माधुरी नर्सबाई न म्हणता नर्सताई म्हणू लागला. थोड्या दिवसांनी त्याने बदली करून घेतली.
थोड्या दिवसांनी माधुरी नर्सेची पण बदली झाली. व ती सुद्धा आपले बस्तान गुंडाळून पेठचं गाव सोडून आपल्या बदली झालेल्या ठिकाणी गेली. व आपल्या आयुष्यातील आठवणी तीनं पेठत ठेवल्या.
लेखक. : निशिकांत हारुगले.
