शुक्रवार, २५ नोव्हेंबर, २०२२

कथा वाकाटखोर्याची भाग १७

 कथा वाकाटखोर्याची भाग १७

१७)पेरणी

लेखक : निशिकांत हारुगले.

सर्व गावची शेत तयार झाली होती, पण पार्वतीच्या शेतात कोणीही औत घालण्यास तयार नव्हते. प्रत्येकाची काही ना काही अडचण होती. वाडीची औत पण आपल्या आपल्या कामात मग्न होती. पेरणीचे दिवस म्हंटले की औतवाल्यांची चांदीच.

शिवानंद व पार्वतीन कित्तेक लोकांची विनवनी केली. पण कोणीही शेतात येईना. यामुळे पाटील चांगलाच खुश होता. तो दिसेल त्याला म्हणे शिवानंदाला म्हणावं अवंदा रानात पेंडी काप.

बाजारचा दिवस उजाडला. पार्वती बाजाराला गेली. बाजारात तिला गावच्या मानलेल्या भावाची बायको हौसा भेटली. दोघीत इकडल्या तिकडल्या गप्पा झाल्या. शेवटी पार्वती म्हणाली, “काय सांगू बाई. रान पडायची पाळी आलीया. कोणी औतवाला येईना झालाय.रान पडायची पाळी आलीय.”

तवा हौसा म्हणाली, “ दोन दिवस कड काढ. मी लावून देतो मालकाला बैल घेऊन. जवा वैरण नव्हती तवा तून तूझ्या शेतातल पयान दिलस.

तवा आमची गुर जगली. अन् आता तुमच्या वाईट वेळेत आम्ही कस माग राहावं. काळजी नको सांगते मी यांना.” पार्वतीचा निरोप घेऊन हौसा गेली. पार्वती ही बाजार करून घरला आली. दोन चार दिवसात गावातील माणसांनी पेरा पूर्ण केला. सर्व लोक शिवानंदाची अगतिकता बघून हसत होती. रातीला पाऊस गडगडे पण पेठच्या हद्दीवर पडत नसे. पाटील मात्र ताठ तोरा दाखवत गावातून फिरत असे. बाजारानंतर चार पाच दिवसांनी भगटायला बैलगाडी घेऊन हौसेचा नव्हरा भीमा हजर झाला. भीमा आल्याचं पाहून पार्वतीला आनंद झाला. बैलगाडीतून उतरून झटपट चहा घेतला. व व्यंकूला घेऊन त्याने बैल शिवाराच्या दिशेनं दामटली. व पेरणीला माणसं बघायला पार्वतीला सांगितले. तिने नव्हर्याला वाडीच्या बायकांना टोकणाय मिळतात का ते पाहायला सांगितले. व्यंकू बैलगाडीत बसून रानाकडे निघाला. अमृतमहल बैल डिरक्या फोडत मेन गल्लीतन शिवाराच्या वाटला निघाली. उमा पाटलाच्या दारावरुन जाताना तो काळ तोंड करुन व डोळे वटारून पहात होता. शिवारात आल्यावर भीमान खळ्याच्या ओप्यात बैलं सोडली. व औताला झुंपली. सात मोटीच्या शिवारात काळवाट रान तयार करायला सुरवात केली. वज्रेकडून न्याहारी पाठवून तिन दिली. ती उभ्या उभ्या खाऊन त्यानं काम चालू ठेवलं. सकाळी दहा वाजेपर्यंत त्यानं रान तयार केलं. घरातील काम आवरून पारू भाकरी करायला बसली. इतक्यात शिवानंद आला सात बायका मिळाल्याचं त्यांनी सांगितल. वाडीची सुनंदा अक्का मधल्या वाटेन येताव म्हणाली. पारून परसातल्या चुलीवर झपाझप भाकरी केल्या. व छान पिठल केलं. व शिदोरी बांधली. व नव्हर्याला पेरणीचे भात व तिकाटन घेऊन शेताला जेवून पाठवलं. व आपणही आवरून तिने म्हातारीला जेवाय घालून ती रानात निघाली. जाण्यापूर्वी देवार्यावर तीन भाताची चिमट ठेवली. शेताला जाताना शांती व तिची आई आपणही मदतीला येतो असं सांगून गेली.

शेतात गेल्यावर भवरमागी पेरणीच पाट फिरवताना भीमा दिसला. पार्वतीला पाहताच तो म्हणाला, “आक्के इथल रान पेरून मळवात ये. आज सगळं रान तयार करून पेरुयाच.”

पेरणीच पाट मारून तो व व्यंकू माळवाच्या वाटेला लागलीत.

इकडे पार्वती व तिचा नव्हरा शिवानंद तिकाटन फिरवू लागली. थोड्याच वेळात वाडीच्या बायका आल्या. त्या अन् वज्रा टोकानाय लागल्या. बघता बघता दुपारपर्यंत त्यांनी सगळं रान पेरल व त्या एकत्र बसून जेवल्या. व सर्वजन मळवाच्या वाटेला लागल्या. मळवातील ओपे खूप मोठे होते. ती येईपर्यंत भीमाने एक एक करत मळवाच रान तयार करायला सुरवात केली. बैलं नेटाची असल्यान बघता बघता त्यानं दोनपतूर मळवाच शेत तयार केलं. एवढं रान पेरून होणार नाही हे भीमा ओळखून होता. त्याने पाट मारल्यावर अर्ध रान हाडगी घालूया म्हणाला. “ भिमाने बैलाना हाडगी बांधून अर्ध रान पेरल. वाडीच्या बायका कामाला घट्ट होत्या. शांती व तिची आईही मदतीला आली होती. त्यांनी बघता बघता सांजपतूर राहिलेलं रान टोकनून टाकलं. पाच वाजता सगळ रान टोकणल्यावर पार्वती वाडीच्या बायकांना कृतज्ञेन म्हणाली, “ बायाव लई मदत केल्यासा देवच तुमच्या रूपान धावून आला.”

तेव्हा वाडीची सुनंदा म्हणाली, “असं काय बोलू नका आमच्या वाईट वेळी तुम्ही आम्हाला जातपात न बघता मदत केलीसा. तुझी सासू देवावाणी हाय बघ. तिन कित्येक वेळा डागतील पयान व लाकडी आम्हाला दिली त. व आमची जनावर जोगली. व चुली पेटल्या आम्ही विसरू कशी. व सगळी घरला निघालीत. वाडीच्या बायकांनी निरोप घेतला. व त्या मधल्या वाटेनं घरला निघाल्या. भीमाने बैलं पाण्यावर सोडली. वेदगंगेच झुळझुळ वाहणार पाणी बैलानां सुखद गोडवा देत होत. पाणी पिल्यावर सर्व साहित्य बैलगाडीत भरलं. व ती सगळी गावात आलीत. एकदाचा पेरा सरला होता. गावात आल्यावर बैल मांगरात बांधली. त्यांना वैरण घातली. भीमा व शिवानंद बाहेरच्या सोप्यात आपले हातपाय धुवून बोलत बसलीत. दिवसभर पेरून वज्रेचे पाय दुखत होते. पण आई जेवण करणार होती. तिने धार काढायला वज्रेस सांगितलं. वज्रेन कशीबशी धार काढली. सगळ गोठ्यातील काम आटोपुन ती घरात आली. पार्वतीनं जेवण केले. सगळ्यांनी जेवून घेतले. जेवण झाल्यावर सगळी आरामात गप्पा मारत बसली होती. बाहेर वीज व्हायला लागली होती. वज्रा बाहेर जाऊन आली. ती म्हणाली, “ आई अंधारून आलंय. गड तटाला वीज व्हयालीया.”

वज्रा बोले पर्यंत गडतटाचा पाऊस पेठवर चालून आला. बघता बघता अंबेसरी कोसळू लागल्या. मातीला सुगंध सुटला.

तेव्हा पार्वतीला शेजारच्या बायक्काच बोलण आठवलं. ती रोज पार्वतीला टोमणे मारी. आज रातीला पाऊस पडणार. व तुझ रान टोकणायच राहणार.

तेव्हा पार्वती म्हणाली होती. “माझ शेत टोकनल्याशिवाय पाऊस काही येत नाही. अन् तसच झाल होत. पेठच्या शिवारात. पार्वतीच शेत पेरल्यावर पाऊस आला होता. पार्वती पेरा सरल्यान सुखावली होती. थोड्या वेळाने सगळी झोपी गेली. दुसऱ्या दिवशी भीमाने निरोप घेतला. जाताना पार्वतीने त्याला गाडीभर वैरण दिली. व ती घेऊन तो गावी निघाला.

अशा पद्धतीने पेरणी पूर्ण झाली.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

कथा वाकाटखोर्याची भाग २५

 २५)दादाची सायकल लेखक :  निशिकांत हारुगले. व्यंकू आता खूप मोठा झाला होता. तो कॉलेजला जात असे. घराच्या गरीब परिस्थितीमुळे वज्रेला शाळा सोडावी...