शनिवार, १७ डिसेंबर, २०२२

कथा वाकाटखोर्याची भाग २२

 २२)गावतंबुतील सिनेमा

लेखक:  निशिकांत हारुगले


उन्हाळ्याचे दिवस होते. गावातल्या तरुण मुलांनी पैसे गोळा करून सिनेमा आणला होता. व तो तिकीट काढून पाहण्यासाठी ठेवला होता. साकरी व वज्राच्या घरातल्यांनी त्यांना सिनेमा पाहायला जायचे नाही असा सज्जड दम भरला होता. त्यामूळे त्या हिरमुसल्या होत्या. कारण सिनेमा पाहून मुली बिघडतात असे कोणीतरी त्यांना सांगितले होते.

दुपार झाली शांती, वज्रा व साकरी वज्रेच्या घरी जमल्या होत्या. त्या वज्राच्या परड्यात आंब्याच्या झाडाखाली गेल्या. आंब्याला चांगल्याच मोठाल्या कैऱ्या लागल्या होत्या. शांती झपझप झाडावर चढली. व तिने कैऱ्या काढून त्या दोघींकडे टाकल्या. व ती खाली उतरली. त्या दोघींचा चेहरा पडलेला पाहून ती म्हणाली, “ काय एका सिनेमासाठी तुमचा हा अवतार.”

तेव्हा साकरी म्हणाली, “तुझ  आपलं बर हाय, तुझे बाबा तुला काय सुट देतात. तशी आम्हाला नाही.”

तेव्हा शांती म्हणाली, “ माझ्या बापाण काय मला पहिल्या नंबरच तिकीट आणून दिल्यासारखच बोलतेस.”

तेव्हा वज्रा बोलली, “काय तुला पण परवानगी नाही.”

शांती नाही म्हणाली.

वज्रा बोलली, “ मग आता काय करायचं?”

तेव्हा शांती म्हणाली, “ हे बघा आपल्या घरातील मोठी माणसे सिनेमा पाहायला जाणार. तेव्हा आपण तिघी आमच्या घरी झोपायच. मग नंतर काय करायचे ते मी सांगेन.”

तेव्हा त्या तिघी आपली खलबत्ते योजून आपापल्या घरी गेल्या.  संध्याकाळ झाली. साक्री आपल्या वडिलांना म्हणाली, “ मी घरात एकटी राहणार नाही. जर मला सिनेमा पाहायला नेणार नसालं तर मी शांतीकडे झोपायला जाणार. व हे जर मंजूर नसेल तर मला पण सिनेमाला न्या.”

असे म्हणताच घरातल्यांनी परवानगी दिली .

इकडे वज्रा पण घरात परवानगी मागू लागली. तेव्हा वडील तिला म्हणाले, “ की आजी जवळ कोण तरी हवे.”

तेव्हा वज्रेला मोठे कोडे पडले. तेव्हा ती म्हणाली, “ वा.. वा तुम्ही करा मज्जा मी तेवढी इथ बसते एकटी आजीजवळ. ते काही नाही मी शांतीकडे झोपायला जाणार.”

शेवटी पार्वती म्हणाली, “ मी थांबते. तू जा शांतीकडे झोपायला.”

असे म्हणताच वज्रा खुश झाली. तिने आईला मिठी मारली. रात्री जेवण आटोपल्यावर  साकरी वज्रेच्या  घरी अंथरूण घेऊन आली. व त्या दोघी शांतीच्या घरी झोपायला गेल्या.

शांती त्यांची घरामध्ये वाटच पाहत होती. त्या आल्यानंतर तिने त्यांचे अंथरूण पांघरूण वरती माडीवर ठेवण्यास सांगितले. तेव्हा दामजीपांत जेवण करून पलंगावर पान खायला बसले होते. ते या तिघींनी पाहून म्हणाले, “ काय ब्रम्हा, विष्णू ,महेश आज एकत्र आलेत.”

तेव्हा शांती म्हणाली, “ ते तर रोजच येतात. तुम्ही खावा गप्प पान.”

तेवढ्यात आतील काम आटोपून सुंदरा बाहेर आली.या तिघींनी पाहून ती म्हणाली, “या तिघी एकत्र आल्या.की मला भीतीच वाटते बघा.”

तेव्हा शांती म्हणाली, “ तुझ्या घरात काही धाड नाही टाकत आम्ही “

असे म्हणून त्या तिघी माडीवर गेल्या. शांतीने घोंगड अंथरल. वर धुपटे टाकले. व त्याना अंथरूण व्यवस्थित कराय सांगून ती पाण्याचा तांब्या आणायला गेली. तेव्हा सुंदरा व दामाजी सिनेमाला निघाले होते. मुलाला झोपवून जातो म्हणाले. तेव्हा तो उठला की दंगा करेल असे तिने सांगितले. तेव्हा त्यांनी बाळाला आपल्या बरोबर न्यायचे ठरवले. व ती दोघे राऊळाच्या पटांगणाकडे सिनेमा पाहायला गेले. 

राऊळाचे भव्य पटांगण पांढ-या कपड्याच्या कनातीने वेधले होते.  तिकिटे घेऊन लोक आत जाऊन बसत होती. लहान मुले दंगा करत होती. लोक सिनेमा पाहायला मिळणार म्हणून आनंदी होती. प्रत्येक जण आनंदी होता  थोड्या वेळाने सिनेमा सुरू झाला.

इकडे शांतीने वज्रा व साक्रीला झोपण्याचे नाटक करायला लावले. व ती खाली आली. आई बाबा गेल्याची खात्री करून तिने पुढील दार बंद आहे का पाहून ती मागील दारी आली. तेथील दाराला भले मोठे कुलूप होते. ती ते पाहून पेचात पडली. व मागे फिरून ती माडीवर आली. 

आता काय करायचे या विचारात ती त्यांपुढे बसली.  वज्रा व साकरी अंथरुणावर बसल्या होत्या. ती त्यांना म्हणाली, “ इथं झोपा काढायला नाही बोलावले तुम्हाला, उठा चला माझ्याबरोबर व तीने खाली जाऊन दोन्ही दारे बंद असल्याची खात्री केली. व पुन्हा जिन्याच्या दाराची कडी लावून ती माडीवर आली.

त्या दोघींना माडीवरल्या दरवाजाने माळीतून मागल्या सोप्यात आली.तेथील माळा उंचीला लहान होता.त्या माळ्यावरील बेंगलोरी खापर्या काढल्या. व आपण प्रथम तेथून बाहेर आली. नंतर वज्रा व साक्रीला बाहेर येण्यास सांगितले. त्या ही पाठोपाठ आल्या. खापरीच्या जोडावर पाय देत हळूहळू न्हाणीघराच्या कोपऱ्यात आल्या. तेथील पेरवनीच्या झाडावरून खाली उतरल्या. व रखमा पाटलिनीच्या परड्यातन पुढे निघाल्या. तिथे आल्यावर वज्रेला गिरणीत लक्ष्मीने सांगितलेली गंमत आठवली. ते पाहून शांती म्हणाली, “ आधीच अंधार अन् त्यात तुला खोकळायला काय झालं.”

तशी वज्रा शांत चालली. साकरी लगेच म्हणाली, “ शांते, राहू दे चल सिनेमा तो उगाच रात्रीच या परड्यात सापकिरड असतात.”

शांती म्हणाली, “ गप चला आता सिनेमा पहायचा म्हणजे पाहायचाच.”

पाटलीनीच परड संपल. अन् शिंद्याच लागलं. त्या परड्यात परसदारी उंच करंजीच झाड होत. त्यावर पहिल्यांदा शांती चढली. त्या पाठोपाठ वज्रा व साकरी पण चढल्या. वरती चढायला लई सोपं झाड होत. वर जाऊन फांद्यांच्या गेचक्यात जाऊन त्या बसल्या. तेथून देवळाच्या दारातील सिनेमाचा पडदा दिसत होता आवाज पण थोडा थोडा ऐकू येत होता. शांतीच्या पुढे ऐक डहाळी करंजीची आडवी येत होती. ती तिने मुरगळून खाली टाकली . 

सिनेमा अर्धा झाला. तस त्या फांदीच्या गेचकात बसून त्या अवघडल्या. थोड्या वेळाने शिवाराच गार वार सुटलं. तसी थंडी जाणवू लागली. वज्रेला थंडी वाजू लागली. तशी तिला हुडहुडी भरली ती थरथरू लागली. तेव्हा शांती म्हणाली, “काय झालय, थरथरायला. परत आवाज केलास तर दिन ढकलून खाली.”

तेव्हा वज्रा म्हणाली, “तुला काय तुझ्यासारख नाही माझं. तुला काय बर्फाच्या लादिवर जरी झोपवली तरी काय व्हायचं नाही. एकवेळ तो बर्फ वितळेल. पण तुला थंडी वाजायची नाही.”

तेव्हा शांती हसू लागली. व त्या तिघी सिनेमा पाहायला लागल्या. तेवढ्यात त्यांना कोणतरी घोरत्याला आवाज आला. तेव्हा आवाज कुणीकडून येतो ते शांतीने पाहिलं. तेव्हा तिच्या लक्षात आलं. की दुसऱ्या ढांपीच्या गेच्क्यात बसलेली साकरी घोरत होती. 

शांतीने डोक्यावर हात मारून घेतला. व म्हणाली, “ देवा महादेवा कसल्या मैत्रिणी पदरात बांधल्यास यांच्यासाठी एवढा आटापिटा केला. अन् मी यांना इथपर्यंत आणल्या. व या सिनेमा पाहायचा सोडून एक लागलंय मांजरीणीसारख कुडकुडाय व दुसर लागलंय घोराय.”

शांतीने करंजीची डहाळी मोडली. व साकरीला खुचकाय सुरू केलं. तशी ती निजच्या तंद्रीत बडबडू लागली. ‘आबा मी शेण काढते, धारा काढते. पण जरा झोपते. नंतर काढते…’

तिचे बडबडणे ऐकून वज्रा हसाय लागली. व म्हणाली, “ अग बाई, आता अन् ही काय गंमत म्हणायची, हिला आता गोठा दिसाय लागला वाटत. जाबडाय लागलीय.” तशी तिला जागी केली. ती म्हणाली, “वाजवत जाऊ दे तो सिनेमा, चल झोपायला जाऊ.”

शांती म्हणाली, “ आणखी थोडा वेळ बघुया.”

थोड्या वेळाने शांती म्हणाली, “ इथ आलो सिनेमा पाहायला अन् आमचाच सिनेमा व्हायची पाळी आली. चला जाऊया.”

त्या करंजीवरून खाली उतरू लागल्या. पण तेवढ्यात शिंद्याच परडच दार उघडल. अन् लक्ष्मीचा नव्हरा अन् शिंप्याचा बेवडा नाम्या परडला आलीत. ती थेट परसपरड्यापर्यंत. नाम्यान कमरेला लपवलेली दारूची बाटली काढली. व आपल्या घाट्यात वतली तशी ती दोघं फेराफेरान पिवू लागली. या तिघी आता चांगल्याच पेचात पडल्या.

तशी साकरी म्हणाली, “ आता काय करायचं ग शांते. आपणं गावलो तर बा मला पहार्यातच ठेवील.”

वज्रेच काळीज धडधडायला लागलं. त्यांचा आवाज त्या बेवड्या नाम्याला अस्पष्ट ऐकू आला. तो दारूच्या तंद्रीत बडबडला, “ कोण हाई. .ती..ती..थ.”

तस शांतीन मनात ठरवल आता याची गंमतच करायची.तीन करंजाची डहाळी हालवली व मोठ्यानं किंचाळली.अन् म्हणाली, “अरे माकडा, मला विचारतोस कोण हाय ते. थांब दाखवते तुला, बर झाल आलास इथं, माझ्या मेळ्यात एक मुंजा पाहिजेच होता. तुलाच घेते थांब आलोच.”

असे मोठ्यानं ओरडताच त्या दोघांची दारू दणक्यात उतरली. त्यांचे हातपाय लटलट कापू लागले. ते पाहून शांतीने वज्रा व साकरीला किचळायला सांगितले. त्या ओरडू लागल्या. त्यांच्या आवाजाने ती निरव शांतता भंग पावली.त्या आवाजात रातकिड्यांची किरकिर भर घालत होती. 

ते दोघे घाबरून दारूची बाटली तिथेच टाकून पळाले. त्या तिघी खाली उतरल्या. त्यांना हसू येत होत. पण त्यांनी ते तोंड धरून दाबून धरल. साकरीची मात्र झोप चांगलीच उडाली होती. अंधारातून वाट काढत त्या तिघी शांतीच्या परड्यात आल्या. 

या गडबडीत वज्राचा पाय शेणाच्या गारीत गेला. तिने तो बाहेर काढून माती लावून सुका केला व ती त्यांच्या पाठोपाठ पेरवनी जवळ आली.

 एकामागून एक झाडावर त्या चढल्या. व नंतर खापरीवरून पुन्हा खाप्र्या काढलेल्या ठिकाणातून आत उतरल्या. शांतीन एक पोतेर दिले. त्याने वज्राने पाय सुका केला. नंतर न्हाणीघरात जाऊन तिने तो धुतला. तोपर्यंत शांतीने खाप्र्या घातल्या. व अंग झाडले. त्यांनी पण हातपाय धुतले. व सूके करून पुढील दार तपासले. बाहेरून कडी घालुन आई कुलूप लावून गेली होती. ते तपासून त्या अंथरुणावर आल्या.

साकरी म्हणाली, “ त्या दोघांनी आपल्याला पाहिलं तर नसेल ना?”

शांती म्हणाली, “ ते काय बघत्यात. त्यांना आज्जा आठवला असेल बघ..”

त्या हसू लागल्या. व झोपी गेल्या.

….. ….. ……




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

कथा वाकाटखोर्याची भाग २५

 २५)दादाची सायकल लेखक :  निशिकांत हारुगले. व्यंकू आता खूप मोठा झाला होता. तो कॉलेजला जात असे. घराच्या गरीब परिस्थितीमुळे वज्रेला शाळा सोडावी...