शनिवार, १८ जून, २०२२

९)डोंगराची मोळी

९) डोंगराची मोळी

लेखक : निशिकांत हारुगले.

              एम. ए. बी. एड.




  सह्याद्रीच कुशीत असलेल्या या पेठत सर्व लोकांना जमिनी काही समान नाहीत. काही लोकांना कमी काहीना जास्त अशा आहेत. तर काहींना तर जमिनीचं नाहीत. अशा या लोकांचं राहणं सह्याद्रीच्या दरी खोऱ्यात जास्त जात. पावसाळा म्हंटला की भात खाचरात राबायचं व चार महिन्यात वर्षभराच पिकवायच. व पुढचे सहा महिने लोकांच्यात किंवा आपल्या शेतातील राहिलेली कामे करायची. पेठेच्या गावातील अनेक कुटुंबे शेती करत असल्याने घरात चुलीच्या जळणाची समस्या उद्भवत असे. फेब्रुवारी महिना उलटला की डोंगरच फासल पाणी अटायचं. त्यामूळे शेत कामातून थोडा विसावा मिळत असे.

 लागोपाठ जत्रा यायच्या व शिमग्या पर्यंत घरातील जळण संपत असे.

तेव्हा घरातल्या बायांना राईतील तसेच भुदरगडला लागूनच असलेला डोंगर खुणावू लागे. व बायाबापड्या राईच्या डोंगराची पायवाट चढू लागत. अशीच एक कथा पेठेच्या गावातील बायांची लाकडापायी होणारी झडती कशी होते ती सांगते.

रब्बीचा हंगाम निघाला. व जत्रांचा ओघ सुरू झाला. गाव देव जोतिबाची पण जत्रा झाली. व गडच्या भैरवनाथाची सुद्धा.

रिकाम्या वेळात काय करायचं तर वाकळ शिवण चालू होई. अशाच या एकमेकींच्या शेजारील बायाबापड्या आपले घरकाम आटोपून शेजारच्या तानुबाईच्या परस अंगणात ओसरीत वाकाळ शिवत बसल्या होत्या. यामध्ये चव्हाणांची तानुबाई, गुरवाची सखूबाई, नाव्ह्याची बायजाक्का होत्या.

बोलता बोलता त्यांच्यात विषय निघाला. गुरवाची सखूबाई बायजाक्काला म्हणाली, “ काय सांगू बाई घरात जळणाचा एक तुकडा पण नाही. म्हाताऱ्यानं पावसात वाहून आलेला ओंडका आणला होता. तो पण संपला.”

तेव्हा बायजाक्का म्हणाली, “ तर काय बाई फेब्रुवारी महिन्यात माही झाली. पावन रावळं जेवलीत. त्यात माझी पण लाकड संपलित बघ. आमचा काय खंडोळ कमी हाय हो. जमली की चांगली भुतावळच नव्हं.”

तेवढ्यात तिथे पोऱ्याची सुंदरा आली. व म्हणाली, “ काय तान्याक्का वाकाळ शिवतेस म्हणं.”

तेव्हा गुरवाची सखू म्हणाली, “काय दिसत नाही.”

तेव्हा सुंदरा म्हणाली, “ दिसतेय की पण विचारायची एक पद्धत असतीया. कुणासाठी शिवतीस ग.”

तेव्हा तानुबाई म्हणाली, “ माझ्या लेकीसाठी.”

तेव्हा गुरवाची सखू म्हणाली, “तर.. लेकीलाच दे. तिचं तिथं खाऊन संपना एवढं असताना हीची पोर मुलखातनं राबून आणत्यात. व ही लागली लेकीला वाकाळ द्यायला.”

तेव्हा तानुबाई म्हणाली, “ काय सांगू जावई म्हणाला म्हणून, नाहीतर मला कुठली हौस. आलिया. तरुणपणात शिवल्या होत्या वीस पंचवीस वाकळी. आता नाही जमत. म्हटल कवा मागत नाही. आता मागितलीया तवा देऊया एखादी शिवून. “

तेवढ्यात सखू म्हणाली, “ तर तर तो लागला गोड गोड बोलायला, व ही लागली म्हातारी डोलायला तेच्या तालावर. शहरवस्तीला बंगला बांधला. चिमुटभर कुंकू लावायला तरी बोलावलं का तुला. राधानगरीचा चिक्कू कोंबडा त्यो कवा येताना पावाची पिशवी तरी आणतो का तो.”

तेव्हा म्हातारी म्हणाली, “ जाऊ दे तिकड. नाहीतर तेच्या खादिन कुठं माझी झाड व्हायचीत. पोरगी सुखात असली म्हणजे झालं.”

तेव्हा सुंदरा म्हणाली, “ सखू बोलती ते खर हाय. तेच्या घरात नाही काय तेची आई. तिला इत नाही का वाकाळ शिवायला. तुला लई व्याप बघ.”

तेवढ्यात बायजाक्का म्हणाली, “ ते सर्व जाऊ देत लाकडाचं काय करायचं. तेवढं सांग.”

तेव्हा सखूबाई म्हणाली, “ काय करायचं म्हणजे आणायची डोंगरातून नाहीतर काय.”

तेव्हा सुंदरा पण म्हणाली, “आमच्यात काटकीचा एक नार पण नाही.तवा परवा दिवशी सोमवार हाय. जाऊया काय लाकडाला.”

तेव्हा त्या बायकांच्यात चर्चा झाली. व लाकडाला जायचं ठरलं.”

सोमवारचा दिवस उजाडला. तस त्या सर्वजणी आपापली कामे आटोपून डोंगराला निघाल्या. प्रत्येकिन आपल्या घरातील कोयते व दोऱ्या घेतल्या या सर्वजणी डोंगराला निघाल्या. एकमेकींशी गप्पा करत त्या डोंगर चढू लागल्या. चालता चालता सखू तानुबाईच्या सुनेला म्हणाली, “ काय सुने माहेराला कधी गेलतिस का लाकडाला.”

सुनिता म्हणाली, “नाही बाई आमच्या गावाला डोंगर कुठला.सगळा सपाट माळ हाय. ऊसातील रानात खोडव्याबिगर कायपण मिळत नाही.”

तेव्हा बायजाक्का म्हणाली, “डोंगरची मोळी इल काय तुला.”

“न यायला काय झाल. मी आमच्या गावाला नदीच्या रानातनं वाड्याची वज्जी व उसाच्या मोळ्या वडल्यात. ऊसाच्या मोळ्या पण वडाय जाईते की. मी काय वज्ज्याला हलकी नाही.”

सुनिताच उत्तर ऐकूण बायजाकका म्हणाली, “ पोरगी घट्ट हाय. शंकर्याचा संसार लई चांगला करील.”

इतक्यात सुंदरा म्हणाली, “ तुझा नव्हरा लई साधा माणूस, कोण पण फसवल बघ तेला. तवा डोळ्यात तेल घालून संसार कराय पाहिजे बघ तुला. नाहीतर ही तानी लई जावई जावई करतेय. कधी नाही विचारणार जावई तिला. पण तुला जरा आधार हाय तिचा.”

सुनिता म्हणाली, “ तिच्या जिवावर तर पोर टाकून मला बाहेर पडता येत.”

अशा गप्पा मारत त्या डोंगर चढून गावमिरीच्या रानात आल्या. गवमिरीच रान सपाट असल्याने तिथं भाताची शेतं केली जायची. रानगव्यांच्या मुळे नुकसान होत असे. त्यात मोरांचा वावर असल्याने तर भात पिकाची चांगलीच मळणी व्हायची. गावमिरीला लागून असलेल्या जंगलाच्या रानात गेल्या. व लाकडाच्या मोळ्या काढल्या. व घेऊन आल्या. अस त्यानी आठवडा भरात भरपूर जळण गोळा केलं. हे तुळजाईच्या तुक्यान बघितलं. व त्यानं वन खात्याला चहाडी केली. एकदा जळणाला गेल्या असताना. त्या जळण काढू लागल्या इकडून तिकडून त्यांनी जळण जमा कराय सुरवात केली.

सखूबाई झाडावर चढण्यात तरबेज असल्याने तिन झाडावर चढून वाळलेला मोठा ढापा पाडला. आपल्या वज्ज्याची जोडणी केली. व सुनीताला म्हणाली, “ तू लाकड तोडून मोळी बांध. मी तुला पण एखादा ढापा बघते. अशा तऱ्हेनं त्यानी आपली वज्जी तयार केली. वज्जी केल्यावर त्या एका झाडाखाली जाऊन विसावल्या. आपापल्या भाकरी सोडल्या. एकमेकींना सांबार व कालवण वाटून त्यानी भाकरी खाल्या. व तेथील जवळच्या झरीच पाणी प्यायल्या. रानातली बोर, करवंद, तोरणं गोळा करून ते खात आपल्या वज्जा जवळ आल्या.सूनितांन त्यातली थोडी करवंद आपल्या मुलीसाठी पदरात बांधली.”

 बघून सुंदरा म्हणाली, “ काय नव्हऱ्याला नेऊन देतेस वाटत.”

तर सुनिता म्हणाली, “ नाही पोरसनी घेते.”

तेवढ्यात सखू गुरविन म्हणाली, “लई पोर पोर करू नकोस, स्वतच्या पोटाला देखील खात जा. या जगात कोण बी कुणाचं नसतं. माझं वय बघितलंस नव्हं. तुझ्या सासुबरोबर नांदायला आले. तवापासन हा वनवस हाय बघ. आदी सासूच्या राज्यात राबूनच मेले. व आता पोरग्याच्या राज्यात तरी डोंगराची मोळी चुकली नाही बघ.”

“ मी पण माझ्या पोरासनी तुझ्यासारखी जपते. या रानातनं पिशव्या भरून करवांद नेईते. पण आता लगीन झाल्यापासून बघितलस नव्हं, दोन दोन सूना असून आम्हा म्हातारा म्हातारीला राबाय लागतेय. मी मरायच्या आधी माझा नव्हरा कलमडला तर बर. नाहीतर त्याच वाळवान लागल माझ्या मागं.”

“बरं घ्या आता मोळ्या व चला लागूया गावच्या वाटेला.”

तेव्हा सुनिता म्हणाली, “ शेवटला देवान आईपण दिलंय नव्हं. तू अस बोलतीस. व पदराआडनं सांबार नेऊन लेकाला देतीस नव्हं. “

तेव्हा सखू म्हणाली, “ व्हय बाई खर हाय तुझं. कवा वनवास संपतोया देवा जोतिबाला ठावं.”

असे म्हणून वज्जी घेऊन त्या गावच्या वाटेला लागल्या. गावमिरीच्या शिवरातून त्या खाली उतरल्या. व विश्रांतीसाठी थोडावेळ मेसकाट्यांच्या दाटीच्या बेटाच्या जागेवर बसल्या.

इतक्यात तपासणीला निघालेला वनरक्षक त्यांना गाठ पडला. व त्यांना बघून म्हणाला, “ लाकड कुठून आणल्यासा मला माहीत आहे. खूप दिवस शोधतोय तवा आज सापडल्यासा मुद्देमालासह.”

तेव्हा सुनीता हळूच म्हणाली, “आता काय करायचं ग.”

सकू म्हणाली, “ गप्प बस भिऊ नको.“

तेव्हा तो आपल्या तोऱ्यात जास्तच बोलू लागला.या सगळ्या त्याच्याकडं पाहू लागल्या.”

त्यात बायक्का म्हणाली, “ एक वार माफ करा साहेब. आम्ही गरीब माणसं आहोत. पोटासाठी एवढं डोंगर कट्टा चढताव काय करावं.”

तेव्हा सुंदरा म्हणाली, “ एवढ्या डाव सोडा साहेब आम्ही काय वल्ली लाकड नाही काढलीत. वाळलेल ढाक पाडल्यात. तवा आम्हाला सोडा.”

तेव्हा तो दोनचार शिवा हासडत मोळीतील कोयते काढून घेऊ लागला.”

 तशी सखू म्हणाली, “ पाया पडते साहेब कोयत तेवढे काढून घेऊ नका.”

“तुमचे कोयते काढून घेतल्या शिवाय तुमची मस्ती उतरायची नाही.” तो म्हणाला.

कितीतरी वेळा गया वया केली तरी तो ऐकायला तयार नव्हता. व जास्तच अरेरावी करायला लागला.

ते पाहून सखू म्हणाली, “ लई सरकारच जंगल सरकारच जंगल म्हणतोस. सरकार कुणाचं गा आम्ही निवडून दिलेलच नव्ह. चार फुकण्या कांडग्या पाई गरीबाच कोयत काढून घेऊन बायकांवर पुरुषार्थ दाखवतोस व्हय रं.”

तेव्हा तो म्हणाला, “ एक तर चोरी व वरती बरी चाललीय शिरजोरी.”

तेव्हा सुंदरा म्हणाली, “ मगाठावण ओरडुन सांगताव की आम्ही वाळलेली लाकड काढल्यात. तुला एक तरी वल लाकूड दिसतय का. आम्ही गरीब मानस गावात धड घर नाही की शिवारात धड शेत नाही कुठं जावाव.”

तेव्हा तो म्हणाला, “ जावा की मसणात.”

तेव्हा बायजा म्हणाली, “ हे बघा मसणात तर सगळीच जात्यात. तू पण जाशील.”

शेवटी सखू म्हणाली, “ हे बघ आम्ही आता गावमिरीत हाय तू काय आम्हाला जंगलातली लाकड काढताना पकडलास काय. आमचं म्हणणं हाय की आम्ही जंगलातील लाकड काढली नाहीत. जा आता काय म्हणणं हाय तुझ.”

तेव्हा तो म्हणाला, “मग कुठली काढल्यासा सांगा.”

तेव्हा ती म्हणाली, “ ते तुला विचारायचा संबंध नाही. व एवढी रखवाली करतोस रात्रीची सागवानाची लाकड व चंदनाची लाकड कुठं पळून नेत्यात त्यांनां पकड की. तेव्हा पडत असशील डाराडूर घोरत. व आम्हा बायकांना बघून शड्डू ठोकतोस व्हय र.”

तेवढ्यात सुंदरा म्हणाली, “ मला काय ठाव नाही त्या लाकडविक्या तुक्यासंग तुझ काय संधाण हाय ते. जंगलातली सागवानाची लाकड कुठं जात्यात ते माहीत नाही व्हय आम्हाला. गुमाण कोयत दे नाहीतर उभा इतच जाळताव तुला..”

तेव्हा तो म्हणाला, “ सरकारी अधिकाऱ्याला अस बोलण गुन्हा हाय.”

तेव्हा सखू म्हणाली, “ होय गुन्हा हाय खर तर कायदा तुम्हाला पण लागू हाय. तुम्ही इकता ते चालत. व आम्ही पोटासाठी कांडग्या काढताव ते चुकीचं.”

हे बोलणं ऐकूण हुज्ज्जत घालत्याला त्यो वनरक्षक ओशाळला. व त्यांचे त्याने कोयते परत केले. व निघून गेला.”

तेव्हा सुनिता म्हणाली, “ आता तो आपली तक्रार करणार.”

सखू म्हणाली, “ सुने हा साधापणा सोड. बघितलंस काय कसा फुगलेल्या बैलागत आलता. व गेला कसा भिजलेल्या उंदरागत याला एकीच बळ म्हणत्यात.”

बायजा म्हणाली, “ आता काय या वर्षाची जोडणी झाली. उद्यापासनं खोडव्याला जायचं. इकडली वाट जगला वाचलाव तर पुढल्या वर्षी.”

लाकडाच्या मोळ्या घेऊन त्या घरला आल्या. त्यानी आता सुटकेचा निःश्वास टाकला होता. संध्याकाळ झाली. सांजेच्या जेवणाला सुनिता लागली. इतक्यात शेजारील मंगलाची पोरगी सांगत आली. तुम्हा लाकड आणायला जात्याली चाडी तुळजाबाईच्या तुक्यान केली. मगाशी मी दामू अण्णाच्या दुकानात गेले. तेव्हा संगप्पा आजाला तो सांगताना ऐकलं.

तेव्हा सुनिता चिडली. व तिने हातातलं काम सोडलं. व तिने सखुला सांगितलं. तशी सखू चिडली. व तिने लाकडाला जाणाऱ्या बायकांना बोलावलं. व हे सांगितलं. तशा सगळ्या बायका चिडल्या. व व एक एक लाकूड घेऊन तावा सरशा तुळजाईच्या घरात शिरल्या. व तुळजाईच्या सुनेला त्यानी विचारलं. ‘तुक्या कुठं हाय?’ तेव्हा ती म्हणाली, “ काय काम हाय?”

तेव्हा सखू म्हणाली, “ त्याची पूजा बांधायची हाय.”

इतक्यात त्यांना चुलवानाला बसलेला तुकाराम दिसला. त्यानी आत जाऊन त्याला जाब विचारला.

तसा तो म्हणाला, “ तुला कुणी सांगितलं म्या.. म्ह.. टल म्हणून.”

तेव्हा ती म्हणाली, “ त्या ऑफिसरन सांगितल जातोस काय विचारायला लेका.”

तुझ्या बाबन डबोल करून ठेवलंय तस आमच्या सासऱ्यान नाही. तुझ मड बसवलं ते.” असे म्हणत. त्यानी तुक्याला बडवायला सुरुवात केली. तस त्याची बायको मधी पडली. तशी तिला धरत सुनिता म्हणाली, “ तू गप्प बसलीस तर बर नाहीतर तुला पण निपाणी दाखवीन.”

शेवटी तुक्या बोंबलायला लागला. तवा तुळजा म्हणाली, “ सखे सोड बाई तेला. तुझ्या पाया पडते.”

तेव्हा सखू म्हणाली, “ म्हातारे तुझ्याकडं बघून याला आता सोडताव जर याने असा परत चमचा ढवळला तर डोचक्याची पाक केस निघतील तेच्या.”

शेवटी त्या सगळ्या त्या घरातून बाहेर पडल्या. व आपापल्या घरला निघून गेल्या.

अशा प्रकारे डोंगरची मोळी पेठतील लोकांच्या मनोरंजनाचे कारण बनली.

लेखक : निशिकांत हारुगले


रविवार, १२ जून, २०२२

८) नर्स बाई

८) नर्सबाई

लेखक : निशिकांत हारुगले.

         एम. ए. बी.एड.




पूर्वीच्या काळी डॉक्टरकीचे काम वैद्य लोक करत असत. राजेरजवाडे असोत. वा सामान्य माणसं निसर्गात मिळणारा झाडपाला हिरडा, बेहडा, तुळस या सारख्या औषधी वनस्पतींचा वापर करत असत. पुढे आधुनिक जगात वेगवेगळ्या रसायनांचा शोध लागत गेला. व झाडपाल्यांच्या औषधांना आयुर्वेदिक गोळ्यांचे रुप प्राप्त झाले. व उपाय म्हणून वेगवेगळ्या रसायनाने निर्माण गोळ्यांचा वापर होऊ लागला.

भारत सरकारने वेगवेगळ्या शिक्षणाद्वारे नवीन डिग्री तयार केली. त्याद्वारे नवीन डॉक्टर निर्माण झाले. पण हे डॉक्टर शहरी भागातच आपले बस्तान मांडून बसले. ग्रामीण भागात पेशंट कमी, त्या मानाने शहरी भागात पेशंट जास्त व इतर सुखसोयी त्यामुळे शिक्षणाला घातलेला पैसा पण वसूल होई. त्यामुळे डॉक्टर ग्रामीण भागात जास्त नसत. त्यामुळे ग्रामीण भागातील लोकांना उपचारासाठी एकमेव आधार असे तो तेथील नर्सबाईचा. व तिच्या जोडीला असणारा मलेरिया अधिकारी किंवा कुष्टरोग तंत्रज्ञ. हे त्रिकुटच ग्रामीण भागात जास्त राबताना दिसते.

नर्स व तिच्या बरोबर फिरणारा डॉक्टर पाहिला की त्यांच्या बाबत माणुसकी सोडून चर्चा करणारी माणसे आपण पाहतो. पण कोळशाच्या खाणीत जसे हिरे असतात. तसे आपल्या काळ्या केसांचे पांढरे पण होई पर्यंत प्रामाणिक राबणाऱ्या नर्सा अनेक आहेत.

अशा या क्षेत्रात राबणारी एक नर्स तिची ही कहाणी. माधुरी ही एक नर्स पेठत असणाऱ्या केंद्रावर तिची नेमणूक झाली. दिसायला देखणी , पश्चिम महाराष्ट्रात एका गरीब मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेली, व्यवसायाने ती नर्स होती. प्रतिकूल परिस्थितीमुळे ती या व्यवसायात पडली होती. अशा या नर्सची नेमणूक पेठच्या गावात झाली होती.

नोकरीवर रुजू झाल्यानंतर गावातील लहानापासून वृधापर्यंत सगळ्यांचे आरोग्य तपासणी , नसबंदीची कामे व इतर नेमलेली कामे करण्याची जबाबदारी तिच्यावर होती.

तिच्याकडे नवनवीन पेशंट येत असत. कधी क्वालरा कधी टायफॉइड व इतर त्यांना तपासताना तिची हसून दमछाक होत असे.

एके दिवशी ती गावातून फिरत असताना प्रत्येक घरावर नोंदणी करण्याचं व लहान मुलांच्या पोलिओसाठी नोंदीची ती काम करत चालली होती. गाव व आसपासच्या वाड्या ती फिराय लागली.

पेठतून फिरत एका घरावर ती नोंदणी करताना एक म्हातारी तिला बघून तिला म्हणाली, “ डॉक्टर बाई मला पण औषधं द्या.”

नर्स, “ काय होतंय ते सांगा.”

म्हातारी बाई, “ माझ्या की नाही पोटात तोडल्यासारख होतंय.”

नर्सन निरिक्षण केलं व ती म्हणाली, “ संध्याकाळी लावून द्या एखाद्या पोराला, देते औषध पोटावरील कळीचं.”

एका घरात तर तिला वेगळाच अनुभव आला. त्या घरातील स्त्रीचा नव्हरा नोकरीला बाहेरगावी गेला होता. त्यामुळे तिला करमत नव्हते. दारावर नोंद करताना तिने नर्सेला आत बोलावले. ती बाई नर्सला म्हणाली, “ बाई काय सांगू मला कससच होतंय.”

नर्सबाई “ कससच म्हणजे नेमकं काय होतंय.”

ती बाई, “ काय सांगू बाई मागल्या महिन्यात धनी होतं तवा झोप चांगली लागायची. पण आता झोपच येत नाही. मला करमत नाही.”

नर्स, “ अहो हे मानसिक दुःखन झाल. शारीरिक नाही. यावर माझ्याकडे इलाज नाही.”

अशा प्रकारे ती सर्व गावचा सर्वे करत गावाबाहेर एका मांगाच्या घरात आली. गावच्या खालच्या बाजूला असणारे हे मांगाचे घर म्हणजे दोन तीन सोपे. त्याला ताट बेळ्याच दार त्यावर लिहिणार कसं. म्हणून बाजूच्या भिंतीवर रंगीत खडूने तपासणी नंबर टाकला. व ती म्हणाली, “ घरात कोण आहे का?”

तेव्हा आतून एक बाई बाहेर आली. व त्या नर्सला बघत म्हणाली, “ काय हाय डागतरीन बाई.”

नर्स, “ घरात मुले किती हाईत. “

ती बाई लाजून म्हणाली, “ चार पोरी हाईत मला.”

घरामाग चामड धूणारा तिचा नव्हरा आला. व म्हणाला, “ चार पोरी हाईत, अजून पोरगा झाला नाही.”

माधुरी नर्स तेला म्हणाली, “ आव पोरगा आन पोरगी असा भेद करू नये. घरात नाही खायला आन उगाच ढीगभर पोर कशाला, शिवा आदी तिला. भारताची लोकसंख्या वाढतिया.”

तेव्हा तो मांग म्हणाला, “ वाढली तर वाढूदेत. आम्ही मेल्यावर तिटव धरायला नको का कोण.”

तेव्हा वाद न घालता ती पुढल्या घरावर गेली. अशीच ती नोंद करत पाटलाच्या घरला गेली. दारावर नोंद करत तिन हाक मारली. तेव्हा पाटलाची मुक्ताबाई बाहेर आली. व म्हणाली, “काय काम हाय हो.”

नर्सबाई, “ जरा डोसाच काम आहे. तेव्हा घरात मूल किती आहेत?”

तेव्हा पाटलीन म्हणाली, “ आमच्या घरात होय थोरल्याला दोन गंडे हाईत व धाकट्याला चार पोरी हाईत.”

नर्सबाई, “ दोन मुलांचा कायदा असताना इतकी पोर काढणं गुन्हा हाय. अशान तुमचं रेशन बंद होईल.”

मुक्ता पाटलीन म्हणाली, “ हू मला शहाणपण शिकवत्यात शाळा शिकली नसली तरी अक्कल हाय मला बाई, माझ्या धाकट्याला मुलगा नको.”

नर्सबाई म्हणाली, “ पण मावशी पुढला पोरगा होईल कशावरून. अन् पोरगी झाली तर.”

नर्सच बोलण तोडत ती म्हणाली, “ तुम्हाला काय ठाव पोरग्याच महत्त्व. पोरी पोरी काय कामाच्या आम्ही मेल्यावर वेशीतून रडत यायच्या व बारादिवसाला पातळ नेसायच्या. माझा पोरगा माझ्या मड्यावर लाथेन माती सारू दे. फिटल माझं. माझ्या माहेरच्या देवीला नवस केलाय मी. माझ्या धाकल्याला पोरगा होऊंदे, मी दंडवत घालेन म्हणून. माझी देवी मला पावल्याबिगर रहायची नाही.”

नर्स बाईला काय बोलावं ते सुचेना गुपचूप दारावर नंबर टाकला. व ती पुढल्या दाराला निघाली. मनातल्या मनात म्हणाली, “ देवा परमेश्वरा हीच्या पोराला पुढली पोरगीच होऊ दे.” व ती पुढे मार्गस्थ झाली.

लसीकरणाचा दिवस उजाडला. की तिची तारांबळ होत असे. गावातिल बायकांना दहा बारा वेळा तरी डोसला बुलवावे लागे. पावसाळ्याचे दिवस असले की साथीचे रोग थैमान मांडत. गावात कोंबड्यांना रोग आला तर लोक नर्सबाईकडे धाव घेत असत. आपल्या पोटात चावतय, डोकं दुखतंय, ताप आलाय अशी कारणे सांगून गोळ्या नेत.

पेठच्या गावात मे महिन्यात गरमीत कोंबड्यांचे रोग थैमान घालत आसत. व गोल मटोल आंडी घालणाऱ्या कोंबड्या झिंगायला लागत. तसेच बुळकायला लागत. पेठत राहणाऱ्या ज्ञानु जगतापला पण कोंबड्या पाळायची खूप हौस. गावातील कोंबड्यांच्या पाठोपाठ त्याच्या कोंबडीला पण रोगाने पकडले. त्या पाठोपाठ त्याचा कोंबडा पण झिंगायला लागला. त्याला काय करावे ते सुचेना. शेवटी त्याने नर्स बाईकडून गोळी आणायचे ठरवले. व तो नर्स बाईच्या सरकारी निवासस्थानी गेला. व म्हणाला. की आमच्या आईला ताप आलाय. व त्यावरील गोळी द्या. तेव्हा नर्स बाईने विचारले, “ केव्हापासून ताप आलाय.”

तेव्हा ज्ञानु म्हणाला, “ मघासी शेतातून आली. तेव्हापासून ताप आलाय. व त्यावर गोळी द्या.”

तेव्हा नर्सबाई तेला म्हणाली, “ रक्त लगवी तपासायला पाहिजे. मग औषध देता येईल.”

तेंव्हा तो म्हणाला, “ एवढ्याशा तापाला कशाला पाहिजे रगात, द्या की गोळी एखादी.”

तेव्हा नर्स बाईन आपल्या जवळील दोन गोळ्या त्याच्या हातावर टेकवल्या. तो घरला निघून गेला. दुसऱ्या दिवशी नर्सबाई वाडीच्या गावांना तपासणीसाठी निघाली. तेव्हा वाटेत तिला ज्ञानुची आई भेटली. तेव्हा तिने तिला विचारले. की काल तर ताप होता. व आज कुठं गेला होता. औषध घेतल्यानंतर एक दिवस तरी विश्रांती घ्यायची.”

ती म्हणाली, “ मला बरं नसायला काय झालं. चांगली हट्टी कट्टी हाय.”

तेव्हा नर्स म्हणाली, “ मग ज्ञानु काल तुमचं नाव सांगून कोणाला गोळ्या घेऊन गेला. तेव्हा ती काही न बोलता निघून गेली. सर्वेवरून येताना ज्ञान्याला खेळताना तीनं बघितला. तेव्हा ती तेला म्हणाली, “ ये ज्ञान्या काल आई आजारी आहे. म्हणून खोटं सांगून गोळ्या आणल्यास नव्हं. काय केलंस त्या गोळ्यांचे.”

इतक्यात तिथे खेळत्याला पवाराचा गणू म्हणाला, “ बाई त्यानं ती गोळी आपल्या झिंगत्याल्या कोंबड्याला घातली. त्त्यो बघा कोंबडा झाडाखाली बसलाय.”

नर्सबाई चिडली व तेला म्हणाली, “ व्हय रे गाढवा इथ माणसाना द्यायला गोळ्या मिळत नाहीत आन तुझ आपल बर चाललय. ये आता परत गोळ्या मागायला.तुला दाखवतो.” असे म्हणून ती आपल्या रूमवर गेली.

सरकारी नियमानुसार ऑपरेशन टार्गेट पूर्ण करावं लागतं असे. त्यामुळे ती इकडल्या तिकडल्या पेशंटना गोळा करत असे. पण पुरुष नसबंदी म्हंटल की आपल्या पुरुषत्वावर हल्ला समजला जात असे.

एकदा सरकारी नियमानुसार पुरुष नसबंदीची केस हवी होती.तेव्हा गावातल्या तसेच वाडीतल्या अनेक पुरुषांची चौकशी केली. पण कोण तयार नव्हता. शेवटी एक दोन मध्यमवयीन माणसाना तयार केलं. ती ऑपरेशनला घेऊन गेली. तेव्हा डॉक्टर तिला म्हणाला, “ यासनी कशाला घेऊन आल्यासा यांची काय झाड व्हायचीत , आताच मर्तुकडी दिसत्यात.”

ती डॉक्टरला म्हणाली, “ हे बघा दोन पेशंट पाहिजेत ना मग हे घ्या. नाहीतर माझ्याकडे पेशंट नाहीत.उगाच वाडाचार लावू नका.”

तेव्हा त्या डॉक्टरने त्यांची नसबंदी करायला घेतली. तेव्हा असे जाणवले की, त्यांची आधीच नसबंदी झाली होती. डॉक्टरने तिला चांगलेच धारेवर धरले.

नर्स चिडून म्हणाली, आता मी काय त्यांना तपासून आणायचं राहिलय. आधी पुरुष नसबंदीची केस मिळत नाही. व मिळाल्या तर या अशा आम्ही काय करावं. वरच्यासणी नुसतं बोलता येते. त्या अधिकाऱ्याना म्हणा आधी तुमची नसबंदी करा. व मग आमच्याकडे केसेस मागा. डॉक्टर त्यावर गप्प बसला. व त्या दोघांची नोंद घेतली. व त्याना अनुदान दिले. व रिकामा झाला. सरकारी अधिकारी म्हणजे वार वार बदल्या या ठरलेल्या त्यानं वैद्यकीय अधिकारी म्हंटले म्हणजे बदली नसेल असे होणारच नाही. सरकारी हॉस्पिटल मधील डॉक्टरची बदली झाली. व त्या ठिकाणी एक साखरदांडे नावाचा अधिकारी रुजू झाला. तो जरा रंगेल असल्याने बायकांच्याकडे पाहण्याचा त्याचा दृष्टीकोन विचित्र होता. नेहमीप्रमाणे माधुरी नर्स रिपोर्ट जमा करणेस आली. तेव्हा तिला पाहताच याच्या मनात विचित्र विचार आले. व हा रंगेल चेंडू लागला की गोंडा घोळायला. मुद्दाम एखाद्या सामान्य केसची जास्तच चौकशी करणार. त्यातून लगट करायचा प्रयत्न करायचा. कोणत्या न कोणत्या कामासाठी हा तालुक्याला बोलवायचा. याच्या बोलण्याने नर्स जाम वैतागून गेली होती. तिला अवघडल्या सारखं व्हायचं. पहिलं ज्या सरकारी दवाखान्यात अगदी आनंदात जायची तोच आता जेल सारखा वाटाय लागला होता. त्याच्या या वागणुकीमुळे सगळे डॉक्टर व इतर स्टॉप तिच्याकडे संशयाने पाहू लागला.

तिच्या बरोबर काम करणारा मलेरिया अधिकारी तिला डिवचून बोलू लागला. एकेदिवशी त्या मलेरिया अधिकाऱ्याने तिला खुणावले. तेव्हा तिने त्याच्या एक कानफटात लगावली. तिचा नाजूक हात असा जोराचा बसला की एखाद्या राकट माणसाचा बसावा. त्याने त्याला दिवसाच्या चांदण्या दिसायला लागल्या..तेव्हापासून तो तिच्या पुढ्यात एखाद्या मांजरासारखा राहायला लागला.

आपल्या शुद्ध चारित्र्यावर हा डाग पडतोय. तेव्हा या साखरदांडेचा कारलेदांडा करायचा व याचा एम बी बी एस डिग्रीचा नक्षा उतरायचा चंगच माधुरीने बांधला. एके दिवशी तिने आपल्या नव्हर्याल हे सगळं सांगितलं. व यावर उपाय काय करायचं ते ठरवू लागली. तेव्हा तिच्या ध्यानात आले. की तिच्या नव्हत्याच्या एक राकट मित्र संजय जो भांडखोर आहे त्या द्वारे याला धडा शिकवायच तिने ठरवले.

एके दिवशी तिने संजयला जेवायला बोलवून घेतले. व चांगला मटणाचा बेत केला. जेवता जेवता त्यापुढे विषय काढला. तेव्हा संजय म्हणाला, “माधुरी ताई तो डॉक्टर कधी रिकामा असतो ते सांग.”

माधुरीने आधीच माहिती काढली होती. तिने सांगितले. की तो रोज सकाळी पालीच्या घाटाकडे फिरायला जातो. तेव्हा संजू म्हणाला, “ मग काम फत्ते होणार.”

दुसऱ्या दिवशी पालीच्या राईच्या वाटेला संजू व त्याचा मित्र गाडी घेऊन भगटायला थांबले. गाडीची नंबरप्लेट काढली होती. थोड्या वेळाने धावत घाटाकडे निघालेला डॉक्टर दिसला. संजयचा मित्र मागे जाऊन त्याला म्हणाला, “ नमस्कार साखरदांडे डॉक्टर साहेब”

डॉक्टर म्हणाला, “ नमस्कार.”

तो डॉक्टर आहे याची खात्री पटताच. त्याने संजयला खून केली. तसा संजय मागून आला व डॉक्टरच्या डोक्यात टपली मारली. व रस्त्यावर कोण नाही बघून बाजूच्या झाडीत डॉक्टरला ते घेऊन गेले. डॉक्टर घाबरला, “ तुम्ही कोण आहात.”

इतक्यात संजय थोबाडात एक लगावली. व म्हणाला, “ बायकांच्या लई खोड्या काढतोस, पेशंट असो नर्स असो लई वाघटा सारख्या जिभल्या चाटतोस." असे म्हणून बडिवला. व ते निघून आले.

त्या दिवसापासून त्याचे वागणे बदलले. बायकांकडे तो नजर वरकरून बघायचे सोडाच. माधुरी नर्सबाई न म्हणता नर्सताई म्हणू लागला. थोड्या दिवसांनी त्याने बदली करून घेतली.

थोड्या दिवसांनी माधुरी नर्सेची पण बदली झाली. व ती सुद्धा आपले बस्तान गुंडाळून पेठचं गाव सोडून आपल्या बदली झालेल्या ठिकाणी गेली. व आपल्या आयुष्यातील आठवणी तीनं पेठत ठेवल्या.

लेखक. : निशिकांत हारुगले.


शुक्रवार, १० जून, २०२२

७) बसवाण, बैल, महादेवाचा नंदी

 ७) बसवाण

               लेखक : निशिकांत हारुगले.

                एम. ए. बी. एड.




दख्खनच्या सह्याद्रीच डोंगर कप्यात शेताची खाचर डोलत होती. त्याच्या कुशीत वाहणारी वेदगंगा आपल्या काठावरील अनेक गावांना सुखावत चालली होती. तिच्या कुशीत अनेक वाड्या व गावे गुण्यागोविंदानं नांदत होत्या. पेठेच्या गावाला देखील असाच शिवार होता जसा गावाच्या खालती तसाच तो गावच्या वरती देखील होता. शिक्षणान जरी सुशिक्षित पण आलं असल तरी बरेच जन शेती करत होते. त्या पैकी एक पांडुरंग पवार. हा देखील शेती करी. तशी त्याला लहानपणापासूनच शेतीची आवड, त्यामूळे शेतात राबणारी बैलं म्हणजे त्याचे सवंगडी. लहानपणापासून याच्या बैलगाडीत बस. त्याच्या गोठ्यात खेळ, कधी मातीची बैलं बनव. असा सगळा खेळ खेळत तो लहानाचा मोठा झाला.

पुढे त्याच लग्न झालं. घरची जबाबदारी अंगावर पडली. व ज्या बैलांशी खेळत तो लहानाचा मोठा झाला. तिच बैलं त्याच्या जीवनाचा आधार झाले. घरच्या गाईची पाठी छान बैल तयार केली होती. पण बहिणीच्या नव्हऱ्याला हवी असल्याने त्यान ती देऊन टाकली. आता नवा जोड घ्यायचा तर पैसे हवेत. म्हणून घराच्या शेताबरोबर लोकाची शेत त्यानं कसायला घेतली. व सुगी होताच धान्य विकून आलेल्या पैशात बैलं घ्यायचं त्यानं ठरवलं. पेठेच्या शिवारात अनेक प्रकारची बैल असत. पण पांडबाला आपली बैलं नंबरी हवी होती. म्हणून त्यानं संकेश्वरच्या बाजारातून बैलं घ्यायची ठरवलं. त्या दृष्टीनं त्यानं रुपयांची जमवाजमव केली. व आपला मित्र हरबासोबत तो बैलं घ्यायला निघाला.

बाजाराच्या दिवशी तो तालुक्याच्या स्टँडवर आला. सोबत हरबा पण होता. गडहिंग्लजला चाललेली गाडी त्यांनी पकडली. थोड्या वेळानं गाडी निघाली. पाल घाट लवंडून गाडी चिकोत्रा खोऱ्यात उतरली. पांगीर पाटीवर काही उतारू उतरले. तर काही गाडीत चढले. एक म्हातारा लगबगिन चढला. व हरबाजवळ बसला. व म्हणाला, “गाडी कंच्या गावाला जाती.”

हारबा, “ पाटी वाचली नाही का?”

वाटसरु, “ नाही व मला जरा कमी दिसतं.”

हरबा, “ गडहिंग्लजला जाती. “

वाटसरु, “ तुम्ही कुठं चालल्यासा.”

हराबा, “ आदी तूम्ही कुठं जाणार ते सांगा.”

वाटसरु, “ मी उत्तूरात उतरणार हाय. जरा डुलकी लागती हो मला. उत्तूर आलं की सांगा. नायतर मागल्या वानी नको. गडहिंग्लजातच जाग यायची.”

हरबा, “ मी उठविन म्या चाललोय गडहिंग्लजला.”

तो थोड्या वेळानं घोराय लागला. उत्तूरात आल्यावर त्याला जाग केलं. व त्याला आदी उतरला. व दुसरीकडं बसलेल्या पांडबाला जवळ बसायला बोलावलं.

हरबा, “ काय त्या म्हाताऱ्याचा सूर कशी बायको नांदत असेल देव जाणे.”

पांडबा, “ गप्प लेका तू बी घोरतोस की.”

हरबा, “ माझी तिनची मोटार कुठं व ही दहाची कुठ.”

एकच हास्या पिकला.

गाडी गडहिंग्लजात दाखल होताच. त्यानी पहिल्यांदा उपहारगृह गाठलं. भजी पावाची ऑर्डर दिली. ती येताच नाष्टा आटोपून ती बील भागवून स्टँडवर आलीत. व संकेश्वर पाटी वर आलीत. तिथं अनेक कन्नड बस होत्या. त्याकडे पाहत

पांडबा, “ हरबा यातर सगळ्याच जिलब्या हाईत. कोणत्या बशीत चढायचं.”

हरबा, “ थांब कंडेक्टरला विचारू आधी.”

मग त्यानं दोन चार एस्टींची चौकशी केली. शेवटी त्यांना संकेश्वरला जाणारी बस मिळाली. व तेनी थेट संकेश्वर गाठलं.

संकेश्वरचा बाजार भरला होता. ती चौकशी करत करत. जनावरांच्या बाजारात दाखल झाली. त्याना काय करावे सुचेना सगळेच कन्नड बोलणारे. ते कावरे बावरे होऊन इकडे तिकडे फिरुन बैलं बघू लागले.




त्याने बघून एकजण जवळ आला व कन्नड मध्ये बोलला.

तेंव्हा हरबा , “ ये बाबा मराठीत बोल तुझं कायबी समजत नाही.”

तेव्हा तो म्हणाला, “ काय बसवाण घ्यायचय.”

हरबा, “ होय, बैलच घ्यायची हाईत. पण आम्हाला या लोकांची भाषा समजत नाही.”

“एवढच नव्हे, मी देतो जमवून पण मला हजार रुपये कमिशन पाहिजे.” तो म्हणाला.

हरबा, “ पावणं आम्ही तुम्हाला येड वाटलाव काय. नको आम्हाला तुमच्या कडन बैलं. आमचं आम्हीच बघतो.”

ते दोघे बाजूला गेले. बाजारात हिंडून बैल बघू लागले.काही पाडी दोन दाती तर काही चार दाती , शेपटीचा गोंडा, अंगाच कांड बघत ते निघाले. शेवटी त्यांनी एक बैलजोडी हेरली. बैलं दिसायला वक्राकार शिंगाची करड्या रंगाची. दिसायला झ्याक त्यानं आपल्या भाषेत त्या पाड्यांचा दर विचारला. त्या माणसानं पंचवीस हजार सांगितला. दर जास्त पाहून ते बाजूच्या जोडीला बघू लागले. थोड्या वेळानं ते दोघे एका बाजूला गेले. हरबा, “हे बघ पांडू जर आपल्या दरात जोडी मिळाली तर घ्यायची. नाहीतर निघायचं. थोड्या वेळानं तो मघाचा कानडी हेड्या पुन्हा त्यांच्याजवळ आला. “ हे बघ मामा मला जर सातचे रुपये देत असशीला तर तुम्हाला बैल जमवून देतो.”

पांडबा, “ हे बघ तू जर ती करड्या रंगाची बैल चौदा हजारात जमवून देत असशिल तर तुला पाचशे रुपये कमिशन देईन.”

“काय राव चौदा हजाराला ऐक बैल तरी येईल काय?.”

हरबा, “ मग तुझी बैलच नकोत. चल पांडू जाऊया आपल्या भागात बघू एखादा जोड मुरगुडच्या बाजारात.”

 असे म्हणताच तो त्यांना थांबा म्हणाला, व त्या बैल मालकाकडे गेला कानडीत बोलचाल झाली व पंधरा हजार चारशेला ती बैल ठरवून त्यानं दिली. बैलं घेतल्यावर त्याला पैसे दिले. व मध्यस्तीला पाचशे रुपये देऊन व्यवहार बाजारात नोंद केला. व बैल घेऊन ती बाजारातून बाहेर पडलीत. आता थोडेच पैसे शिल्लक होते .

बाजारातून बाहेर पडताना त्या मध्यस्तान विचारलं, “काय ट्यांपो गाठून देऊ का.”

तेव्हा हारबा म्हणाला, “ नको पावन, इथ भडगावात आहेत पावन आमचं त्यांचा टेम्पो हाय की.”

असे म्हणुन ती गडहिंग्लजच्या वाटेला लागलीत. जवळ पैसे कमी असलेने त्यांनी चालत जायचं ठरवलं.”

थोड अंतर गेल्यावर पांडू म्हणाला, “ मगाशी टेम्पो ठरवला असता व घरी गेल्यावर पैसे दिले असते तर चालले असते की.”

हरी, “ चल गप हा आधी कारडी मुलुख यांचा काय नेम कुठतरी न्यायची व लुटायची.”

“मग आता गावी कस जायचं.” पांडबा म्हणाला.

“ कस म्हणजे चालत वाटेत कुणी विचारलं की सांगायचं पुढल्या गावी चाललोय म्हणून.” हारबा म्हणाला.

चालत चालत ती दोघ गडहिंग्लजला आलीत. एका हॉटेल बाहेर थांबून तेथून थोड्या चपात्या व भाजी घेतली. व थोडं पाणी पण आपल्या जवळील कातडी पाण्याच्या पिशवीत घेतलं. व ती आपल्या वाटेला लागलीत. पुढे वाटेला एका शेतात त्यांनी जेवण केलं. व उत्तूरच्या वाटेला लागलीत वाटेतील ओढ्यातील पाणी बैलांना पाजलं. बैलं चांगलीच धापली होती. त्याना सोक पडला होता. पाणी प्यायल्यावर त्यांना बर वाटलं. ती पुढे वाटेला लागलीत. वाटेत भेटणारी लोक बैलांची चौकशी करत होती. उत्तूरजवळ आल्यावर एका माणसान विचारलं, तो दिसायला काळसर होता.

“ बैलं आणली वाटत.”

हारबा, “ व्हय आणल्यात.”

थोड्या वेळानं त्यानें पुन्हा विचारले.

“ कोणत्या गावाला चालल्यासा.”

तेव्हा पांडबा म्हणाला, “ उत्तूरला चाललोय.”

पुढे ती निघालीत. थोड्या वेळात उत्तुर पार करून पिंपळगाव पाटी आली. आपल्या भागात आल्यामुळे त्यांना बर वाटलं. पिंपळगाव यायला चांगलाच अंधार झाला.

हरबा पांडबाला म्हणाला, “ एकदास आलो आपल्या भागात, या भागात वाटमाऱ्या होतात. आता मांगणूर पार केलं म्हणजे झाल.”

मांगणूर पार करत पाल गाठाय चांगलेच बारा वाजले. कुठून तरी जंगलातून कोल्हेकुई ऐकू येत होती. आता अंधाऱ्या वाटेनं चालन कठीण झाल होत. हारबा पांडबाला म्हणाला, “हे बघ पांडू चालून पाय दुखायला लागलेत. तवा आपण आपल्या पार्वतीकडे मुक्काम करूया.”

पांडबा, “ हे बरं हाय की.”

तेव्हा ती सर्वजण पार्वतीच्या घराकडे निघाली. पालीच्या मध्यावर पार्वतीच घर होत. तिथं गेल्यावर हहारबन पांडबाच्या हातात बैलाची दोरी दिली. व त्यानं पार्वतीच्या दारावर थाप मारली. रात्रीचं बारा वाजता घरावर थाप पडल्याने थापेच्या आवाजाने पार्वतीचा नव्हरा उठला. व दार उघडायला निघाला. तेंव्हा पार्वती म्हणाली, “ काय बाई म्हणावं या बाप्ययाला राती येळच कोण पणं थाप मारलं. रात्रीचं बारा वाजले. भुतावळ उठली असलं. झोपा गप्पवाणी.”

तो पुन्हा माग येऊन अंथरुणावर बसला. तेव्हा दारावर पुन्हा थाप पडली. तेव्हा तो म्हणाला, “ कोण हाय,”

हरबा, “ मी हाय हारबा पेठचा पावणा.”

तेव्हा पार्वती म्हणाली, “ आव, भुताटकी असलं ती, एवढ्या रातीला आमचा दादा कशाला येईल. इथं. “

हरबा, “ ये पारे असली कसली झोप लागली तुला.” पार्वती खाडकन उठली. व अंगावरली वाकाळ बाजूला सारत नवऱ्याला म्हणाली, “ चला बघुया कोण हाय ते.”

पार्वती अन तिचा नव्हरा दार उघडायला गेले. दाराजवळ जाताच पार्वती म्हणाली, “ दादा तू असशील तर दारावर चारवेळा थाप मार व राम म्हण.”

हरबान हसतच दारावर चारवेळा थाप मारून राम म्हणाला. पार्वतीची खात्री झाली. तिनं नव्हऱ्याला दार उघडायला लावलं.

दार उघडताच हारबा तिला म्हणाला, “ पेठत असताना बाच्यामागं रातइरचं पाणी पाजायला जाताना तुला भीती वाटत नव्हती. आन आता कुठून हे खूळ डोक्यात बसलय तुझ्या.”

पार्वती म्हणाली, “ तवा आपला बाबा असायचा संग. तो म्हणजे देव माणूस कसं त्या बरोबर कुठं पण जायलां भ्या नव्हतं वाटत. पण आता….”

अस म्हणत तीन बोलण तोडले.

पार्वतीचा नवरा म्हणाला, “ रात्रीचं कस येणं केल्यासा. सगळ कुशल हाय नव्हं…”

हारबा म्हणाला, “ पांडबाला बैल घ्यायची होती. म्हणून संकेश्वरला गेलतो. येताना चालत अलाव मोजक पैकं होत नव्ह. आदि तो कारडी मुलुख. फसवा वाटमाऱ्या होतात. तवा सगळ्यांना गंडवत आलाव. रात लई झाली.

 तवा तुझ्यात मुक्काम करावं म्हणून आलावं. बरं आता येळ नको बैल तेवढी गोठ्यात बांध व आम्हाला कायतरी वाढ बाय. कावळ कोकलायल्यात पोटात. पांडू हाय बैल घेऊन दारात.”

पार्वतीनं नव्हऱ्याला मांगराच दार उघडायला सांगितल. पांडबान बैल बांधली. त्यांना पाणी पाजून वैरण घातली. बैल बघून पार्वतीची म्हस नाचाय लागली. ती घाबरली होती. तशी पांडू व पार्वतीच्या नव्हर्यान बैलं आकडूनच बांधली. व दोघ घरात आली. हरबा व पांडू न्हाणीघरात जाऊन हातपाय धुऊन आलीत. तोपर्यंत पारून चुलीवरच्या शिक्याच्या थाबड्यात बघितलं. त्यात एक भाकर होती. तिन गोबर गॅस पेटवला. व दोन भाकरी टाकल्या. त्याच तव्यात झूणका केला. व ताट तयार करून घोंगडं अंथरले. व त्यांना वाढलं.

लागलीच थोडा असणारा भात व वरण्याच्या दाण्याचं कालवण पण वाढलं. ती दोघं जेवू लागली. त्यांना पाणी देण्यासाठी ती डेरक्याजवळ गेली. फळीवरचे तांबे काढून डेरक्यात बुडिवलं. तसा डूबुक डूबुक असा आवाज झाला. डेरक्याला पांढर कापड गुंडाळल होत. त्यामुळे त्यातील पाणी थंडगार होत.

पाण्यानं भरलेले तांबे देत पार्वती. पांडबाला म्हणाली, “ दादा जोडी मस्त हाईत. मग पैली जोडी काय केलीस रं.”

“ काय सांगू पार्वती दाजिला बैलं हवी होती. म्हणून घरचा जोड दिला. व आता सोसायटीचे प्रकरण व धान्य विकून आलेल्या पैक्यात हा सगळा डाव मांडला. आता बघुया आता ही बैल कशी लागत्यात.” पांडबा म्हणाला.

बोलत चालत इकडील तिकडील गप्पा मारत त्यांनी जेवण केलं.नंतर पारूच्या नव्हर्यान घोंगड अंथरलं. व ती सगळी झोपी गेली.

पारून भांडी उचलून बाजूला एका बुट्टीत घालून ठेवली. व ती पण आतल्या माळीत अंथरुन घालून झोपली.

तांबड फुटायला सुरुवात झाली. डालाखालची कोंबडी आरवू लागली. पार्वती उठली. न्हाणीघरात डेर्याखाली तीनं जाळ घातला. व बाहेरील हौदातन पाणी आणून त्यात भरलं. तिचा नव्हरा पण उठला. व न्हाणीघरात डेर्याखाली जाळ घालत शेकत दात घासू लागला. तिन मग उठून मांगर गाठला. तिला शेण काढायचं होत. बैल बघून तिनं नव्हऱ्याला हाक मारली.

“ आव इकडं या बैल बील मला मारल.”

तसा तिचा नव्हरा लागलीच आला. व बैलांचा रात्री त्याला अंदाज होता. त्याला उभा करून तिन शेण काढल. नंतर धार पण म्हशीची काढली. नंतर तिच्या नव्हऱ्यान जनावरांच्या पुढ्यातील काडसर काढून त्यानं पाणी पाजलं व वैरण घातली. तोपर्यंत पाणी तापल. पारुनं अंघोळ केली. व ती स्वयंपाकाला लागली. तिन चूल पेटवली. व बुड भांड्याला घेऊन भाताचं आधन ठेवलं. व वायलावर चहा टाकून ती भांडी घासायला गेली. थोड्या वेळानं पांडबा व हरबा उठले. त्यानी आपल आवरलं. ते दोघे जेवणखोलीत आले. पार्वतीनं त्यांनां पाठ दिला. ते त्यावर बसले. पार्वती चपात्या करत होती. तिन चहा आन चपाती दिली ती त्यानी खाल्ली. व ते म्हणाले, “ पारू आता निघताव.” तस पार्वती म्हणाली, “ असं कसं राती पण सरळ जेवण नाही. आता जेवूनच जा.” पार्वतीनं जेवणं केले. ती दोघं जेवली. व रातीच्या विश्रांतीन बैलं पणं तरतरीत झाली होती. आता त्यांनी जायचं ठरवल. त्यानी निरोप घेतला व तालुक्याच्या वाटेला लागली. घाट उतरून गारगोटी पार केली व नदीच्या शिवारानं त्यांनी गाव गाठलं. दारात आल्यावर पांडबाच्या बायकोन बैलाना ओवाळले. त्यानंतर पांडबान बैलं गोठ्यात नेऊन बांधली. नंतर ते दोघे हातपाय धुवून आले. पांडबाच्या बायकोन त्याना जेवण वाढले. त्यांनी जेवण केलं. नंतर थोडावेळ गप्पा मारून हरबा घरी जायला निघाला. 




गावातली लोकं येऊन बैलांची चौकशी करू लागले. बैलं चांगली लागली. कष्टाळू असल्याने पांडबान आपल सगळ कर्ज फेडलं. पण तो बैलांची खूप काळजी घेत असे. बैलांकडून चांगली राबनुक करुन जरी घेतली. तरी तो त्यांच्या सेवेत काही कमी पडू देत नव्हता. पांडबाची बैलं बघून जळणारे अनेकजण होते. त्यात गजा पाटील हा देखील होता. एकदा त्यानं दसऱ्याच्या शिलंगणाला पांडबाची कळ काढली.

शिलंगण असल्याने पांडबाने बैलं सोडली. तो व त्याचा पोरगा बैलं धुवायला व पवनी पाडायला नदीला गेलीत. अमृतमहल माटी करड्या रंगाची बैल खाऊन टमटमित दिसत होती. त्यांच्या वाटोळ्या शिंगांना लावलेला रंग व त्यावरील नक्षी खूप छान दिसत होती. बैलं घरी घेऊन जाताना वाटेत. गजा पाटील आपली खीलार बैलं घेऊन जाताना दिसला. सखारामला बघून म्हणाला, “काय सखाराम लावायची का शर्यत.”



तेच बोलण ऐकूण पांडबा म्हणाला, “ तेला काय इचारतोस. मालक अजून मी हाय. मी काय बैलं शर्यतीसाठी बाळगली नाहीत. माझा प्रपंच चालवतात ती. तूझ काय जातय म्हणायला, दहजणांच डबोल लाटून नाही बसलो मी भुजंगावाणी. तू काय एकाच्या दहा जोड्या घेशील बैलांच्या. तस माझं नाही. “

तसा गजा पाटील तेला म्हणाला, “तू भित्र्या लढाईच्या आधीच शेपूट ढेंगत घालतोय व्हय र.”

पांडबा, “ तू काय म्हणायचं ते म्हण.”

असे बोलून तो घरी निघाला. वाटेत शेताला निघालेला हरबा त्याला भेटला. गजाचं तिरक बोलण त्यानं हरबाला सांगितलं. तसा हरबा म्हणाला, “ बघवत नाही तेला खोटा पैसा हाय, तालुक्याच्या काय चोर बाजारात देखील खपणार नाही. तेच्या नादाला लागायच नाही.” अस बोलून हरबा शेताला गेला. पांडबान बैल गोठ्यात बांधलित. त्यांना चांगल सजिवल. त्याच्या बायकोने पुरणपोळीचा नैवेद्य खायला बैलांना दिला. नंतर पांडू व सखान जेवण केलं.

संध्याकाळ झाली. शिलंगणाच सोन लुटायला बैलगाड्या निघाल्या. पांडबाच पोरग म्हणाल, “काय नाही आज मी बैल घेऊन जाणार. त्यानं बैलं सोडली. तशी पांडबाची आई तेला म्हणाली, “ पांडू तू जा बरोबर, तरण पोर आहे, सळसळत रगात शांत बैलं न्यायचं नाही.”

तेव्हा पांडबा म्हणाला, “ हे बघ सखा आपण शेतकरी माणस, बैल जास्त दबवू नकोस. बैल म्हणजे महादेवाचा नंदी, बसवाणं महादेवान पाठीवलय तेला. त्याची सेवा आपला धर्म. बैल लई दबवू नकोस. देवाच्या पायावर घालून आण. महादेवान आपल्या सेवेला पाठीवले त्याला. महादेवान नंदीला पाठीवल की जा व माणसाला सांग दोनवेळ आंघोळ कर व एकवेळा जेव. पण नंदी सांगत आला. दोन वेळा जेव व एकदा अंघोळ कर. म्हणून महादेवान त्याला शिक्षा केली. दुसऱ्या वेळच्या माणसाच्या जेवणाची तयारी तू कर. तेव्हापासून नंदी शेतात राबतो. व माणसाला मदत करतो.म्हणून आपण त्याला दुखवायचं नाही.”

असं म्हंटल्यावर सखाराम बर बरं म्हणाला. व तेनं बैलं सोडली. सखाच्या बायकोन दृष्ट काढून बैलांना ओवाळले. त्यांवर मायेचा हात फिरवला व कानाजवळ नेऊन बोट कडाकडा मोडलीत. सखाराम बैल जुंपून देवळाकडे आला. देवळाला वेडा घालून त्यानं बैल ऊभी केली. देवाच्या पाया पडून अंगारा घेतला. आपल्या व बैलांच्या कपाळाला लावला. त्याचे मित्र पण गाडीत चढले. इतर बैलगाड्या पाठोपाठ शीलंगणाला निघाला. गावा बाहेर येताच गजा पाटलाची गाडी पण होती. त्याच पोरगं व तो बैलं दबवत होते. त्याची खिल्लार जोडी पळण्यात लई पटाईत होती. मुख्य सडकला आल्यावर गजा पाटील सखारामला म्हणाला, “ काय सखा लावायची का शर्यत.”

तेव्हा सखा म्हणाला, “ नाही मी शिलंगणाला आणल्यात.”

तेव्हा गजा पाटील म्हणाला, “बुळग्या हरलो म्हण की.”

सखारामचे मित्र म्हणाले, “ चल की लावूया बघू तरी.”

शेवटी शर्यत लागली. पांडबान पत्री न मारल्यान बैलांना डांबरी रस्त्यावर जोरात पळता येईना. गजाची गाडी पुढे निघाली. गजा म्हणाला, “ बघितला का खिल्लारांचा खिल्लारपणा इकडून तिकडून नाही आणली म्हसवडच्या बाजाराची हाईत. तस सख्यानं बैलांना दोन चाबूक लगावले. तशी बैल पळू लागली. डांबरी रस्ता संपला. व भोर्डीच्या माळाचा कच्चा रस्ता लागला. चडाचा टेक असल्यानं व बुरंबाट रस्त्यानं बैलानी जोर धरला. डोंगरच पयांन वडून सरावलेली बैल धावू लागली. व शर्यतीला आणलेली गजाची बैल माग पडली. वाट वळखीची असल्यानं डिरक्या फोडत कृष्णाकाठी बैलं पळायला लागली. टेक पार करून अमृतमहल माटी बैलांनी गजाच्या बैलांना माग सारत भोर्डीचा माळ गाठला. शर्यत जिंकून शिलंगणाच सोन लुटून बैलं घरला आलीत. पांडबाला समजल्यावर त्यानं सख्याला गोरणीत घालून चाबकाने बडवला.

सख्या म्हणाला, “ बा चुकलो मी, पुन्हा नाही करायचा असं.”

 शिलंगण झाल. भात कापणीची धांदल सुरू झाली. भाताच्या मळण्या निघू लागल्या. शर्यतीत झालेल्या हारीन पाटील चांगलाच भांबावलेला होता. गावात सगळीकडे चर्चा सुरू झाली होती.

एके दिवशी पांडबाने हरबाची मळणी काढून बैल हरबाच्या मांगरात बांधली. व बैलांना वैरण आणायला गेला. इतक्यात पाटील उसाच्या फडातून आला. लपत छपत येऊन त्यानं कडच्या बैलाला कायतरी खायला घाटल. ते खाल्यावर बैल ओरडू लागला. तसा पाटील पळाला. बैलाचा आवाज ऐकून पांडबा व रानातील माणस तिथं आली. बैलाच्या तोंडाला फेस आला. व जाग्याला बैल मटकन बसला. व तळमळूनं बैलान प्राण सोडला. काय पायाखालच झाल का म्हणून इकड तिकड बघितलं. तर काही नव्हतं शेताला निघालेल्या लक्ष्मीला पाटील गडबडीने जाताना दिसला. ती कालवा ऐकूण तिथं आली. व म्हणाली, पांडूदा मी गजा पाटलाला उसाच्या सरितन जाताना बघितला. मेल्याचच काम असणार हे. इकडं तेच शेत का भात काय कराय आलता मेला.”

पांडबाला रडू आलं. दुसरी बैलगाडी आणली. व बैलाला नेऊन शेतात पुरलं. घरी कळल्यावर पांडबाच्या बायकोन शिव्यांची लाखोली वाहिली. तेची आई हात पाय घासत म्हणाली, “ माझ्या बसवणाला इक घालणाऱ्याच मड बसू दे. आई लक्ष्मी बघून घेईल. त्याच्या रक्ताचं शिंपण होईल.” पश्चिमेला पुढा करून तिन माहेरच्या देवीला नमस्कार केला. व म्हणाली, “बघून घे ग आई.” दोनचार दिस कुणाला आन गोड लागलं नाही. सगळे लोक पाटलाला शिवा देवू लागले. दिस सरू लागले. पाटील एके दिवशी शेताला गेला होता. त्याला झटका आला. व पाण्याचा एक थेंब पण न मिळता जाग्याला मेला. काही दिवस गेले. हरबा पांडबाच्या घरी आला. व म्हणाला, “ एक बैल मेला म्हणून दुःखी होऊ नको. त्याच आयुष्य तितकं. चल जाऊ संकेश्वरला आणि या बैलाच्या जोडीला दुसरा बैलं घेऊया. “ पांडबांन जोडणी केली व दुसऱ्या दिवशी शिदोरी घेऊन ते दोघे पुन्हा तालुक्याला आले. व गडहिंग्लजची गाडी धरली. व बैल आणायला ते दोघे संकेश्वरला निघाले.

लेखक : निशिकांत हारुगले.


कथा वाकाटखोर्याची भाग २५

 २५)दादाची सायकल लेखक :  निशिकांत हारुगले. व्यंकू आता खूप मोठा झाला होता. तो कॉलेजला जात असे. घराच्या गरीब परिस्थितीमुळे वज्रेला शाळा सोडावी...