शनिवार, १ ऑक्टोबर, २०२२

कथा वाकाटखोर्याची १)

 कथा वाकाटखोऱ्याची वेदगंगेकाठची

लेखक : निशिकांत हारुगले.

१) वज्रा व शांतीचा जन्म



वेदगंगेचं पाणी निथळून स्वच्छ दिसत होत. बंधार्यास फळ्या घातल्यामुळे नदीला चांगलाच तुंब चढला होता. दोन्ही दरडणा घासणारे पाणी निरव शांतता निर्माण करत होते. मात्र या शांततेत भंग पावण्यास सकाळीच सुरवात झाली होती. इंजिनाची बकबक चालू होती. शिवानंद बामण पाणी पाजण्यात मग्न होता. दिवस कलू लागल्याचे त्याला काहीच भान नव्हते. वाडीस लग्न लावायला गेलेला गणेशचंद्र भट शयनग्रामला निघाला होता. शिवानंदाला शिवारात पाहून कपाळावर अट्ट्या आणून तो बोलला.

“ शिवा तू इथ पाणी पाजतच बस. तिकडे तुझी बायको बाळंतपणाच्या वेण्णा देतेय व सिंच्या तू इथं खोडव काय भिजवतोयस. तुला लाज नाही वाटत. खोर टाक व जा बघू घरला. भटा बामनान होम हवन करावी, पूजा अर्चा करावी. श्राद्ध करावी. ते सोडून तू हे काय करतोयस. माझ्या सारखी भिक्षुकी केली असतीस. तर आज चांगला गोलगट्टम झाला असतास. तू पालाच काढून मरणार. जा आधी पहिला, अमावशेचा दिवस आहे. आशा वेळी पुरुषाने आपल्या स्त्री जवळ असावे. तेवढाच तिला आधार मिळतो.”

एवढं बोलून गणेशचंद्र भट पुढे मार्गस्थ झाला. शिवानंदान पाणी पाजायच खोरं जाळीत लपवले. तो इंजिनाकडे गेला. व त्याने इंजिन बंद केलं. डोक्यात दिवस भरलेल्या बायकोचे विचार. व डोळ्यासमोर तिची सोज्वळ मुर्ती दिसत होती. मातीची घागर घेऊन तो नदीकाठी आला. सूर्य पार अस्थाला चालला होता. मावळतीच्या किरनामुळे नदीचं पाणी चकाकत होत. नदीकाठची बच्चाची झाडे. व त्याच्या बुडक्याची केसरे भयावह दिसत होती. पण धाडशी शिवा नंदाला याच काहीच वाटत नव्हत.तेथे त्याने आपले दिवसभरच्या कष्टाने घामावलेले हातपाय स्वच्छ धुतले व मातीची घागर भरून अलगत घेतली. व तो घरी निघाला. घरी देवपुजेला नित्य नदीचं पाणी सलग तिन वर्ष घालण्याचा त्याने केलेला प्राण होता. तो घागर घेऊन गावाकडे मार्गस्थ झाला. ओढ्याच्या वाटेपर्यंत येईतोवर चांगलाच अंधार झाला होता. अंधारी ती वाट ओळखीची असलेने तो झप झप चालत गावच्या वेशित पोहोचला. तोपर्यंत त्याला एक दिवा सुद्धा दिसला नव्हता. गावच्या वेशीत पिंपळाचे झाड होते. ते वेशीचे प्रवेशद्वार होते.. तेथे आल्यावर

 त्याच्या आज्जीने सांगितलेली पिंपळणीच्या भुताची गोष्ट आठवली. व तो गालातल्या गालात विनोदी हसू लागला. कारण म्हातारीनं सांगितलेल्या गोष्टीत रात्रीचे बारा वाजता दिवट्यांचा नाच व झिन्झ्या पसरून नाचणाऱ्या हाडळी व त्यांच्या करामती त्याने ऐकल्या होत्या. पण कित्येक वेळा रात्रीचे त्या झाडाखाली जाताना त्याने कधीच तो नाच पहिला नव्हता. त्या विचारातच तो पुढे घरच्या दिशेने चालू लागला. देवळातील घंटा ऐकू येत होती. गावातील माळकरी तिथे जमा झाले होते. त्यांचं भजन कीर्तन चालू झाले होते. शिवानंदाने तिकडे पाहिले व डोळे बंद करून अंतरमनाने नमस्कार केला. व पुढे चालला. बघता बघता तो अंगणात येऊन पोहोचला. अंगणात अनेक लहान मोठी फुलं व फळझाडे होती. काळ्याकुट्ट अंधारात घरात व तुळशी शेजारी लावलेले दिवे हाच काय तो उजेडाचा स्त्रोत होता. घरातून पार्वतिच्या कन्हण्याचा आवाज ऐकू येत होता. त्याने आपल्या खांद्यावरील घागर ज्योत्यावर नेऊन ठेवली. व अंगणातील बादलितील पाणी पायावर घेऊन आत आला. पार्वती विव्हळत होती. तिच्या शेजारी गल्लीतल्या बायका बसल्या होत्या. त्यात बसलेल्या त्याच्या आईचे लक्ष त्याच्याकडे गेले. ती त्याच्याकडे डोळे वटारून बोलू लागली.

“ बघत काय उभरलाईस, जा त्या गंगू सुईनीला बोलावून आण जा. एखादे दिवशी नदीच्या पाण्याऐवजी परसदारातील विहिरीचे पाणी घातलं असतास तर काय घरातील देव धोतर धरून पळून जाणार नव्हते. व आजच नडलं होत काय खोडव्याला पाणी पाजायचे. त्या गंगीला मगाठावून दहा निरोप धाडले. तरी ती उगवेना झालीय. तू आपला शेत शेत कर. मी मात्र निस्तरते घरातील गोष्टी जा आदी पहिला.”

इतक्यात वेलणकरांची सुंदरा म्हणाली,

“ गप्प बस म्हातारे, वेळ काय बोलतीस काय. तुम्ही जावा हो भावजी आम्ही बघतो पारुकडे.”

तसा शिवानंद घरातून बाहेर पडला. व लगबगीनं गंगू सुईनीच्या घरला निघाला. तिच्या घराजवळ पोहोचलाच असेल. तेवढ्यात गंगू सुईन बाहेर पडत होती. तिला पाहून शिवानंदला जरा बरं वाटलं.तो तिला म्हणाला,

“ काकू काय घोड पाठवाय हवं होत का?”

गंगू,

“ अरे, लेकरा मला काय एकच काम आहे व्हय, आताच थोड्या वेळापूर्वी शेताहून आले. मोळी लाकडाची घेऊन. म्हशीची धार काढली. तेच निघाले बघ. चहा सुद्धा घेतला नाही. मी पण बाईचं आहे. मला कळत नाही का? अशा वेळी काय करायला हवं ते. आता चल लवकर अशी झटक्यात पारुला रिकामी करते बघतच राहा.”

तशी ती दोघं कंदिलाच्या उजेडात चालू लागली. देवळात आता टाळ वाजायला लागले होते.

शिवानंद,

“ हरी भकतांचा मेळा भरला वाटत.”

तशी म्हातारीच्या डोक्यातील शीर झटकली. व ती शिवानंदाला म्हणाली,

“ त्या मेल्याना काम आहे कुठे, त्यानं चांगल सत्यवाच्या घाण्याला जुंपाय पाहिजे दिवसभर दुसऱ्यांना शिवा द्यायच्या, नको त्या चकाट्या पिटायच्या. अन् रात्री पापाचे प्रायश्चित्त करण्यासाठी पारायण करायचे. देवा पांडुरंगा यांना अक्कल दे थोडी.”

तेव्हा शिवानंद म्हणाला,

“असे बोलू नये काकू.”

“ अजून तुला खूप ध्याडे बघायचे आहेत. या डोईची केंस काय अशीच पांढरी झाली नाहीत. हू चल आता सरळ हो.” गंगू उत्तरली.

“ चालतो की पण तू अशी काय म्हणतेस.”

“ हे बघ बाळ, त्या ज्ञानु पाटलान विधवा बायजाची जमीन लाटली.”

तो शिरप्या आपल्या बहिणीला मुलबाळ होऊ नये. व आपल्याला तिची इस्टेट मिळावी म्हणून वेशितल्या म्हासोबाला रोज पाय पडतो. अन त्या तुक्यान तुझी जमीन कूळ कायद्याच्या नावाखाली काळबेळ करून नाही का लाटली. ते सगळे या भजनात आहेत बघ. जमलेत की नाहीत बोल आता.”

“ अग, काकू तो सगळा नशिबाचा भाग आला. चल आता.”

बोलता बोलता ते दोघे घरापर्यंत आले. गंगू तर आत मध्ये गेली. खोलीचं दार तीनं लावलं. आत गेल्या गेल्या म्हातारी तिला म्हणाली, “ गंगे तुला एवढा कसला भाव आलाय ग. माझी सून इथं विव्हळतेय अन तू एवढा उशीर केलास काय, मोटला जुंपली होती काय तुला.”

गंगू,

 “ हे बघ मला तुझ्याशी बोलायला वेळ नाही. वाद घालू नकोस.जा गरम पाणी आन जा.”

रात सरत होती. तसं गावातील मिणमिणते दिवे बंद होत होते. अंधाऱ्या रात्री फक्त पार्वतीच्या विव्हळण्याचा आवाज येत होता. शिवानंद जोत्यावर येरझार्या मारत होता. मध्यरात्रीचा प्रहर झाला. तरी देखील पार्वतीची सुटका झाली नव्हती. . मध्यरात्रीनंतर तिसरा प्रहर आला. व बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकू आला. शिवानंदाचा छोटा मुलगा व्यंकटेश झोपी गेला होता शेवटी गंगू सुईन अन् वेलंकरांची सुंदराबाई बाहेर आली.

सुंदरा, “ लक्ष्मी आली घरात.”

हे ऐकताच शिवानंदाला खूप आनंद झाला. कारण खूप वर्षांनी त्याच्या घरात मुलगी झाली होती. रात्रभर तळमळणाऱ्या म्हातारीने गंगुला विचारले.

“ पारू कशी हाय ग?”

गंगू,

“ आहे व्यवस्थित काळजी करू नको.”

तशी म्हातारी तडक उठून माजघरात गेली. पार्वती व बाळाला सुखरूप पाहून तिचा आत्मा थंड झाला होता. तिच्या पाठोपाठ शिवानंद ही आतमध्ये गेला. व आनंदी मुद्रेने त्याने पार्वतीकडे पाहिले. या सर्व त्रासाने ती शांत पडली होती. शेजारची हिरा व सुंदरा पाणी तापवून आणायला गेली. म्हातारी व शेजारील बायकका स्वयंपाकाला लागल्या. शिवानंद तिथेच बसून कधी बाळाकडे तर कधी पार्वतीकडे पहात होता. भर अमावस्येला मुलगी झाली. घरात लक्ष्मीचं आली होती. बाळबाळंतीनीची अंघोळ घालून व्यवस्था लावून घासभर जेवून बायका घरला गेल्या. तवा तांबड फुटायला लागल होत. कोंबड्यांच आरवन ऐकू येत होत. दिवस उजाडला. गावातील ओळखीच्या पाळखीच्या स्त्रिया येऊन बाळबाळंतीनीची चौकशी करून जात होत्या. दिवस सरू लागले.

पाचवा दिवस उजाडला. पाचवी पुजली गेली. मुटके व घुगऱ्या बनवून पाच घरच्या बायकांना बोलावून पूजा केली. बाराव्या दिवशी बारसे केले. पै पाहुण्यांना बोलावून मुलाला पाळण्यात घालायचे ठरले होते. गोड शिरा व जेवण केले. गंगू सूईन पण आली होती. तिला साडी नेसून पेरावा केला. बाळाला पाळण्यात घातले. त्याचे नाव काय ठेवायचं हे जमलेल्या बायकांनी शिवानंदाला विचारले. तेव्हा त्याने वज्रेश्वरी ठेवा असे सांगितले. बायकांनी पाच देवांची नावे घेऊन बाळाला पाळण्यात घातले. व बाळाचे नाव वज्रेश्वरी ठेवले. दिवसा मागून दिवस जाऊ लागले. पुढे वेलणकरांच्या घरात देखील पाळणा हलला. दामाजीपंत वेलंकरांच्या घरी खूप दिवसांनी पाळणा हलला होता. मुलीचं नाव स्नेहशांता ठेवले होते. पण सगळे तिला शांता म्हणत. मुलीला पाहून शांताची आई खूप खुश झाली. कारण तिच्या वांझोट्या पणावर फुल उमलले होते. त्यामुळे तिला नावे ठेवणाऱ्या स्त्रियांची तोंडे बंद झाली होती. दामाजीपंत खुश होते. मात्र त्यांच्या भावांचे व पै-पाहुण्यांचे तोंड पडले होते. कारण हे सगळे दामाजीच्या इस्टेटीवर डोळे ठेवून होते. सर्वांच्या आयत्या पिटावर रेगोट्या ओढायच्या मनसुब्यावर पाणी पडले होते. या एकट्या मुलीच्या जन्माने त्याच्या व त्याची राबणारी पत्नी यांना बांधणार असं कोणीतरी होत. दामाजी हा मूळचा गरीब देशाहून आलेला. तेव्हा शिवानंदान त्याला राहायला जागा दिली. गावोगावी फिरून त्याने सोनारकीचा धंदा केला. आता तो तालुक्याला आपली पेढी काढून आहे. पण आता मोठा पैसेवाला झाला म्हणून माणुसकी विसरला नाही. आडल्या नडल्यांसाठी मदत कराय नेहमी पुढं असायचा.

क्रमशः

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

कथा वाकाटखोर्याची भाग २५

 २५)दादाची सायकल लेखक :  निशिकांत हारुगले. व्यंकू आता खूप मोठा झाला होता. तो कॉलेजला जात असे. घराच्या गरीब परिस्थितीमुळे वज्रेला शाळा सोडावी...