शनिवार, २१ मे, २०२२

रक्ताच नातं

 ६) रक्ताच नातं

लेखक : निशिकांत हारुगले.

एम. ए. बी.एड.


सुगंधा तशी पेठेच्या माळावरल्या वाडीत जन्मलेली घरची परिस्थिती बेताची असलेने व मुलीची जात असल्याने तिच्या शिक्षणावर म्हणावा तितका खर्च तिच्या बापानं केला नाही. त्यामुळे घराजवळच्या पोरीसंगे खेळण्या बागडण्याच्या वयात तिला शेतात राबाव लागत असे. कधी कधी लाकूडफाट्यासाठी डोंगरात देखील जावे लागे.

 राबत कष्टतच तिचं बालपण गेलं. वयात आल्यावर इकडून तिकडून स्थळ तिला येवू लागली. पण मुलाकडील मागणी जास्त असे. व घरची परिस्थिती नाजूक असलेने मंगळसरीला लागणारे पैसे देखील तिच्या बापाने कर्जाऊ घेतले. सुगंधेच राबन व लाघवी बोलणं यामुळे शामा कुंभाराच्या बायकोन आपल्या माहेरच्या गावाकडून स्थळ काढल. 

शामा कुंभाराची बायको ही दूधगंगा काठची असल्याने तिनं ऐनी कडल्या वाडीतील एक स्थळ काढल. नव्हरा दिसायला सावळा होता. पण देखणा शेतकरी होता. त्याची परिस्थिती बेताचीच असलेने त्याची मागणी पण जास्त नव्हती. तो कष्टाळू असलेने सुगंधेला सुखात ठेवल म्हणून तिने ते स्थळ काढले.

शेवट पै पाहुण्यांनी ठरवून सुगंधेच लग्न जमवून गावातली गणपतीच्या देवळात अक्षता टाकून एकदासी सुगंधेला उजवली.

सुगंधा आता सासरी नांदु लागली. घरची शेती करत थोडीफार बाहेरची शेती पण ते करु लागले.सुगंधेची सासू हौसा ही खूप साधी होती. मात्र तिचा दीर खूप शिकला असल्याने तो मास्तर झाला होता. जाता येता तो सूगंधेच्या नव्हऱ्याला बोलत असे. सुगंधेला खूप वाईट वाटत असे. शेवटी तिला राहवल नाही. व ती नव्हर्याला बोलली, “दुसऱ्याच्या जीवावर कधी संसाराचा गाडा हाकता येत नाही, आपलं राबन कधी चुकतंय का? हा बैलोबा जरी मास्तर असला तरी आपल्याला कधी उपयोगात पडणार नाही. आपण राबायच व याच्या हातात सत्ता हे काय बरोबर नाही. आपल्याला त्याची पै पण नको. तवा आपण वेगळं झालेलं बर.”

 तिन वेगळं मागताच तिच्या दिरानं भांडण उकरून काढले. एके दिवशी सुगंधा म्हसीची धार काढत होती. तिचा दीर बाहेरून टाचा आपटतच घरात आला. व आईजवळ येऊन म्हणाला, “ वाटणी पाहिजे म्हणते ना, घे म्हणावं तिला वाटणी. लई परपंजा करुन दावती मला, कर म्हणावं. उद्याच बोलवतो पंच व करतो वाटणी. सुगंधा हे सारं धार काढताना ऐकत होती. नव्हरा घरात नसलेने तिनं गप्प बसायचे ठरवले. तिचा नवरा दुसऱ्याच्यात कामाला गेला होता. संध्याकाळी घरी आल्यावर सुगंधेचा नव्हरा न्हाणी घरात हातपाय धूवाय लागला. तेवढ्यात बाहेर गेलेला तिचा दीर मारुती आला. व आईजवळ जाऊन मोठ्यानं बोलाय लागला.

उद्याच पंच बोलवतो. कर म्हणाव वाटणी. माझी बायको माहेराला गेलीय बाळंतपणाला तवा मी तयार हाय. माझ काय पडत नाही.”

सुगंधेचा नव्हरा धनाजी न्हाणीघरातून हातपाय पुसतच बाहेर जोत्यावर आला. भावाला बडबडताना बघून तो म्हणाला, “हे बघ मारुती तुझ्या वागण्यात व बोलण्यात खूप अंतर हाय. गावच्या चारचौकडीच ऐकतोस व घरात येऊन नको तसं बोलतोस. नोकरीला लागल्यापासून एक पाई देखील दिली नाहीस घरात व कसल्या लाखाच्या कोटीच्या गप्पा मारतोस.”

तवा मारुती गप्प बसला. दुसऱ्या दिवशी पंच बोलावण्यात आले. व वाटणी करण्यात आली. पंचामधिल तिघे मास्तरच्या सलगितले होते. त्यानी वाटणी करताना गावातलं घर मास्तरला दिलं. व गावाबाहेर असणारा गोठा व त्या मागची पाच गुंठे जागा सुगंधेला दिली गेली. शेताची वाटणी करताना तगाच काळवाटाची जमीन मास्तरला दिली. त्यातील एक दहा गुंठे ओपा फक्त धनाजीला दिला. त्या बदली गावच्या वरील जमीन धनाजिला दिली. वैरणीचं रान धनाजीला पसंत न पडलेने पंचातील गणू अण्णाला तो म्हणाला, “ गणू आण्णा घराच्या वाटणीत मला डावी बाजू दिल्यासा मी काही बोललो नाही. शेत देताना देखील डाव उजवं केला. तरी मी काही बोललो नाही. आता पेंडीच्या वावराची सरळ वाटणी झाली पाहिजे. तेव्हा गणू अण्णा म्हणाला, “ मगाठावनं मी गप्प होतो. बाकीच्यांच ऐकलं आता नाही, आता पेंडीच्या वावरातल रान जरा जादा आम्ही धनाजीला देणार. शेवटी वाटणी झाली.

मास्तर मात्र डूरक्या बैलासारखा धनाजिकडे बघत म्हणाला, “घे वावर नाहीतर त्यात काय पेंडिच कापणार नव्ह. पयानाच्या चार काड्याशिवाय काय मिळणार आहे त्यात.”

शेवटी स्टॅम्प करण्यात आला. व समदी वाटणी झाली. म्हाताऱ्या हौसेला मात्र अन्न गोड लागणा झालं. धनाजीला दिलेली वाटणी तिला पसंद पडली नाही. नव्हरा मेलेला म्हातारं झाड काय म्हणलं. शेवटचं दिस आलेत तसे कंठायचे

घरातील सुगंधेच्या लग्नात आलेल्या चार भांड्यावर तांदळाच्या काही दाण्यावर व शेरभर चटनिवर सुगंधेला वाटणी देण्यात आली. घरातील मुर्हा म्हस जी मास्तरन कोकणात असताना घेतली होती. ती पण मास्तरन घेतली.

सुगंधा मात्र शांत राहिली व आपल्याला दिलेल्या घरात तिनं आपला संसार मांडला. त्यापूर्वी गावातील आपल्या साखळीच्या माणसांच्या मदतीने ते घर शेकरुन घेतले. सारवण सूरवण करून आपला संसार थाटला. तिचा नवरा व ती आपले शेत बघत दुसऱ्याच्या शेतात राबत. ते आपला संसाराचा गाडा हाकू लागले.

सुगंधेला बघून तिचा दीर इतर बायकांना म्हणत असे की कर् म्हणावं परपंजा उपाशी राहून. तेव्हा सुगंधा म्हणत असे, “ तूझ्या ताटाखालचं मांजर होऊन राहण्या पेक्षा उपाशी राहून ध्याड काढेन मी.”

 तो तिच्याकडे डोळे मोठे करून बघत असे. सुगंधेची वाटणी झाल्याचे तिच्या माहेरी समजले. तेव्हा तिचा बाप तिला भेटायला चांगल मणभर तांदूळ व शीधा घेऊन आला. वाटणी चुकीची झाल्याची लक्षात येताच तो जावयाला म्हणाला, “ काय हो पावनं कोणती कोल्ही आणला होता वाटणी करायला.”

तेव्हा धनाजी म्हणाला, “ मामा झाल ते झाल वाटणी म्हंटल्यावर जरा इकडं तिकड व्हायचंय मी मला दिलेल्यात समाधानी आहे. पुढं राबून आपण मिळवायचं.”

जावयाचं बोलण एकूण सुगंधेचा बाप आपल्या बरोबर आणलेले पैसे देत म्हणाला, “ हे बघा जावईबापू यातून एक म्हैस घ्या. व चालवा आपल रहाटगाडगं. माझ्याकडून जमेल तितकी मदत मी करेन.

त्या दिवशी मुक्काम करुन सुगंधेचा बाप सकाळी जावई व मुलीशी हितगूज साधून तो आपल्या गावाला गेला.

सोसायटीचे एक प्रकरण करून व मामाने दिलेले पैसे याच्यावर दोंन म्हशी घ्यायचे धनाजीनं ठरवल.

घरला लागूनच मागील बाजूला त्यानं एक छप्पर काढलं. दोन-चार मेडक्या लाऊन त्यावर बांबू टाकून पत्रे अंथरले. व डोंगराच्या चीव्याचा कुड केला. व छानसा गोठा तयार केला. नदीच्या वत्ताडाचा बुरुंब टाकून त्यावर फरसी घातली. व दर वाजा तयार केला. आपला मित्र गजा चव्हाणाला घेऊन तो मुरगूड व निपाणीचा बाजार फिरून आला. इकडल्या तिकडल्या बाजारात चौकशी करून म्हशीचे दर काढले. ते चांगलेच भडकलेले होते. असा एक आठवडा गेला.

एके दिवशी सुगंधा आपल्या शेजारच्या तारुबाई संग भांगलानिस गेली असता. भांगलताना तिनं तारुबाईपुढे विषय काढला. तवा तारुबाई म्हणाली, “तुझ्या नव्हर्याला सांग कशाला मुरगूड निपाणीच्या बाजाराला जातोस. त्या मोठ्या म्हशी तुला परवडायच्या नाहीत. तू ऐनीचा डोंगर उतर व सरळ कोकण्या कडगावच्या बाजाराला जा. तिथं येणाऱ्या थकिव कुडाळ मुलखाच्या रेड्या बघ. तुला परवडेल. 

आता आमच्या घरातील म्हस बघितलीस नव्ह माझ्या नव्हऱ्यान जवा आणली. तवा तिच्या आंगावर चिमुटभर मास नव्हतं. आमच्या हळदीच्या पावण्यानं बघितली. तेव्हा म्हणाला, “ पावणी बाई झूल नाहीतर वाकळ घाल मग दिसल गबगबीत. तुझ्याच भागातील तवा रोडकीच असायची. पण आता तिचं म्हस दोन दारातून जाणार नाही. 

परवा आलता पावणा व म्हशीकडे बघून म्हणाला, पावणीबाई म्हस झ्याक केलीस. तवा मी पण म्हणाले, “ ठेवता नव्ह नाव मला व माझ्या म्हशीला. तुम्हा डोंबाऱ्यांचा संसार आम्हीच कडगाव भागाच्या पोरी करताव. व आमच्या भागातील म्हशींच दूध पिऊन तुमची पोर मोठी झाल्यात. तवा तो थोबाडीत मारल्यासारखा गप्प बसला.”

तवा सुगंधा म्हणाली, “होय अक्कासाब तुमच्या सारखच करते. आमचा करंबळीचा पावना हाय. त्यालाच गाठाय सांगते तो देईल एखादी छानशी रेडी घेऊन.”

तारुबाई म्हणाली, “ हे बघ पहिल्यांदा नव्हरा जातोय. म्हस आणायला. तवा तू त्याच्या हातावर दही साखरेची चिमट ठेव त्याच्या हातावर जाताना, निष्णपच्या देवीचं नाव घे म्हणावं तिच्या खोऱ्यात जाणार हाय. यावर तिचा आशीर्वाद असुदेत. असे म्हणुन चुलीतला राकूंडा अंगारा म्हणून लाव कपाळाला. अन बघ सांजपतोर तुझ्या गोठ्यात म्हस उभा राहते की नाय ते.”.

संध्याकाळ झाली. दिस बुडाला कुलकरी उडाला. सुगंधा घरी आली. घरात आल्यावर तिने आपल्या नव्हर्याला सर्व काही सांगितलं. व आपल्या माहेरी जाऊन बाबाला घेऊन करंबळीला जावा व तेथील आपल्या पाहुण्याला घेऊन बघा एखादी म्हस मिळते का?

दुसऱ्या दिवशी सकाळी उठून आपल आवरून तडक धनाने सासुरवाडी गाठली. सासऱ्याला घेऊन तो थेट करंबळीला गेला. पाहुण्याच्या ओळखीने त्यानं म्हस बघितली. दोन चार म्हशी बघितल्यावर त्याने त्यातील दोन लहान रेड्या ज्या नुकत्याच व्याल्या होत्या. त्या घ्यायचे ठरवले. दरात योग्य पडल्याने त्याने त्या घेतल्या. व एका छोट्या टेम्पोत घालून घरी घेऊन आला.

घरात आणल्यावर सुगंधाने हळदीकुंकू लावून ओवाळले. त्यांना पाणी पाजलं व वैरण घातली. एकीला दोन मिळाल्याने ती खुश होती.

त्या दोन्ही म्हशी चांगल्या लागल्या. त्या म्हशींच्या जोरावर त्यांनी सुधारणा केली. सुगंधेला मिळालेलं डोंगरातील जे रान मिळालं होत . ते त्यांनी बसवून त्यात चांगल पिक घेतले. डोंगरातून जाणाऱ्या ओढ्याला समांतर फाटा पाडून त्या द्वार त्यांनी चांगले पिक घेतले.

डोंगरी पाण्यानं माळधावणीच रान चांगलंच तगाच झालं. त्यातून चांगल पीक यायला लागल्याने त्यांनी हळूहळू घरदार सुधारले. या धामधुमीत सुगंधेला दोन मुलं पण झालीत. सुगंधाचा संसार सुरळीत चालला. 

पण सुगंधेच्या दिराला तिची झालेली प्रगती आवडत नव्हती. एकदिवस डोंगरातून पयान कापताना त्यानं भांडण काढल. त्या दिवशी सुगंधा व तिचा नव्हरा पयान कापायला गेली होती. इतक्यात तिथं मास्तर व त्याची बायको तिथं आली. सुगंधा व तिच्या नव्हर्याला पयान कापताना बघून तो म्हणाला, “ हे बघ दादा मला वावराची वाटणी पसंत नाही. मला पेंडीच रान कमी आलय. तवा.”

त्याच बोलण तोडत धनाजी म्हणाला, “ हे बघ मारुती तू जे रान मागितल ते मी तुला दिलं. चांगल रान घेऊन मला माळ दिलास. व सगळी वाटणी तुझ्यासारखी झाली. व आता मेलेल मड उकरून काढू नकोस. “

तेव्हा मास्तरची बायको सुगंधेला पहात म्हणाली, “ हीच्या अंगात सगळ पाणी आहे. हिनच वाटणी केली. त्यावेळी मी नव्हते. नाहीतर दाखवला आसता हिला माझा हिसका.”

सुगंधेला जावेच बोलण आवडल नाही. ती म्हणाली, “ हे बघ उगाच तुझा तोरा मिरवू नकोस. गप्प बसते म्हणून नाटकं करू नकोस. वाटणी करताना तगाच चांगल रान घातलं तुझ्या घशात. गावातील घर दिलं. व आम्ही गोठा पत्करला. तवा तू कुठं ग गेलतीस. व आता मी राबून खातोय ते बघवत नाही काय तुला..”

सुगंधेकड बघत मास्तर म्हणाला, “ माझ्या बायकोला कायपण बोलायचं नाही.”

सुगंधा, “ तर तुझी बायको राजाची लेक ना. माझ्यापुढे तुझं शहाणपण नको. चार पोरासनी शिकवतोस तुझ्या पईट आम्ही मिंद नाही. आता उगाच तोंड पिसळवू नको. राबाय नको दाणागोटा काय फुकट पिकत नाही. बायको फिरती टळो करुन लोकाची दारं पुजती.”

मारुती, “ उगा माझ्या तोंडाला बबाईमासान लागायचं काम नाही.”

मास्तराची बायको, “ तुझ्या जीवावर नाही फिरत. उगीच नको ते बोलू नको.”

शेवटी त्या दोघांचं भांडण मोठ झाल. शेवटी रागाच्या भरात धनाजीन मास्तरच्या दोन कानफाटात लावल्या. शेवटी आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी भांडण मिटवलं.

त्या दिवसा पासून मास्तर गप्प राहू लागला. धनाजीला व सुगंधेला वाईट वाटत होत. दिस झपाझप जात होते. त्या दिवसापासून मास्तर शांतच राही. आपल घर, शाळा व आपले शेत यातच तो लक्ष देऊ लागला. त्याच मन त्याला खात होत. वाटणी करताना आपण चुकीची वाटणी केली.

एके दिवशी मास्तर आपल्या रानातील गव्हाला पाणी पाजत होता. तवा सुगंधा व तिचा नव्हरा शेजारच्या मालूच्या रानात काडसर कापत होती. मास्तरन लाकड तोडून ठेवलेली होती. ती न्यायला शिरपा बैलगाडी घेऊन आला होता. वावरात गाडी आणण्यासाठी महादू पाटलाच्या रानातून शिरपान गाडी घातली. गाडी भरली. व परत जाताना महादू पाटलाने गाडी अडवली. व तो मास्तरसंगे भांडू लागला.

बघता बघता मास्तर व महादुची हमरी तुमरी लागली. व. महादू पाटलाने मास्तरची गळपट धरली. व मास्तरला खाली पाडलं. महादू वांड असलेने कोण त्याच्या नादी लागत नसे. सगळ्या शिवारात लोकं भांडण बघत होते. 

भांडण लागल्याचा सांगावा मिळताच मास्तराची बायको तिथं आली. तिची व महादूची हुज्जत लागली. तस महादून आपल्या बायकोला हाक मारली. ती तरतरतच खालच्या ओप्यातून आली. तिनंन मास्तरच्या बायकोला मारायला सुरुवात केली. भांडणाला चांगलंच तोंड फुटल.

बघ्यामध्ये असणाऱ्या पांडू ढेकळ्याला ते बघवलं नाही. तो धावत खालच्या शिवारात गेला. सुगंधा व धना असणाऱ्या ठिकाणी आला. व धापा टाकतच बोलला.

“ वरती रस्त्याला महादूच्या वावरात मास्तर व महादूची भांडण चालल्यात. मास्तर व त्याच्या बायकोला लई मारलय.”

धनाजी व सुगंधेला रहावलं नाही. ती तडक काम टाकून धावतच वरच्या रानाकडं आली. गाडी अडवलेल्या ठिकाणी आल्यावर धनान महादुला आपल्या भावाच्या अंगावर बसलेला पाहुनी तो चिडला. व त्यान महादुला ढकलला. व गाडीतल्या गेचक्याच लाकूड काढलं व महादूच्या अंगावर धावून गेला. तसा त्यानं दोन चार लगावली. 

सुगंधानन महादुच्या बायकोला चांगलीच हिसकली. व ती म्हणाली, “ बैलगाडी अडवायला तुला तालेवारणीन काढली काय. मेल्यावर काय मड्यावरून घेऊन जाणार हाईस काय. एवढ्याशा वाटपाई माझ्या दिराला मारायला आम्ही काय मेलो नाही. बघतेच कसा वाट अडवतोस ते.”

महादू म्हणाला, “ माझ्या वावरातून गाडी न्यायची नाही.”

तेव्हा धनाजी म्हणाला, “ तुझ्या वावरातन गाडी न्यायची नाही. तर मग माझ्या वावरातन पयानाच्या गाड्या वडताना लाज नाही वाटली. व आमची लाकडाची गाडी अडवतोस व्हय.”

शेवटी महादू व महदुच्या बायकोन गाडी सोडली. व ती गप्प बसली.

त्यावेळी मास्तरन आपल्या भावाला गच्च मिठी मारली. व तो ढसा ढसा रडू लागला. त्या दिवसापासून दोन्ही भावात गोडवा निर्माण झाला. व पुन्हा दुरून का असेना स्नेहबंध निर्माण झाला.

लेखक : निशिकांत हारुगले.


गुरुवार, १२ मे, २०२२

शिकार

 ५) शिकार

लेखक : निशिकांत हारुगले.

एम. ए. बी.एड.



पेठच्या गावच्या वरील बाजूस हिरव्यागार डोंगराची राई होती. त्याच्यावर जंगल. सह्याद्रीच्या दूधगंगा डोंगररांगेत येणारा हा भाग निसर्ग संपन्न असा होता.

घनदाट अरण्यात या भागात गवे, रान कोंबडे, मोर, वाघट,असे अनेक प्राणी आहेत. फिरायला गेल्यावर मोरांचे थवेच्या थवे दृष्टीस पडत.

अशा या पेठच्या डोंगरात भुदरगडाच्या पायथ्याशी अनेक लहान वाड्या, हिरव्यागार दुलई पांघरलेल्या डोंगरात पायऱ्यांची उतार शेती असणाऱ्या भागात एक वाडी होती. इथल्या लोकांना शिकारीचा खूप नाद. डोंगरात जरी ही गाव असली. तरी डोंगरातील झर्याच्या पाण्यावर हिवाळी गहू, हरभरा घेत. पावसाळ्यात भात, नागली ठरलेली असे. या वाड्यावर जन्मलेली पोर पेठला शिकायला जात. शाळा शिकत डोंगरातून उड्या मारत ही लहानाची मोठी होत. मोठं झाल्यावर रोजगार धंद्याला काही गावाबाहेर जात. तर काही गावात राहून मिळेल तो कामधंदा करून आपला उदरनिर्वाह करीत.

बाहेर गेलेले असोत. किंवा घरी राहणारे सगळ्यांचा आवडता छंद म्हणजे शिकार. अशा या गडतटा खाली वसलेल्या गावात अनेक महाभाग पाहायला मिळतात. अशा या महाभागांच एक टोळकं तयार होत असे. अशा एका वाडीतलं टोळकं. यात शिंप्याचा गजा, दुसरा नाव्ह्याचा बाजीराव, तिसरा पाटलांचा तुकाराम व सुर्यवंश्यांचा महादेव. असे जोडगोळीतले मित्र राहत होते. या चौकुळात मुख्य प्याद होत. ते म्हणजे नाव्ह्याचा बाजीराव. पण त्याला बाजाच म्हणत. याने कशी बशी सातवीपतूर शाळा शिकली असल. पुढे शाळेला जा म्हंटले की याची स्वारी घरातून शाळेला म्हणून निघे. व पेठच्या अर्ध्यावाटेवरून हे मागं फिरत व डोंगरातून गडतटाच्या खोर्यात फिरायचे. यांची शाळा म्हणजे जंगलातील सफर. फिरत फिरत हे डोंगरातील करवंदे,बोरं, तोरणं, बिब्ब्या, कटक्या खात उंडारत फिरत. सवंगड्यांशी खेळत त्यांचे दिवस गेले.

एक दिवस बाजीच्य बापाला कळलं. की पोरगं शाळेत जात नाही. तेव्हा तो तेला म्हणाला, “ तू शाळा शिकू नकोस हं, हाय पुढे तुझ्या एका हातात वस्तारा व दुसऱ्या हातात कात्री. गावाच्या माणसांची भादरायचीच तस म्हशी व रेडकांची पण भाद्रायची. तू लेका भादरतच मरणार. पूर्वजांचा वारसा चालवाय नको.”

तेव्हा बाजी बोलत असे, “ बा राजासारखा राजापण कुणापुढे झूकतोय माहीत आहे ना.”

तेव्हा बाजाचा बा म्हणाला, “ तर तू देव हाईस नव्हं.सगळ्या गावची केसरच काढ. आम्हाला तवा शाळा कसली ती ठावूक नव्हती. म्हणून आम्ही या फंदात पडलाव. तवा तूपण हाच कित्ता गिरव.”

तेव्हा बाजी म्हणायचा, “ उपाशी तरी मरणार नाही ना.”

तवा तेचा बा काठी घेऊन पाठी लागायचा.तेव्हा हा परसदारी पळून जायचा.

शिंप्याच्या गजानं पण बाजीच्या नादान शाळा सोडली. तसा तो चौकुळात असायचा.पण घरातील सर्व काम करून घर सांभाळून तो संगत करी. शाळा सोडल्यावर त्यानं बापाकडून आधी कपडे शिवायला शिकला. सुरवातीला कपडे शिवताना जरा चूकायचा मात्र नंतर त्याचा हात चांगलाच बसला होता.कधीतरी चुकून तक्रार यायची.

एकदा गावातल्या हौसा म्हातारीनं चोळी शिवायला टाकली. त्यान चोळी मस्त शिवली. चोळी शिवताना त्याला वाटल. म्हातार माणूस तरुणपणात कधी मिरवायला मिळालं नाही.म्हातारपणी तरी नटूदेत. म्हणून यानं तिच्या खांद्यावर दोन चार चुण्या पाडत फुगं पाडल. त्याला वाटल म्हातारी खुश होईल. पण तिसऱ्या दिवशी म्हातारी भांडत दुकानात आली. व गज्याला म्हणाली, “ गजा भाड्या मला काय नवरी म्हणून दाखवतोस व्हय र .या वयात कशाला पाडलास माह्या दंडाला फुग्. सर्व बायका म्हातारपणी म्हातारचळ लागलय म्हणत्यात. तवा ते उसवून परत चांगली शिव.”

असं म्हंटल्यावर तो म्हातारीला म्हणाला, “ तूझा नव्हरा काय म्हणाला काय तुला?”

तेव्हा म्हातारी म्हणाली, “ तो काय बोलतोय .मीच पोसते तेला. पडला असल दारू पिऊन.”

गजा म्हणाला, “ कोण नाव ठेवतं ते सांग.”

म्हातारीनं गल्लीतल्या बायकांची नाव सांगितली.”

तेव्हा तो म्हणाला, “ म्हातारे काळजी करू नको.पुढच्या चार महिन्यात त्यांची तोंड बंद करतो.”

व म्हंटल्याप्रमाणे या गजान त्यांची तोंड बंद केलीत. गावात दुसरा शिंपी नसलेने त्याच्या जवळच लोक शिवायला येत असत. त्यामुळे त्यानं फुग्याची फॅशन गावात फेमस करून टाकली. बाया आपल्या दंडाचे पडलेले डीझाइन सगळ्यांना दाखवत कौतुक करू लागल्या.

चौकुळतला पाटलाचा तुकाराम तसा दिसायला देखणा घरच्या शेतीमुळे याच्याकडे लोकांचा राबता असायचा. याला काही काम लावत नसत. हा खादडायचा व उंडरायचा. तो आळशी असल्यानं सगळी त्याला पाटलाचा गवारेडा म्हणायचे. मोठं झाल्यावर सुदरेला म्हणून त्याचा बाप दिवस ढकलत होता. या सगळ्यात जास्त शिकलेला म्हणजे सूर्यवंश्याचा महादू. तो चांगला मॅट्रिक पर्यंत शिकलेला होता. पण यांच्या नादान जंगलात फिरायची सवय होती. एके दिवशी बापानं मरेपर्यंत मारला. त्याची आई अडवायला गेली. तेव्हा तिलाही दोन-चार लाता बसल्या. शेवटी त्यानं गाव सोडलं. व मामासंगे मुंबईला गेला. तो आता सहा सहा महिने झाल्याशिवाय इकडे फिरकत नसे.

बघता बघता पोर वयात आलीत. तेव्हा त्याच्या बापानी त्यांचे दोनाचे चार करायचे ठरवले. कसंबसं या चौकडीचे चाराचे आठ झाले. जो तो आपल्या आपल्या संसाराला लागला. स्वतःचा घर संसार सांभाळत एकमेकाशी भेटी गाठी करत यांचे संसार सुरू झाले.

उन्हाळा आला. मुंबईला गर्मी वाढल्याने महिन्याभराची सुट्टी काढून महादू गावाकडे यायला निघाला.त्यानं मुंबई पाटगाव गाडी धरली. व दुसऱ्या दिवशी तो गावात हजर झाला.गावात आल्यावर सगळे विचारू लागले, “काय मुंबई कवा आली.”

महादू सांगे, “ आताच आलोय.”

प्रवासाने दमल्यामुळे त्या दिवशी महादू घराबाहेर पडला नाही. दुसऱ्या दिवशी उठून आपले सर्व आटोपून तो गावात रपेट मारायला गेला. गावातील मित्रांना व इतर लोकांना भेटून तो शेवटी गजा शिंप्याच्या दुकानात आला.

त्याला बघून गजा म्हणाला, “ तुझं आपल बर हाय बघ महादू, जीवाची मुंबई करतोस म्हणे. भारी बाबा नाहीतर आम्ही इथे कापतोय कापड.”

महादू म्हणाला, “ कसली जीवाची मुंबई. राबराब राबायच. व तिथंच खर्च व्हायचं. आपण जास्त शाळा शिकली नसल्यानं मिळल ते काम करावं लागतंय बघ. तुमच्यासारखे हाय व्हय आमचं. नोकऱ्या नाही मिळाल्यात की हाय सुईदोरा तुला. व बाजाला वस्तरा. तसं आमचं नाय. शेवटी हाय नांगर व खुरपं पुजलेली पाचवीला.

तेव्हा गजा म्हणाला, “ तुला काय नको म्हंटल व्हय सुईदोर घ्यायला..” “लेका मी सूईदोरा घेतला तर तूझ्या पोटावर पाय येईल.”

“ बर ते सगळं जाऊ देत. आपण आज शिकारीला जाऊया. खूप दिवस झालेत शिकार करुन.” महादू बोलला.

“ जाऊया की.” गजा उत्तरला.

“बाजी व तुक्याला पण बोलतो.” महादू म्हणाला.

तवा गजा म्हणाला, “ चाललं की नाहीतर तू नसल्यामुळे आम्हाला पण शिकारीला जायला अवघड वाटत. तुझ्यासारखा नेम इतरांना जमतच नाही बघ. आम्ही जरी गेलो तरी एखाद्या कवड्यावरच समाधान मानावं लागत बघ. मागच्या महिन्यात दिवसाचं भगटायला त्या तुक्याला घेऊन गेलो होतो. त्याचे डोळे आधी सरळ बघतोय कुणीकड व नेम धरतोय कुणीकड. हे समजतच नाही. मागं रानकोंबडी टिपायला सांगितली. तर यांन नेम धरून कुठ बार काढला कुणास ठाऊक. कोंबडीला सोडून गव्हाला पाणी पाजयला गेलेल्या तान्याला छरा लागला. तो अजून पाय वाकड करीत चालतोय. त्याची बायको येता जाता शिवा देते बघ. तेव्हापासून कोणपणं शिकारीला गेलं नाही बघ.”

महादू म्हणाला, “ ते काही नाही आज जायचं शिकारीला. तू बत्ती तेवढी तयार कर . मी तुक्या व बाज्याला तयार करतो. आज रातीला आपण शिकारीला जायचं.”

तिथून महादू निघाला. त्याने आपल्या मित्रांची गाठ घेतली. रात्री शिकारीला जायचं ठरवलं. शिकारीला जायचं म्हणून तुकाराम व बाजी सुध्दा खुश झाले.

संध्याकाळी सर्वांनी शिकारीला जायसाठी लागणार साहित्य ठरलेल्या ठिकाणी नेऊन ठेवलं. यांचं ठरलेलं ठिकाण होत महादुचा गोठा. जो गावापासून जरा बाजूला शेतात होता.गावापासून जरा दूर असलेने कुणाला कळत सुध्दा नव्हतं.

या सर्वांचे पार्टी करायचे ठिकाणही महादुचे घर असलेने कुणाला कळत नव्हते. रात्री लवकर आठ वाजता जेवण करून ते सर्व महादूच्या गोठ्यात जमणार होते.

महादू घरात आला. शिकारीच साहित्य शोधू लागला. त्याच साहित्य त्याच्या बायकोने सारवान काढताना वरती माळ्यावर ठेवले होते. ते शोधायला तो माळ्यावर चढला.शोधताना त्याला कनुगल्याच्या कोपऱ्यात त्याचे गंबुट सापडले. ते सुस्थितीत असल्याचे बघितल्यावर त्याने ते चौकोणी फळी काढलेल्या ठिकाणातून खाली फेकले. शिकारीची कपडे शोधताना त्याला ती बोचक्यात सापडली. ते काढताना त्यानं बायकोला दोन -चार सुनावतच काढली. तो म्हणाला, “ कुठं हे आडग पदरात पडल शिकारीची कापड बोचक्यात ठेवतय.” त्याच बोलणं एकूण त्याची बायको जेवण खोलितून म्हणाली, “ हे आडगं हाय म्हणुन संसार चाललाय. नाहीतर तुमचे मुंबईचे पैसे या घरातील तेलासाबनाला तरी पुरले असते का.” तिचा आवाज ऐकून तो गपचूप आपली कपडे घेऊन खाली उतरला. व बायकोला म्हणाला, “ लई शहाणी हायेस, जेवणं कर लवकर, मी शिकारीला जाणार हाय,”

तसी त्याची बायको पुटपुटत कामाला लागली. रात्री आठ वाजता ती सर्व महादुच्या गोठ्यात जमा झाली. महादूनं शिकारीचे कपडे घातले. त्याचे गुडघ्यापर्यंतचे गंबुट व इंग्लिश कॅप त्याने खास मुंबईवरून आणून ठेवली होती. प्रत्येकाने आपापल साहित्य घेतले. तुक्यानं बत्ती पेटवली. महादून मुंबईवरून आणलेली ऐव्हरीडेची बॅटरी घेतली. व ती सर्व जंगलाच्या वाटेला लागली. बॅटरी वर असणार रानमांजराच चित्र बघून तुक्या म्हणाला, “ आज काय रानमांजर मारायचं काय?” तेव्हा ती हसत जंगलाच्या वाटेला लागलीत.

अंधाऱ्या रात्री ब्याट्री व बत्तीच्या प्रकाशात ती सर्वजण जंगलाकडे निघाली. रातकिड्यांची किरकिर चांदण्याच्या प्रकाशात कुठेतरी घुबडाचा घुत्कार ऐकू येत होता. बत्तीच्या प्रकाशात इकडच्या तिकडच्या गप्पा मारत ते निघाले. कुठेतरी काजव्याचं लखलखन दिसत होत. ही सर्व मंडळी शिळेचं वताडाचा उगम ओलांडून वाघझरीला पोचले. उन्हाळ्यात सगळे पाणवठे आटतं तेव्हा तहान भागवणेसाठी प्राणी वाघझरीला येत. महादुने आज निश्चय केला होता. की आज एकतरी शिकार मारायची. ते त्यांच्या निश्चीत असणाऱ्या ठिकाणी. म्हणजे वाघझरिवर असणाऱ्या आंब्याच्या झाडावरील मचानावर गेलीत. तिथं गेल्यावर त्यांनी बत्ती विझविली. व शांतपणे सावजाची वाट बघायला लागलीत. इकडे तिकडे पाहायला लागलीत. थोड्या वेळानं वेताच्या बेटाच्या झाडिकडून सळसळ ऐकू येऊ लागली. तुकारामान बॅटरीचा झोत पाडला तर त्यांना एक वाघीण तिच्या पिलांसवे पाणी प्यायला आली होती. तिच्या तोंडाला रक्त लागल होत. त्यावरून तिने कुठल्या तरी प्राण्याचे काम तमाम केले होते. कारण वाघाट आपल्या अंगावर कुठलही रक्ताचं डाग वा घाण ठेवत नाहीत. शिकार करताना तिला खूप त्रास झाला असणार त्यामूळे ती खूप दमली होती. थकावट भागवनेसाठी ती तेथें पाणी प्यायला आली होती.

तिचा अवतार पाहून शिंप्याचा गजा म्हणाला, “ यांच आपल बर हाय की शेतात राबाय नको, याच पैसे द्यायचे, त्याकडून उधारी वसूल करायची असं काही टेन्शन नाही बघ. टाकली झेप केली शिकार लागली गटम गटम करायला. नाहीतर आम्ही मानस नुसती हा काय करतोय तो काय म्हणतोय, याच्याकडे किती पैसे, त्याकडे किती याचाच विचार करत असतो. यातच सगळी जिंदगाणी जातिया..”

 हे बोलण ऐकून नाव्ह्याचा बाजी म्हणाला, “ मग आता देवा पांडुरंगाला हात जोड. व म्हण, पुढला जन्म वाघाचा मिळूदेत म्हणून. म्हणजे तू व तुझी दूनिया या जंगलातच फिरत जाऊ देत. काय बोलतोस त्यांचं जीवन सोपं हाई व्हय. पावसाळ्यात इकडं तिकडं निवारा शोधताना व चिल्टानी फाडून खाल्ला म्हणजे समजलं. शिकार काय रोज मिळतीय काय. त्याना काय कमी श्रम कराय लागत नाही.

इतर प्राणी त्यापुढे येऊन उभा राहत नाहीत. की वाघोबा दादा भूक लागली असल तर मला येऊन खा. माणसाचा जन्म मिळालाय म्हणून चमचमीत खातोस नाहीतर बसला असतास सडत एखाद्या गुहेत.”

त्याच हे बोलण ऐकूण तुकाराम हसायला लागला. ते पाहून गजा म्हणाला, “ तुला काय झालंय बत्तीसी काढायला. तोंड बंद कर ते ब्याटरीच्या उजेडात तरी पांढरं दिसतील काय ते दात.”

तसा तुकाराम म्हणाला, “ हे आपल बर हाय की तुझ बोलणारा राहिला बाजूला व ऐकनार्यालाच लागलाय कावयला.”

तेव्हा त्याचं हे बोलण ऐकूण महादू म्हणाला, “ ए गप्प बसा तुम्हाला इथं शिकारीला आणलय की गप्पा मारायला.”

तेंव्हा बाजीराव म्हणाला, “तू लेका एवढं मुंबई करून आलास.जरा खायला मिठाई तरी आणलीस काय.”

महादू म्हणाला, “ मला वाटलच होत, तू हावऱ्या कसा काय बोलला नाहीस. चींगट्या कवा खरकट्या हातानं कावळा मारत नाहीस. व मला बोलतोस व्हय. आणलीय बघ तुझ्या शेजारच्या पिशवीतत हाय. तुम्हाला कवा चुकवून खाल्लया काय मी. तुम्ही कवा येवढं मुंबई करून आलोय . प्रेमानं कवा बोलत्यासा काय. तुमची सर्व जोडणी करायची. तुम्ही मात्र आयत्या बिळात नागोबा होऊन बस्त्यासा. आता शांत बसा. आलोय कशाला व करताय काय.”

थोडा वेळ वाट पाहिली पण कोणतंही सावज आलं नाही.

दोन चार तास झाले.

शेवटी महादू म्हणाला, “ हे बघा बराच वेळ झाला. काहीच सापडलं नाही. तवा त्या पिशवीतील मिठाई खावा. व बाजा तू आणि गजा खालच्या बाजूच्या डोहात बसलेली रानातली उठवा. मी त्यातील एखादं टिपतो. तेव्हा सांगितल्याप्रमाणे त्यांनी मिठाई वर ताव मारला. बाजा व गजा काठी आणि खूरपे घेऊन झाडावरून खालती उतरली. व खालच्या डोहाच्या बाजूला गेलीत. तिथं वटाडाच्या खालच्या बाजूला मोठा डोह होता. पायवाटेने पुढे पानमलळ्यातून ते डोहाजवळ आलीत. व तिथे आल्यावर बाजीरावाने वाघाचा आवाज काढायला सुरुवात केली. तशी ती रानातली सावध झालीत. गजान तोपर्यंत दगड मारायला सुरुवात केली. तशी ती रानातली जंगलाच्या चढणीच्या वाटेला लागलीत. त्यामागे हुर्रे हुर्रे असा आवाज करत ते हकलाय लागलीत.

तशी ती वटाडाच्या वाटेने वाघझरीला निघाली. ती जाताना पाहून गजा म्हणाला, “ आज एकाधी चांगली शिकार साधतीया.” वाघझरीला येत्याली रानातली त्यांच्या पायाच्या आवाजाने दगडातून खडखड आवाज येत होता. म्हादूने नेम धरला. व एका रानातल्यावर आवाजाच्या रोखाने नेम धरून चाप ओढला. छरा बंदुकीतून सुटला. आवाजाने बिथरून ती इकडे तिकडे पळू लागली. व एका रानातल्याच्या पायात जरा लागला. ते झुडपातून उलट पळाल. ते सरळ गजाच्या दिशेनं निघालं. तसा गजा आडवा पळाला. तो वाचला.त्यातून एक काठी लगावली तसा त्याचा वेग मंदावला. पण जातांना त्याची धडक बाजाला बसली. तो खाली पडला. तरी त्याने त्यातून सावरून त्याला खुरपं मारल. पण ते त्याचा नेम चुकुन पळालच. योजना फसली. सगळे नाराज झाले. बाजीरावाला धडक बसल्याने त्याचा पाय खुब्यातून दुखू लागला . ती पुन्हा माचावर आलीत. माचावर बराच वेळ बसली पण काही शिकार येईना. शेवटी फेराफेराने जागरण केली. तरी देखील शिकार नाही आली. मध्यरात्र उलटुन गेली. दोनच्या सुमारास एक वाघा सारखा प्राणी आला. त्याचा आवाज ऐकूण तुकारामान बॅटरीचा प्रकाश झोत पाडला. तो एक छोटा चीत्ता होता. ते बघितल्यानंतर. तुकारामान बॅटरी बंद केली. चीता आवाजाच्या व झाडाच्या रोखाने निघाला. त्याच येणं पाहून तुका घाबरला. व इतरांना म्हणाला, “ अरे तो चित्ता इकडचं येतोय.”

तसा महादू म्हणाला, “ तो काय खातोय तुला.”

“ तस नाही रं तो झाडावर चढला तर काय करायचं.त्याला कस टोलवायचं.”

तवा शिंप्याचा गजा म्हणाला, “ ही काठी काय पुजायला आणली काय. येऊदेत वरती द्यायचं ढकलून खालती.”

“ मगाशी काय भारी उपयोग केलास बघ. जरा वाचलो नाही तर माझीच शिकार झाली असती.” बाजीराव म्हणाला.

तवा गजा म्हणाला, “ जरा ठोका कमी पडला रं नाहीतर त्याचं डोकच फोडीतो.”

बाजीराव म्हणाला, “ गावात कुणाला शिकारीला जातोस म्हंटलास तर हसतील लेका तुला बघितली काठी कशी फिरवलीस ते.”

इतक्यात तो चित्ता झाडावर चढू लागला. ते बघून तुकारामाने वाघाचा आवाज करत डहाळी जोरात हलवली.तस तो चीता घाबरून पळून गेला.पहाट व्हायला लागली तशी ही सगळी हिरमुसली. व घराच्या वाटेला लागली. उजडायला ती गाव शिवारात आली. तवा रानकोंबडी त्यांना गावाच्या शिवारात दिसली. तसा नेम धरुन चार कोंबडी त्यानं टिपली. त्यांना उचलून घेत तुकाराम म्हणाला, “ महादू असताना शिकारीच कधी रिकाम जाणं घडलं होय.”

यावर गजा म्हणाला, “ काही का असेना दुधाची तहान ताकावर भागवून. घेऊया.”

तेव्हा महादू लंगड्या बाजीरावाला सावरत गावाकडे निघाला. शिकार झालेले कोंबडे चांगलेच रानातील पिकाच्या लोंब्या खाऊन माजले होते. गप्पा मारत ते घरला चालले.



महादू म्हणाला, “ एवढी जीवाची मुंबई केली. पण आपल्या या भुदरगडाच्या दऱ्या खोऱ्यात असणारी गंमत कुठच नाय बघ. तुमच्या सारखे सवंगडी व जीवाला जीव लावणारी माणसे कुट मिळतात. बाजीरावाला हिम्मत देत महादू म्हणाला, “ घाबरु नकोस मी मुंबईवरून आणलेलं आयुर्वेदिक औषध जे दाजीला दिल होत. त्यातील एक बाटली घरात हाय. ते लावलं की लागशील दोन दिवसात उड्या मारायला. बोलत चालत ती गावात आली. त्यांना बघून जो तो कौतुक करत होता. बाजाची बायको मात्र म्हणाली, “ काय शिकार करायला गेलता की शिकार व्हायला.”



तवा बाजी म्हणाला, “ अगं शिकार करायची म्हणजे लहान सहान अपघात व्हायचे. शिकार म्हणजे जोखमीच काम.”

ती म्हणाली, “ होय तर आता दोन चार दिवस दुकान बंद ठेवावं लागलं.”

तवा तो म्हणाला, “ दोन चार दिवस दुकान बंद ठेवायला मला काय पाळणा करून आणला नाय.”

मारलेली शिकार वाटून घेतली. व घरच्यांसकट सगळ्यांनी मनमुराद आनंद लुटला.

आपल्या सवंगड्यासवे मज्जा मारत महिना आनंदात घालवून महादू पुन्हा मुंबईला जायला निघाला. तेव्हा गावच्या स्टँडवर त्याचे मित्र सोडायला आले. महादू गाडीत आपल् लगेज घेऊन चढला. थोड्या वेळाने गाडी तालुक्याला मार्गस्थ झाली. बाकीचे तिघे त्याची आठवण काढत घरला निघाले. त्यांच्या मनात महादू पुन्हा दसऱ्याला गावी आला की शिकारीला जायचं हा विचार घोळू लागला. मनात मनोराज्ये रचत सगळी आपापल्या कामात मग्न झाली.

बाजीराव पुन्हा आपल्या दुकानात वस्तरा चालवू लागला. तर गजा आपल्या दुकानात कपडे शीवण्यात मग्न झाला. तर तुकाराम आपले घर शेत व जनावरे सांभाळण्यात गुंतला.

महादू मात्र आपल्या गावच्या आठवणीत शहरातील धावत्या जगात आपले दिवस ढकलू लागला. पुन्हा कधी सुट्टी मिळेल. व मी गावी जाईन या आठवणीत तो दिवस घालवाय लागला.

लेखक : निशिकांत हारुगले.


मंगळवार, ३ मे, २०२२

देवाक नदीची जत्रा

llदेवाक नदीची जत्राll

लेखक : निशिकांत हारुगले

 एम.ए.बी.एड.




ग्रामीण भागात कोणतीही घटना घडूदेत. पहिल्यांदा देव देवताळ तपासून पहात. अंगारे धुपारे देव देवरशी व उतारे यांची उतारा उतर घडे.

वेदगंगेच्या काठावर भुदरगड खोऱ्यात अनेक गावे वसलेली आहेत. या गावात साट लोट करून लग्न वर्हाडाचे संबंध जुळलेले आहेतच. पेठेच्या गावातील जना पाटलीनीन आपली पोरगी कडगाव फाट्याला दिली होती. तिचा नवरा बागायतदार होता. तशी त्याची थोडीफार जमीन पाण्याखाली असल्याने त्याला बागायतदार म्हणत असत. शेतात राबून ऊसाला पाणी देऊन येणार्या पिकाचे कारखान्याला घालवल्यावर मिळणाऱ्या टनाचे पैसे मोजत तेही या वर्षी ऊस गेला की पुढल्या वर्षी ऊस तोडणीसाठी आला की पैसे मिळत. त्यामुळे पैशाची उलाढाल करावी लागायची.

जनाबाईची लेक सुनिता तिच्या हाताखाली राबत लहानाची मोठी झाली होती. त्यामुळे ती चांगलीच घट्ट झाली होती.तिला सर्व सूने म्हणत.

तिन तिच्या नवऱ्याला शेत कसे कसतात ते दाखवलं. नाहीतर त्याला साधा शेताचा बांधसुध्दा माहीत नव्हता. मात्र तिचा दीर एकजात बेवडा. घरात काही कामधंदा करणार नाही. पण गावात याच्याकड राब त्याच्याकडे राब, व मिळालेल्या पैशातून दारू ढोसून संध्याकाळी धिंगाणा घाल. त्याला लोक बेवडा शिरप्या म्हणत.

सुनिता व तिचा नवरा खूप राबत असत. त्यामुळे त्यांचे कोणतेही पीक डावे नसे. नेहमी उजवच असे. दरवर्षी प्रमाणे या वर्षीही सूनिताच ऊस चांगला आला होता. मळवातल्या ऊसात सूनिताचा ऊस उठून दिसत असे. मात्र चांगल झाल की त्यावर घाला हा येतोच. अशा प्रमाणे लाईटच्या वायरींच स्पार्किंग झालं. व ठिणग्या पडल्या. व फडाला आग लागली बघता बघता चांगला ऊस पेटला. उत्पादन घटल. ऊसाच चिपाड झालं.

हातातोंडाचा घास देवानं काढून घेतला. सुनिताचा नव्हरा खुळ्यासारखं करायला लागला. सुनितानं समजाऊन सांगितल. पण काही उपयोग झाला नाही. दवापाणी पण केलं. त्यानं चांगलच मनाला लावून घेतलं होत. कारण दोन घरचा संसार त्या एका एकरातील उसावर चालायचा. एक सूनीताचा व दुसरा बेवड्या शिरपाचा..

एके दिवशी सूनिताच्या शेजारची मालाक्का निष्णपला निघाली होती. ती सुनीताला म्हणाली, “सूने येतीस काय निष्णपला माझ्या माहेरची देवी लई जागृत हाय बघ. तिथून पुढे वाडीत माझ्या ओळखीचा एक देवऋशी हाय बघ. तेला विचारुया तुझ्या नवऱ्याबद्दल, त्याच्या मागं काय कटकट लागलीय.”

सुनीताला पण वाटल. व तिन सासुबाईला सांगून मालुबाई बरोबर ती निष्णपच्या वाटेला लागली. सुनिताच्या डोक्यात चालता चालता विचार येत होते. की तो देवऋषी काय सांगेल.

ती गुमान मालुच्या मागणं निघाली. नदीच्या काठान रस्त्याने चालत त्या वाडीवर आल्या. तिथं आल्यावर त्या निष्णपच्या चढणीच्या वाटेला लागल्या. वाटेला देवीला जाणाऱ्या येणाऱ्या लोकांची रेलचेल दिसत होती.

मालू सुनीताला म्हणाली, “ हे बघ सुने आमची देवी अख्ख्या पंचक्रोशीत प्रसिद्ध हाय. नुसती हाक मारली की माग उभी राहती बघ. तिच्याकडून काय मागनं असेल तर मागून घे. नंतर आपण वाडीवल्या देवऋष्याकडं जाऊ.”

तेव्हा सुनिता म्हणाली, “ नवरा चांगला झाला म्हणजे झालं. बाकी काय नको मला.”

बघता बघता देऊळ आल्ं. मंदिरा बाहेर अनेक माणसांची गर्दी होती. काहीजण गाड्या करून आली होती. मालू व सुनिता देवळात गेल्या. देवीला त्यांनी नमस्कार केला. देवदर्शन घेऊन मालूनं चौकावर पूजेचं साहित्य ठेवलं. तांदूळ साखर,कापूराच्या पुड्या सोडून ठेवल्या. गुरवान ते घेऊन आंगारा लावला. तशा त्या गुरवाच्या पाया पडल्या. व बाजूला एका कोपऱ्यात जाऊन बसल्या.

बसल्या जागेवरून सुनिता देवीला हात जोडून म्हणाली, “ आई लक्ष्मी आमच्यावर कृपा असु देत.”

ती देवळाच्या बाहेर पडलीत. व वाडीच्या दिशेला लागलीत. वाडीत भरवस्तीत त्या देवऋषाचे घर होत. त्या तिथं गेल्या. तिथं आतील बाजूस मोठा देवारा सजवलेला होता. तिथे अनेक देवांचे टाक पुजले होते. त्या तिथे गेल्या. गर्दी होती. थोड्यावेळाने त्यांचा नंबर आला. त्या दोघींनी देवऋष्याच्या पायावर लोटांगण घातले. व त्या त्याच्या शेजारी बसल्या.

 बघताच देवऋषी म्हणाला, “ ये मालुबाई आजकाल दिसत नाहीस कुठं.”

तेंव्हा मालू म्हणाली, “ काय सांगू देवा माझ्यामागं एक वनवास हाय होय. अगदी सीतवाणी हाय बघ, आदी लहान असताना आई मेली. नंतर सावत्र आईचा झिंज्या उपटून मार खात मोठी झाले. मागं अठरा विश्व दारिद्र्य म्हणून मला त्या बेवड्याच्या गळ्यात बांधली. तर तो नवरा बर खर सासू नको अशी गत झाली. सासून तर माझा दांडगा छळ केला. शेवटी त्या छळाला कंटाळून मग वेगळा प्रपंच मांडला. आता कुठं सुखान चार घास खाते. दोन पोर हाईत पोटाला चांगल चाललय बघ. पण….”

“पण काय आणखीन.” देव ऋषी म्हणाला. तेव्हा मालू म्हणाली, “ नवऱ्यानं तेवढी दारू सोडाया पाहिजे.”

तेव्हा तो हसला व म्हणाला, “ ते काय माझं काम हाय का जा की डॉक्टरकडं.” तेव्हा ती म्हणाली, “ माझा नाही विश्वास डाक्टर वर.”

देवऋषी बोलला, “ असं कसं म्हणून चालेल, डॉकटर म्हणजे वैद्य माणूस. त्याला नाव ठेवू नयेत. आपली जुनी औषध फक्त नवीन बाटलीत भरून देतात.”

“ते काही बी मला माहित नाही. तुम्हीच करा उपाय.”

तेव्हा त्या देवऋषाने विचार केला. व म्हणाला, “ हे बघ तुझ्या गावाला जाताना वाडी लागलं. तिथं एक वैदू राहतो. दिसायला जक्कड म्हातारा. त्याच्या घरात पूर्वीपासून वैद्यकी चालते. तिथं जाऊन गाठ घे. त्याकडून जे औषध मिळेल ते घेऊन जा, चांगला गुण आहे म्हणत्यात तेच्या हाताला. तिथं माझं नाव सांग. पण जाताना एखादा नारळ व पंचवीस रुपये दक्षिणा घेऊन जा म्हणजे झालं. आग नवीन डॉकटर सुध्दा माहिती घेऊन जातात त्यांच्याकडून.”

“बर माझं आणखीन एक काम आहे. ही आमच्या गावची सुनिता हीचा मागं ऊस पेटला. व नवरा तवाठावणं खुळ्यागत करायला लागला. तवा त्यावर उपाय सांगा.”

तेव्हा तो म्हणाला, “ बाळ सुनिता एखाद्या फुलाच नाव सांग.”

सुनिता म्हणाली, “ आ आ … तांबड फूल.”

देवऋशी म्हणाला, “ हे आणि कोणतं फूल म्हणायचं.”

सुनिता म्हणाली, “ ते हो गणोबाला घालतात ते.”

“ जास्वंदीची म्हण की.” देवऋषी उत्तरला. त्यानं सूनिताच्य पुढ्यात एक पाट मांडला. व म्हणाला, “ शेजारी ठेवलेल्या ताटातील चार तांदळाचे दाणे घे. व इथं ठेव.”

सुनिता ने ते ठेवले. तो जोड्या जुळवू लागला. व बडबडू लागला, “ जर घरच्या देवाच असेल. शेता भातातील असेल तर जुळू दे.”

दाणे जुळले नाहीत. मग त्यानं दुसरा कौल लावला. असे करत करत शेवटी माहेरच्या देवाचा नदीचा सात देवींचा राग निघाला.”

सुनिता म्हणाली, “ पण आमच्या गावात कुठलच सात देवीचं मंदिर नाही.”

तेव्हा देवऋषी म्हणाला, “ हे बघ तुला कधी स्वप्नात पाणी आलतं काय?”

सुनिता म्हणाली, “ परवाच आलत , आमच्या गावची सरल्याका व पोरी धूणं धुत्याल्या नदीवर दिसल्या.”

तेव्हा तो म्हणाला, “ मग तूझ्या अंगावर सात्या असरा आहेत बघ. त्याची सांगड द्यावी लागली बघ. आधी ती दे. मग माझ्याकडं ये.”

तेव्हा सुनिता म्हणाली, “ त्याला आणखी काय काय लागतं.”

तेव्हा मालू म्हणाली, “ हे बघ मला सगळं माहीत आहे. मी सांगते तुला.”

असे म्हणून ती उठली. व सुनिता व मालू देवऋष्याच्या पाया पडल्या. व पंधरा, पंधरा रुपये दक्षिणा ठेवून तिथून बाहेर पडल्या. व वाटेला लागल्या. आता दुपारचे चांगलंच दोन वाजले होते. उतरण उतरून त्या वाडीत आल्या. गावातील लोकांना विचारत विचारत त्या पुढे त्या वैदुच्या घरी गेल्या.तिथं जाण्याआधी त्यांनी किराणा दुकानातून एक नारळ घेतला. व त्या वैद्याच्या घरात गेल्या.

तिथं गेल्यावर मालू म्हणाली, “आम्हाला जोतबा देवऋष्यानं पाठीवले. तुमच्याकडून औषधं घ्यायला.”

तेव्हा तो म्हणाला, “ तुम्हाला कुठल औषधं पाहिजे हाय.”

तेव्हा मालू म्हणाली, “ माझा नवरा दारू लई पितो. तवा दारू सोडायचं औषध हवंय.”

तेव्हा वैद्याने त्यांना जोत्यावर बसायला सांगून तो आत मध्ये गेला व एक पुडी घेऊन आला. व मालुला म्हणाला, “ हे बघ नवऱ्याला न कळता त्याच्या जेवणातून वा पाण्यातून दे. थोडा त्रास होईल. पण आपण औषध द्यायचं थांबवायचं नाही. सोडल दारू. संपल की ये पुन्हा एक दोन पुडीत काम होईल.” मालून ते औषध कंबरेवरच्या कडोसरीत लपवले. व ती सुनीताला म्हणाली, “हे बघ सुने ही गोष्ट तुझ्यात व माझ्यातच. ह्या कानाचे त्या कानाला कळता कामा नये.”

असे म्हणून मालूने त्या वैद्यापुढे पंचवीस रुपये ठेवले. व एक श्रीफळ ठेवून ती त्यांच्या पाया पडली व म्हणाली, “ वैद्यबुवा तुमच्या बोलण्याला यश येऊ देत.” व त्या दोघी गावच्या वाटेला लागल्या. गावात यायला चांगलीच संध्याकाळ झाली. गावात आल्यावर मालू ही आपल्या घरला निघून गेली. व सुनिता आपल्या घरला आली. घरात आल्यावर सुनिता न्हाणीघरात गेली. व चुलिवरल्या डेरक्यातील पाणी घेऊन. तिन हात पाय खळखळ धुतल. व घर लोटायला घेतलं. बघता बघता तीन घर स्वच्छ करून जनावरांचे शेण काढले. चूल शिलगावली. तेवढ्यात शेताला गेलेली तिची सासू व जाऊ आली. सुनिताने चहा केला व त्यांना दिला.

चहा घेत सासुन विचारलं, “ काय म्हंटला ग देवऋषी.”

“ काय नाय माहेरच्या देवाचा राग हाय म्हण.”

“ कोणत्या देवाचा राग गं.”

“ साती असरांचा हाय म्हण. जत्रा करा म्हणतोय.”

तेव्हा सासू म्हणाली, “ म्हणजे हाय सात आठशेला भुर्दंड.”

“ मग कराया नको.”

“ करा की म्या काय नको म्हणतोय पण..”

“ पण काय.”

“ आम्ही पण त्याच नदीच्या काठाला राहता व माझा माहेरपण त्याच व्हळीला हाय. आमची काळ्याची पांढरी झाली पण नाही आम्हाला कवा राग निघाला.”

तेव्हा सुनिता म्हणाली, “सगळ्यांचं काय सारखच असतय व्हय.”

असे म्हणून सुनिता स्वयंपाकाला लागली.

थोड्या वेळानं मालू सूनीताच्या घरला आली. थोडा वेळ गप्प झाली. नदीची जत्रा करायच ठरलं. मालूनं कोण कोणते साहित्य लागणार याची माहिती सांगितली. त्याच टिपण केलं गेलं.

घरला जाताना मालू म्हणाली, “ हे बघ सुने उद्या कडगावचा बाजार हाय. तवा मी सांगितलेलं साहित्य घेऊन ये. मग मी काय करायचं ते सांगते.” असे बोलून मालू घरला निघून गेली.

दुसरा दिवस उजाडला. सुनिता उठून कामाला लागली. संपूर्ण घरकाम करून ती व तिची जाऊ जेवणासाठी बसली. इतक्यात बाहेर मुले घेऊन गेलेली तिची सासू आली. व तिला म्हणाली, “ हे बघ सुने दूधाच आलेलं बील मी कपाटात ठेवलंय. तवा त्यातील पैसे घे. व कडगावच्या बाजारातून तुला सांगितलेलं साहित्य व बाजार करून ये. व जाताना धृपदेला पण घेऊन जा. म्हणजे एकीला दोघी असलेल्या बऱ्या.” असे म्हणून ती कडेवरील बाळाला खेळवाय लागली.

थोड्या वेळानं धुणं भांडी आटोपून सुनिता व तिची जाऊ धृपदा नवी साडी नेसून त्या कडगावच्या बाजाराला निघाल्या. कडगाव जवळ असलेने चालत चालत कुठेतरी झाडाखाली थांबत कशाबशा त्या दोघी कडगावच्या पेठत आल्या. संपूर्ण बाजार फिरून झाल्यावर त्यांनी थोड माळवं विकत घेतलं. व त्या पुढे सरकल्या. बाजारात एके ठिकाणी झाडाखाली बसलेल्या बुरडाजवळ आल्या. सुनिताने बुरडाला उतार्याच्या शिबड्याचा भाव विचारला.तर तो म्हणाला, “ पंचवीस रुपये.”

तशी धृपदा म्हणाली, “ काय मामा तुला काय आणि पोरी वाटलाव तवा असा कसा भाव सांगालाईस ऐकू येतय नव्ह. आम्ही शिबड्याचा भाव विचारतोय दुर्डीचा नाही.”

तेव्हा तो म्हणाला, “ मी पण शिबडयाचाच भाव सांगतोय.”

तवा सुनिता बोलली, “ शिबड्याला पंचवीस, त्याच्यासंग तुझा पण भाव सांगतोस काय.”

तेव्हा तो बुरुड म्हणाला, “ मला म्हाताऱ्याला कोण विकत घेतय. परवडत असल तर घे नाहीतर हो पुढे.”

शेवटी सूनितान भाव वरखाली करून शेवटी त्याला म्हणाली, “ दहा रुपड्यांला देते बघ.”

तवा तो म्हातारा म्हणाला, “ दहा रुपयाला गुढीची काठी पण येत नाही. व शिबड कस देऊ. मुलुख महाग काठी नानिवळ्याच्या व्हळीसन आणली. आणि मला काय बाई विसाच्या खाली द्यायला परवडत नाही.”

तेव्हा द्रुपदा म्हणाली, “ नानिवळ्यासन काठी आणायला वेदगंगेच्या शिवारात काय दुष्काळ पडलाय काय.”

तरी देखील म्हाताऱ्या एक रुपया कमी केला नाही. तेव्हा सुनिता म्हणाली, “ राहु देत चलं धुरपा आपल्या शेजारच्या रामू आजाकडून घेऊया वळून.” असे म्हणून त्या पुढे निघाल्या. त्यांना जाताना पाहून म्हातारा ओरडुन म्हणाला, “ ये बाई घे.” अस म्हणून त्यानं ते शीबड दहा रुपयाला विकलं. तशी धुरपा म्हणाली, “ मगाशी कशाला आडवेडं घेत होतास, तुझा काय म्होतुर होता काय, म्हणत्यात ना नाक दाबल्या शिवाय तोंड उघडत नाही.”

तेव्हा तो म्हातारा म्हणाला, “ धंदा करायचा म्हणजे असं वागावच लागत. मी जर मगाशी दहा रुपये म्हणलो असतो तर तू पाच रुपयाला मागितलं असतस.म्हणून लेकी वीस रुपये म्हणालो.”

शेवटी शिबड घेऊन त्या पुढे कोंबडी बाजारात आल्या. एका बाजूनं भाव विचारत त्या निघाल्या. कुठे शंभर तर कुठे एकशे वीस असा दर छोट्या पिलांचा ऐकूण त्या थक्क झाल्या. शेवटी त्या दोघी एका घेवारनीजवळ आल्या. तिच्या जवळील पिले जरा मोठी वाटली तवा सूनिताने भाव विचारला. तर ती बाई म्हणाली,” दीडशे रुपये जोडी.” तेव्हा सुनिता म्हणाली, “ काय किलोभर तरी मटण पडल काय तेच.”

तेव्हा ती म्हणाली, “ किलोभर मटणासाठी घ्यायच नसत देवकाची किंमत लावायची नसतीया.” तेव्हा धृपदा म्हणाली, “ व्हय देवकाची किंमत लावायची नसतीया पण तू आता कोंबडीच्या बारक्या पिल्लांना पण जर बकऱ्याची किंमत लावालियास तर कस होईल. सोन्याचा मुलामा लावलीस काय त्या पिल्लांना.”



शेवटी सूनिताने घासाघीस करून एकशे एक रुपयाला ती दोन कोमडा व कोमडीची पिल्ली (सांगड) घेतली. अशा तर्हेने त्या बाजार करून घरच्या वाटला लागल्या.

घरात आल्यावर त्याने सगळा बाजार व्यवस्थित लावला. व जत्रेला आणलेली सांगड कोंबडीची पिली त्यांनी डालग्याखाली झाकली. दुसऱ्या दिवशी सूनितेनं आपल्या माहेरी निरोप धाडला की ती मंगळवारी नदीची जत्रा करायला येणार आहे म्हणून.तेव्हा सगळी व्यवस्था लावायला सांगितलं. मंगळवारचा दिवस उजाडला. सूनितानं आपल्या घरातील सर्व कामे आटोपली व तिने आपल्या मुलांना बोलवले. व आपण मामाच्या गावाला जायचं आहे. जत्रा करायची आहे. तेव्हा आज शाळेला जाऊ नका. मी गुरुजींची परवानगी घेतली आहे. तवा ती मुले खुश झाली. व सारे काही आटोपून तिने आपल्या मुलांना व आपल्या जावेच्या मुलांना घेऊन सासऱ्याला घेऊन ती माहेरच्या वाटेला लागलीत जाताना तिने प्रत्येकाच्या हातात काहीना काही वस्तू दिल्या.तिचा नवरा नंतर येणार होता. थोडं साहित्य दुर्डीत बांधल. ती आपल्या डोक्यावर घेऊन ती सर्व लटांबर घेऊन निघाली. तिचं गाव थोड्याच अंतरावर होतं. गावाला जाणारी वाट शेतातून जात होती. शेतातून जरा चालत उठत बसत ती सर्व झाडाखाली विसावा घेत. माहेराला आली. पोचल्यावर वेशितंच तिला पारू जाधवीन शेताला राकुंडा टाकायला निघालेली भेटली. सुनीताला बघून म्हणाली, “ सुने आज अचानक कशी काय उगवलीस .”

तेव्हा सुनिता म्हणाली, “ त्या लाईटीच मड बसवलं. तारांच्या स्पार्कींगन ठिणग्या पडून आखंड फड जळला. नव्हरा खुळ्यागत करायला लागला. तवा देवऋष्याला विचारलं, तवा नदीचा राग निघाला. म्हणून जत्रा करायला आलो. बघ.”

तेव्हा पार्वती म्हणाली, “ लई वाईट झाल बघ. तुझा फड पेटला खरं. जनीला माहीत असून एक शबुद बोलली नाही बघ म्हातारी. आता तू म्हंटल्यावर आम्हाला ठाव.”

“ पण तुला सांगते तुला जत्रा भराय यायची नाही. तवा तू संध्याकाळी आंबककाला बोलावं. ती तुला सांगेल काय करायचं ते. मी जाते शेताला.” ती आपल्या वाटेला लागली. सुनिता गावात आली. वाटेत दिसणाऱ्या प्रत्येकाशी बोलत चालत शेवटी ती आपल्या माहेरच्या घरात आली. तिन आल्यावर आपल्या भावजयीला डोक्यावरील बुट्टी उतरायला सांगितली. बुट्टी उतरल्यावर भावजयीन पाणी दिलं. मुले हात पाय धुवायला न्हाणीघरात गेली. हातपाय धुतल्यावर सर्वांनी चहा घेतला. मुले परस दाराला खेळायला गेली.

 थोड्या वेळाने सूनिताची आई जी दुकानाला गेली होती.ती परत आली. तिन सुनीताला पाहिलं. व म्हणाली, “आलीस व्हय लई बर झालं. मी अंबककाला बोलले संध्याकाळी येईल ती, सगळं ठीक हाय नव्हं, पोर कुठं हाईत.”

तवा सुनिता म्हणाली , “ पोर होय, हाईत परडला खेळत्यात. व तू कशी हाईस. आबा कुठं दिसत नाहीत मी सांगावा पाठवलाय नव्हं.”

तेव्हा जना म्हणाली, “ तुझ्या बाला काय एकच काम हाय का सगळा व्याप, ऐतीलच थोड्या वेळात. जावईबापू कुठं हाईत. मामंजीला पाणी दे म्हणावं. व चहा टाक.”

“ते झाली आमचं बहिणीनं केव्हाच चहा दिलाय.” सुनिता म्हणाली.

तशी ती न बसता तीनं पिशवीतील सांगड बुट्टीखाली झाकली. व वहिणीकडून पोतिरा घेऊन चुलीला मारू लागली.तेव्हा वहिनी म्हणाली, “ वनसं मी मारते की.”

तस ती म्हणाली, “ हे बघ सांजपतूर काम व्हाय पाहिजे. मी करते तू कर दुसर काम. तसा तिनं पोतिरा देऊन चुलीला हळद कुंकू लावलं. व चुलीत विस्तू पेटवला. व आपल्या मुलग्याला संजाला हाक मारली. व अंबककाला बोलवण पाटीवल. पोरग गाडी कशी चालवतात तस ब्रुम ब्रुम् करत पळाल. तो पर्यंत तिचा नव्हरा पण पोचला होता. त्याला चहा पाणी भावजयीन दिलं.

इतक्यात अंबकका घरामधे आली. हिरवगार लुगडं व कपाळाला लालभडक पंढरपुरासन आणलेलं कुंकू, गळ्यात चीत्ताक व घनसर मंगळसूत्र असणारी ही आंबक्का चालायला लागली की मासोळ्या छमछम वाजायच्या. अंबिका मुरका मारतच आत आली. तिला बघून सुनिता व तिचा नव्हरा दोघे पाया पडलीत.

आंबक्का सुनिताच्या नव्हऱ्याला म्हणाली, “ हे बघा जावईबापू हात फिर तिथे लक्ष्मी वस म्हणत्यात. फड पेटला नव्ह पेटूदेत. अशी डोचक्यात राख घालून चालत नाही संसार म्हंटला की चढण बुडण आलच. तवा मागलं सगळ विसरायचं व पुढली वाट धरायची. एका वर्षी बुडल म्हणायचं. पुढं तरी तारल नव्हं. ज्यान जन्माला घातलं. तेला काळजी नाही का? तो ज्याचा त्याचा शेर घालूनच पाठवतो झालं गेलं गंगेला मिळालं अस म्हणायचं व पुढली वाट चालायची.”

सुनिताचा नव्हरा गप पाटावर बसून ऐकत होता.

सुनिता म्हणाली, “ आता तूच सांग चांगल्या शहाणपणाच्या गोष्टी, आमचं ऐकतय कोण.”

अंबिका म्हणाली, “ सुने चल बघता बघता सांज होईल.” असे बोलून त्या जत्रेच्या तयारीला लागल्या. सुनिता आंबकका व सूनिताची भावजय यांनी सर्व जेवण केलं. व एका हऱ्यात भरलं. मुंज्याचा निवद, उतराच शिबडं देखील तयार केलं. तोपर्यंत चांगलच सांजेच सहा वाजले होते. म्हातारीनं शेजारच्या मालुबाईच्यातील बत्ती पण आणली होती. तेवढ्यात म्हातारा घरात आला होता. शेतातून आल्याने त्याच आंग घामानं चांगलच थबकत होत. न्हाणीघरात जाऊन त्याने सगळं आंग धुवून घेतल. अंगातील मळकी कापड काढून टाकली. व दुसरी चढवली. व तो जावयाजवळ जाऊन बसला. इकडल्या तिकडल्या गप्पा झाल्या. म्हातारीनं भावकीतल्या बायाना व शेजारच्या बायांना हळदीकुंकू लावायला बोलवले. अंबककाने सर्व मांडणी केली होती. थोड्या वेळाने सर्व बायकांनी हळदी कुंकू लावले. व बाया एकमेकींना लावू लागल्या. इकडे अंबक्का घुमायला लागली. तशी मालू म्हणाली. “ अंगात आलं वाटतं.”



आंबक्का आंगात काढून बडबडू लागली. तिचे ते डोलने पाहून सूनीताची पोरं कावरी बावरी होऊन बघत व बाहेर जाऊन हसत. थोड्या वेळाने सर्व तयारी झाली. सुनिताच्या नवऱ्यानं तिच्या अंगावरुन उताराच शिबड उतरून तो वाटेला लागला. पाठोपाठ इतर जणांनी पण बाकीचं सामान उतरून घेतला. व नदीच्या वाटेला लागलीत. सुनिताची व तिच्या दिराची पोर पण माग लागली होती. चांगलाच अंधार पडला होता. सूनिताच्या बापानं बत्ती पेटवली. तशी बत्तीच्या उजेडात सगळी चालायला लागलीत. अंधार पडल्यामुळे दिवसांची हिरवीगार दिसणारी झाड रात्री काळी दिसत होती. आधुनमधून काजवे चमकत होते. रातकिडे किरकिरत होते.अंधारातून पायाकडे बघत मुलांना घेऊन नदीवर आलीत.सर साहित्य ठेवून दोघांनी चूल मांडली. सूनिताच्या नव्हऱ्यान आपल्या हातातील शीबडं नदीच्या वाहत्या पाण्यात सोडलं. ते हळूहळू पुढे पुढे जाऊ लागल. सूनिताच्या नव्हऱ्यान चुळ भरली. व तो नदीच्या काठावर आला. सूनीताच्या बापानं सात खडं पुजलं. व श्रीपती व गण्याला मुंजाचा नीवद उंबरणीखाली ठेवायला सांगतलं. ते तिकडे जाऊन ठेऊन आले.



 सूनितेच्या आबान पोरांना कोंबड्यांची सांगड आणायला सांगितली. तसं सुनीताच्या पोरान सांगड आणून दिली. सांगडीतल्या पिल्लानी चावचाव करायला सुरुवात केली. व फडफड चालवली. त्यांचं पाय सोडलं. पिलांना पायाखाली धरलं. व हणमाला खुरपे द्यायला सांगितलं. तस हाणमा खुरपे घेऊन आला. खुरपे घेऊन म्हातार्यांन त्या तलंगेच व कोमड्याच काम तमाम केलं. व त्यान नदीकडं पुढा करून म्हणाला, “ वाकडं तिकडं देवा तुला साकड. कसपण घे, गोड मानून घे. व माझ्या लेकीला सुखी ठेव.” व तो म्हातारा नदीच्या पाया पडला. सगळी मंडळी जेवणाच्या तयारीला लागली. सूनितेची मूल लहान असल्याने बाजूला बसून सगळ्यांची गंमत पाहत होती.

सुनिताच पोरग संज्या सुशाला म्हणाला, “ आर, हे सगळ देवाक माणसांनी केलं. त्यांच्या चैनीखातर.”

शेजारी बसलेला सुशा म्हणाला, “नाहीतर काय त्या कोंबडीच्या पिलांचा जीव जाणार. व यांना म्हणे सुख मिळणार. “

इतक्यात शेजारी बसलेला धृपदेचा बाजा म्हणाला, “ तुम्ही कशाला बडबडता आपल्याला खायला मिळतंय नव्ह. गप्प बसा अशा गप्पात मुले रंगून गेली. इतक्यात बाजाच लक्ष हाणमादाकड गेलं. तो शेजारच्या सुशाला म्हणाला, “ ते बघ तो हणमादा रडतोय.”

तेव्हा सुशा म्हणाला, “ काय काका पेंडीच वज्ज पटापट कापत्यासा व आता साधा कांदा कापताना रडतासा.”

तेव्हा हणमादा म्हणाला “ लेका ये इथं कांदा कापायला म्हणजे कळल तुला, बायकांची काम बायकांनी करावीत. तिथं पेंडी कापणारा गडीसुधा चालत नाही. गप बसतोस काय तिथं .”

तसा सूशा गप्प बसला.

थोड्या वेळात कोणतरी बॅटरीचा उजेड पाडत येताना दिसले. थोड जवळ आल्यावर पोरासनी दिसलं, शिंद्यांचा नागुअण्ण व संजाचा काका म्हणजे सुनीताचा दीर येताना दिसली. संजाच्या काकानं जरा चांगलीच घेतली होती. तो धडपडत कसा बसा त्यांच्याजवळ आला. नागू अण्णा कडे बघत सुनीताचा बाबा म्हणाला, “ काय नागूआण्णा उशीर केलास.”

तवा नागुआण्णा म्हणाला, “ काय करू मामा माझ्या माग काय एक कटकट हाय. एकातन बाहेर पडावं तर दुसर दत्त म्हणून उभा. शेतातून येऊन बघतोय तर पोरग्यान म्हस सोडली नदीच्या पल्याड गेलती. तिला घरात आणून बांधतो. तवर शेजारी पुष्प्यान बायकोला चेचली. त्यांची भांडण सोडवून रिकामा झालो. तोवर म्हातारी कट्टीवरन घसरली. तिला दवाखान्यातन आणली. आन इकडं आलो बघ.”

इतक्यात संजाचा काका म्हणाला, “झाल काय नाही जेवण.”

तेव्हा नागूआण्णा म्हणाला, “ पावनं झेपत नाही तर घेता कशाला. मगाठावण त्या म्हशीनं दंबवल. व येताना या बाबांन मी होतो म्हणून बर. नाहीतर कुठतरी पडल असत वाट कडला. रस्त्यानं कुठं धड चालतंय व्हय याला काकतच घ्यायचं राहीलतं बघ. कसा बसा आणलाय हेला.” तेव्हा एकच हशा पिकला. थोड्या वेळानं जेवण तयार झालं. निवद दाखवला. व सर्वजण जेवायला बसलीत. कवळ्या कोंबड्याचा व तलंगेच्या रश्यावर सर्वांनी ताव मारला.जेवताना मुलांचं लक्ष मात्र समोर बसलेल्या बेवड्या काकाकडं लक्ष होत. तो चांगलाच फतकल मांडून बसला होता. त्याचा हात कधी जेवत्याल्या पत्रावळीत तर कधी बाजूच्या मातीत जात होता. तो तसाच घास ढकलत होता.

तेची तऱ्हा बघून नागूआण्णा म्हणाला, “ जेव की नीट, काय माती खातोस कशाला आलया जन्माला देवाला ठावं.”

त्याची ही तऱ्हा पाहून सूनीताच्या नव्हऱ्याच्या डोळ्यात पाणी आलं. व तो म्हणाला, “ काय सांगू नागू अण्णा याच्या दारुमुळं सगळ्या संसाराची माती व्हायला आलीय. नाहीतर यांच्यासारखा माणूस नाही.” अस म्हणत त्याने आपल्या बेवड्या भावाला घास भरवायला सुरुवात केली.”

ते बघून नागू अण्णा म्हणाला, “ इथच चुकतंय बघा तुमचं, चांगल मुंगणीच्या शिवारातल्या झाडाला बांधाय पाहिजे, रातसारी डोंगळ्यानी खाल्ल म्हणजे समजल.”

असे बोलत चालत त्यांनी जेवणावर ताव मारला. व शेवटी ती सर्वजण आटोपून शिजवलेली भांडी रीती करून व साहित्य घेऊन घरच्या वाटेला लागलीत. इकडल्या तिकडल्या गप्पा मारत ती सर्व जण घराकडे निघाली. पोचल्यावर त्यानी घरात जाण्यापूर्वी दारात सगळ्यांनी आपापल्या हातपाय धुतले. व घरात गेलीत.

दुसऱ्या दिवशी सुनिता सर्व आटोपून सासरी जायला निघाली. सर्व मोठ्या लोकांना नमस्कार केला. आईला कडकडून भेटली. व पुन्हा दुर्डी आपल्या डोक्यावर घेतली. दूर्डी घेताना जड लागली. तेव्हा ती म्हणाली, “ आई दुर्डित काय ग.”

तर जना म्हणाली, “ जरास तांदूळ बांधल्यात हावळं, पोरसणी चार आंबोळ्या करून घाल.”

तेव्हा सुनिता म्हणाली, “ कशाला उगाच बांधलस तिकड काय मिळतं नाहीत व्हय.”

तेव्हा म्हातारी म्हणाली, “ तसं नाही लेकी माहेरच्या दाण्याला प्रेमाचा गोडवा असतोया. दिवून च्या दिवून तुला एका शेतकऱ्याच्या गळ्यात बांधली. आम्हावाणी तुझं पण हाड या वेदगंगे काठच्या तांबड्या मातीसंग झुजतच जायचं. तवा आईच्या मायेनं दिल्यात ते घेऊन जा.”

 असं म्हंटल्यावर सूनिताचं डोळ पाणावल. ती म्हणाली, “ शेतकरी नव्हता जरी असला तरी सुपारीच सुदिक व्यसन नाही बघ. मी सुखात हाय बघ.” अस म्हणत तीन दुर्डी डोक्यावर घेतली. भावजयीन जाताना हळदीकुंकू तिच्या हातावर दही साखरेची चिमट ठेवली. ती घेत सुनिता व तिचा नवरा मुलांबरोबर चालती झाली.

वाटेत त्यांच्या गप्पा रंगल्या होत्या. बेवडया भावान घातलेला गोंधळ त्यामुळे त्याला गावी रात्रीचं पाठवलं होतं. आपल्या दिराच्या पोरांकडे बघत सुनितानं मनात ठरवल. मालूच्या नव्हऱ्यासारखं धृपदेच्या नव्हर्याची पण दारू सोडवायची.असा निश्चय करून ती गावच्या वाटेला लागलीत.

लेखक : निशिकांत हारुगले.

शनिवार, २३ एप्रिल, २०२२

सोसायटीचे राजकारण

 कथा क्र. ३ सोसायटीचे राजकारण

लेखक : निशिकांत हारुगले

एम. ए. बी.एड.




राजकारण व ग्रामीण भाग यांचं नात एकमेकांशी जुळलेले आहे. त्यात ग्रामपंचायतीच किंवा सोसायटीचे राजकारण ते काही वेगळेच असते. रोज एकमेकांबरोबर जेवण वाटून खाणारे लोक देखील टोणके घेऊन भांडताना दिसतात.

वेदगंगेच्या खोऱ्यात पेठेच्या हद्दीत अनेक वाड्या वस्त्या पाहायला मिळतात. हिरव्या गर्द झाडीत वसलेल्या या घरांचे रुप जरी कौलारू आसले तरी खाऊन पिऊन हे लोक सुखी असणारे पहावयास मिळतात.

एकमेकाला मदत करीत असताना एकमेकांवर कुरघोडी करण्यास देखील हे लोक पटाईत असतात. अशाच एका गावात घडलेली एक कथा आहे. पेठच्या हद्दीत वाडीची अनेक गावे होती. असेच एक वाडीच गाव उंच डोंगरमाथ्यावर वसलेलं नदीचं पाणी काही यांच्या भाग्यात नाही. अशा या गावात एक सोसायटी होती.त्या सोसायटीचे नाव होते लिंगराज सोसायटी होते.

सोसायटीतून वाडीतील लोकांना खते व बियाणे, कर्जे मिळत असत. त्यामुळे अनेक लोकांना सोसायटी म्हणजे गरजा भागवणार साधनच होत.

अशी ही सोसायटी शेतकऱ्यांना कमी व्याज दराने कर्ज देत असे. पण मिटिंगला दोन गटात वाद विवाद होत, मात्र आतल्या आत मिटत असतं.

ग्रामपंचायतीचे इलेक्शन झालं. मतदान झाल्यापासून गावात चांगलीच दूफळी माजली होती.

धनाजी सलगर व आबाजी पाटील यांच्यात सोसायटीच्या बैठकीत जोरदार वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की धनाजीनं अबाजीच्या विरुद्ध शड्डू ठोकला. व म्हणाला, “ बघतोच तुला लई नाटक चाललेत डेव्हिडंटवर सुद्धा टपून बसलास व्हय रं बोक्या, गोरगरिबांचा श्राफ घेशील. म्हणे इमारत फंडासाठी कट केलाय. ही इमारत काय बाद हाय. चांगली शंभर वर्षे अजून टिकल. मला माहित आहे. तुझ्या पोराच्या लग्नाचा खर्च वसूल करतोस व्हय यातनं, लई जड जाईल तुला, जर खर्च वाचवायचा होता तर गडच्या देवापुढे लगीन लावायचा होतास. वरात काढून गावात टेंभा मिरवून दाखवतोस काय.”

असे म्हंटल्यावर आबाजी पाटील चिडला व म्हणाला, “माझ्या पोराचं लगीन झालेलं बघवत नाही तुला. नाहीतर वरातीच्या रात्री दार बंद करून बसला नसतास. व सोसायटीच्या पैशान लगीन करायला मी काय भिकारी नाय माझ्याच पैशावर लगीन केलय मी माझ्या पोराचं. जरा इमारत वाढवावी म्हणून डेव्हिडंट काय कापला. तर तुझ काय जळतंय टकुर. उगाच लागलय भांडायला.”

तेव्हा धना सलगर म्हणाला, “ पाटील तुमची पाटीलकी त्या आंगठे बहादुरांपुढे दाखवा. मला नको, ते काय माहित नाही, आम्हाला संचालक मंडळाचा निर्णय मान्य नाही. आता चार महिन्यानी संचालक मंडळाची मुदत संपतीया. तेव्हा नवीन मतदान घेऊन संचालक मंडळाची बॉडी निवडायची .” असं बोलून तो मिटिंगमधून बाहेर पडला.

बघता बघता सोसायटीच्या मिटिंगची बातमी संपूर्ण गावात पसरली. व गावातील वातावरण तापायला लागलं. जो तो उठला सुटला याच विषयावर चर्चा करू लागला.

गावातील पारापासून ते नाव्ह्याच्या दुकानापर्यंत सगळीकडे हीच चर्चा सुरू झाली. गावातील मध्यवस्तीत देवळाजवळ दामाजी नाव्ह्याचे दुकान होते. दामाजी व आबाजी बालपणापासूनचे मैत्रर होते. त्यामुळे दामाला कर्ज देण्यासाठी आबाजीने मदत केली होती. त्या कर्जाच्या जीवावर त्याने दोन म्हैशी विकत घेतल्या होत्या. त्यामुळं तो आबाजीची बाजू उचलण्यास तयार होता.

गावात ज्या सफाईदारपणे वस्तरा चालवत असे. त्याप्रमाणे त्याचे तोंड ही चालवत असे. अंगान धिप्पाड रंगानं सावळा असा झूपकेदार मिशांचा हा न्हावी, त्याच्या दुकानात नेहमी गर्दी असायची. त्यामुळे त्याला दिवसभरात मिळाली तर दुपारची उसंत नाहीतर नाही.

अशा या नाव्ह्याच्या दुकानात गर्दी जमली होती. दामाजी व त्याने ठेवलेला पोऱ्या गिऱ्हाईकाची हजामत करत होते. इतक्यात तिथं बाबू ढलप्याच पोर आलं. त्याला गावातील बातमीपत्र म्हणत.

ते म्हणाल, “ सोसायटीत भांडणं झाल्यात धनाजी सलगर व आबाजी पाटील यांच्यात बाचाबाची झाली. इलेक्शन लागणार हाय म्हणत्यात.”

हे ऐकताच दामाचा वस्तरा थांबला. व तो म्हणाला, “ या धन्याचा आधून मधून लई किडा उठतोया. का त्या आबाच्या पाठी लागलाय कुणास ठाऊक. मुंबईचा पैसा मिळवला आता देव खाऊ देईना वाटतं. म्हणून हे धंदे करतोय. जा म्हणावं, माझा वस्तरा घे, व गावच्या ओढ्यावर जाऊन काम धंदा नसलं तर गावच्या म्हशी भादर म्हणावं.”

पण दाढी करून घेणाऱ्या आशा ढेकळ्याच्या पोराला त्याच बोलण रूचल नाही. ते म्हणाल, “ तुझ्या का पोटात चावतया. त्या दोघांचा वाद तुझी तू भादर की लेका.”

 तेव्हा दामाजी म्हणाला, “ तुझ्या सारखा मी नाही गरज सरो आणि वैद्य मरो. गावात एक पाण्याचा ठीबुस नव्हता. तेव्हा आबा पाटलांनी डोंगरातून झिरपीच पाणी आणलं. तवा कुठे होता तुझा धना सलगर. उगाच तोंड वाजू नको माझं.”असे म्हणत त्याने हजमतीला सुरुवात केली. गावात चौका चौकात लोकांच्या गप्पा चालू झाल्या. चौकातील पारावर गावातील अनेक लोक बसायला येत.

 त्यांच्या इकडल्या तिकडल्या गप्पा चालत. त्यात तरणी व म्हातारी सरमिसळ असत.

तरण्या पोरांना धना सलगर आवडत असे. ती धनाजीच्या बाजूने बोलत असत. म्हातारी मात्र आबाजी पाटील चांगला म्हणू लागली. तिथं बसलेला गजाबाईचा म्हातारा चाचपडत बोलला, “अबा पाटलानं गावचा बराच विकास केला आहे. ह्यो धना काय कालपरवाच पोर ते, त्याच काय एकायच काल परवाच पोर ते,गावात गावदेवीच देऊळ आबानच बांधल नव्हं.”

इतक्यात ईराचा भालू म्हणाला, “ तर देऊळ बांधल, ठाव हाय आम्हाला, देवळाला देणगी गोळा करताना आमच्या तंगड्या तुटल्या, देऊळ बांधून उरलेल्या पैशातून यान ट्रॅक्टर घेतला.म्हणतात ना तळे राखी तो पाणी चाखी.”

इतक्यात तुकाराम भुईकर म्हणाला, “ त्याने देवळाच्या पैशाने ट्रॅक्टर घेतला म्हणतोस जसा काय तुझ्या पुढ्यात घेतल्यासारखे बोलतोस की. आ उगाच लागलाय त्याच्या नावानं खड फोडायला. जरी तेन ट्रॅक्टर घेतला तरी त्याने गावचा विकास केलाय. गावात रस्ता करताना त्याचा ट्रॅक्टर नुसता डिझेलवर वापरल्यासा मला काय माहीत नाही व्हय. तुम्ही आज कालची शिपूर्डी पोर, नाव ठेवत्यासा म्हणून आम्ही नाही सोडणार तेला.”

त्याच हे बोलण एकूण संजू मास्तर म्हणाला, “तर तुला काय वाटणी दिली वाटत तवा तेची बाजू घेऊन बोलतोस व्हय. ते काय नाही नविन पक्ष नवी शाई.”

मास्तरच बोलण तोडत तुकाराम भूईकर म्हणाला, “ हे बघा गुरुजी ती तुमची नवी शाई तुम्हालाच लखलाभ असुदेत. राजकारण म्हणजे अरळगुंडीच्या शाळेतील शेंबडी पोर शिकविण नव्ह, तुम्ही जावा शाळा शिकवा. बे एके बे व बांगडा भाजून दे.”

तुकारामच बोलण मास्तरला झोंबले तो म्हणाला, “ तुला तुझ एक घरातलं कारट सांभाळता येईना. व मला तू शिकवू नको शाळा सांभाळायला. मी मस्त घट्ट हाय शाळा सांभाळायला. तुमच्यात जर हिम्मत असेल तर या शाळेत शंभर तऱ्हेची शंभर पोर. सांभाळून दाखवा की मग बोला.पोर सांभाळन म्हणजे शेतात नांगर हाकन नव्हं.तुमच्यासारखी आम्ही कुतायची काम करत नाही.बुद्धीची करताव बुध्दीची.”

तवा तुकाराम चिडला व म्हणाला, “ शाळेतली पोरं राहुदेत आधी भांडून गेलेली बायको आण जा माहेरासन.” तेव्हा मास्तर चिडला व म्हणाला, “ तुक्या लई बोलतोस, जास्त बोलशील तर थोबाड फोडीन तुझं.”

यांचं बोलण पारावर बसलेला मारुती पाटील ऐकत होता. तो म्हणाला, “त्यांचं राजकारण आणि तुम्ही कशाला भांडता. सोडा तो विषय.”

तेव्हा ती दोघं शांत झाली.

सोसायटीचे राजकारण चांगलेच रंग दाखवायला लागले होते. याची व्याप्ती चौकापासून पाणवठ्यापर्यंत झाली नाहीतर नवल म्हणायचे. गावात आणलेलं डोंगरातील पाण्याची दोन ठिकाणी कनेक्शन दिली होती. एक ग्रामपंचायतीच्या दारात व दुसरे देवळाजवळ. देवळाच्या दारातील नळाला मोठे पाणी पडत असल्याने व ते ठिकाण भर वस्तीत असल्याने तिथे खूप गर्दी जमत असे.

उन्हाळ्याच्या दिवसात म्हातारीच्या वड्याचे पाणी आटल्याने . देवळाजवळ असलेल्या नळाला वाघझरीचं पाणी यायचं ते ही बारीक झिरपीच ते थोडे फार मिळत असे. अनेक बाया पाणी भरायला तिथे जमत असत. सुताराची सगुणा व माळ्याची कंबळी पाणी भरायला आली होती. सगुनाचे केस कायम विस्कटलेले असत. त्यामुळे गावातील बायका तिला सूताराची झिप्री म्हणून हाक मारत. सगुणा ही आबा पाटलाच्या गोटातील कारण आबाची बायको सरवड्याची होती. या दोघी एकाच गावच्या होत्या. तर माळ्याची सगुणा व धना सलगराची बायको जिगरी मैत्रिणी.

सगुणा कंबळीकड बघत म्हणाली, “ लई तोरा गाजवत्यात त्या धनां सलगराचा, आता जावा म्हणावं त्यासनी पाण्याला नदीला. कशाला इथे कलमडल्यात त्या आबा पाटलान पाणी आणल म्हणून पित्यासा. नाहीतर या गावात कुठं पाणी मिळालं असतं.”

सगुनेच बोलणं कंबळीला झोंबल होत. पण ती गप्प बसली. व आपली घागर पाणी भरायला तिने पुढे ढकलली.

तशी सगुणा म्हणाली, “ ये जरा थांब, एवढी कळशी घेतो आधी.”

कंबळी म्हणाली, “ माझी घागर आधी हाय मी पाणी आगोदर घेणार.”

तेव्हा सगुणा म्हणाली, “ लई पाणी पाणी करत्यासा, एवढी तहान लागली असल तर सांगा जावा त्या धना सलगराला गावात नवीन नळ बसव म्हणावं.”

तेव्हा कंबळी चिडली व म्हणाली, “ ए झिप्रे लई बोलतीस तुझे सगळे दात घशात घालून टाकीन बघ. मगाठावनं गुमान ऐकूण घेते म्हणून लईच बोलतीयास की, लई आबा पाटलाचं कौतिक सांगतीय. तो काय घर चालवतोय का तुझं. मघाठावन माझ्या नावानं खड फोडतीस व पाणी आबा पाटलांनी आणल म्हणायला गावातील बाकीची माणसं कुठं भाद्रायला गेलतीत का, उगाच तोंडाला तोंड देतिया नुसती. आमचा म्हातारा पण होता चर खोदायला. तुझ्या आबा पाटलान एकट्यानेच पाणी आणल्या सारखं बोलू नकोस. जा घरला खरकटी भांडी घास जा.” असे म्हंटल्यावर सुगंधीला राग आला. ती म्हणाली, “ तुझ्या जीवावर ठेवायला नाहीत मी भांडी, एकच कळशी घेतो म्हंटलं नव्हं, जरा मोठ बारक काही कळतं की नाही.”

तेव्हा कंबळा म्हणाली, “ म्हणूनच मगाठावनं गप्प होते. पण मोठ्या म्हशीनी पण आपली शिंगं लई दाखवू नये.” कंबळीच्या बोलण्याने सुगंधा चिडली. व कंबळीवर घागर घेऊन धावून मारायला आली. दोघींची भांडणे सोडवता सोडवता इतरांची दमछाक झाली. शेवटी इतर बायकांनी त्याना कसंबसं शांत केलं.

बघता बघता सोसायटीची इलेक्शन लागली. आबा पाटील व धना सलगर यांनी पण अर्ज दाखल केले. दोन पॅनेल मध्ये इलेक्शन होणार होती. गावात प्रचाराचा जोर चढला. आबा पाटलाच्या पॅनेलला पतंग तर धना सलगरला विमान असे चिन्ह देऊन इलेक्शन जाहीर झाली.

गावात प्रचार वाढला होता. जागोजागी पोस्टरं लावण्यात आली होती. निवडणूक लावलेल्यांच दिवाळ निघत होत. पण गावातील दारु पिणारी मात्र चैनीत होती. मांगाचा विलास हा गावातील अट्टल दारुडा होता. तो सकाळी एकाकडे तर संध्याकाळी दुसऱ्याकडे दारुसाठी नको ते धंदे करायला तयार होता. सोसायटीच्या इलेक्शनने त्याची तर चांदीच उसळली होती. फक्त नेत्यांच्या मागणं जयजयकार करत फिरायच होत. ते करत दारूच्या इतक्या बाटल्या घरात जमल्या की एखाद दारूचं दुकान निघालं असतं.

असा हा विलास धडपडत आबाजी पाटलाच्या प्रचारफेरीत दाखल झाला. व त्याने आबाजीच्या पोराकड दारूला पैसे मागितले. जवळच पवारांचा नंदन उभा होता. तो म्हणाला, “ विलासदा तुझ आपल बरं चाललय की सकाळी धनबाकड व रातीला आबाकड, दोन्ही बाजूंनी हलगी वाजवतोयस की.”

तेव्हा विलास म्हणाला, “ तू गप्प रे, जास्त बोलायचं काम नाही. मी आबांचा माणूस हाय धनबाकड जातोय म्हणजे फितुरांची माहिती काढायला.”

तेव्हा नंदू म्हणाला, “ हे बघ दारुसाठी तू शेण बी खाशील. मला तुझ्या नादाला लागायचं नाही.तुझी बायको चांगली म्हणून म्हणतोय. बिचारी खूप राबती, आणि ह्यो रेडा मुतू पिऊन धिंगाणा घालतोय.” असे बोलून नंदू तिथून निघून गेला. विलासने आबाच्या पोराकडून पैसे घेतले व तो दारुच्याअड्याच्या दिशेनं चालू लागला.

अशा या सोसायटीची इलेक्शन चांगली रंगात आली होती. घरोघरी कवा वटसावित्रीला हळदकुंकू न लावणाऱ्या बायका पण हळदीकुंकू कार्यक्रमाला हजर राहत होत्या. मटणाच्या पार्ट्या रंगात आल्या होत्या.

मतदानाचा दिवस उजाडला. मतदान सुरू झाले. 



पोलिस बंदोबस्तात मतदान पार पडले. त्याच दिवशी संध्याकाळी मतमोजणी होणार होती. दोन्ही बाजूचे दोन उमेदवार तिथे बसले होते. मोजणी सुरू झाली. निकाल लागलं तशी दोन्ही गोटात चळबळ सुरू झाली.

धना सलगर नवखा उमेदवार असल्याने त्याच्या बाजूने कमी मतदान पडते असं वाटल्यावर धनानं आपल्या गोटातील दोन पैलवानांना खालच्या कोटीतील मतपेट्या पळवण्यास सांगितल्या. तसे त्यांनी कोठीच्या मागच्या बाजूची खिडकी पेचून त्यातील एक पेटी पळवली. ती पळवून नेताना एका लहान मुलाने बघितली. ते पोरग सरळ दामा नाव्ह्याजवळ आलं. व म्हणाल, “ दामुअण्णा विरूद्ध पार्टीनं खालच्या कोटितल्या मतपेट्या पळवल्या.”

तसा दामूनं आपला टॉवेल खांद्यावर टाकला. व त्या पोरग्यास विचारले, “ कोणत्या दिशेला गेल्यात.”

तेव्हा वताडाच्या दिशेला बोट करत ते म्हणालं, “ त्या बाजूला गेल्यात.”

दामा त्या दिशेनं पळाला त्यानं पंधरा मिनिटात त्यांना गाठलं. व म्हणाला, “ कुठं पळत्यासा चोरांनो, तुमची आई बाळत झालीय काय ते भेट घेऊन निघाल्यासा. गाढवानो थांबा.”

तेंव्हा त्यातील गुंड्यान दामाला ढकलले व म्हणाला, “ ह्यो नाव्ही लई तोंड चालवतोय याला धरून बडवायचाच. असे म्हणून त्यांनी पेटी बाजूला ठेवून दामला धरला व बडवायला लागलीत. दामा कसा बसा त्यांच्या तावडीतून निसटला. व आपला रुमाल फिरवून गुंड्याला मारला. रुमालाचा एक जोराचा दणका बसला. तसा गुंड्या आई गो, मेलो मेलो, असं ओरडायला लागला. दरम्यान गुंड्या व दुसऱ्या मेंबरला टॉवेलान चांगलाच चेचला. तसं ती हाबकली व म्हणाली, की टॉवेल लागतोय काय बांधले त्यात या नाव्ह्यान देवास ठावं.

इतक्यात धना सलगरची आणखी पाच सहा मानसं आलीत. त्यानी दगड मारायला सुरुवात केली. तस दामान पण नेम धरुन दोघा तिघांची टकुरी फोडलीत. तसा एक जण काठी घेऊन धावून आला. तस दामाने वार चुकवला. व टॉवलाचा एक सोगा फिरवून मारला दणक्यात तो गडी गार झाला. व दाडवान धरून बसला.त्याला दिवसाच्या चांदण्या दिसायला लागल्या. येईल त्याला तो टॉवेलाने बडवत होता.

एकजण म्हणाला, “ आर यांच्याजवळ ना दगड ना काठी फक्त टॉवेल फिरवून यांन चेचल. अस काय हाय याच्या जवळ.”

पण इतका वेळ कुणाजवळ नव्हता. इतक्यात पोलिस आले. त्यानी पेट्या ताब्यात घेतल्या. पण कोणी पेट्या पळवल्या म्हंटल्यावर जो तो एकमेकाकडे बघू लागला. शेवटी सामोपचाराने मिटवायच ठरलं.

पेट्या पुन्हा गावात आणल्या. मोजणी पूर्ण झाली.पुन्हा आबाच पॅनल निवडून आले. तरी देखील धना सलगरच्या काही शिटा निवडून आल्या. त्यामूळे इथून पुढे प्रत्येक सभा सोसायटीची गाजणार हे सिद्ध झालं.

जखमी सर्वांना तालुक्याच्या हॉस्पिटलमध्ये गारगोटीला आणण्यात आलं. त्यांवर उपचार सुरू झाले. दामजीला पण चांगलच लागलं होत. त्याला देखील मलमपट्टी केली होती.

नर्सबाई मुद्दाम बेंजोईनचे औषधं टाकत होती. ताज्या जखमेवर बेंजोईन पडल्यावर जोरात कळ यायची. तेव्हा नर्स म्हणायची, “मारामारी करतांना लई गॉड वाटतं नव्ह. मग आता सहन करायचं. उगाच कालवा करायचा नाही. बाकीचे पेशंट डिस्टर्ब होता येत. उगाच पुंगी वाजवू नका तोंडाची. नाहीतर जखमा कात्रिन कुर्दरिन.”

मुकाट्यानं कळ सोसण्याशीवाय त्यांजवळ गत्यंतर नव्हते.

सोसायटीच्या राजकारणापेक्षा दामाच्या करामतीचीच जिकड तिकड चर्चा ऐकायला मिळत होत्या. गारगोटीचे सरकारी दवाखान्यातून दामाजीला आबाजी मलमपट्टी करून घेऊन आला होता. दवाखान्यातून बाहेर पडताना धना सलगर गुंड्याला घेऊन आत चालला होता. गुंड्या दामाजीला बघताच म्हणाला, “ तुला दावतोच.”

तेव्हा दामा म्हणाला, “ ये दाखवायचं ते इथच दाव, अजून मस्ती गेली नाही वाटत. मार विसरलास काय. जा आत तुझी आई बसलीय औषध लावायला. दोन थेंब पडल बेंजॉइंच की गारगार वाटतंय जा तोंड घेऊन. ”

असं म्हणून ती दोघं घराकड चालली. व गुंड्याला धना दवाखान्यात घेऊन गेला. गावात जिकडे तिकडे दामाचीच चर्चा सुरू होती. की दामानं पराक्रम केला.

आबा पाटलाने दामाचा सत्कार केला. सत्कारात दामाचे कौतुक करताना पाटील म्हणाले, “ शिवाजी महाराजांच्या काळात जशी घोडखिंड बाजीप्रभुनी लढवली. तशी आपल्या दामान वताडाची खिंड लढवून धनाजी सारख्या मातबबर शत्रूला खडे चारले. दामाजिने केलेलं हे कार्य अतुलनीय आहे.”

सत्कार झाल्यावर दामा घरी आला. दामाच्या बायकोन दामा घरी आल्यावर दामाला ओवाळले व घरात घेतले. व त्याला गोडधोड जेवण घातले.

जेवता जेवता दामा म्हणाला, “ आज नव्हर्याच लई कवतिक चाललय.”

तेव्हा दामाची बायको म्हणाली, “ सगळ्या गावात नाव गाजवल्यासा सात आठ जणांना टॉवेलाच्या फटक्यात लोळवल्यासा, मग कवतिक कराय नको का.”

असे म्हंटल्यावर दामा म्हणाला, “ म्हणून सगळ केलस व्हय.”

“नुसत्या रुमालाने कस लोळवलत तुम्ही?” दामाची बायको बोलली.

तेव्हा दामू म्हणाला, “ आग, तुला गंमत माहीत नाही नुसत्या टॉवेलने मी त्यांना लोळवल नाही. तर जाताना रस्त्यावरले खडीकरणाचे दोन बारके दगड त्यात लपवले होते. व फिरवलं तसं ते लई जोरात लागायचे. अशा प्रकारे मी त्यांचा फज्जा उडवला. मला तो गुंड्या म्हणत होता नुसतं तोंड चालवता येते. तवा आता तेलां कळल आसल तोंड, वस्त्रारा व टॉवेलपणं चालवता येतोय मला ते.”

तेव्हा ती दोघं खो खो हसायला लागली . अशा प्रकारे सोसायटीचे राजकारण झाल. कुठं हसू तर कुठं रडू फुटलं.

लेखक : निशिकांत हारुगले

शुक्रवार, १५ एप्रिल, २०२२

म्हशीचे दात

 llम्हशीचे दात ll


लेखक : निशिकांत हारुगले.

                               एम. ए. बी. एड.

                                                गाव :  पुष्पनगर



तांब्याच्या वाडीची वेदगंगा भुदरगडाच्या पायथ्याला नांदते. तिच्या काठावर वसलेले पेठच गाव होते. तिथल्या लोकांचा मुख्य व्यवसाय शेतीचा होता. घर संसार म्हटलं तर खर्च आलाच. शेतीतील उत्पन्नावर भागवणे अवघडच. चार सहा महिन्याचा पावसाळा सरला की शेतातून मिळणारे तांदळाचे चार दाणे, व बांधाला लागलेल्या वरण्या- जगदाल्याच्या शेंगा, हा काय तो चरितार्थ, कधी पीठलं कधी मासळी असे खाद्य ते खात व सणाला केलेली पुरणपोळी हेच काय ते जेवण, या बाहेर हॉटेलचे चमचमीत काय ठाऊकच नाही.

शेतातील उत्पन्नास पाळलेल्या गाई, म्हशीच्या दुधाची काय ती जोड असायची. गोकुळचा संघ झाला. त्यामुळं फुकट पासरी जाणार दूध जरा त्याला भाव यायला लागला. त्यामुळे लोकांची चलती झाली. व साध्या खापराच्या घरावर बेंगलोरी कौलारू झालर चढली. अशा या पेठेत गणपत राहत होता. पण त्याला बारशात कोणतरी गणपतराव म्हटलं असल. नाहीतर रोज त्याला गण्या शिवाय हाक मारली नाय तर शपथ. असा हा गणा मोठा झाल्यावर त्याचं लग्न ठरवायला लागले. घरची परिस्थिती बेताचीच होती. यामुळे कोणी पोरगी देईना. सगळे म्हणत. “ हाच भिकारी पोरीला काय सुख लावणार.”

आपल्या घरात खायला काही नसना पण नवऱ्याच्या घरात पोरगी सुखात रहावी ही प्रत्येक बापाची अपेक्षा असते.

गणाचं काही केल्या लग्न जमत नव्हते. म्हणून गणाच्या बापानं घरात कणग्यांची रांग लावली. व त्यामधे लाकडाचा भुसा व कोंडा भरला. व वरती भाताचे चार दाणे पसरले व लिंपण घातले. कोकणातल्या लोकांना याचे कारणामे माहित असलेने, त्याने देश मुलखात पोरी लग्नासाठी बघायला सुरवात केली. लग्न होत नसल्याने गणा मात्र रडायच्या घाईला आला होता. त्याच्या वर्गातील त्याचे जुने मित्र मात्र चिडवत होते, ते म्हणत, “ गणा तुझ्या नशिबात देवाकडे विमानावरून जाणं काय लिहिलं नाही वाटत, घोंगड्यातून जाशील.”

तेव्हा गणा चिडून त्यांना म्हणे,

“ तुमची मढी जाऊ देत तिरडी वरून, मी काय बिन लग्नाचा मरणार नाही. जर का कुणी मुलगी दिली नाहीतर एखादी पळवूनच आणीन, बघाच तुम्ही.”

गणाची ही अवस्था त्याच्या आत्तिला बघवत नसे. तिने आपल्या लांबच्या निपाणीतील पाहुण्यातली एक मुलगी स्थळ म्हणून काढली. मुलीचा बाप जातीचा हेड्या पण त्याला म्हशीतील जेवढं जमे त्यापेक्षा लग्नातील काहीच जमत नसे. भेटीगाठी झाल्या, एकदाचं लग्न ठरलं. दोन्ही घरची परिस्थिती गरीब असलेने लाखेचं मंगळसूत्र घालून कसबस गणाचं लग्न पार पडलं. व गणाचा संसार सुरू झाला. थोड्या दिवसात नव्या सुनेला कणगीतल्या भाताची गंमत कळाली. व तिने भांडण काढले.

 व म्हणाली, “ बरे आहात की बाप- लेक आम्हाला घरात धान्य भरपूर आहे शेत आहे. म्हणून फसवलत नव्ह. केसा न गळा कापला माझा. कणगीत कोंडा भरला व सांगतात भात आहे म्हणून.”

असे बोलून गणाच्या बायकोन घर चांगलच डोक्यावर घेतलं होत. गणाची आई तिला समजावण्याचा प्रयत्न करीत होती. “ आग गप बसं भावकित अब्रू घालवू नकोस म्हणून. मी तुझ्या पाया पडते ग.”

असे म्हणून देखील तिने दोन दिवस घर डोक्यावर घेतले. व दोन दिवसांनी ती आपल बोचक गुंडाळून माहेरी निघून गेली. सगळे गणाला चीडवाय लागले. “ गण्याची बायको पळाली. अग ग.”

 गणला तर लग्न करूनच चुकलं की काय असं वाटायला लागलं. दोन दिवस झालं मुलीचा बाप त्या पोरीला घेऊन आला. सगळे आश्चर्यानं तिच्याकडे बघत होते. कालपर्यंत नाव ठेवणारी सुगंधा पाटलीन गणाच्या बायकोला न रहावून म्हणाली, “ काय ग रखमा नांदण टाकून गेलतीस नव्हं, आणि दोन दिवसात परत आलीस व्हय ग.”

आधीच राग त्यात ही सुगंधा असं म्हणत्याले ऐकूण ती फाडकण तिला म्हणाली, “नांदण टाकून जायला मी बाजार बुणगी नव्हं, जातिवंताचीच आहे. जर माहेराला गेले नसते. तर ह्यो हेडया बा आला असता काय माझी संसाराची घडी नीट बसवायला. जशी यानं मला दिली तशी माझी नीट व्यवस्था लावू देत.”

असे म्हणून ती घराकडे गेली. घरात आल्यावर तिच्या बापाने गणाला व त्याच्या घरातल्यासणी फैलावर घेतले. थोड्या वेळाने त्यानं बघितलं घरात म्हस देखील नाही.

तेव्हा त्यानं सांगितलं घरात काय थोड पैसे आहेत काय. तर गणा म्हणाला, “ लग्नात सगळे संपले.”

तेव्हा त्याची लेक रखमा म्हणाली, “माझ्या घरातील पैसे घेऊन मलाच म्हैस घेऊन द्यायला बोलवलं नाही. बाबा तूच दे. तुझे पैसे घालून.”

तेंव्हा तो म्हणाला, “ माझीच लेक नव्हं, कशी शब्दात गावल. तवा उद्या शुक्रवार हाय कोकन्या कडगावचा बाजार हाय. तेव्हा जावईबापू तुम्ही या तिथं बघू एखादी म्हैस.”

असे म्हणून त्यानं चहा घेतला व त्यो गेला. गणाची बायको घरातल्या कामाला लागली. तिनं नवऱ्याला गोठा तयार करायला सांगितला.सासू व सासऱ्याला सांगितले आता गप्प बसून चालत नाही. उठा कामाला लागा.

दुसरा दिवस उजाडला. गणाच्या बायको रखमान चांगल्या चार पाच भाकऱ्या व पिठल केलं. व शिदोरी बांधून गणाच्या हातात टेकवली. व त्याला कडगावची वाट धरायला सांगितलं. रखमानं दिलेल्या शिदोरीची पिशवी घेऊन तो जायला निघाला. 

नदीच्या वाटेनं पुढे वाडीचा पुल पार केला. व शेणगाव गाठलं. दत्ताच्या पाया पडला. नंतर कुंभारवाड्यावर गेल्यावर त्यानं मिळेल त्या वाहनाला हात दाखवत तो कडगावच्या पेठत पोहोचला. तोपर्यंत चांगलीच उन्ह चढली होती. घामाच्या धारा अंगावरून चांगल्याच निथळत होत्या. 

तो कसा बसा जनावरांच्या बाजारात आला. व मामा कुठं दिसतोय का ते पाहू लागला. तर त्याला सासरेबुवा एका टेम्पोत म्हैस चढवत्याला दिसला. आपलं काम आटोपल्यावर मामा गणाजवळ आला. दोघेही सावलीत एका झाडाखाली जाऊन बसली. खूप भूक लागली होती. दोघांनी शिदोरी सोडली. व चांगलाच ताव पीठल भाकरीवर मारला. जेवताना सासरेबुवा म्हणाले, “ काय गणपतराव थोडे फार पैसे आणलेत काय.”

गणा म्हणाला, “ बायकोन फक्त येस्टीपूरत दिल्यात. व म्हणाली चांगली म्हैस घेऊन द्या म्हणावं.”

तेव्हा रखमाचा बा म्हणाला, “ शेवटी निपाणीचीच ना, व्यवहाराला ऐकलं तर खरं.”

रखमाच्या बापानं बाजारातील ओळखिण इकडल तिकडल पैसे जमवलं. व बाजारात आलेल्या म्हैशीतिल एक थकीव रेडी जी नुकतीच व्याली होती ती निवडली.

 गणाचा सासरा गणाला म्हणाला, “काय जावई पसंत आहे का रेडकी.”

गणा, “ मला यातल काय कळतंय,तुम्हीच बघा.”

असे म्हंटल्यावर त्याने त्या म्हैशीच्या मालकास घोळात घेतले. व दुसऱ्या हेड्याला घेऊन मध्यस्ती केली. व म्हशीचा दर काढला. म्हैशीचा मालक पाटगाव कडला होता.

 तो म्हणाला, “पाच हजार रुपये देत असशीला तर सोगा धर. नाहीतर पुढे जा.”

गणाच्या सासऱ्याने म्हैशीच्या कितीतरी खोड्या काढल्या. तरी त्याचं वाक्य ठरलेलं, एक पाई कमी करणार नाही. शेवटी गणाच्या सासऱ्यानं बाजारात हेडेगिरी करून आणखी पैसे कमवून व बाजारातील ओळखीचे लोकांकडून घेऊन एकदाची ती म्हैस गणाला घेऊन दिली. म्हैस घेऊन दिल्यावर गणाचा सासरा गणाला म्हणाला, “ बघ गणा आता म्हैस दिली आता तू व तुझ नशीब. कोकणातल्या रेड्या आपल्या भागात दुधाला सुटतात. पुढे दोन तीन येत खाल्यावर मुरगूडच्या किंवा निपाणीच्या बाजारात खपवूया आपण.”

असे म्हंटल्यावर गणा खुश झाला. त्यानं म्हैस घेतली. व गावच्या वाटेला लागला. नदीच्या वाटेनं म्हैस घेऊन तो निघाला. वाटेत भेटणाऱ्या प्रत्येकाच्या प्रश्नाला उत्तरे देता देता तोंडाला फेस यायची पाळी आली.

कसा बसा तो शेणगावात आला. नदीचं पाणी कमी होत. त्यानं नदीच्या वाटेनं गाव गाठलं. कसा बसा वेशीत आला. संध्याकाळ झाली होती. पवारांची कमळा शेण टाकायला निघाली होती. गणा म्हैशीसंग येत्याला तीनं बघितलं.

 हासली व म्हणाली, “ काय र गणा हे काय म्हणायचं,”

गणा म्हणाला, “ मामान म्हस दिलीय. ती घेऊन आलोय.”

म्हैस बघितल्यावर ती म्हणाली, “ आर तिच्या अंगात हाडतरी हाईत काय, व ही काय दूध द्यायची.केवढ्याला घेतली र..”

तेव्हा गणू म्हणाला, “ पाच हजाराला.”

तेव्हा कमळी डोक्यावर हात मारत म्हणाली, “ आता पाच हजार टाचण्या मारून कापसाचे बोळे लाव. व वरती दूर पांघर तवा दिसेल जरा गबगबित म्हशीवाणी.फसला ग बाई.”

असे म्हणून ती शेण टाकायला गेली. गणान कशीबशी ती म्हस् धडपडत घरापर्यंत आणली. . रखंमान भाकर तुकडा ओवाळून टाकून रखमानं म्हैस घरात घ्यायला लावली. तिला पाणी पाजून थोडी वैरण घालून दमल्या भागल्या नवऱ्यास पाणी आणून दिलं.

गणा पाणी घटाघटा प्यायला. व रखमाला म्हणाला, “ काय तुझ्या बापाने म्हैस दिली बघ. सगळी मानसं नाव ठेवत होती.”

तेव्हा ती म्हणाली, “ उगाच गावच्या कहाण्या सांगू नका. जर गाव काय म्हणतं याचा विचार करत रहीलासा तर असच बसशीला तंबाखू चोळत. ते काही नाही, चांगली चार पाच महिन्यात अशी करते बघा तिला दोन्ही दारातून गेली तर शपथं.”

असे म्हणून तिने खुरपे घेतले. व म्हणाली, “ आ तुम्ही घरात बसा. मी व मामंजी रानात जाऊन चार पेंड्या घेऊन येतो.”

असे म्हणून ती शेताच्या वाटेला लागली. अशा रीतीने गणूच्या संसाराची गाडी रुळावर आली. गणू स्वभावाने खूप भोळा होता. त्याला कोणीही सहज फसवेल. असा त्याचा स्वभाव. पण बायकोच्या राबण्यानं त्याचा संसार खूप सुखात चालला होता.

 त्याच्या बायकोने म्हंटल्याप्रमाणे त्या म्हशीला चांगले तयार केले. गणाची रोज निंदा करणारे लोक आता त्याचे कौतुक करू लागले होते. पण गणाची प्रगती गावच्या पाटलाच्या मनात सलत होती. त्याला गणाची म्हैस गब्दुल्ली झालेली बघवत नव्हती.




एके दिवशी रखमा धारला बसली होती. व गणा उगाच गोठ्यात बसला होता. तर त्याचं लक्ष त्या रवंथ करणाऱ्या म्हशीकडे गेला. तेव्हा त्याला म्हशीच्या वरच्या बाजूला एकपण दात दिसला नाही. तो विचार करायला लागला. की म्हशीला वरती एक पण दात दिसत नाही. आजपतोर म्हैस कशी वैरण खाते दूध देते. वरच्या बाजूला तर एकपण दात नाही.

 “बापरे, मामानं माझ्या गळ्यात दात पडकी म्हस् बांधली वाटतं.”

तो बायकोला म्हणाला, “ काय ग रखमा मामानं पैसे दिले नाही म्हणून दात पडकी म्हस बांधली वाटत. बघ की जरा तिला वरती एकपण दात नाही.”

“ गप बसा उगीच कायपण बोलत्यासा, वैरण तर खाती, शेण देती, दूध पण देती. मला काय दाताच नाय ठावं. मला फक्त दुधाची शीर ठाव. ती तर दिसती. जावा गप कामाला.”

दुसऱ्या दिवशी सकाळी गणू उठला.त्याने उठून चहा घेतला. व खुरपे घेतले व शिवाराच्य वाटेला लागला. पाणंदितून जाताना त्याला सखाराम पाटील भेटला. तो म्हणाला, “काय गणू कसा काय प्रपंच चाललाय.”

तेव्हा गणू म्हणाला, “कसला गरिबांचा प्रपंच म्हणायचा पाटील. तुमच्या वाणी नाही आमचं, आमची माळा मुरडाची रानं कसली पिकत्यात. दैवारान भिजायची व चांदण्या न वाळायची.काय पिकायच तिच्यात चार भाताच दाण, व बुटिभर शेंगा, व कुट्टतरी नाचणं बाकीच्या रानात गवताबिगर काय नाही.

सखाराम म्हणाला, “ नाही कस म्हैस तर लई झाक बाळगलीस.”

तेंव्हा गणू म्हणाला, “ कसली झ्याक मामानं फसवल राव, म्हस दिली ती पण दात पडकी.तिला वरती एकपण दात नाही बघा. आता विकताना कोण घेईल बरं. दर पडला की.”

सखाराम पाटील म्हणाला, “ आर तो हेड्या फसवणारच. चल आज आमच्या मळवातली पेंडी देतो तुला.”

गणुपण खुश झाला. व पाटला बरोबर मळवात गेला. मळवातील पेंडी कापताना पाटील म्हणाला, “ हे बघ गणू तूझ्या मामानं फसवल बघ तुला. तू माझा बालपणाचा मित्र म्हणून सांगतो. मला तुझी दया येते बघ. आता कुठं तुझा संसार सरळ चालला होता त्यात ही दात पडकी म्हस् सासऱ्यांन गळ्यात बांधली तुझ्या. तो तर जातीचा हेड्या. हेड्या तो हेड्याच, त्यांना फक्त पैसा दिसतो बघ. तशा माझ्या घरात म्हशी हाईत पण तुझ्यासाठी मी ती म्हैस खरेदी करतो बघ. तू जेवढ्याला आणली तेवढ्याला मी ती म्हस् खरेदी करतो बघ. यात तुझा तोटा पण नाही व माझा फायदा पण नाही. त्या पैशात दुसरी म्हस घे तू. “

तेव्हा गणू म्हणाला, “ घरात विचारतो, व नंतर काय ते सांगतो.”

तेव्हा पाटील म्हणाला, “ अरे मर्दा बापया सारखा बापय तू व बायकांना काय विचारायचं. व म्हातार्यांच काय ऐकायच.”

गणुला पाटलाच बोलण एकूण मोठं झाल्या सारखं वाटायला लागलं.

“ नंतर येईन मागन व्यवहार करायला,” असे बोलून त्याने पेंडीच वज्ज बांधल. व तो घरच्या वाटेला लागला.

वाटेत त्याच्या मनात विचारांचे काहूर माजू लागले. तो विचार करू लागला. नाहीतर म्हशीची किंमत मिळतेच. ही देऊ व दुसरी घेऊ आपण. असा विचार करत तो घरात आला त्याने वज्ज टाकलं. अंघोळ केली. व नंतर थोड्या वेळानं तो सखा पाटलाच्या घरात गेला. सखाराम गणा आल्याचं बघताच त्याने आपल्या बायकोला चहा करायला सांगितला.

थोड्या नाखूशीन पाटलीन  मुरका मारून आत गेली. शेवटी सखा पाटलान गणाला चांगलाच घोळात घेऊन त्याच्या हातावर पाच हजार रुपये टेकवले व म्हशीचा कागद करून घेतला. थोड्या वेळानं रखमा व म्हातारा शेताला गेल्यावर त्यानं गणुच्या दावणीची म्हस सोडून आणली.

गणूला अवघडल्यासारखं झाल. पण पुन्हा विचार केला. की दुसरी घेता येईल.

संध्याकाळ झाली रानात गेलेली माणस घरला निघाली. गणुच्या बापाला घरला येताना वाटेत शिंद्याचा म्हादू भेटला. तो गणूच्या बापाला म्हंटला.

“काय राव म्हैस विकणार माहीत असत तर मीच घेतली असती. त्या पाटलाला कशाला दिली.”

“ काय म्हैस कोण म्हणत दिली.”

“घरला जा तुझ्या पोरग्यानच दिली.”

“काय म्हणतोस, मला काय माहीत नाही यातलं.”

“म्हणजे पोरगं मोठं झालं व्हय व्यवहार करायला.तू बस आता कोपऱ्यात , जा घरला.” असे म्हणून तो निघून गेला.

म्हातारा लगबगिन घरला आला. त्याने गोठ्यात म्हस बघितली.म्हस गोठ्यात नव्हती. तो तडक घरात आला. व गणाला म्हणाला, “ गण्या म्हस कुठं हाय.”

गणा, “ विकली.”

“ का विकलीस कुणाला विचारून तुझं टकोर तर फिरल नाही नव्ह.” म्हातारा चाचपडत बोलला.

तेंव्हा गणू म्हणाला, “ तिचं दात पडल होत.”

तेव्हा म्हातारा म्हणाला, “तरण्या रेडीच कधी दात पडलत काय र!”

तेव्हा गणू म्हणाला, “हे बघ बा मला थोडी तरी अक्कल हाय,उगाच कालवा करू नकोस. उद्या दुसरी घेऊ.”

तेव्हा गणूचा बाप म्हणाला, “ तसली म्हैस परत मिळाय ठेवलीय तूझ्या बापानं.लगीन झालं म्हणजे शेना झालास.”

तेव्हा गणू उठला. व परसदारी रागात निघून गेला. थोड्या वेळानं गणुची आई व बायको रानातून आल्या. त्यांना जेव्हा हे कळलं तेव्हा त्यां गणूला खूप बोलल्या. शेवटी गणू रागान दोरी घेऊन फासलावाय निघाला.तेव्हा सगळी गप्प झाली.

म्हातारी म्हणाली. “जाऊदे दुसरी घ्या पण माझ्या पोरान काय करून घेतल तर मी कुणाकडं बघू असल्या भावकित मी हाडाची काड करून संसार केला कुणासाठी याच्यासाठी. सोडा विषय तो.”

म्हाताऱ्याने दुम काढला म्हैस कुणाला दिली याचा. त्याला समजले की सखा पाटलाकड म्हस हाय.तेव्हा त्यानं ओळखलं सख्यानं फसवल माझ्या गणाला.रात्री म्हाताऱ्याला जेवण गॉड लागलं नाही. तो नुसता हांथरुणावर तळमळत होता.

भगटायला तो उठून बसला. त्याच्या लक्षात आले की शिंद्याची लक्ष्मी आपल्या माहेरला यमगर्णीला जाणार हाय. तो तडक तिच्या घरला गेला. व त्याने सर्व हकीकत लक्ष्मीला सांगितली. व रखमाच्या बापाला तेवढा निरोप द्यायला संगितला.

लक्ष्मी म्हणाली, “म्हाताऱ्या तू काळजी करू नकोस, मी सांगते रखमाच्या बापाला. त्या सखा पाटलाच मडं बसवलं ते, भाड्या कोणत्या येळला उपाजलाय देवा महादेवाला ठाव. सगळ्या गावाला खाऊन भुजंगावाणी बसलाय करिटखाऊ मेला. तेला बुडीवला वेदगंगेत .” असे म्हणत लक्ष्मी चुलिवला चहा म्हाताऱ्याला देऊ लागली. तेव्हा म्हातारा म्हणाला, “ नको मला चहा काय, काहीपण गॉड लागत नाही बघ. या पोरान ह्यो बाजार मांडलाय, माझ काम एवढं कर.” असे बोलून तो घरी आला. लक्ष्मी गावाला गेली तिन निपाणीत रखमाच्या बापाला निरोप पोचवला. दुसऱ्या दिवशी सकाळी भगटायला रखमाचा बाप पेठत हजर झाला. व घरात आल्या आल्या त्यानं गणा कुठाय विचारलं.गणा लगेच हजर झाला.

“ गण्या म्हस कुणाला विकलिस व का विकलीस.” गणा जरा घाबरूनच बोलला, “सखाराम पाटलाला.”

“ का विकलीस,” असे विचारताच गणू म्हटला, “दात पडकी म्हस माझ्या गळ्यात बांधल्यासा व आता मला विचारता होय.” तेव्हा सासरा म्हणाला, “ काय दात पडकी, आर परवडीची रेडी घेऊन दिली होती तुला, व दात पडकी म्हणतोस व्हय.”

तेव्हा गणू म्हणाला, “नाहीतर काय त्या म्हशीला वरती एक पण दात नव्हता.कोण पुढे विकत घेणार, शेवटी विचार केला व दिलेलं तेवढं पैसे परत मिळत्यात म्हंटल्यावर विकली सखा पाटलाला.”

असे म्हटल्यावर रखमाच्या बापानं डोक्यावर हात मारून घेतला. व तो म्हणाला, “ तुझ्या बापाने तरी लावले होते काय म्हशीला वरती दात. व विकत घेणारा काय बचाळी बसवणार हाय का? जा उठ व गावातल्या सगळ्या म्हशींना बघून ये वरती दात आहेत का ते. कुठली अवदसा सुचली व तुझ्या पदरात पोरगी बांधली माझी.”

गणा उठला व शेजारच्या शिंद्यांच्या गोठ्यात गेला.त्यांच्या गोठ्यातील म्हशीचे दात पाहण्याचा प्रयत्न त्याने केला. तर त्याला रवंथ करताना म्हशीचे फक्त खालचेच दात दिसले. वरती दात नव्हते. त्याने डोक्याला हात मारला. व तो घरी आला. व रडू लागला.

त्याच्या बायकोने समजूत काढली. बाबाला म्हणाली, “आता बाबा तूच यातून मार्ग काढ. माझा नवरा भोळा भाबडा त्याची फसगत झाली.”

रखमाच्या बापानं गणाची समजूत काढली. तो म्हणाला माणूस चुकतोचं झालं गेलं गंगेला मिळालं. इथून पुढं शान व्हायचं. ते पाच हजार आण. आणखी काही जोडणी करा. आता मी एक पाई घालणार नाही.तुला दुसरी म्हैस घेऊन देतो. येत्या बाजारात तुझ्या घरात दुसरी म्हस बांधतो. पण इथून पुढं तरी मला विचारल्या शिवाय व्यवहार करायचा नाही.”

गणाच्या बायकोने म्हशीच्या दुधातून साठलेलं दोन हजार रूपये दिवळीतल्या गाडग्यात साठवले होते ते बाबाकडे दिले व म्हणाली,” मी पण खुळ्यासारखच केलं.तुला विचारायच्या आधी या बाबाला व्यवहार करू दिला. तेच माझं चुकल. इथून पुढे सावध राहीन. आता मला काय पण कमी नाही बघ तुझ्या आशीर्वादाने पण तेवढी म्हैस आन बाबा.” बोलून ती त्याच्या पाया पडली.

रखमाचा बा जाताना वाटेत सखा पाटलाला वाटेत दिसल्यावर म्हणाला, “ माझ्या भोळ्या जावयाला फसवून काय मेल्यावर मड्यावरन घेऊन जाणार हाईस काय. तुलापण कोणतरी भेटल सवाई. दुसऱ्याचं वाईट केलं की देव आपलं पण करतोय. एवढा जातीचा हेड्या, हेड्याचा धंदा करतोय पण बाजारात पत हाय माझी. घेतलीस म्हस नव्ह घे. त्या म्हशीपेक्षा नाही सवाई म्हैस घेतली माझ्या लेकीच्यात तर नाव सांगणार नाही.”




अस म्हणून तो निघून गेला. व म्हटल्याप्रमाणे त्याने चांगली म्हैस घेऊन दिली.” त्या दिवसापासून गणा प्रत्येक व्यवहार सावधगिरीने करीत असे.

पाटील व त्याचे मित्र गणाला चिडवत असत. पण हा काही बोलत नसे.गप्प राही. पण त्याच्या मनात पाटलाचा राग होताच.

त्याला न कळताच धडा शिकवण्याच गणाने ठरवले.

दिवस सरत चालले होते. भात कापणी झाली. गाणाची बायको राबणारी असल्याने या वर्षी चांगलंच भात पिकलं. व शेंगा पण वावरात भरपूर झाल्या. म्हशीमुळे व राबणुकिमुळे घरखर्च भागून चाऱ पैसे पण साठाय लागले होते.

गणाने मात्र सखा पाटलाची धुंदी उतरायचा चंगच बांधला. वैरण कापणी सुरू झाली. आपल्या वावरातल पयान कापताना गणा मनातल्या मनात हासला. कारण त्याच्या मनात पाटलाची खोड मोडायची युक्ती सुचली होती.

भात कापणी झाली. शेतं नांगरून पडायला लागली. गणानं पण आपल शेत नांगरल.पण माळधावणी असल्याने त्याने त्यात काही टाकल नाही. सखा पाटलान मात्र आपल्या शेतात हरभरा व मसूर टाकली होती. दिवस सरत चालले. हरभर्याला घाटे धरून काढणीस आला.

एके दिवशी सखा पाटलाची बायको दारात उभा राहून शिवा देताना दिसली. तेव्हा रखमा पाण्याला गेली होती. घरात आल्यावर ती सासूला म्हणाली. “सासूबाई सखा पाटलाचा हरभरा कुणी उपटून नेला म्हणं.”

रखमाची सासू म्हणाली, “ नेवूदेत भाड्याचं आमच्या पोराला फसवलं, असच जायचं.”

गणा मात्र शांत होता. सात आठ दिवसांनी गणा बायकोला म्हणाला, “ चल जरा डोंगराकड शेतात काम आहे.”

तर ती म्हणाली, “ पयान पण कापून रचलं. आता काय काम तिकड.”

तेव्हा गणा म्हणाला, “ चल गप काम आहे.”

तशी घरातलं काम आवरून नवऱ्याच्या मागणं शेताला निघाली.शेतात गेल्यावर त्याने दोन व्हळीमधील उनात घातलेला हरभरा काढला व तिला एक टोणका झोडायल आणून दिला.

तेव्हा ती म्हणाली, “हा हरभरा कुठला?” तेव्हा गणा म्हणाला, “ तू आंबे खा झाडे मोजू नको.”

ती म्हणाली, “ असं कुणाचं चोरून खाण्यपरिस उपाशी मरीन मी.” तेव्हा गणा रखमाला म्हणाला, “ लई खर्याची पुतळी आहेस बघ. हा हरभरा त्या सखा पाटलाचा आहे. माझी म्हस फसवून घेतो काय. आता खा म्हणावं हरभरं, तू राब मी खातो.”

“ आव ती पाटलिन लई शिवा देत होती. पांडुरंग बघून घेईल चोराला. तुम्हाला हे धंदे करायला कुणी सांगितलं.” रखमा बोलली.

गणा म्हणाला, “ रखमा तू लई साधी आहेस. हा भोळापणा सोड. मी केला तेवढा गाढवपणा पुरे. त्या पाटलाची घमेंड आता अशीच जिरवायची कड कडणं कुरण खायचं त्याला कळूच द्यायचं नाही. तू गप्प बस मी नाही त्या पाच हजाराचे दहा हजार केले तर नावाचा गणा नाही.मला फसवतो काय.”

दर वर्षी पाटलाच्या शेतातील हरभरा , कधी ज्वारी, कधी मुगाच्या शेंगा असं काहीना काही चोरीला जायला लागलं. गणानं असे दरवर्षी हजार पाचशे मिळवत म्हैशीच्या आठ दाताचे आठ दहा हजार मिळवले. व पाटलाची चांगलीच मस्ती उतरायचे काम या भोळ्या शंकराच्या गणाने केले.

तात्पर्य : आपण कोणाला तरी फसवले तर आपल्यालाही कोण तरी फसवू शकते.

टीप. सद्या म्हैशीचे दर जास्त आहेत. हा दर २००८-०९, सालचा आहे. नाहीतर ५००० रुपये घ्याल व जाल बाजारात म्हस द्या म्हणून खुळ्यात काढतील. तुमचा शुभचिंतक.

लेखक. : निशिकांत हारुगले
                              एम. एम. बी.एड.


शुक्रवार, ८ एप्रिल, २०२२

कथाक्र. १ मासेमारी

 १) मासेमारी

लेखक :निशिकांत हारुगले.

                                 एम.ए बी एड.



दर वर्षी सण समारंभ चालून येत असतात. नित्य नेमाने आश्विन महिन्यात दसरा आला. गावातील लोकांचा मुख्य व्यवसाय शेती. त्यातून येणाऱ्या पैशावरच उदरनिर्वाह चालत असे.दसरा म्हटल की खारकांडाचा बेत ठरलेला असे. पण मटण महाग असलेने सर्व सामान्य गरीब कुटुंबांना त्याचा खर्चं परवडत नसे.तेव्हा या मासाहाराची गरज भागवण्याचे काम पेठच्या शिवारातील नदी वेदगंगा व तिच्या व्हळी म्हणजेच ओढे करत असत.

पेठच्या गावात होऊन गेलेलं प्रसिद्ध त्रिकुट म्हणजे पाटलाचा हणमंता, कुंभाराचा शंकऱ्या व येसाक्काचा बाजीराव. ही तिघे पेठच्या रानात पाखराप्रमाने लहानाची मोठी झालीत.

शाळा शिकणे म्हणजे डोक्याच काम ते जमणार छे छे वेड व्हायला होतंय असे समजत असत. त्यामुळे शाळेत कमी व गावच्या शिवारात जास्त हुंदड्या मारतच हे लहानाचे मोठे झाले.

लहानपणी शाळेला जर मुले बोलवायला आले की कधी कणुगल्यात तर कधी पोटमाळ्यावर लपून बसत. तर कधी शिवारात दडी मारत.

येसाक्का तर आपल्या बाज्याला फुकणीन बडवत असे.की शाळेला का जात नाहीस.

“भाड्या नुसता खादाड बोका खातोय व खोंडावाणी हुंदडतोय नुसता.” असे म्हणत असे.हा शाळा शिकावा व या त्रिकुटाच खेळ मोडावा म्हणून येसुबाईन बाजीरावाला त्याच्या मामाच्या गावी भोगावतीला पाटीवला.पण काय घरातील मांजर पिल्ली धरतय म्हणून रानात सोडावं व ते फिरून परत यावे तसा हा चांगल महिनाभर खादडून महिन्यान चालत घरला आला. तवा आईनं डोचक्यावर हात मारून घेतला व म्हणाली, “ काय बाई करावं या पोराला आता ह्यो भाड्या व याचं नशीब मी काय करणार.” अस म्हणून तिने त्याचा नाद सोडला.

शेतातून येणारे चार तांदळाचे दाणे व म्हशीचे दूध ढेरीला घालून मिळणाऱ्या दहा दिवसाच्या बिलावर घर कसे बसे चालत असे.

 डोंगरातील जंगलातील लाकडाच्या मोळ्या घरच्या सरपणाची गरज भागवत असत.पैशाची वानवा अशीच परिस्थिती हणमंत पाटलाची होती.

शंकर कुंभाराच्या बापाचा मडकी तयार करायचा.पावसाळ्यात चिखल रांधून गणपती करायचे व ते विकायचे. शंकरला गणपतीतला ग सुद्धा येत नव्हता. एकदा त्याच्या बापानं मारून मुटकून त्याला गणपती करायला बसवला. तर त्याने गणपतीचं धड एका बाजूला व तोंड मागल्या बाजूला. केले. गणेश चतुर्थीला जो तो हसू लागला. तेव्हा शंकर्या सगळ्यांना सांगे. की हा नवसाला पावणारा गणपती आहे.कारण त्याचे तोंड पाठीमागे होते.घरला जाताना तुमच्याकडे बघून आशीर्वाद देणारा व तुम्ही त्याला बुडवता तो मात्र तुम्हाला तारणार. तारल्या वाचून राहणार नाही.

पण एवढं सांगून पण तो गणपती घ्यायला कोणीच तयार नव्हते.

शेवटी शंकऱ्यान त्या गणपतीला उचलले व हनमाच्या गळ्यात घातले. व म्हणाला, “ मला तुझी पई नको, पण माझ्या श्रमाचा गणपती आवंदा तरी खपुदेत. पुढचं पुढं बघू.शेवटी हणमंतानं मैत्रीखातर तो गणपती घरी नेला.

घरात आणल्यावर हणमाच्या आजीनं घर डोक्यावर घेतलं व म्हणाली,

“ भाड्या फुकटात मिळालं म्हणजे शेण पण आणशील.तुला मोडून बसवला नदीवर त्यो. रेड्या आसला कसला गणपती आणला.”

तेव्हा हणमंत म्हणाला, “ म्हातारे गप्प बस उगाच कालवा करू नकोस, बघ नवसाला पावतो की नाही हा गणपती.”

तेव्हा म्हातारी म्हणाली, “ तो आधीच पावलाय व तुझ्यासारखं कारट आमच्या पदरात टाकलय काय कामाचं ना धामाचं.”

तेव्हा तो म्हणाला, “ कामाचं नाही कस तू खपलीस तर तुझ्या लेकाला नाहीतर मलाच तिटव धरायला देतील लोक तवा म्हणशील काय कामाचं ना धामाचं.”

तेव्हा म्हातारीनं काठी घेतली व त्याला म्हणाली, “ भाड्या माझ्या मरणावर उठलाय.”

तेव्हा हणमाच्या आईनं कशीबशी समजूत काढली. व म्हातारीला शांत केली. तेव्हा तो म्हणाला , “ तिला म्हणावं जा माहेरला गवर खेळायला.”

तेव्हा ती म्हणाली, “ ये वळू या म्हातारपणी मला पाठवतो व्हय रं मेल्या या दावणीला डोकं फोडून मरेन पण माहेरला जाणार नाही.”

अस म्हणून ती आत गेली. पण पाठमोरा गणपती हाणमाला पावलाच म्हणायचा. त्यावर्षी हाणमाच्या शेतात धान्य भरपूर पिकलं, म्हैस दुधाला सरळ लागली. व हणमाचं लगीन पण झालं. तेव्हा तो म्हातारीला म्हणाला,  "का गणपतीला नावं ठेवती नव्हं आता बघ कसा पावला गणपती शिखरासकट मला.” म्हातारीने त्याचे पटापटा मुके घेतले.

अशा प्रकारचे हे त्रिकुट दसऱ्याला एकत्र न आले तर नवलच. या त्रिकुटाने देव उठल्यावर ठरवलं काही नाही आज रात्री शिकारीला जायचं पाण्यातल्या. यांची शिकार म्हणजे मासेमारी हाणमानं त्या दिवशी माळ्यावरली बत्ती काढली. व इकडल तिकडल उसन रॉकेल आणून कशीबशी तयारी केली. येसू पाटलिनीच्या बाज्यानं माळ्यावरल्या मच्छरदाणीची जाळी कापून घेऊन आला. व कुंभाराचा शंकऱ्या विळा घेऊन तयार झाला.तिघेजण अंधार पडल्यावर बाहेर पडले. तेव्हा म्हातारी ओरडली, “हाणमंता काठी घेऊन जा माझी रातीची वेळ हाय, उगाच शंका नको.”

तसा हणमंत ती काठी घेऊन ती तिघ नदीच्या वाटेला लागली. नदीच्या वाटेवर ओढा लागला. त्या ओढ्यात अलगत घुसली. व पाण्याच्या वाटेनं निघाली. अंधाऱ्या रात्री किर किर आवाज करत किड्यांचा कालवा चालला होता. गप्पा मारत यांनी मासळ्या व किरवी धरायला सुरवात केली अंधाऱ्या रात्री अनेक किरवी बाहेर पडत असत. खुरप्याने पटापट टिपत आणलेल्या पोत्यात किरवी टाकत पुढे चालली होती. शंकर कुंभार हाणमाल म्हणाला, “ तुझी आजी लई वांड हाय रं, लई बोलती म्हातारी, हाड म्हातारी झाल्यात पण जीभ काय तिची म्हातारी झाली नाही बघ.आशी बोलते की समंद गावच हादरायला पाहिजे. तुझ्या आईचं कस ध्याड गेलं असतील र तिच्या हाताखाली.”

तेव्हा हाणमा म्हणाला, “ म्हातारी बडबडतीया पण पोटात लई माय बघ, तुळशी काठाची असली तरी तुळशिगतच हाय बघ. आता मी जोपतोर घरात जाईत नाही तोपर्यंत झोपली तर शपथ माझ्या लग्नाचा खर्च तिनच केला नव्ह, साठवलेल्या पैशातून. नाहीतर आमचा बा काय आडगा पन्नास पैशाला पाच रुपये व पाच रुपयाला पन्नास पैसे म्हणतोय. तो काय व्यवहार करणार दगड. म्हातारी हाय म्हणून सगळ चाललय नाहीतर आमचं वाळवणं कवाच लागलं असतं. आमच्या आसल्या भावकीत तिचा आवाज ऐकला की आजुन हादरतिया.

आमच्या भावकितल्या किशाच्या बापानं आमच्या बाला दमदाटी करताच व शिव्या देताच किशाच्या बापाला आमच्या म्हातारीनं गोरणीत घालून बडवला.



अशा गप्पा मारत ओढ्याचे पात्रातून ते मासे धरत ते पुढे चालले.भरपूर मासे जमले. टिक्क उचलना झालं, तेव्हा शंकर म्हणाला, “आता बास, पुढल्या वळणावर बाहेर पडू.”

तसे ती तिघे पुढल्या वळणावर बाहेर पडू लागली. वळणावरून बाहेर पडताना अचानक हणमाला पायात काय तरी चावल्या सारखं वाटल.

माग वळून बत्तीच्या उजेडात त्याला सापाची शेपटी दिसली. तिचे दात त्याच्या पायात लागले होते. व बारीक मुंग्या मारू लागल्या होत्या.

शंकर व बाज्या चांगलेच घाबरले होते.

शंकर म्हणाला, “ आता काय करायचं र.”

बाजीराव, “काय करायचं म्हणजे याला पाटकोळीवर घे व रस्त्याला ये. व ही पिशवी तिथ व्हळीत लपव. मी बैलगाडी आणतो.”

बाज्या पळत घरला गेला व त्यानं परसदरातील मांगरातील बैलं सोडली. व छकड्याला जुंपली..खीलार बैलांना दोन चाबूक लगवताच डीरर्क्या फोडत पळाली. इतक्यात शंकर हाणमाला घेऊन वाटेला आला होता. बैलगाडी येताच त्यानं हाणमाला छकडा गाडीत टाकल. हाणमाला मात्र काहीच वाटत नव्हते. त्याने आपल्या पायाला दोराने घट्ट बांधले होते. गाडी तालुक्याच्या सडकला लागली.थोड्याच वेळात बघता बघता बैलांनी वेग धरला. दणक्यात बाजीरावानं गाडी तालुक्याला रेटली. हणमाला घेऊन तालुक्याच्या सरकारी दवाखान्यात आलीत.

बैलगाडी तशीच उभा करून त्यांनी दवाखान्याच दार ठोठावले रातपळीला आलेली नर्स उठून आली. व म्हणाली, “काय हाय येवढ्या रातीच,जरा कुठं डोळा लागतोय तोपर्यंत कलमडलित.” अस म्हणतच तीन दार उघडलं.तस धापा टाकत शंकर म्हणाला, “हणमाला पायाखालच झालय.”

 तवा ती नर्स म्हणाली, “एवढ्या रातीच कशाला गेलता वारुळाकड जीव द्यायला काय?”

“ बोला काय होत ते नासकवणी की फुरस .”

तेव्हा बाजीराव म्हणाला, “ सापटोळी होती.”

तेव्हा ती नर्स म्हणाली, “ काय साप टोळी मी नवीनच नाव ऐकतेय.”

“केवढी होती लांबीला.” नर्स म्हणाली.

तेव्हा हणमंता म्हणाला, “ बाई जर ती दिसली असती तर तुम्हा पुढे आणून टाकली असती.”

 तेव्हा त्या बाईन जास्त वाडाचार न लावता एक इंजेक्शन घेतल. व हाणमाला टोचत म्हणाली, “ मी आता हे जे इंजेक्शन देते. ते सर्व सापांवर चालते. जर एवढी रात्र ढकलली तर समजा हा वाचला नाहीतर चचला.”

असे म्हणून तिने त्याला वार्डात एका खाटेवर जागा दिली. व ती निघून गेली.

हणमाला बाजीराव व शंकऱ्यान आणून त्या खाटेवर झोपवला. व बाजीराव गाडीची बैल सोडायला निघून गेला.

शंकर मात्र खाली गार फरशीवर बसला. आधीच ओढ्याच्या पाण्यात भिजल्यांन थंडी वाजत होती. त्यात सरकारी हॉस्पिटल मधील गार फरशी याने चांगलीच हुडहुडी भरली.

थोड्या वेळानं बाजीराव तिथे आला, व म्हणाला, “ काय झालं र.”

तेव्हा शंकर म्हणाला, “काय नाही इथे फरशीवर आणखी दोन तास बसलं तर मलाच दाखल व्हावं लागलं दुसऱ्या खाटेवर.”

थोड्या वेळानं हाणमा डाराडूर झोपला ते दोघे मात्र त्याच्या पहार्याला रातभर जागे होते.सारखं आंगाला हात लावून बघत असत. व म्हणत, “ हाय, हाय, आजूनं जित्ता हाय म्हणायचा.”

रातभर जागून जागून डोळ पांढर व्हायची वेळ आली होती.भगटायला कुठे यांचा जरा डोळा लागतोय तोच हाणमंता उठला. व म्हणाला, “ ये चला लवकर रातभर नुसती झोपा काढत्यात, घरला जायचं की नाही.”

त्यावर शंकर म्हणाला, “ हे आपल बर हाय की तू झोप डाराडूर व तुझ्या काळजीनं रातसारी जाग आम्ही. व आम्हालाच म्हण झोपा काढत्यात.”

बाजीराव म्हणाला, “ मेला असतास तर लई बर झाल असत, तुझी काळजी करून जागं आम्ही व तूच तोरा दावतोस व्हय रं.”

तेव्हा हाणमा म्हणाला, “ खेकडी मास्यांची पिसवी कुठाय.”

ती दोघं म्हणाली असल शिवारात व्हळीत ठेवलीय.”

ती उठून जायला निघाली.बाजीराव बैलगाडी जुंपली.रातभर बैलांना झाडाखाली चांगलंच चीलटानी खाल्ल होत.जुंपताना डूरक्या बैलान शिंग दाखवली. तशी त्याने वेसण धरली व गाडी जुंपली . इतक्यात रातपाळीची नर्स डुटी संपल्यावर घरला निघाली होती. “ काय हाईस व्हय मला वाटल… …”

तेव्हा शंकर म्हणाला, “ तुमच्या सारखी सावित्री असताना हाणमाचा जीव न्यायची काय बिशाद त्या यमदेवाची.”

असे म्हणताच ती नर्स चिडली. व म्हणाली, “ देव करो व आज तुला साप चावू दे, व तू इथे येवो, नाही तुला वरती पाठवला ढगात तर बघ.मला सावित्री म्हणतोस व्हय रे डूचक्या आणि हा तुझा सत्यवान काय. घाणेरडी किती दिवसांनी आंघोळ करत्यासा देवाला ठाऊक, तुमच्या आंगाचा वास बघून तो यम म्हणाला असेल की आधीच नरकात हाईसा आणि उगीच कशाला नेऊ.”

असे ऐकल्यावर व तिचा अवतार बघून बाजीरावाने गाडी गडबडीने जुंपली. व ती तिघे गावच्या वाटेला लागलीत.गावात यायला घराजवळ चांगलीच गर्दी उसळली होती. आजू बाजूच्या बायका जमल्या होत्या. म्हातारीनं घर चांगलच डोक्यावर घेतलं होत.ती चांगलीच सुर लावून रडत होती.

“ कशाला गेला मासळ्या धरायला.”

शेवटी हाणमाला बघितल्यावर म्हातारीचा जीव भांड्यात पडला. व म्हणाली,

“ हाणमा नको आम्हाला मासे ते तू घरात बसून रहा म्या आजुन धट्टीकट्टी हाय राबायला.तुला कायबी कमी पडू देणार नाही.तू तेवढा चांगला रहा बाबा.”

जो तो येऊन चौकशी करू लागला.

व शंकर व बाज्याला म्हणू लागले, “ काय अक्कल हाय की नाही कशाला गेलत्यासा मासळ्या धरायला. जीव गेला असता तर.दिसाचं जाता इत नाही.”

तेव्हा बाज्या व शंकर त्यांच्या तोंडाकडे बघून विचार करू लागले. “हे आपल बर हाय देणं नाही घेणं आणि कंदील लावुन येणं. हाच घेऊन गेला माश्याला , याच्यासाठी एवढं रामायण केलं. थंडीनं कुडकुडलो. रातभर जागे राहीलाव व सगळे आम्हालाच बोलत्यात.”

कसे बसे सात आठ दिवस गेले. हाणमा परत बाजीराव व शंकरकडे गेला. व म्हणाला, “ काय जायचं काय आज रात्री मासळ्या धरायला.”

तेव्हा हे त्रिकूट पुन्हा मासे धरायला जाण्याच्या तयारीला लागले.

लेखक. : निशिकांत हारुगले


कथा वाकाटखोर्याची भाग २५

 २५)दादाची सायकल लेखक :  निशिकांत हारुगले. व्यंकू आता खूप मोठा झाला होता. तो कॉलेजला जात असे. घराच्या गरीब परिस्थितीमुळे वज्रेला शाळा सोडावी...