सोसायटीचे राजकारण मतदाप्रक्रिया व निकाल लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
सोसायटीचे राजकारण मतदाप्रक्रिया व निकाल लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शनिवार, २३ एप्रिल, २०२२

सोसायटीचे राजकारण

 कथा क्र. ३ सोसायटीचे राजकारण

लेखक : निशिकांत हारुगले

एम. ए. बी.एड.




राजकारण व ग्रामीण भाग यांचं नात एकमेकांशी जुळलेले आहे. त्यात ग्रामपंचायतीच किंवा सोसायटीचे राजकारण ते काही वेगळेच असते. रोज एकमेकांबरोबर जेवण वाटून खाणारे लोक देखील टोणके घेऊन भांडताना दिसतात.

वेदगंगेच्या खोऱ्यात पेठेच्या हद्दीत अनेक वाड्या वस्त्या पाहायला मिळतात. हिरव्या गर्द झाडीत वसलेल्या या घरांचे रुप जरी कौलारू आसले तरी खाऊन पिऊन हे लोक सुखी असणारे पहावयास मिळतात.

एकमेकाला मदत करीत असताना एकमेकांवर कुरघोडी करण्यास देखील हे लोक पटाईत असतात. अशाच एका गावात घडलेली एक कथा आहे. पेठच्या हद्दीत वाडीची अनेक गावे होती. असेच एक वाडीच गाव उंच डोंगरमाथ्यावर वसलेलं नदीचं पाणी काही यांच्या भाग्यात नाही. अशा या गावात एक सोसायटी होती.त्या सोसायटीचे नाव होते लिंगराज सोसायटी होते.

सोसायटीतून वाडीतील लोकांना खते व बियाणे, कर्जे मिळत असत. त्यामुळे अनेक लोकांना सोसायटी म्हणजे गरजा भागवणार साधनच होत.

अशी ही सोसायटी शेतकऱ्यांना कमी व्याज दराने कर्ज देत असे. पण मिटिंगला दोन गटात वाद विवाद होत, मात्र आतल्या आत मिटत असतं.

ग्रामपंचायतीचे इलेक्शन झालं. मतदान झाल्यापासून गावात चांगलीच दूफळी माजली होती.

धनाजी सलगर व आबाजी पाटील यांच्यात सोसायटीच्या बैठकीत जोरदार वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की धनाजीनं अबाजीच्या विरुद्ध शड्डू ठोकला. व म्हणाला, “ बघतोच तुला लई नाटक चाललेत डेव्हिडंटवर सुद्धा टपून बसलास व्हय रं बोक्या, गोरगरिबांचा श्राफ घेशील. म्हणे इमारत फंडासाठी कट केलाय. ही इमारत काय बाद हाय. चांगली शंभर वर्षे अजून टिकल. मला माहित आहे. तुझ्या पोराच्या लग्नाचा खर्च वसूल करतोस व्हय यातनं, लई जड जाईल तुला, जर खर्च वाचवायचा होता तर गडच्या देवापुढे लगीन लावायचा होतास. वरात काढून गावात टेंभा मिरवून दाखवतोस काय.”

असे म्हंटल्यावर आबाजी पाटील चिडला व म्हणाला, “माझ्या पोराचं लगीन झालेलं बघवत नाही तुला. नाहीतर वरातीच्या रात्री दार बंद करून बसला नसतास. व सोसायटीच्या पैशान लगीन करायला मी काय भिकारी नाय माझ्याच पैशावर लगीन केलय मी माझ्या पोराचं. जरा इमारत वाढवावी म्हणून डेव्हिडंट काय कापला. तर तुझ काय जळतंय टकुर. उगाच लागलय भांडायला.”

तेव्हा धना सलगर म्हणाला, “ पाटील तुमची पाटीलकी त्या आंगठे बहादुरांपुढे दाखवा. मला नको, ते काय माहित नाही, आम्हाला संचालक मंडळाचा निर्णय मान्य नाही. आता चार महिन्यानी संचालक मंडळाची मुदत संपतीया. तेव्हा नवीन मतदान घेऊन संचालक मंडळाची बॉडी निवडायची .” असं बोलून तो मिटिंगमधून बाहेर पडला.

बघता बघता सोसायटीच्या मिटिंगची बातमी संपूर्ण गावात पसरली. व गावातील वातावरण तापायला लागलं. जो तो उठला सुटला याच विषयावर चर्चा करू लागला.

गावातील पारापासून ते नाव्ह्याच्या दुकानापर्यंत सगळीकडे हीच चर्चा सुरू झाली. गावातील मध्यवस्तीत देवळाजवळ दामाजी नाव्ह्याचे दुकान होते. दामाजी व आबाजी बालपणापासूनचे मैत्रर होते. त्यामुळे दामाला कर्ज देण्यासाठी आबाजीने मदत केली होती. त्या कर्जाच्या जीवावर त्याने दोन म्हैशी विकत घेतल्या होत्या. त्यामुळं तो आबाजीची बाजू उचलण्यास तयार होता.

गावात ज्या सफाईदारपणे वस्तरा चालवत असे. त्याप्रमाणे त्याचे तोंड ही चालवत असे. अंगान धिप्पाड रंगानं सावळा असा झूपकेदार मिशांचा हा न्हावी, त्याच्या दुकानात नेहमी गर्दी असायची. त्यामुळे त्याला दिवसभरात मिळाली तर दुपारची उसंत नाहीतर नाही.

अशा या नाव्ह्याच्या दुकानात गर्दी जमली होती. दामाजी व त्याने ठेवलेला पोऱ्या गिऱ्हाईकाची हजामत करत होते. इतक्यात तिथं बाबू ढलप्याच पोर आलं. त्याला गावातील बातमीपत्र म्हणत.

ते म्हणाल, “ सोसायटीत भांडणं झाल्यात धनाजी सलगर व आबाजी पाटील यांच्यात बाचाबाची झाली. इलेक्शन लागणार हाय म्हणत्यात.”

हे ऐकताच दामाचा वस्तरा थांबला. व तो म्हणाला, “ या धन्याचा आधून मधून लई किडा उठतोया. का त्या आबाच्या पाठी लागलाय कुणास ठाऊक. मुंबईचा पैसा मिळवला आता देव खाऊ देईना वाटतं. म्हणून हे धंदे करतोय. जा म्हणावं, माझा वस्तरा घे, व गावच्या ओढ्यावर जाऊन काम धंदा नसलं तर गावच्या म्हशी भादर म्हणावं.”

पण दाढी करून घेणाऱ्या आशा ढेकळ्याच्या पोराला त्याच बोलण रूचल नाही. ते म्हणाल, “ तुझ्या का पोटात चावतया. त्या दोघांचा वाद तुझी तू भादर की लेका.”

 तेव्हा दामाजी म्हणाला, “ तुझ्या सारखा मी नाही गरज सरो आणि वैद्य मरो. गावात एक पाण्याचा ठीबुस नव्हता. तेव्हा आबा पाटलांनी डोंगरातून झिरपीच पाणी आणलं. तवा कुठे होता तुझा धना सलगर. उगाच तोंड वाजू नको माझं.”असे म्हणत त्याने हजमतीला सुरुवात केली. गावात चौका चौकात लोकांच्या गप्पा चालू झाल्या. चौकातील पारावर गावातील अनेक लोक बसायला येत.

 त्यांच्या इकडल्या तिकडल्या गप्पा चालत. त्यात तरणी व म्हातारी सरमिसळ असत.

तरण्या पोरांना धना सलगर आवडत असे. ती धनाजीच्या बाजूने बोलत असत. म्हातारी मात्र आबाजी पाटील चांगला म्हणू लागली. तिथं बसलेला गजाबाईचा म्हातारा चाचपडत बोलला, “अबा पाटलानं गावचा बराच विकास केला आहे. ह्यो धना काय कालपरवाच पोर ते, त्याच काय एकायच काल परवाच पोर ते,गावात गावदेवीच देऊळ आबानच बांधल नव्हं.”

इतक्यात ईराचा भालू म्हणाला, “ तर देऊळ बांधल, ठाव हाय आम्हाला, देवळाला देणगी गोळा करताना आमच्या तंगड्या तुटल्या, देऊळ बांधून उरलेल्या पैशातून यान ट्रॅक्टर घेतला.म्हणतात ना तळे राखी तो पाणी चाखी.”

इतक्यात तुकाराम भुईकर म्हणाला, “ त्याने देवळाच्या पैशाने ट्रॅक्टर घेतला म्हणतोस जसा काय तुझ्या पुढ्यात घेतल्यासारखे बोलतोस की. आ उगाच लागलाय त्याच्या नावानं खड फोडायला. जरी तेन ट्रॅक्टर घेतला तरी त्याने गावचा विकास केलाय. गावात रस्ता करताना त्याचा ट्रॅक्टर नुसता डिझेलवर वापरल्यासा मला काय माहीत नाही व्हय. तुम्ही आज कालची शिपूर्डी पोर, नाव ठेवत्यासा म्हणून आम्ही नाही सोडणार तेला.”

त्याच हे बोलण एकूण संजू मास्तर म्हणाला, “तर तुला काय वाटणी दिली वाटत तवा तेची बाजू घेऊन बोलतोस व्हय. ते काय नाही नविन पक्ष नवी शाई.”

मास्तरच बोलण तोडत तुकाराम भूईकर म्हणाला, “ हे बघा गुरुजी ती तुमची नवी शाई तुम्हालाच लखलाभ असुदेत. राजकारण म्हणजे अरळगुंडीच्या शाळेतील शेंबडी पोर शिकविण नव्ह, तुम्ही जावा शाळा शिकवा. बे एके बे व बांगडा भाजून दे.”

तुकारामच बोलण मास्तरला झोंबले तो म्हणाला, “ तुला तुझ एक घरातलं कारट सांभाळता येईना. व मला तू शिकवू नको शाळा सांभाळायला. मी मस्त घट्ट हाय शाळा सांभाळायला. तुमच्यात जर हिम्मत असेल तर या शाळेत शंभर तऱ्हेची शंभर पोर. सांभाळून दाखवा की मग बोला.पोर सांभाळन म्हणजे शेतात नांगर हाकन नव्हं.तुमच्यासारखी आम्ही कुतायची काम करत नाही.बुद्धीची करताव बुध्दीची.”

तवा तुकाराम चिडला व म्हणाला, “ शाळेतली पोरं राहुदेत आधी भांडून गेलेली बायको आण जा माहेरासन.” तेव्हा मास्तर चिडला व म्हणाला, “ तुक्या लई बोलतोस, जास्त बोलशील तर थोबाड फोडीन तुझं.”

यांचं बोलण पारावर बसलेला मारुती पाटील ऐकत होता. तो म्हणाला, “त्यांचं राजकारण आणि तुम्ही कशाला भांडता. सोडा तो विषय.”

तेव्हा ती दोघं शांत झाली.

सोसायटीचे राजकारण चांगलेच रंग दाखवायला लागले होते. याची व्याप्ती चौकापासून पाणवठ्यापर्यंत झाली नाहीतर नवल म्हणायचे. गावात आणलेलं डोंगरातील पाण्याची दोन ठिकाणी कनेक्शन दिली होती. एक ग्रामपंचायतीच्या दारात व दुसरे देवळाजवळ. देवळाच्या दारातील नळाला मोठे पाणी पडत असल्याने व ते ठिकाण भर वस्तीत असल्याने तिथे खूप गर्दी जमत असे.

उन्हाळ्याच्या दिवसात म्हातारीच्या वड्याचे पाणी आटल्याने . देवळाजवळ असलेल्या नळाला वाघझरीचं पाणी यायचं ते ही बारीक झिरपीच ते थोडे फार मिळत असे. अनेक बाया पाणी भरायला तिथे जमत असत. सुताराची सगुणा व माळ्याची कंबळी पाणी भरायला आली होती. सगुनाचे केस कायम विस्कटलेले असत. त्यामुळे गावातील बायका तिला सूताराची झिप्री म्हणून हाक मारत. सगुणा ही आबा पाटलाच्या गोटातील कारण आबाची बायको सरवड्याची होती. या दोघी एकाच गावच्या होत्या. तर माळ्याची सगुणा व धना सलगराची बायको जिगरी मैत्रिणी.

सगुणा कंबळीकड बघत म्हणाली, “ लई तोरा गाजवत्यात त्या धनां सलगराचा, आता जावा म्हणावं त्यासनी पाण्याला नदीला. कशाला इथे कलमडल्यात त्या आबा पाटलान पाणी आणल म्हणून पित्यासा. नाहीतर या गावात कुठं पाणी मिळालं असतं.”

सगुनेच बोलणं कंबळीला झोंबल होत. पण ती गप्प बसली. व आपली घागर पाणी भरायला तिने पुढे ढकलली.

तशी सगुणा म्हणाली, “ ये जरा थांब, एवढी कळशी घेतो आधी.”

कंबळी म्हणाली, “ माझी घागर आधी हाय मी पाणी आगोदर घेणार.”

तेव्हा सगुणा म्हणाली, “ लई पाणी पाणी करत्यासा, एवढी तहान लागली असल तर सांगा जावा त्या धना सलगराला गावात नवीन नळ बसव म्हणावं.”

तेव्हा कंबळी चिडली व म्हणाली, “ ए झिप्रे लई बोलतीस तुझे सगळे दात घशात घालून टाकीन बघ. मगाठावनं गुमान ऐकूण घेते म्हणून लईच बोलतीयास की, लई आबा पाटलाचं कौतिक सांगतीय. तो काय घर चालवतोय का तुझं. मघाठावन माझ्या नावानं खड फोडतीस व पाणी आबा पाटलांनी आणल म्हणायला गावातील बाकीची माणसं कुठं भाद्रायला गेलतीत का, उगाच तोंडाला तोंड देतिया नुसती. आमचा म्हातारा पण होता चर खोदायला. तुझ्या आबा पाटलान एकट्यानेच पाणी आणल्या सारखं बोलू नकोस. जा घरला खरकटी भांडी घास जा.” असे म्हंटल्यावर सुगंधीला राग आला. ती म्हणाली, “ तुझ्या जीवावर ठेवायला नाहीत मी भांडी, एकच कळशी घेतो म्हंटलं नव्हं, जरा मोठ बारक काही कळतं की नाही.”

तेव्हा कंबळा म्हणाली, “ म्हणूनच मगाठावनं गप्प होते. पण मोठ्या म्हशीनी पण आपली शिंगं लई दाखवू नये.” कंबळीच्या बोलण्याने सुगंधा चिडली. व कंबळीवर घागर घेऊन धावून मारायला आली. दोघींची भांडणे सोडवता सोडवता इतरांची दमछाक झाली. शेवटी इतर बायकांनी त्याना कसंबसं शांत केलं.

बघता बघता सोसायटीची इलेक्शन लागली. आबा पाटील व धना सलगर यांनी पण अर्ज दाखल केले. दोन पॅनेल मध्ये इलेक्शन होणार होती. गावात प्रचाराचा जोर चढला. आबा पाटलाच्या पॅनेलला पतंग तर धना सलगरला विमान असे चिन्ह देऊन इलेक्शन जाहीर झाली.

गावात प्रचार वाढला होता. जागोजागी पोस्टरं लावण्यात आली होती. निवडणूक लावलेल्यांच दिवाळ निघत होत. पण गावातील दारु पिणारी मात्र चैनीत होती. मांगाचा विलास हा गावातील अट्टल दारुडा होता. तो सकाळी एकाकडे तर संध्याकाळी दुसऱ्याकडे दारुसाठी नको ते धंदे करायला तयार होता. सोसायटीच्या इलेक्शनने त्याची तर चांदीच उसळली होती. फक्त नेत्यांच्या मागणं जयजयकार करत फिरायच होत. ते करत दारूच्या इतक्या बाटल्या घरात जमल्या की एखाद दारूचं दुकान निघालं असतं.

असा हा विलास धडपडत आबाजी पाटलाच्या प्रचारफेरीत दाखल झाला. व त्याने आबाजीच्या पोराकड दारूला पैसे मागितले. जवळच पवारांचा नंदन उभा होता. तो म्हणाला, “ विलासदा तुझ आपल बरं चाललय की सकाळी धनबाकड व रातीला आबाकड, दोन्ही बाजूंनी हलगी वाजवतोयस की.”

तेव्हा विलास म्हणाला, “ तू गप्प रे, जास्त बोलायचं काम नाही. मी आबांचा माणूस हाय धनबाकड जातोय म्हणजे फितुरांची माहिती काढायला.”

तेव्हा नंदू म्हणाला, “ हे बघ दारुसाठी तू शेण बी खाशील. मला तुझ्या नादाला लागायचं नाही.तुझी बायको चांगली म्हणून म्हणतोय. बिचारी खूप राबती, आणि ह्यो रेडा मुतू पिऊन धिंगाणा घालतोय.” असे बोलून नंदू तिथून निघून गेला. विलासने आबाच्या पोराकडून पैसे घेतले व तो दारुच्याअड्याच्या दिशेनं चालू लागला.

अशा या सोसायटीची इलेक्शन चांगली रंगात आली होती. घरोघरी कवा वटसावित्रीला हळदकुंकू न लावणाऱ्या बायका पण हळदीकुंकू कार्यक्रमाला हजर राहत होत्या. मटणाच्या पार्ट्या रंगात आल्या होत्या.

मतदानाचा दिवस उजाडला. मतदान सुरू झाले. 



पोलिस बंदोबस्तात मतदान पार पडले. त्याच दिवशी संध्याकाळी मतमोजणी होणार होती. दोन्ही बाजूचे दोन उमेदवार तिथे बसले होते. मोजणी सुरू झाली. निकाल लागलं तशी दोन्ही गोटात चळबळ सुरू झाली.

धना सलगर नवखा उमेदवार असल्याने त्याच्या बाजूने कमी मतदान पडते असं वाटल्यावर धनानं आपल्या गोटातील दोन पैलवानांना खालच्या कोटीतील मतपेट्या पळवण्यास सांगितल्या. तसे त्यांनी कोठीच्या मागच्या बाजूची खिडकी पेचून त्यातील एक पेटी पळवली. ती पळवून नेताना एका लहान मुलाने बघितली. ते पोरग सरळ दामा नाव्ह्याजवळ आलं. व म्हणाल, “ दामुअण्णा विरूद्ध पार्टीनं खालच्या कोटितल्या मतपेट्या पळवल्या.”

तसा दामूनं आपला टॉवेल खांद्यावर टाकला. व त्या पोरग्यास विचारले, “ कोणत्या दिशेला गेल्यात.”

तेव्हा वताडाच्या दिशेला बोट करत ते म्हणालं, “ त्या बाजूला गेल्यात.”

दामा त्या दिशेनं पळाला त्यानं पंधरा मिनिटात त्यांना गाठलं. व म्हणाला, “ कुठं पळत्यासा चोरांनो, तुमची आई बाळत झालीय काय ते भेट घेऊन निघाल्यासा. गाढवानो थांबा.”

तेंव्हा त्यातील गुंड्यान दामाला ढकलले व म्हणाला, “ ह्यो नाव्ही लई तोंड चालवतोय याला धरून बडवायचाच. असे म्हणून त्यांनी पेटी बाजूला ठेवून दामला धरला व बडवायला लागलीत. दामा कसा बसा त्यांच्या तावडीतून निसटला. व आपला रुमाल फिरवून गुंड्याला मारला. रुमालाचा एक जोराचा दणका बसला. तसा गुंड्या आई गो, मेलो मेलो, असं ओरडायला लागला. दरम्यान गुंड्या व दुसऱ्या मेंबरला टॉवेलान चांगलाच चेचला. तसं ती हाबकली व म्हणाली, की टॉवेल लागतोय काय बांधले त्यात या नाव्ह्यान देवास ठावं.

इतक्यात धना सलगरची आणखी पाच सहा मानसं आलीत. त्यानी दगड मारायला सुरुवात केली. तस दामान पण नेम धरुन दोघा तिघांची टकुरी फोडलीत. तसा एक जण काठी घेऊन धावून आला. तस दामाने वार चुकवला. व टॉवलाचा एक सोगा फिरवून मारला दणक्यात तो गडी गार झाला. व दाडवान धरून बसला.त्याला दिवसाच्या चांदण्या दिसायला लागल्या. येईल त्याला तो टॉवेलाने बडवत होता.

एकजण म्हणाला, “ आर यांच्याजवळ ना दगड ना काठी फक्त टॉवेल फिरवून यांन चेचल. अस काय हाय याच्या जवळ.”

पण इतका वेळ कुणाजवळ नव्हता. इतक्यात पोलिस आले. त्यानी पेट्या ताब्यात घेतल्या. पण कोणी पेट्या पळवल्या म्हंटल्यावर जो तो एकमेकाकडे बघू लागला. शेवटी सामोपचाराने मिटवायच ठरलं.

पेट्या पुन्हा गावात आणल्या. मोजणी पूर्ण झाली.पुन्हा आबाच पॅनल निवडून आले. तरी देखील धना सलगरच्या काही शिटा निवडून आल्या. त्यामूळे इथून पुढे प्रत्येक सभा सोसायटीची गाजणार हे सिद्ध झालं.

जखमी सर्वांना तालुक्याच्या हॉस्पिटलमध्ये गारगोटीला आणण्यात आलं. त्यांवर उपचार सुरू झाले. दामजीला पण चांगलच लागलं होत. त्याला देखील मलमपट्टी केली होती.

नर्सबाई मुद्दाम बेंजोईनचे औषधं टाकत होती. ताज्या जखमेवर बेंजोईन पडल्यावर जोरात कळ यायची. तेव्हा नर्स म्हणायची, “मारामारी करतांना लई गॉड वाटतं नव्ह. मग आता सहन करायचं. उगाच कालवा करायचा नाही. बाकीचे पेशंट डिस्टर्ब होता येत. उगाच पुंगी वाजवू नका तोंडाची. नाहीतर जखमा कात्रिन कुर्दरिन.”

मुकाट्यानं कळ सोसण्याशीवाय त्यांजवळ गत्यंतर नव्हते.

सोसायटीच्या राजकारणापेक्षा दामाच्या करामतीचीच जिकड तिकड चर्चा ऐकायला मिळत होत्या. गारगोटीचे सरकारी दवाखान्यातून दामाजीला आबाजी मलमपट्टी करून घेऊन आला होता. दवाखान्यातून बाहेर पडताना धना सलगर गुंड्याला घेऊन आत चालला होता. गुंड्या दामाजीला बघताच म्हणाला, “ तुला दावतोच.”

तेव्हा दामा म्हणाला, “ ये दाखवायचं ते इथच दाव, अजून मस्ती गेली नाही वाटत. मार विसरलास काय. जा आत तुझी आई बसलीय औषध लावायला. दोन थेंब पडल बेंजॉइंच की गारगार वाटतंय जा तोंड घेऊन. ”

असं म्हणून ती दोघं घराकड चालली. व गुंड्याला धना दवाखान्यात घेऊन गेला. गावात जिकडे तिकडे दामाचीच चर्चा सुरू होती. की दामानं पराक्रम केला.

आबा पाटलाने दामाचा सत्कार केला. सत्कारात दामाचे कौतुक करताना पाटील म्हणाले, “ शिवाजी महाराजांच्या काळात जशी घोडखिंड बाजीप्रभुनी लढवली. तशी आपल्या दामान वताडाची खिंड लढवून धनाजी सारख्या मातबबर शत्रूला खडे चारले. दामाजिने केलेलं हे कार्य अतुलनीय आहे.”

सत्कार झाल्यावर दामा घरी आला. दामाच्या बायकोन दामा घरी आल्यावर दामाला ओवाळले व घरात घेतले. व त्याला गोडधोड जेवण घातले.

जेवता जेवता दामा म्हणाला, “ आज नव्हर्याच लई कवतिक चाललय.”

तेव्हा दामाची बायको म्हणाली, “ सगळ्या गावात नाव गाजवल्यासा सात आठ जणांना टॉवेलाच्या फटक्यात लोळवल्यासा, मग कवतिक कराय नको का.”

असे म्हंटल्यावर दामा म्हणाला, “ म्हणून सगळ केलस व्हय.”

“नुसत्या रुमालाने कस लोळवलत तुम्ही?” दामाची बायको बोलली.

तेव्हा दामू म्हणाला, “ आग, तुला गंमत माहीत नाही नुसत्या टॉवेलने मी त्यांना लोळवल नाही. तर जाताना रस्त्यावरले खडीकरणाचे दोन बारके दगड त्यात लपवले होते. व फिरवलं तसं ते लई जोरात लागायचे. अशा प्रकारे मी त्यांचा फज्जा उडवला. मला तो गुंड्या म्हणत होता नुसतं तोंड चालवता येते. तवा आता तेलां कळल आसल तोंड, वस्त्रारा व टॉवेलपणं चालवता येतोय मला ते.”

तेव्हा ती दोघं खो खो हसायला लागली . अशा प्रकारे सोसायटीचे राजकारण झाल. कुठं हसू तर कुठं रडू फुटलं.

लेखक : निशिकांत हारुगले

कथा वाकाटखोर्याची भाग २५

 २५)दादाची सायकल लेखक :  निशिकांत हारुगले. व्यंकू आता खूप मोठा झाला होता. तो कॉलेजला जात असे. घराच्या गरीब परिस्थितीमुळे वज्रेला शाळा सोडावी...