रविवार, २३ ऑक्टोबर, २०२२

कथा वाकाट खोर्याची भाग ६

 कथा वाकाट खोऱ्याची

६) वज्रा व व्यंकू शेताकडे

लेखक : निशिकांत हारुगले.


वज्रा आपल्या भावाबरोबर शेताला निघाली. तेव्हा व्यंकू म्हणाला, “ तू हल्ली गप्प असतेस. व शांती रोज एक दोन तरी चकरा मारणारी ही दिसत नाही. भानगड काय?”

वज्रा बोलली, “ आम्ही बोलत नाही.”

व्यंकू म्हणाला, “ का बोलत नाहीसा तुम्ही?”

वज्रा, “ तिच्यामुळे मला शिक्षा झाली.मला व्हरांड्यात कोंबडा केलं गेलं.”

व्यंकू हसला, “ ती काय शिक्षा म्हणायची. खुळीच आहेस. त्यामूळे तुमची घनिष्ट मैत्री कळते. त्यात आनंद मानत जा. मैत्री करायची तर सोसायला नको.”

“ पण वर्गात तिच्यामुळे माझी काय अवस्था झाली. माहितेय ना तुला. व तू ही आजीला सांगितलस.” वज्रा बोलली.

व्यंकू, “ ए वेडे, भोळी आहेस तू. माणसानं तुझ्यासारखं मवाळ ही असू नये, व शांती सारखं अती ताठर, परिस्थितीनुसार वागणं बदलाव.”

व्यंकू चे विचार खूप काही शिकवत होते. ती दोघे बोलत बोलत ओढ्यापर्यंत आलीत. ओढ्याच्या पांढ-याखड पाण्यात पावले धुतली. पाण्यातून जाताना तिने भावाचा हात धरला. कारण शेवाळलेल्या दगडावरून पाय घसरू नये. रस्त्याच्या बाजूने असलेली झाडे सुखद गारवा देत होती. अधून मधून रानातली पाखरांची किलबिल ऐकू येत होती. शेतातील ऊस चांगलाच वर आला होता. तो वाऱ्यावर हेलकावे खात होता. त्याची पाने सळसळत होती. रानात कुठेतरी मोर केकावत होते. चालता चालता ती दोघे शेताजवळ आलीत. मुख्य वाट सोडून पायवाटेने ती रानात निघाली. उसाच्या कडेने रानातली हारिटी वाढली होती. ती पायवाटेवर आली होती. व्यंकू म्हणाला, “ वज्रे पायाकडे बघत ये. दुपारची वेळ लांबडी बाहेर पडतात.”

वज्रा घाबरून पायाकडे पहात चालू लागली. चालताना तिला लहान मुलांचं घाटी गाणे आठवले. ‘अबल डबल' ती हसत निघाली. ती आता सहावीत गेली होती. लहान मुलांना सापाची भीती वाटते. तेव्हा ते हे गाणं गुणगुणत. ते म्हंटल की साप आपल्या घरी न येता कावळ्याच्या घरी जातो. असं म्हणतात. ती हसतच मनातल्या मनात म्हणू लागली.

‘ अबल डबल आम्ही काय नाव काढलं नाही. त्या झाडावरच्या कावळ्याने काढलं. त्याच्या घरी जा. दही भात खा. व आल्या वाटेने निघून जा.”

ते म्हणताना तिचे हात चेहऱ्यावर फिरू लागले. ते पाहून व्यंकु म्हणाला, “ घाबरली वाटत भागुबाई. असं साप घरी आला असता तर मेलाच असता. व कावळ्याच्या घरात कुठले तांदूळ व दही असत मला दाखव बघू.”

“ आम्ही लहान असताना तूच सांगितलस ना. “ वज्रा बोलली.

“ अग, तेव्हा मी लहान होतो.”

“ आता बुद्धी आली वाटत आडग्या डोक्यात.”

बोलत चालत शेत आले.वज्रेच लक्ष ओप्यातील नदिकडच्या गजाबाईच्या आंब्याकडे लक्ष गेलं. तिच्या काळजात धस्स झालं. “जर का उठलं तर आपली काय धडगत नाही.” वज्रा बोलली. असे बोलत चालत ती भांगलन चाललेल्या ओप्यात आलीत. व्यंकूने हाक मारली. तेव्हा मेसाच्या बेटाकडून तिला आवाज आला. व्यंकू म्हणाला, “ चल तिकडे आहेत ती.”

वाढलेल्या उसातून ती दोघे निघाली. उसाची पाने अंगाला कापत होती.तशी ती जपूनच चालू लागली. एकदाची ती भांगलन चालू असलेल्या ठिकाणी आली. ऊस सगळा भांगलून होत आलेला होता. कडेच्या सात आठ सऱ्या तेवढ्या राहिल्या होत्या. बाहेरची पाच सहा माणसं कामाला होती. वज्रेला पाहून शिवानंद म्हणाला, “ हिला आणि कशाला घेऊन आलास इकडं. भर दुपारी रानात.”

वज्रा हिरमुसली व म्हणाली, “ का? मी आल्याने काही बिघडणार आहे का.”

तेव्हा वडील म्हणाले, “ नाही काळजी वाटली म्हणून म्हणतो.”

वज्र म्हणाली, “ मी काही आता लहान नाही. चांगली सहावीत आहे..”

तेव्हा रामा परटाची बायको म्हणाली, “ तस नव्ह बाळा, मुले कितीही मोठी झाली तरी ती आईबापाला लहानच असतात.”

तेवढ्यात आई म्हणाली, “ व्यंकु ती भाकरी बांधाकडेला ठेव व तेवढी कळशी नदीवरून भरून घेऊन ये जा.”

आईचे व्यंकूला सांगणे ऐकून वज्रा म्हणाली, “ मी पण येणार.”

तेव्हा शिवानंद म्हणाला,” तू आणि कशाला? आलीस तेवढी पुरे. बांधाकडेला जाऊन बस.”

असे म्हणताच ती रडू लागली. तेव्हा आई म्हणाली, “ जा पण जरा जपून.”

असे म्हणताच तिने वडिलांकडे पाहिले. तेव्हा त्यांनी नजरेनं होकार दिला. ती खुदकन हसली. ती व्यंकूच्या मागणं निघाली. बांधाकडेन मळवाच्या रानातून व्यंकू निघाला. तशी वज्रा ही त्या मागून निघाली. 

नदीकडे जाताना तो गजाबाईच्या आंब्याच्या खालून निघाला. ते भलं मोठ झाड होत. जुनी लोक त्या आंब्याविषयी बोलत. आखी मालकिणीवाणीच हाय.. पूर्वी गजलक्ष्मी नावाची एक म्हातारी होती. सगळे तिला गजाबाई म्हणत. गावात तिला खूप मान होता. आडल्या नडल्याल्या ती मदत करायची. तिचा नव्हरा पूजाविधी करी. पण तिला ते पसंत नसे. ती घरचं शेत पहात असे. राबायला घट्ट. चार गड्यांनी उचलन्या जोगे वज्ज ती न्यायची. तिच्या चार पंढरपुरी म्हैशी तिच्या वज्यात गार व्हायच्या. एकदा गावच्या पाटलाने बांधावरून भांडण काढल. व तिच्या नव्हऱ्याला मारलं. तेव्हा तिन उखळातल्या मुसळान तिनं बडीवला. चांगलाच चेचला. चांगल महिनाभर पाटील अंथरुणात होता. पाटील गावचा कारभारी असून देखील गावात गजाबाईचाच दरारा. निम्मं गाव तिच्या शेतावर पोसत होत. तिन ह्यो आंबा लावला. म्हणून तिला गजाबाईचा आंबा म्हणत. त्या आंब्याजवळच्या पायवाटेने ती दोघं भावंडं नदीच्या गोंडाला गेली. 

पावसाळा संपल्यान नदीच पाणी निवळशंख दिसत होत. धरणाला फळ्या नसल्याने नदीतील खडक उघडे बोडके दिसत होते. काठच्या तांबड्या वाळूत नदीत अंघोळ करुन लोळावे असे वाटत होते. नदी काठच्या झाडांचे उगडे सांगाडे दिसत होते. तेथून शयनग्रामचा गोंड दिसत होता. वाळूत स्त्रियांनी कपडे धुवून घातलेले होते. इतक्यात तिला व्यंकू म्हणाला, “तिथं थांब. माग माग येऊ नको. मी पाणी भरून आणतो. तशी ती थबकली. व धूणं धुवायच्या दगडावर जाऊन उभी राहिली. व्यंकूने पुढे होऊन खळाळत्या पाण्यात घागर धुवून भरली. तसा बुडबुड आवाज झाला. वज्रेला त्याच नवल वाटल. कारण तिने या आधी फक्त विहिरीच पाणी काढताना घागर दोरीला बांधून सोडणे व जड झाली की काढणे एवढंच तिला माहित होत. या आधी कधी तिने बाहेर पाणी भरले नव्हते. 

व्यंकूने पाण्याची घागर भरली. व तो नदीपात्रातून बाहेर आला. त्याने दगडावर बसून खेळणाऱ्या वज्रेस चलण्याची सूचना केली. व ती नदीच्या गोंडाचा टेक चढून वरती आलीत. नदी परिसरात अनेक प्रकारची झाड होती. त्यामधे उंबर, करंज, जांभूळ अशी निरनिराळी झाडे होती.पाखरांची किलबिल शांत झाल्याने ती निरव शांतता बोचत होती. पुढे चालता चालता अचानक पक्ष्यांचा गलका ऐकू आला. त्यांनी आवाजाच्या दिशेने पाहिलं तर उंबरणीवर सरसर धामण चढताना त्यांनी पाहिले. वज्रेच्या काळजात धस्स झाल. ती भावाला जाऊन बिलगली. व म्हणाली, “ दादा तो बघ साप उंबरणिवर चढतोय. तो म्हणाला, “ घाबरु नकोस. तो काही आपल्याकडे येत नाही.”

“ तसे नाही रे दादा. मगाशी मी सापाचे नाव काढले. तेव्हा वाईट विचार मनात आला होता.”

“ वेडे असं काही नसतं. एवढा मोठा भाऊ असताना घाबरतेस कशाला.”

त्या दोघांनी पाहिले. धामण झाडावर सरसर चढत होती. उंबरणीवरील पोपटांनी एकच कल्लोळ केला. त्यांनी त्या धामणीवर हल्ला केला. उडत उडत ते टोचण्या मारू लागले. तेव्हा त्या सापाला वर चढणे कठीण झाले. ती धामण उतरंडीला लागली. पोपटानी तिचा पाठलाग चालवला. ही झूंज चांगली पाच-सहा मिनटे चालली. ती दोघे शेतात गेली. तेव्हा वज्रा म्हणाली, “ दादा त्या सापाबद्दल कुणाला सांगू नको. नाहीतर मला शेताला येऊ देणार नाहीत.”

“ का मी का सांगू नये. त्या दिवशी मला पाण्याने का भिजवलस? खूप गोड वाटत होते ना. तुला.”

“ मग तू का सगळ आजीला संगितलस.”

“ त्यात काय मी खर तेच बोललो ना?”

“ हो तर खर्याचा पुतळाच ना. सत्यवादी हरिशचंद्र, आमच्या घरात जन्माला आलाय.”

“ आता खरंच सांगणार म्हणजे तुला शेतात यावयास मिळणार नाही.”

वज्रेला राग आला. व ती म्हणाली, “ जा सांग जा. तुला पण गरज लागेलच की माझी.”

“ घाबरु नकोस सांगत नाही.” तेव्हा ती हसली. व ती दोघं शेतात आली. पाण्याची कळशी ठेवली. आता चांगली दुपार झाली होती. पाणी आणल्यावर सगळी जेवायला बसली. झाडाखाली बसून त्यांनी भाकरी इकडल्या तिकडल्या गप्पा मारत खाल्ली. तेव्हा बायक्कान विषय काढला.

“ काल महादून दारू पिऊन बायकोला मारली म्हण.”

सुनंदा पटलीन लगेच म्हणाली, “मी व्हते तिथंच. माझ काय धाडस झाल नाही. अडवायला. कोण जाणार आ जाईल तेला शिवा देतय. तो सदा गेला होता अडवायला तर तेलाच शिवा देऊ लागला मेला.”

“ काय सदाला शिवा दिल्या. दोन थोबाडीत लावायच्या नाहीत तेन.” शिवानंद म्हणाला.

“ एवढेच नाही. तर सदाला गुरकावून म्हणाला कसा. की माझी बाईल हाय. तिला मारीन नाहीतर वाट घालीन. तू कोण विचारणार. तुला तिचा लई पुळका का? का तुझ व तिचं हाय. असं म्हणताच सदान दोन थोबाडीत लगावल्या. तस पडल कोंबडं मळगळल्यागत. कोपऱ्यात. तवा बायकोला तेव्हा दया आली. व ती म्हणाली, की सदाभाऊ तुम्ही गप्प जावजावा. बेवड मरल बिरल. तुमच्या अंगावर यायला नको. आमची शिंद्याची भावकी लई वंगाळ हाय. म्हणतील नव्हर्याला मारायला मारेकरी घातलाय. सटविन लावलय नशीब माझं याच्याशी. भोग आणखीन काय. माझ माहेर गरीब. लगीन लागल्यापासून माझा वनवास सुरू हाय. अगदी सितवाणी. गरिबाच्या पोरी म्हणजे दावणीची ढोर. एकदा विकल की तिकडल्याच त्या. माग काय पहायचं माती. ज्या दावणी बांधल्या तिथंच आमचं मरण. म्हशीला मालक दुधासाठी मारतो. व आम्हाला नव्हरा पैशापाई मारतो. तुम्ही जावा भावजी अस म्हणून सखूनं पाणी डोळ्यात भरल.”

 “ खरच बाई एवढ्या लांबल्या मुलखाला देसोऱ्या पोरीनी संसार करायचा लई कठीण काम आसल्यासणी कोकणीच पोरी पाहिजेत फणसाला बांधणाऱ्या. म्हणजे महादेव बसला असता कोकलत. गवारेडा कुठला.” तारा उत्तरली.

तराच बोलण ऐकूण पार्वती म्हणाली, “ खरंच संत सखुवाणी हाय सखू.”

“ मी पाहिजे होते. तिथ त्या महादेवाला चांगल बांधून घाटल असत वड्याच्या कोंडीच्या झाडाला. पाण्यावरल्या चिलटानी चावून खाल्ल असत. म्हणजे समजल असत. डोक्यातली बया मग उत्तरली असती.” बायक्क म्हणाली.

बोलता बोलता सगळ्यांची भाकरी खाऊन झाली. तस पार्वतीनं व्यंकूला पाल्याच वज्ज बांधून दिलं. त्याच्या डोक्यावर ठेवलं. व वज्रेला म्हणाली, “दादा बरोबर जा. आम्हाला वेळ हाय अजून उगाच इकडं तिकडं करत जाऊ नको.”

 वज्रेन नंदीबैलासारखी मान हलवली. जातो असं म्हणून तिन भांडी बुट्टीत घेतली. व ती व्यंकूच्या पाटोपाट निघाली. तशी ती म्हणाली, “ दादा थांब मी पुढे होते. तू माझ्या माग ये. वज्ज्यातून तुला रस्ता दिसणार नाही. असे बोलून ती भावंडे वाटेला लागलो.

क्रमशः पुढे....

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

कथा वाकाटखोर्याची भाग २५

 २५)दादाची सायकल लेखक :  निशिकांत हारुगले. व्यंकू आता खूप मोठा झाला होता. तो कॉलेजला जात असे. घराच्या गरीब परिस्थितीमुळे वज्रेला शाळा सोडावी...