कथा वाकाटखोर्याची भाग १०
१०)लागीर
लेखक : निशिकांत हारुगले
शांती व वज्रेतील अबोला मिटला होता. घरी आनंदात आलेल्या शांतीला पाहून तिची आई म्हणाली, “ काय शांता आज काय घबाड सापडलय वाटत. एवढी आनंदात आहेस.”
शांती म्हणाली, “ होय, सापडलेय मी जरा वज्रेकडे जाऊन येते.”
असे म्हणून तिन धूम ठोकली. तेव्हा तिच्या आईच्या लक्षात आले व ती बोलली, “ बापरे! या महाराणीत तह झाला. आता गावात धुडगूसच नुसता. गाव पेटवाय रिकाम्या झाल्या म्हणायच्या.”
तिच्या बोलण्याकडे लक्ष न देता ती वज्रेच्या घरी आली. तोपर्यंत वज्रा म्हशी बांधून आली. शांतीला पाहून म्हणाली, “ चल जाऊ परसदारी खेळायला.”
तेव्हा ती म्हणाली, “ नको चल वडाच्या झाडाखाली पारावर.”
त्या दोघींना एकत्र जाताना पाहून वज्रेच्या आईला व आजीला आनंद झाला. आजी म्हणाली, “ या दोघी बोलत नव्हत्या तेव्हा घर खायला उठायच. आता गुळात खोबरं घातल्यासारख वाटत.”
तेव्हा वज्रेची आई पार्वती म्हणाली, “होय खर हाय तुमचं.”
वज्रा व शांती वडाखाली खेळायला आल्या. तेव्हा त्यांना केरूअण्णाच्या दारात गर्दी दिसली. तिथे काय घडलंय हे जाणून घेण्यासाठी त्या गर्दीत शिरल्या. व वाट काढत पुढे आल्या. बायकांच्या घोळक्यात जाताना तानुबाई न्हावीन म्हणाली, “ काय नडलय बारक्या पोरांचं इथे जावा तिकडे खेळा जावा.”
तिच्याकडे लक्ष न देता त्या तशाच पुढे गेल्या. तेव्हा त्यांना केरुआण्णाची सून भिंतीला टेकून बसलेली दिसली. तिला साऊ मावशी वार घालताना दिसली. केरुआण्णाची बायको वटवट करत होती. तशी ती दातओठ खात मुठी आपटत तिला शिवा देत होती.
गोंद्याच्या हिरान पारू पाटलीनीला विचारलं, “ काय झाल ग हिला घुमायला.”
तेव्हा ती म्हणाली, “ सकाळी देवपुजेला फूले आणायला रखमा पाटलीनीच्या परड्यात गेली होती. तिथं पाय घासरून पडली. तवा रखमेच्या नवऱ्यान दंडाला धरून आणली. तेव्हापासून अशी घुमायला लागलीय.”
तेव्हा हिरा म्हणाली, “ मग काय तिच असणार चिंचणीवरची अवदसा माली. स्वतः माती खाऊन फास लावून मेली. अन् आता कोवळ्या जीवांना धरतिया.”
“ तर काय बाईसाहेब सहा महिने पण झाले नसतील लग्नाला. चुडा पण उतरला नाही बघ.” पारू पाटलीन उत्तरली.
इतक्यात केरु आण्णाची बायको म्हणाली, “ तुला घर घुसायला दुसर मिळालं नाही वाटत. माझ्यापुढे तुझ चाळ चालायचं नाहीत. आल्या वाटेने निघून गेलीस तर बर. नाहीतर राधा खेळवीन तुझी. ती पण वेताच्या काठीने. ह.सांगून ठेवते.”
असे म्हंटल्यावर तिची सून दात-ओठ खात म्हणाली, “ बघतेच मी तू मला खेळवतेस की मी तुला खेळवते. “ असे म्हणून तिने केसांचा पुंजका केला. व ती आपलं डोचक खांबनीवर आपटणार इतक्यात साऊमावसीन तिला धरल. व म्हणाली, “ हे बघ ही नाटक माझ्यापुढे चालणार नाहीत. जास्त दंगा केलास तर खरोसीला नेईन ह. काय पायजे ते मागून घे व आल्या पावली परत जा. असे बोलून तिने पार्वतीनं आणलेला महादेवाचा अंगारा तिच्या कपाळावर लावला. तेवढ्यात शिंद्यांचा दामू तिथे आला. व बारक्या मुलांना तिथून बाहेर पिटाळू लागला. तस वज्रा व शांती हातात हात धरून बाहेर आल्या. शांतीस बाहेर आल्यावर वज्रा म्हणाली, “ पाहिलस केरुआण्णाची सून काय बिचारीचे हाल.”
तेव्हा शांती म्हणाली, “ काय हाल बिल नाहीत तिचे, काय लागिर वगैरे नाही ह तिला. नाटकं आहेत नुसती. अशी भूत लागाय लागली असती. अन् ठेवलेला निवद खायला लागली असती तर चैनीच झाली असती त्यांची. केरू आण्णाची सून आधी कोकणातली. तिची नाटक कळायची नाहीत तुला. काल शेताला जाताना वटवटत होती. सासूला शिवा देत होती. या म्हातारीला उगळाच पाणी दावते म्हणून.”
“ काय भयंकर आहे नाही हे.” वज्रा बोलली.
“ मी ऐकलंय काल रात्री नवर्याशी भांडली. वेगळं राहूया म्हणून. नव्हरा ऐकत नाही म्हंटल्यावर व आपला डाव फसतोय म्हंटल्यावर लागीर झाल्याचं नाटक करतिया.”
तेव्हा वज्रा बोलली, “ खरंच काय?”
“ कोकणचं याड तुला कळायचं नाहीत. वज्राबाई. रखमा पाटलीनीच्या परसातील चिंचेच्या चिंचा मी कित्येक वेळा काढल्यात. मला का बर माली झपाटली नाही.परवा त्या शिरप्याच्या बायकोन बुट्टीभर चिंचा नेल्या कोळ करायला. तिला बर ही माली झपाटली नाही. व ही सतीसावित्री नाही का हिला झपाटली काय? चल तिकडे खेळूया, तेंच ते निस्तरू देत. काय तू तिथे जाऊन रामरक्षा म्हणणार आहेस?”
“ नाही बा. मी तिथे जाणार परत, चल तुझ बरोबर हाय. पण तुला हे सगळं कसं माहीत.” वज्रा बोलली.
“ ते आहे ना गावातील चालत बोलत वर्तमानपत्र, गणू पुजाऱ्याची सावित्री, ती काल आईला सांगत होती.”
“ ती होय, बर असुदेत चल जाऊया आपण खेळायला. “
त्या दोघी वडाच्या पारवर खेळू लागल्या. पण त्यांचा जीव रमेना. शेवटी त्यांनी खेळ थांबवला व त्या घरी गेल्या.
… … …. …
क्रमशः. पुढे…….
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा