लेखक : निशिकांत हारुगले.
एम. ए. बी. एड.
गाव : पुष्पनगर
तांब्याच्या वाडीची वेदगंगा भुदरगडाच्या पायथ्याला नांदते. तिच्या काठावर वसलेले पेठच गाव होते. तिथल्या लोकांचा मुख्य व्यवसाय शेतीचा होता. घर संसार म्हटलं तर खर्च आलाच. शेतीतील उत्पन्नावर भागवणे अवघडच. चार सहा महिन्याचा पावसाळा सरला की शेतातून मिळणारे तांदळाचे चार दाणे, व बांधाला लागलेल्या वरण्या- जगदाल्याच्या शेंगा, हा काय तो चरितार्थ, कधी पीठलं कधी मासळी असे खाद्य ते खात व सणाला केलेली पुरणपोळी हेच काय ते जेवण, या बाहेर हॉटेलचे चमचमीत काय ठाऊकच नाही.
शेतातील उत्पन्नास पाळलेल्या गाई, म्हशीच्या दुधाची काय ती जोड असायची. गोकुळचा संघ झाला. त्यामुळं फुकट पासरी जाणार दूध जरा त्याला भाव यायला लागला. त्यामुळे लोकांची चलती झाली. व साध्या खापराच्या घरावर बेंगलोरी कौलारू झालर चढली. अशा या पेठेत गणपत राहत होता. पण त्याला बारशात कोणतरी गणपतराव म्हटलं असल. नाहीतर रोज त्याला गण्या शिवाय हाक मारली नाय तर शपथ. असा हा गणा मोठा झाल्यावर त्याचं लग्न ठरवायला लागले. घरची परिस्थिती बेताचीच होती. यामुळे कोणी पोरगी देईना. सगळे म्हणत. “ हाच भिकारी पोरीला काय सुख लावणार.”
आपल्या घरात खायला काही नसना पण नवऱ्याच्या घरात पोरगी सुखात रहावी ही प्रत्येक बापाची अपेक्षा असते.
गणाचं काही केल्या लग्न जमत नव्हते. म्हणून गणाच्या बापानं घरात कणग्यांची रांग लावली. व त्यामधे लाकडाचा भुसा व कोंडा भरला. व वरती भाताचे चार दाणे पसरले व लिंपण घातले. कोकणातल्या लोकांना याचे कारणामे माहित असलेने, त्याने देश मुलखात पोरी लग्नासाठी बघायला सुरवात केली. लग्न होत नसल्याने गणा मात्र रडायच्या घाईला आला होता. त्याच्या वर्गातील त्याचे जुने मित्र मात्र चिडवत होते, ते म्हणत, “ गणा तुझ्या नशिबात देवाकडे विमानावरून जाणं काय लिहिलं नाही वाटत, घोंगड्यातून जाशील.”
तेव्हा गणा चिडून त्यांना म्हणे,
“ तुमची मढी जाऊ देत तिरडी वरून, मी काय बिन लग्नाचा मरणार नाही. जर का कुणी मुलगी दिली नाहीतर एखादी पळवूनच आणीन, बघाच तुम्ही.”
गणाची ही अवस्था त्याच्या आत्तिला बघवत नसे. तिने आपल्या लांबच्या निपाणीतील पाहुण्यातली एक मुलगी स्थळ म्हणून काढली. मुलीचा बाप जातीचा हेड्या पण त्याला म्हशीतील जेवढं जमे त्यापेक्षा लग्नातील काहीच जमत नसे. भेटीगाठी झाल्या, एकदाचं लग्न ठरलं. दोन्ही घरची परिस्थिती गरीब असलेने लाखेचं मंगळसूत्र घालून कसबस गणाचं लग्न पार पडलं. व गणाचा संसार सुरू झाला. थोड्या दिवसात नव्या सुनेला कणगीतल्या भाताची गंमत कळाली. व तिने भांडण काढले.
व म्हणाली, “ बरे आहात की बाप- लेक आम्हाला घरात धान्य भरपूर आहे शेत आहे. म्हणून फसवलत नव्ह. केसा न गळा कापला माझा. कणगीत कोंडा भरला व सांगतात भात आहे म्हणून.”
असे बोलून गणाच्या बायकोन घर चांगलच डोक्यावर घेतलं होत. गणाची आई तिला समजावण्याचा प्रयत्न करीत होती. “ आग गप बसं भावकित अब्रू घालवू नकोस म्हणून. मी तुझ्या पाया पडते ग.”
असे म्हणून देखील तिने दोन दिवस घर डोक्यावर घेतले. व दोन दिवसांनी ती आपल बोचक गुंडाळून माहेरी निघून गेली. सगळे गणाला चीडवाय लागले. “ गण्याची बायको पळाली. अग ग.”
गणला तर लग्न करूनच चुकलं की काय असं वाटायला लागलं. दोन दिवस झालं मुलीचा बाप त्या पोरीला घेऊन आला. सगळे आश्चर्यानं तिच्याकडे बघत होते. कालपर्यंत नाव ठेवणारी सुगंधा पाटलीन गणाच्या बायकोला न रहावून म्हणाली, “ काय ग रखमा नांदण टाकून गेलतीस नव्हं, आणि दोन दिवसात परत आलीस व्हय ग.”
आधीच राग त्यात ही सुगंधा असं म्हणत्याले ऐकूण ती फाडकण तिला म्हणाली, “नांदण टाकून जायला मी बाजार बुणगी नव्हं, जातिवंताचीच आहे. जर माहेराला गेले नसते. तर ह्यो हेडया बा आला असता काय माझी संसाराची घडी नीट बसवायला. जशी यानं मला दिली तशी माझी नीट व्यवस्था लावू देत.”
असे म्हणून ती घराकडे गेली. घरात आल्यावर तिच्या बापाने गणाला व त्याच्या घरातल्यासणी फैलावर घेतले. थोड्या वेळाने त्यानं बघितलं घरात म्हस देखील नाही.
तेव्हा त्यानं सांगितलं घरात काय थोड पैसे आहेत काय. तर गणा म्हणाला, “ लग्नात सगळे संपले.”
तेव्हा त्याची लेक रखमा म्हणाली, “माझ्या घरातील पैसे घेऊन मलाच म्हैस घेऊन द्यायला बोलवलं नाही. बाबा तूच दे. तुझे पैसे घालून.”
तेंव्हा तो म्हणाला, “ माझीच लेक नव्हं, कशी शब्दात गावल. तवा उद्या शुक्रवार हाय कोकन्या कडगावचा बाजार हाय. तेव्हा जावईबापू तुम्ही या तिथं बघू एखादी म्हैस.”
असे म्हणून त्यानं चहा घेतला व त्यो गेला. गणाची बायको घरातल्या कामाला लागली. तिनं नवऱ्याला गोठा तयार करायला सांगितला.सासू व सासऱ्याला सांगितले आता गप्प बसून चालत नाही. उठा कामाला लागा.
दुसरा दिवस उजाडला. गणाच्या बायको रखमान चांगल्या चार पाच भाकऱ्या व पिठल केलं. व शिदोरी बांधून गणाच्या हातात टेकवली. व त्याला कडगावची वाट धरायला सांगितलं. रखमानं दिलेल्या शिदोरीची पिशवी घेऊन तो जायला निघाला.
नदीच्या वाटेनं पुढे वाडीचा पुल पार केला. व शेणगाव गाठलं. दत्ताच्या पाया पडला. नंतर कुंभारवाड्यावर गेल्यावर त्यानं मिळेल त्या वाहनाला हात दाखवत तो कडगावच्या पेठत पोहोचला. तोपर्यंत चांगलीच उन्ह चढली होती. घामाच्या धारा अंगावरून चांगल्याच निथळत होत्या.
तो कसा बसा जनावरांच्या बाजारात आला. व मामा कुठं दिसतोय का ते पाहू लागला. तर त्याला सासरेबुवा एका टेम्पोत म्हैस चढवत्याला दिसला. आपलं काम आटोपल्यावर मामा गणाजवळ आला. दोघेही सावलीत एका झाडाखाली जाऊन बसली. खूप भूक लागली होती. दोघांनी शिदोरी सोडली. व चांगलाच ताव पीठल भाकरीवर मारला. जेवताना सासरेबुवा म्हणाले, “ काय गणपतराव थोडे फार पैसे आणलेत काय.”
गणा म्हणाला, “ बायकोन फक्त येस्टीपूरत दिल्यात. व म्हणाली चांगली म्हैस घेऊन द्या म्हणावं.”
तेव्हा रखमाचा बा म्हणाला, “ शेवटी निपाणीचीच ना, व्यवहाराला ऐकलं तर खरं.”
रखमाच्या बापानं बाजारातील ओळखिण इकडल तिकडल पैसे जमवलं. व बाजारात आलेल्या म्हैशीतिल एक थकीव रेडी जी नुकतीच व्याली होती ती निवडली.
गणाचा सासरा गणाला म्हणाला, “काय जावई पसंत आहे का रेडकी.”
गणा, “ मला यातल काय कळतंय,तुम्हीच बघा.”
असे म्हंटल्यावर त्याने त्या म्हैशीच्या मालकास घोळात घेतले. व दुसऱ्या हेड्याला घेऊन मध्यस्ती केली. व म्हशीचा दर काढला. म्हैशीचा मालक पाटगाव कडला होता.
तो म्हणाला, “पाच हजार रुपये देत असशीला तर सोगा धर. नाहीतर पुढे जा.”
गणाच्या सासऱ्याने म्हैशीच्या कितीतरी खोड्या काढल्या. तरी त्याचं वाक्य ठरलेलं, एक पाई कमी करणार नाही. शेवटी गणाच्या सासऱ्यानं बाजारात हेडेगिरी करून आणखी पैसे कमवून व बाजारातील ओळखीचे लोकांकडून घेऊन एकदाची ती म्हैस गणाला घेऊन दिली. म्हैस घेऊन दिल्यावर गणाचा सासरा गणाला म्हणाला, “ बघ गणा आता म्हैस दिली आता तू व तुझ नशीब. कोकणातल्या रेड्या आपल्या भागात दुधाला सुटतात. पुढे दोन तीन येत खाल्यावर मुरगूडच्या किंवा निपाणीच्या बाजारात खपवूया आपण.”
असे म्हंटल्यावर गणा खुश झाला. त्यानं म्हैस घेतली. व गावच्या वाटेला लागला. नदीच्या वाटेनं म्हैस घेऊन तो निघाला. वाटेत भेटणाऱ्या प्रत्येकाच्या प्रश्नाला उत्तरे देता देता तोंडाला फेस यायची पाळी आली.
कसा बसा तो शेणगावात आला. नदीचं पाणी कमी होत. त्यानं नदीच्या वाटेनं गाव गाठलं. कसा बसा वेशीत आला. संध्याकाळ झाली होती. पवारांची कमळा शेण टाकायला निघाली होती. गणा म्हैशीसंग येत्याला तीनं बघितलं.
हासली व म्हणाली, “ काय र गणा हे काय म्हणायचं,”
गणा म्हणाला, “ मामान म्हस दिलीय. ती घेऊन आलोय.”
म्हैस बघितल्यावर ती म्हणाली, “ आर तिच्या अंगात हाडतरी हाईत काय, व ही काय दूध द्यायची.केवढ्याला घेतली र..”
तेव्हा गणू म्हणाला, “ पाच हजाराला.”
तेव्हा कमळी डोक्यावर हात मारत म्हणाली, “ आता पाच हजार टाचण्या मारून कापसाचे बोळे लाव. व वरती दूर पांघर तवा दिसेल जरा गबगबित म्हशीवाणी.फसला ग बाई.”
असे म्हणून ती शेण टाकायला गेली. गणान कशीबशी ती म्हस् धडपडत घरापर्यंत आणली. . रखंमान भाकर तुकडा ओवाळून टाकून रखमानं म्हैस घरात घ्यायला लावली. तिला पाणी पाजून थोडी वैरण घालून दमल्या भागल्या नवऱ्यास पाणी आणून दिलं.
गणा पाणी घटाघटा प्यायला. व रखमाला म्हणाला, “ काय तुझ्या बापाने म्हैस दिली बघ. सगळी मानसं नाव ठेवत होती.”
तेव्हा ती म्हणाली, “ उगाच गावच्या कहाण्या सांगू नका. जर गाव काय म्हणतं याचा विचार करत रहीलासा तर असच बसशीला तंबाखू चोळत. ते काही नाही, चांगली चार पाच महिन्यात अशी करते बघा तिला दोन्ही दारातून गेली तर शपथं.”
असे म्हणून तिने खुरपे घेतले. व म्हणाली, “ आ तुम्ही घरात बसा. मी व मामंजी रानात जाऊन चार पेंड्या घेऊन येतो.”
असे म्हणून ती शेताच्या वाटेला लागली. अशा रीतीने गणूच्या संसाराची गाडी रुळावर आली. गणू स्वभावाने खूप भोळा होता. त्याला कोणीही सहज फसवेल. असा त्याचा स्वभाव. पण बायकोच्या राबण्यानं त्याचा संसार खूप सुखात चालला होता.
त्याच्या बायकोने म्हंटल्याप्रमाणे त्या म्हशीला चांगले तयार केले. गणाची रोज निंदा करणारे लोक आता त्याचे कौतुक करू लागले होते. पण गणाची प्रगती गावच्या पाटलाच्या मनात सलत होती. त्याला गणाची म्हैस गब्दुल्ली झालेली बघवत नव्हती.
एके दिवशी रखमा धारला बसली होती. व गणा उगाच गोठ्यात बसला होता. तर त्याचं लक्ष त्या रवंथ करणाऱ्या म्हशीकडे गेला. तेव्हा त्याला म्हशीच्या वरच्या बाजूला एकपण दात दिसला नाही. तो विचार करायला लागला. की म्हशीला वरती एक पण दात दिसत नाही. आजपतोर म्हैस कशी वैरण खाते दूध देते. वरच्या बाजूला तर एकपण दात नाही.
“बापरे, मामानं माझ्या गळ्यात दात पडकी म्हस् बांधली वाटतं.”
तो बायकोला म्हणाला, “ काय ग रखमा मामानं पैसे दिले नाही म्हणून दात पडकी म्हस बांधली वाटत. बघ की जरा तिला वरती एकपण दात नाही.”
“ गप बसा उगीच कायपण बोलत्यासा, वैरण तर खाती, शेण देती, दूध पण देती. मला काय दाताच नाय ठावं. मला फक्त दुधाची शीर ठाव. ती तर दिसती. जावा गप कामाला.”
दुसऱ्या दिवशी सकाळी गणू उठला.त्याने उठून चहा घेतला. व खुरपे घेतले व शिवाराच्य वाटेला लागला. पाणंदितून जाताना त्याला सखाराम पाटील भेटला. तो म्हणाला, “काय गणू कसा काय प्रपंच चाललाय.”
तेव्हा गणू म्हणाला, “कसला गरिबांचा प्रपंच म्हणायचा पाटील. तुमच्या वाणी नाही आमचं, आमची माळा मुरडाची रानं कसली पिकत्यात. दैवारान भिजायची व चांदण्या न वाळायची.काय पिकायच तिच्यात चार भाताच दाण, व बुटिभर शेंगा, व कुट्टतरी नाचणं बाकीच्या रानात गवताबिगर काय नाही.
सखाराम म्हणाला, “ नाही कस म्हैस तर लई झाक बाळगलीस.”
तेंव्हा गणू म्हणाला, “ कसली झ्याक मामानं फसवल राव, म्हस दिली ती पण दात पडकी.तिला वरती एकपण दात नाही बघा. आता विकताना कोण घेईल बरं. दर पडला की.”
सखाराम पाटील म्हणाला, “ आर तो हेड्या फसवणारच. चल आज आमच्या मळवातली पेंडी देतो तुला.”
गणुपण खुश झाला. व पाटला बरोबर मळवात गेला. मळवातील पेंडी कापताना पाटील म्हणाला, “ हे बघ गणू तूझ्या मामानं फसवल बघ तुला. तू माझा बालपणाचा मित्र म्हणून सांगतो. मला तुझी दया येते बघ. आता कुठं तुझा संसार सरळ चालला होता त्यात ही दात पडकी म्हस् सासऱ्यांन गळ्यात बांधली तुझ्या. तो तर जातीचा हेड्या. हेड्या तो हेड्याच, त्यांना फक्त पैसा दिसतो बघ. तशा माझ्या घरात म्हशी हाईत पण तुझ्यासाठी मी ती म्हैस खरेदी करतो बघ. तू जेवढ्याला आणली तेवढ्याला मी ती म्हस् खरेदी करतो बघ. यात तुझा तोटा पण नाही व माझा फायदा पण नाही. त्या पैशात दुसरी म्हस घे तू. “
तेव्हा गणू म्हणाला, “ घरात विचारतो, व नंतर काय ते सांगतो.”
तेव्हा पाटील म्हणाला, “ अरे मर्दा बापया सारखा बापय तू व बायकांना काय विचारायचं. व म्हातार्यांच काय ऐकायच.”
गणुला पाटलाच बोलण एकूण मोठं झाल्या सारखं वाटायला लागलं.
“ नंतर येईन मागन व्यवहार करायला,” असे बोलून त्याने पेंडीच वज्ज बांधल. व तो घरच्या वाटेला लागला.
वाटेत त्याच्या मनात विचारांचे काहूर माजू लागले. तो विचार करू लागला. नाहीतर म्हशीची किंमत मिळतेच. ही देऊ व दुसरी घेऊ आपण. असा विचार करत तो घरात आला त्याने वज्ज टाकलं. अंघोळ केली. व नंतर थोड्या वेळानं तो सखा पाटलाच्या घरात गेला. सखाराम गणा आल्याचं बघताच त्याने आपल्या बायकोला चहा करायला सांगितला.
थोड्या नाखूशीन पाटलीन मुरका मारून आत गेली. शेवटी सखा पाटलान गणाला चांगलाच घोळात घेऊन त्याच्या हातावर पाच हजार रुपये टेकवले व म्हशीचा कागद करून घेतला. थोड्या वेळानं रखमा व म्हातारा शेताला गेल्यावर त्यानं गणुच्या दावणीची म्हस सोडून आणली.
गणूला अवघडल्यासारखं झाल. पण पुन्हा विचार केला. की दुसरी घेता येईल.
संध्याकाळ झाली रानात गेलेली माणस घरला निघाली. गणुच्या बापाला घरला येताना वाटेत शिंद्याचा म्हादू भेटला. तो गणूच्या बापाला म्हंटला.
“काय राव म्हैस विकणार माहीत असत तर मीच घेतली असती. त्या पाटलाला कशाला दिली.”
“ काय म्हैस कोण म्हणत दिली.”
“घरला जा तुझ्या पोरग्यानच दिली.”
“काय म्हणतोस, मला काय माहीत नाही यातलं.”
“म्हणजे पोरगं मोठं झालं व्हय व्यवहार करायला.तू बस आता कोपऱ्यात , जा घरला.” असे म्हणून तो निघून गेला.
म्हातारा लगबगिन घरला आला. त्याने गोठ्यात म्हस बघितली.म्हस गोठ्यात नव्हती. तो तडक घरात आला. व गणाला म्हणाला, “ गण्या म्हस कुठं हाय.”
गणा, “ विकली.”
“ का विकलीस कुणाला विचारून तुझं टकोर तर फिरल नाही नव्ह.” म्हातारा चाचपडत बोलला.
तेंव्हा गणू म्हणाला, “ तिचं दात पडल होत.”
तेव्हा म्हातारा म्हणाला, “तरण्या रेडीच कधी दात पडलत काय र!”
तेव्हा गणू म्हणाला, “हे बघ बा मला थोडी तरी अक्कल हाय,उगाच कालवा करू नकोस. उद्या दुसरी घेऊ.”
तेव्हा गणूचा बाप म्हणाला, “ तसली म्हैस परत मिळाय ठेवलीय तूझ्या बापानं.लगीन झालं म्हणजे शेना झालास.”
तेव्हा गणू उठला. व परसदारी रागात निघून गेला. थोड्या वेळानं गणुची आई व बायको रानातून आल्या. त्यांना जेव्हा हे कळलं तेव्हा त्यां गणूला खूप बोलल्या. शेवटी गणू रागान दोरी घेऊन फासलावाय निघाला.तेव्हा सगळी गप्प झाली.
म्हातारी म्हणाली. “जाऊदे दुसरी घ्या पण माझ्या पोरान काय करून घेतल तर मी कुणाकडं बघू असल्या भावकित मी हाडाची काड करून संसार केला कुणासाठी याच्यासाठी. सोडा विषय तो.”
म्हाताऱ्याने दुम काढला म्हैस कुणाला दिली याचा. त्याला समजले की सखा पाटलाकड म्हस हाय.तेव्हा त्यानं ओळखलं सख्यानं फसवल माझ्या गणाला.रात्री म्हाताऱ्याला जेवण गॉड लागलं नाही. तो नुसता हांथरुणावर तळमळत होता.
भगटायला तो उठून बसला. त्याच्या लक्षात आले की शिंद्याची लक्ष्मी आपल्या माहेरला यमगर्णीला जाणार हाय. तो तडक तिच्या घरला गेला. व त्याने सर्व हकीकत लक्ष्मीला सांगितली. व रखमाच्या बापाला तेवढा निरोप द्यायला संगितला.
लक्ष्मी म्हणाली, “म्हाताऱ्या तू काळजी करू नकोस, मी सांगते रखमाच्या बापाला. त्या सखा पाटलाच मडं बसवलं ते, भाड्या कोणत्या येळला उपाजलाय देवा महादेवाला ठाव. सगळ्या गावाला खाऊन भुजंगावाणी बसलाय करिटखाऊ मेला. तेला बुडीवला वेदगंगेत .” असे म्हणत लक्ष्मी चुलिवला चहा म्हाताऱ्याला देऊ लागली. तेव्हा म्हातारा म्हणाला, “ नको मला चहा काय, काहीपण गॉड लागत नाही बघ. या पोरान ह्यो बाजार मांडलाय, माझ काम एवढं कर.” असे बोलून तो घरी आला. लक्ष्मी गावाला गेली तिन निपाणीत रखमाच्या बापाला निरोप पोचवला. दुसऱ्या दिवशी सकाळी भगटायला रखमाचा बाप पेठत हजर झाला. व घरात आल्या आल्या त्यानं गणा कुठाय विचारलं.गणा लगेच हजर झाला.
“ गण्या म्हस कुणाला विकलिस व का विकलीस.” गणा जरा घाबरूनच बोलला, “सखाराम पाटलाला.”
“ का विकलीस,” असे विचारताच गणू म्हटला, “दात पडकी म्हस माझ्या गळ्यात बांधल्यासा व आता मला विचारता होय.” तेव्हा सासरा म्हणाला, “ काय दात पडकी, आर परवडीची रेडी घेऊन दिली होती तुला, व दात पडकी म्हणतोस व्हय.”
तेव्हा गणू म्हणाला, “नाहीतर काय त्या म्हशीला वरती एक पण दात नव्हता.कोण पुढे विकत घेणार, शेवटी विचार केला व दिलेलं तेवढं पैसे परत मिळत्यात म्हंटल्यावर विकली सखा पाटलाला.”
असे म्हटल्यावर रखमाच्या बापानं डोक्यावर हात मारून घेतला. व तो म्हणाला, “ तुझ्या बापाने तरी लावले होते काय म्हशीला वरती दात. व विकत घेणारा काय बचाळी बसवणार हाय का? जा उठ व गावातल्या सगळ्या म्हशींना बघून ये वरती दात आहेत का ते. कुठली अवदसा सुचली व तुझ्या पदरात पोरगी बांधली माझी.”
गणा उठला व शेजारच्या शिंद्यांच्या गोठ्यात गेला.त्यांच्या गोठ्यातील म्हशीचे दात पाहण्याचा प्रयत्न त्याने केला. तर त्याला रवंथ करताना म्हशीचे फक्त खालचेच दात दिसले. वरती दात नव्हते. त्याने डोक्याला हात मारला. व तो घरी आला. व रडू लागला.
त्याच्या बायकोने समजूत काढली. बाबाला म्हणाली, “आता बाबा तूच यातून मार्ग काढ. माझा नवरा भोळा भाबडा त्याची फसगत झाली.”
रखमाच्या बापानं गणाची समजूत काढली. तो म्हणाला माणूस चुकतोचं झालं गेलं गंगेला मिळालं. इथून पुढं शान व्हायचं. ते पाच हजार आण. आणखी काही जोडणी करा. आता मी एक पाई घालणार नाही.तुला दुसरी म्हैस घेऊन देतो. येत्या बाजारात तुझ्या घरात दुसरी म्हस बांधतो. पण इथून पुढं तरी मला विचारल्या शिवाय व्यवहार करायचा नाही.”
गणाच्या बायकोने म्हशीच्या दुधातून साठलेलं दोन हजार रूपये दिवळीतल्या गाडग्यात साठवले होते ते बाबाकडे दिले व म्हणाली,” मी पण खुळ्यासारखच केलं.तुला विचारायच्या आधी या बाबाला व्यवहार करू दिला. तेच माझं चुकल. इथून पुढे सावध राहीन. आता मला काय पण कमी नाही बघ तुझ्या आशीर्वादाने पण तेवढी म्हैस आन बाबा.” बोलून ती त्याच्या पाया पडली.
रखमाचा बा जाताना वाटेत सखा पाटलाला वाटेत दिसल्यावर म्हणाला, “ माझ्या भोळ्या जावयाला फसवून काय मेल्यावर मड्यावरन घेऊन जाणार हाईस काय. तुलापण कोणतरी भेटल सवाई. दुसऱ्याचं वाईट केलं की देव आपलं पण करतोय. एवढा जातीचा हेड्या, हेड्याचा धंदा करतोय पण बाजारात पत हाय माझी. घेतलीस म्हस नव्ह घे. त्या म्हशीपेक्षा नाही सवाई म्हैस घेतली माझ्या लेकीच्यात तर नाव सांगणार नाही.”
अस म्हणून तो निघून गेला. व म्हटल्याप्रमाणे त्याने चांगली म्हैस घेऊन दिली.” त्या दिवसापासून गणा प्रत्येक व्यवहार सावधगिरीने करीत असे.
पाटील व त्याचे मित्र गणाला चिडवत असत. पण हा काही बोलत नसे.गप्प राही. पण त्याच्या मनात पाटलाचा राग होताच.
त्याला न कळताच धडा शिकवण्याच गणाने ठरवले.
दिवस सरत चालले होते. भात कापणी झाली. गाणाची बायको राबणारी असल्याने या वर्षी चांगलंच भात पिकलं. व शेंगा पण वावरात भरपूर झाल्या. म्हशीमुळे व राबणुकिमुळे घरखर्च भागून चाऱ पैसे पण साठाय लागले होते.
गणाने मात्र सखा पाटलाची धुंदी उतरायचा चंगच बांधला. वैरण कापणी सुरू झाली. आपल्या वावरातल पयान कापताना गणा मनातल्या मनात हासला. कारण त्याच्या मनात पाटलाची खोड मोडायची युक्ती सुचली होती.
भात कापणी झाली. शेतं नांगरून पडायला लागली. गणानं पण आपल शेत नांगरल.पण माळधावणी असल्याने त्याने त्यात काही टाकल नाही. सखा पाटलान मात्र आपल्या शेतात हरभरा व मसूर टाकली होती. दिवस सरत चालले. हरभर्याला घाटे धरून काढणीस आला.
एके दिवशी सखा पाटलाची बायको दारात उभा राहून शिवा देताना दिसली. तेव्हा रखमा पाण्याला गेली होती. घरात आल्यावर ती सासूला म्हणाली. “सासूबाई सखा पाटलाचा हरभरा कुणी उपटून नेला म्हणं.”
रखमाची सासू म्हणाली, “ नेवूदेत भाड्याचं आमच्या पोराला फसवलं, असच जायचं.”
गणा मात्र शांत होता. सात आठ दिवसांनी गणा बायकोला म्हणाला, “ चल जरा डोंगराकड शेतात काम आहे.”
तर ती म्हणाली, “ पयान पण कापून रचलं. आता काय काम तिकड.”
तेव्हा गणा म्हणाला, “ चल गप काम आहे.”
तशी घरातलं काम आवरून नवऱ्याच्या मागणं शेताला निघाली.शेतात गेल्यावर त्याने दोन व्हळीमधील उनात घातलेला हरभरा काढला व तिला एक टोणका झोडायल आणून दिला.
तेव्हा ती म्हणाली, “हा हरभरा कुठला?” तेव्हा गणा म्हणाला, “ तू आंबे खा झाडे मोजू नको.”
ती म्हणाली, “ असं कुणाचं चोरून खाण्यपरिस उपाशी मरीन मी.” तेव्हा गणा रखमाला म्हणाला, “ लई खर्याची पुतळी आहेस बघ. हा हरभरा त्या सखा पाटलाचा आहे. माझी म्हस फसवून घेतो काय. आता खा म्हणावं हरभरं, तू राब मी खातो.”
“ आव ती पाटलिन लई शिवा देत होती. पांडुरंग बघून घेईल चोराला. तुम्हाला हे धंदे करायला कुणी सांगितलं.” रखमा बोलली.
गणा म्हणाला, “ रखमा तू लई साधी आहेस. हा भोळापणा सोड. मी केला तेवढा गाढवपणा पुरे. त्या पाटलाची घमेंड आता अशीच जिरवायची कड कडणं कुरण खायचं त्याला कळूच द्यायचं नाही. तू गप्प बस मी नाही त्या पाच हजाराचे दहा हजार केले तर नावाचा गणा नाही.मला फसवतो काय.”
दर वर्षी पाटलाच्या शेतातील हरभरा , कधी ज्वारी, कधी मुगाच्या शेंगा असं काहीना काही चोरीला जायला लागलं. गणानं असे दरवर्षी हजार पाचशे मिळवत म्हैशीच्या आठ दाताचे आठ दहा हजार मिळवले. व पाटलाची चांगलीच मस्ती उतरायचे काम या भोळ्या शंकराच्या गणाने केले.
तात्पर्य : आपण कोणाला तरी फसवले तर आपल्यालाही कोण तरी फसवू शकते.
टीप. सद्या म्हैशीचे दर जास्त आहेत. हा दर २००८-०९, सालचा आहे. नाहीतर ५००० रुपये घ्याल व जाल बाजारात म्हस द्या म्हणून खुळ्यात काढतील. तुमचा शुभचिंतक.
लेखक. : निशिकांत हारुगले
एम. एम. बी.एड.


