कथा वाकाटखोर्याची भाग १९
१९) हादगा
लेखक : निशिकांत हारुगले.
पावसाळी दिवस म्हटले की घाटोरी मुलखात लोकांना सवड नसायची. कारण शेतातील खरिपाची पिके शेतात असायची. त्यामूळे लोकांना सवड मिळायची नाही. जसा श्रावण आला, की भाताची पिके शेतात डोलू लागायची. पुढे गणपती पाण्यात पडल. की दसऱ्याच्या दरम्यान भात कापणी सुरू व्हायची. माळामुरडाची लव्ह्या हावळ्या भाताची सुगीची घाई सुरू होत असे. त्याच दरम्यान सुरू झालेला परतीचा मान्सून सुरू झाला की शेतकऱ्यांची दमछाक होत असे. यावेळी पावसाला अधिक जोर चढे. कधी कधी तो नदीपात्राबाहेर पाणी निघावे असा जोर धरत असे. याच काळात हस्त नक्षत्र निघत असल्याने मुली हादगा देवाची पूजा करत असत. हादगा म्हणजे हस्त. यालाच हत्ती देवाचा पाऊस म्हणत. हत्तीवर बसून भुलोजी नाईक म्हणजे महादेव येतो. व मुलींना भावी आयष्यासाठी भरभराटीचा आशीर्वाद देतो असे म्हणतात. अशी भोळी समजूत रुजल्याने मुली एकत्र जमून एखादया मैत्रिणीच्या घरी हादगा बसवत. दरवर्षी हादगा प्रत्येकीच्या घरी नेमाने चालत यायचा. तेव्हा तगडी पुटट्यावर किंवा पाटावर साळीच्या पीठाने, कोळशाने, व हळदी कुंकवाने सुंदर चित्र काढत.
व त्याची पूजा करत.
एके वर्षी हादगा पूजेचा मान साकरीकडे आला. होता. मुलींनी रानातून वेगवेगळ्या धान्याच्या लोंब्याची जमवाजमव केली. चीरमोऱ्याची माळ तसेच इतर धान्याच्या माळा बनवल्या. व हादगा बसवला. रोज फेर धरून हादग्याची गाणी म्हंटली जाऊ लागली. जसे दिवस वाढतील तसे गाण्यांची संख्या वाढू लागली. रोज नवीन खिरापत त्यामुळे मुलांची चैन होत असे. सर्व काही मजेत चालले होते. पण त्याच दरम्यान भाताची कापणी चालू झाली. अवेळी पडणाऱ्या पावसामुळे लोक टोकण पद्धतीने पीके घेत. त्यामूळे परतीच्या मान्सून काळात भाते कापणीस येत. परतीचा मान्सून याच दरम्यान धाड टाकत असे.
साकरीचे घरचे शेत बुरंबाट माळ रानाचे, तांबुळ जमिनीचे होते. रानातील कर्जत भाताची कापणी सुरू झाली होती. तिचे आई अन् वडील पैरेकऱ्याबरोबर भात कापणी त गुंतली होती. पण रोज येणाऱ्या पावसाने मळणीत अडथळे येत असत. एके दिवशी साकरीच्या वडिलांनी मळणीचा घाट घातला होता. कारण पावसाच्या थेंबांनी कर्जतीच भात झडत असे.
काय व्हायचे ते होऊदे. आज मळणी करायचीच या ईर्षेने साकरीचा बाबा हणमंत पाटील जिद्दीने पेटला होता. सूर्याची किरणं पडल्याने त्याने माणसे जमवून कापणी सुरू केली. दोन मोठे वाफे कापले. व मळणी सुरू झाली. बघता बघता दोन मळण्या दुपारपर्यंत काढल्या. मळणी काढणारे गडी माणसे व बायका झपाझप हलत होत्या. दुपारचे तीन वाजले शेवटची मळणी सुरू झाली. मळणी निम्यावर यायला गड तटावर पावसाची फळी धरली. व हादग्याचा पाऊस पूर्व दिशेच्या वाऱ्याने रेटायला सूरवात केली.
काळवंडलेले ढग कधी उत्तरेला तर कधी दक्षिणेला सरकू लागले. बघता बघता ढग एवढा पसरला की त्याने गडकोपर्यावर फळी कधी धरली. हे समजलच नाही. व तो सरळ पेठच्या शिवारावर चाल करुन आला. टपोऱ्या थेंबांनी मळणी भिजवायला सुरुवात केली. आधीच दमलेली गडी माणसे यांनी मळणी कशीबशी गोळा केली. हनमा पाटलाने बैल सोडली व शेतावरील मांगरात बांधली. डोक्यात पावसाचा चांगलाच राग आला होता. व त्यात डिवचण्याच काम टपोरे थेंब करत होते. त्यानं तंबाखू घेतला व त्याची तळहातावर चीमट घेऊन तो मळू लागला. माणसांना काम सांगून तो तडक गावच्या वाटेला लागला. थोड्या वेळानं घरी पोहोचला. व भिंतीवरील हद्ग्याचे चित्र ओढून काढले. व ओढ्यावर घेऊन आला व त्याने तो पाण्यात बुडवला.
संध्याकाळ झाली. सर्व मुली एकत्र जमल्या. बघतात तर काय हादगा नाहीये. साकरी मांजरीगत गपचीप बसली होती. इतक्यात वज्रा पुढे झाली व तिने हादगा कुठे हाय विचारले. तेव्हा बाहेर ओट्यावर शेतातील पसारा आवरून येऊन बसलेला तिचा बाप म्हणाला, “हादगा नव्हं, गेला असल आता पर्यंत चांगला मुरगूडच्या पुढे पोचला असेल.”
तेव्हा साकरी म्हणाली, “ बाबान हादगा पाण्यात बुडवला. आता काय करायचं.”
तेव्हा सर्व मुलींना वाईट वाटले. त्यातून शांती म्हणाली, “ तुझ्या काय बाबाला पाऊस बघून भात कापाय घालाय येत नव्हत. आमचा हादगा बुडवून कापणीत पाऊस पडायचा थांबणार नाही. त्याच भात पिकलं तरी मावळच्या रोपा सजायच्या हाईत. म्हणून हादगा पडतोय. तो रोपास पोस्वायला पडतोय.”
तेव्हा हनमा पाटील म्हणाला, “नाही थांबला तरी चालेल. मी घाबरत नाही त्याला. चांगलच ओढ्याच्य पाणी पाजलं.”
तेव्हा सर्व मुलींनी खलबते केली. व पुन्हा जोडणी करून हादगा बसवला. पण तो पेटीत. चांगल हात्ती देवाला कुलपात बसावं लागलं. कारण मुलींनी पुन्हा आपला हादग्यावर दुसऱ्याच्या हातून विसर्जनाची वेळ येऊ नये.म्हणून त्या हद्ग्याचे चित्र व साहित्य पेटीमध्ये त्या पुजू लागल्या. अशा रीतीने हादगा बंधिस्त झाला.
…. ….. ….. ……
क्रमशः पुढे....
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा