कथा वाकाटखोर्याची भाग १४
१४) शेताचे भांडण
लेखक : निशिकांत हारूगले.
वज्रल आता घरातल्या कामाबरोबरच शेताकडे ही जावे लागे. ऊस तुटला होता. व खोडव देखील काढल गेलं होत. मळवाच्या वाटेनं शिवानंद वैरण आणायला शेतात गेला होता. तेव्हा वाटेत उमाजी पाटील व त्याच्या बायकोने भांडण काढलं. शिवानंद सोबत व्यंकू पण होता. तो पेंडीला जाणार हे त्यांना माहीत होते. ती दोघे वाटच बघत होती. शिवानंद पेंडीला जाताना दिसला. तेव्हा मळवाची वाट का मळवलीस, पेंडीच नुकसान होत. म्हणून भांडण काढल. शिवानंद समजुतीने सांगत होता. पण त्याचे न एकता तो हमरी तुमरिवर आला. व त्याने गळपट धरली ते पाहून व्यंकू घाबरला. व रडत घरी पळाला. तो घरात आल्यावर रडत परसदारी पळाला. आई पार्वती धार काढायला बसली होती. वज्रा छोट्या रेडकाला चारा घालत होती. पळल्यामुळे त्याचा श्वास फुलला होता. त्याला बोलता येत नव्हते. म्हातारीनं आपल्या हातातील तांदूळ निवडत्याले ताट बाजूला ठेवले. व ती व्यंकूमागे परसदारी आली. पार्वतीनं विचारलं “ का रे लगबगीनं आलास.”
व्यंकू बोलला, “ मळवाच्या वाटेला उमा पाटलान भांडण काढलाय व तो बाबांशी भांडाय लागलाय व त्यानं बाबांना आडव ….” अस बोलून तो रडू लागला. म्हातारीच तर अवसानच गळल. धार काढत्याला तांब्या पारूच्या हातून खाली पडला. ती चटकन धारची उठली. व लगबगीनं गोठ्यातून बाहेर आली. दोन ढेंगत तिन माजघर गाठल. व तिने तुळीतला इंगा काढला. व ती चटकन मळवाच्या वाटेला लागली.
वज्रा पण मागे जाऊ लागली. तेव्हा तिने माग वळून हाक देत “ वज्रे माग फिर माग माग येऊ नको असं सांगितलं.”
पण आईच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून ती मागो माग येऊ लागली.मळवाच्या शिवारात पोहोचली. मळवाच्या वाटेवर शिवानंदाला अडव पाडून त्याच्या उरावर पाटील बसला होता. व शिवानंदाचे पाय धरुन पाटलिन बसलेली होती. ती दोघे नवऱ्याला मारत्याले पाहून पार्वतीचे पित्त खवळले. तीने धावत जाऊन खोपरखळीने पाटलाला ढकलले. तो जाऊन बाजूच्या चरीत पडला. व पाटलीनीच्या बुचड्याला हात घालून चांगली फरफटत नेली. तशी ती ओरडायला लागली. शिवानंद त्यांच्या कचाट्यातून सुटला होता. त्याला जबर मारले होते. अंगावर माराचे वळ होते. पार्वतीनं शेजारच्या ऊसातील गाब भरलेला ऊस मोडला व पाटलिनिला दोन लाता घालून ती पाटलावर धावली. त्याचा वार चुकवून त्याला पायात पाय घालून खाली पाडल. व ऊसाने बडवायला सुरुवात केली. त्याला सावरू दिलाच नाही. इतक्यात शेताला जाणारी माणसं जमा झाली. त्यांनी भांडण सोडवल. दांडग्या शिवानंदाला मारणाऱ्या पाटलाचे पारुपुढे काही चालले नाही. पाटील व त्याची बायको शिवा देत निघून गेली. पारूनं आपल्या नवर्याला सावरलं. व घरी घेऊन आली. घरी आणल्यावर तिन शिवानंदाला पलंगावर झोपवला. आजूबाजूची माणसं जमा झाली होती. म्हातारी तर हाबकली होती. ती देव्हाऱ्यासमोर बसून देवाला आपल्या मुलासाठी साकडे घालत होती. “ देवा महादेवा माझ्या लेकराला वाचव.”
शिवानंदाच्या डोक्याला लागले होते. पार्वतीनं नवऱ्याच अंग पुसल. त्याच्या जखमा स्वच्छ केल्या. इतक्यात दामाजी व सुंदरा आली. ती त्याना धीर देऊ लागली. पार्वतीनं जखमेवर टिक्कीचा पाला व हळद लावली. सुंदरा तिला मदत करत होती. पार्वतीच्या डोळ्यातून अश्रू ओघळले होते. वज्रा वार घालत होती. थोडया वेळाने शिवानंदाला हुशारी आली. तेव्हा जरा पार्वतीला बरे वाटले. ती नवर्याला म्हणाली, “आता पोथी पुराण सोडा. घरचं खाऊन दुसऱ्याचा मार खायला अंगात ताकद नाही. त्या पाटलाचा मार खायला. तेला हिंमत असेल तर माझी कळ काढ म्हणावं. मग दाखवते. माझा नमूना तेला खपावतेच.
‘ तेला वाटल असेल की ही दुबळ्या घरची असेल. पण तेला पुरून उरेल.म्हणावं.’ असं म्हणत ती गोठ्यात गेली. तिने म्हसिचे दुध काढले. पण पानेव सरल्याने कमी निघाले. ती आपले काम आवरून घरात आली. इतक्यात मालू गुरवीन आली. शिवानंदाला पाहून म्हणाली, “लई मारल काय ग बाळासाबांना.”
तेव्हा पार्वती म्हणाली, “ मी असताना तो काय मारतोय भाडखाऊ. त्याची हाड मोडून ठेवीन मी.”
थोडा वेळ चौकशी करून मालू गूरविण निघून गेली
पार्वतीने म्हातारीला सावध केलं. व म्हणाली, “ ही पारी असताना भितीस काय? तुझ्या लेकाला कायपण होऊ द्यायची नाही. त्या पाटलाला चांगलच गाडील ही वाघीण. असे बोलून ती जेवण करायला गेली. व्यंकू कोपऱ्यात रडत बसला होता. त्याला ती म्हणाली, “असा बुळ्यासारखा कशाला रडतोस. जा बाहेर ह्यांच्याजवळ जाऊन बस जा. जाण्या आधी म्हसीला वैरण घाल.” असे सांगून ती जेवणखोलित गेली. थोड्या वेळाने शांती आली. तिला पाहून वज्रेला रडूच कोसळले. शांतीला तिन मिठीच मारली. शांतीन तिची समजूत घातली. थोड्या वेळाने ती घरी गेली.
दिवस झप झप सरू लागले. शिवानंदाला आता बरे वाटू लागले होते. तो आता चालू फिरू शकत होता. पण उमा पाटील आपल्या मनात चांगलीच अढी धरून होता. गावात त्याचे शेत जास्त असलेने अनेक लोक त्याचे शेत कसत. त्या लोकांना तो दमदाटी करी. शिवानंदाच्या शेतात कामाला जायचं नाही असे सांगी. त्यानं साऱ्या गावभर लोकांना शिवानंदाच्या घरावर बहिष्कार घालायला सांगितला होता. गावातील औतवाले देखील शेतात येईनात. पण शिवानंद व पार्वती कच खाणारी नव्हती. ती देखील पणाला पेटली होती.
नदीवर धूण धूयाला पवाराची कमळी आली होती. ती पाटलाच शेत करत होती. तेव्हा पार्वती शेताला गेली होती. व पाणी न्यायला नदीवर गेली होती. तिला पाहून कंबळी म्हणाली, “ आता कोण शेतात कामाला येत नाहीत. त्यापेक्षा पेंडी कापा जावा रान पाडून.”
तिचं बोलणं ऐकून पार्वती तिला म्हणाली, “ कमळे तुझी बोलणी कळतात मला. जाऊन सांग त्या पाटलाला ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाभळी. माझं शेत पडायचं की ठेवायचं ते बघते मी, बघतेच कस पडत ते.”
“ तो किती पण आडकाठी आणुदेत. मी काय कुणाच्या जीवावर शेत करत नाही.”
तशी कमळा म्हणाली, “ सगळ्यांचा शेतातच रात्र दिवस तळ ठोकायचा विचार दिसतोय.”
तेव्हा पाण्याची घागर घेऊन निघालेली पार्वती म्हणाली, “ तळ ठोकाय लागला तरी चाललं पण सोडत नाही.” पार्वती शेताला गेली.
त्या घटनेनंतर म्हातारीनं अंथरूण धरल होत. त्यामुळे घरातील सर्व काम वज्रेला करावी लागे. ती आता धार देखील काढत होती. शिवानंदाचा मारामारीत पाय दुखावला होता. यामुळे व्यंकू व पार्वती रोज जनावरांची वैरण आणायला जात असत. ती माय लेकर संसाराचा गाडा रेटण्यासाठी प्रयत्न करत होती. .
ऊस तुटला. मळवातल खोडव काढायचं होत. पण गावातील औतवाले येईनात. पार्वतीनं किती जणांना विनवले. शेवटी वाडीची औत सांगून खोडव काढल. औतवाल्याने डब्बल पैसे घेतल. म्हणतात ना संकटे आली की एकमेकाचे हात धरून येतात. तशी गत पार्वतीची झाली होती. थोडीफार माणुसकी असणारी लोकं मदत करीत होती. खोडव वेचायला आता वज्रेला जाव लागत होत. रोज लवकर उठून घरातलं काम करून ती आई सोबत रानात जाई. जाताना धूणं घेऊन जाई. नदीवर जाऊन धूणं धूत असे. व ते शेतात वाळत घालून काम करत असे. सुंदरा कधीतरी मदतीला यायची. पण एवढा व्याप तोलन अवघडच पण मनाच्या जिद्दीनं त्या माय लेकींनी शेत तयार केलं.
क्रमशः पुढे…. ….
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा