गुरुवार, १० नोव्हेंबर, २०२२

कथा वाकाटखोर्याची भाग ११

 कथा वाकाटखोर्याची भाग ११

११) साकरीची शाळा सुटली

लेखक : निशिकांत हारुगले

सातवी इयत्ता पार पडली. आठवीहून पुढे तालुक्याला शिक्षणासाठी जावे लागे. तेव्हा सातवीचा निकाल लागला. मुले वर्गात जमली. गुरुजींनी निकाल वाटला. वज्रा, शांती, साकरीला चांगले मार्क भेटले होते. गुरुजींनी त्यांचे अभिनंदन केले. सर्व मुला-मुलींना पुढे कसे वागावे? याविषयी गुरुजींनी मार्गदर्शन केले. शेवटी त्यांचे डोळे पाणावले. मुलांनाही रडू आले. शेवटी निकाल व निरोप समारंभ झाला. आता आपण या शाळेत पुन्हा कधीच शिकायला येणार नाही याची खंत वज्रा व साकरीला वाटत होती. 

निकालपत्रक घेऊन मुले घरी चालली. साकरी, वज्रा व शांता पण चालली. जाताना त्यांच्यात पुढील शिक्षणाची चर्चा सुरू झाली. शांतीन आपण पुढे तालुक्याला शिकण्यास जाणार हे आधीच ठरवल होत. वज्रेच काही निश्चित नव्हत. कारण पुढील निर्णय तिचे वडिलच घेणार होते. साकरी मात्र नाराज होती. तिचे वडील पुढील शिक्षणाची परवानगी देतील असे वाटत नव्हते.

 चालत बोलत केवढ्यात घर आले हे कळलेच नाही. साकरी, वज्रा व शांतीचा निरोप घेऊन घरला निघून गेली. त्या दोघीही घरी गेल्या. जाताना मात्र संध्याकाळी वाज्रीच्या घरी खेळायला जमायचं ठरवल. घरात यायला दुपारचे दोन वाजले होते. घरी आल्यावर वज्रेने आपल्या वडिलांकडे निकाल दिला. व ती हातपाय धुवायला म्होरीत गेली. हातपाय धुवून ती बाहेर आली. तेव्हा वडिलांनी तिचे अभिनंदन केले. नंतर तिने स्वयंपाक घरात जाऊन थाबड्यातील जेवण घेतले. व जेवण केले. जेवताना अण्णा म्हणजे तिचे वडील शेजारी बसले होते. ते म्हणाले, “ वज्रा आता सातवी झाली पुढे काय करणार?”

ती म्हणाली, “पुढे काय म्हणजे?”

तेव्हा शिवानंद म्हणाला, “ पुढील शिक्षण गावी नाही. तालुक्याला जावे लागणार. त्यासाठी खर्च आला…”

आण्णाचे वाक्य पूर्ण होण्याअगोदर ती म्हणाली, “ तुम्ही मला शाळेत घालणार नाही का?”

“ तसे नाही बाळ घालणार की?” शिवानंद अडखळत बोलला.

तेव्हा वज्रा चिडली. व म्हणाली, “ का दादाला घालताना तेवढा पैसा खर्च दिसत नाही. व मला घालताना दिसतोय होय. ते काही नाही. मी पुढे शिकणार .जर का मला शाळेत घातले नाही तर मी घरातील काहीच काम करणार नाही बसा.”

तिचा अवतार पाहून शिवानंद गप्प बसला. मात्र आजी बोलली, “ अग, तू पोरीची जात. तालुक्याला ये-जा तुला जमेल का. त्यासाठी खर्च आला. आपली परिस्थिती बेताची शेतातील धान्य व दुधाचा रतीब एवढंच आपल उत्पन्न. म्हणून तुला विचारले.”

तेव्हा वज्रा हिरमुसली. ते पाहून शिवानंदाला वाईट वाटले. त्याने तिला पुढे शिकवण्याच ठरवल. त्या बदल्यात वज्रेन घरातील कामात मदत करायची. ठरल. आपल्याला पुढे शिकवणार म्हंटल्यावर वज्रेला बरे वाटले. तिने जेवण आटोपले. व ती परसदारी गेली.

सांज झाल्यावर शांती व साकरी वज्रेकडे आल्या. वज्रेच्या परसदारी त्यांनी सारीपाटाचा डाव मांडला. शांतीन वज्रेस विचारलं, “ आण्णांनी परवानगी दिली का?”

वज्रा म्हणाली, “ हो विचारलं.”

तेवढ्यात त्यांचे लक्ष शेजारील साकरीकडे गेले. तिचे डोळे टिचले होते. तेव्हा वज्रेन तिला रडण्याचे कारण विचारले. “ काही नाही ग मला आता परत तुम्हाला सकाळीच व संध्याकाळीच भेटायला मिळेल. कारण मला पुढे शिकता येणार नाही.”

शांती व वज्रेस् वाईट वाटले. पण त्याच परावलंबी असलेने काही करू शकत नव्हत्या. त्यांचा आता खेळात जीव रमेना. त्यांनी डाव बंद केला. व त्या आपापल्या घरी निघून गेल्या. वज्रा व शांतीने तालुक्याच्या शाळेत प्रवेश केला. वज्रेस घरातील कामे आटोपून शाळा जावे लागत होते. तालुक्याला त्या चालत ये-जा करत होत्या. वज्रा सकाळी लवकर उठून घरातील झाडलोट करायची. शेण काढून आजीला घरकामात मदत करायची. व नऊ वाजेपर्यंत सर्व आटोपुन शांतीसवे शाळेस जाई. 

साकरी मात्र घरकाम करी. व शेताला जात असे.तिच्या घरची परिस्थिती गरीब असलेने घरच्या जमिनीबरोबर खंडाची जमीन तिच्या घरचे करत. तिची उणीव वज्रेस शाळेला जाताना जाणवत असे. मात्र ती काही करू शकत नव्हती. शांता मात्र वज्रा आपल्या सोबत येते म्हणून खुश होती. त्या नियमित शाळेला जात असत. 

नवीन शाळा सुंदर व तिची इमारत सुसज्ज होती. पण तेथील शहरी वातावरण व तेथील मुलांचे इस्त्री केलेले कपडे व आपल ग्रामीण राहणे पाहून वज्रेस अवघडल्यासारखं वाटे. हळूहळू त्या वातावरणाची त्यांना सवय झाली. त्या दोघी व वाटेवर भेट नाऱ्या इतर गावच्या मुली संगे असत. नियमित तिन मैल चालून त्यांचा खूप व्यायाम होई. शांता जरा धाडशीच होती. तिच्यामुळे वज्रेस भीती वाटत नसे. तिच्यामुळे ती थोडी धाडसी होत चालली होती. पण कधीतरी शांती तिला भित्री भागुबाई म्हणायची. 

व्यंकूचे तास असलेने तो सायकली ने जाई. थोडया दिवसांनी शांतीने ही सायकल घेतली. त्या दोघी सायकल शिकल्या. व फेरा फराने त्या डब्बल शिट सायकल मारत जाऊ लागल्या.साकरीला रोज रानात जावे लागे. तिची शाळाच सुटली होती. एकदा शाळेतून परतताना गावच्या वाटेवरील शेतातून घरी जाताना साकरी दिसली. तिच्या डोक्यावर बुट्टी होती. त्यावर शिराट्यांचा भरा होता. तो घेऊन ती घरला निघाली होती. तिला वाटेवर वज्रेन हाक मारली. तेव्हा लाजून तिने पाहिले. तेव्हा वज्रेन विचारलं, “ काय करायला गेली होतीस.”

तेव्हा तिने रानात गेले होते. व घरी शेण काढायचे आहे असे सांगून ती घरी गेली. तिचे नजरेन भिडवणारे डोळे सर्व काही सांगत होते. तिच्यासाठी काहीतरी दुसरे कौशल्य शिकून मदत करायचे तिने व शांतीने ठरवले. 

साकरीसारख्या मुलीला हुशार असून देखील घरी राहावे लागत होते. कारण तिची घरची परिस्थिती बेताची होती. तिचे बाबा घरची तसेच दुसऱ्याची शेती करत. म्हसीचे दूध व शेतातील धान्य हेच काय ते उत्पन्न. त्यावरच संसाराचा सारीपाट चालत असे. 

वज्रेस आठवले. आपल्याही घरची परिस्थिती बेताचीच आहे. आपले बाबा आई चांगले म्हणून सर्व चाललय. नाहीतर आपली ही अशीच गत. हा विचार तिच्या मनात आला. व अंगावर शहारा उठला शांतीच मात्र बरे होते. तिचे बाबा सोनारकाम करत. या विचारात ती घरी गेली. व घरात गेल्यावर कामाला लागली.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

कथा वाकाटखोर्याची भाग २५

 २५)दादाची सायकल लेखक :  निशिकांत हारुगले. व्यंकू आता खूप मोठा झाला होता. तो कॉलेजला जात असे. घराच्या गरीब परिस्थितीमुळे वज्रेला शाळा सोडावी...