शनिवार, १८ जून, २०२२

९)डोंगराची मोळी

९) डोंगराची मोळी

लेखक : निशिकांत हारुगले.

              एम. ए. बी. एड.




  सह्याद्रीच कुशीत असलेल्या या पेठत सर्व लोकांना जमिनी काही समान नाहीत. काही लोकांना कमी काहीना जास्त अशा आहेत. तर काहींना तर जमिनीचं नाहीत. अशा या लोकांचं राहणं सह्याद्रीच्या दरी खोऱ्यात जास्त जात. पावसाळा म्हंटला की भात खाचरात राबायचं व चार महिन्यात वर्षभराच पिकवायच. व पुढचे सहा महिने लोकांच्यात किंवा आपल्या शेतातील राहिलेली कामे करायची. पेठेच्या गावातील अनेक कुटुंबे शेती करत असल्याने घरात चुलीच्या जळणाची समस्या उद्भवत असे. फेब्रुवारी महिना उलटला की डोंगरच फासल पाणी अटायचं. त्यामूळे शेत कामातून थोडा विसावा मिळत असे.

 लागोपाठ जत्रा यायच्या व शिमग्या पर्यंत घरातील जळण संपत असे.

तेव्हा घरातल्या बायांना राईतील तसेच भुदरगडला लागूनच असलेला डोंगर खुणावू लागे. व बायाबापड्या राईच्या डोंगराची पायवाट चढू लागत. अशीच एक कथा पेठेच्या गावातील बायांची लाकडापायी होणारी झडती कशी होते ती सांगते.

रब्बीचा हंगाम निघाला. व जत्रांचा ओघ सुरू झाला. गाव देव जोतिबाची पण जत्रा झाली. व गडच्या भैरवनाथाची सुद्धा.

रिकाम्या वेळात काय करायचं तर वाकळ शिवण चालू होई. अशाच या एकमेकींच्या शेजारील बायाबापड्या आपले घरकाम आटोपून शेजारच्या तानुबाईच्या परस अंगणात ओसरीत वाकाळ शिवत बसल्या होत्या. यामध्ये चव्हाणांची तानुबाई, गुरवाची सखूबाई, नाव्ह्याची बायजाक्का होत्या.

बोलता बोलता त्यांच्यात विषय निघाला. गुरवाची सखूबाई बायजाक्काला म्हणाली, “ काय सांगू बाई घरात जळणाचा एक तुकडा पण नाही. म्हाताऱ्यानं पावसात वाहून आलेला ओंडका आणला होता. तो पण संपला.”

तेव्हा बायजाक्का म्हणाली, “ तर काय बाई फेब्रुवारी महिन्यात माही झाली. पावन रावळं जेवलीत. त्यात माझी पण लाकड संपलित बघ. आमचा काय खंडोळ कमी हाय हो. जमली की चांगली भुतावळच नव्हं.”

तेवढ्यात तिथे पोऱ्याची सुंदरा आली. व म्हणाली, “ काय तान्याक्का वाकाळ शिवतेस म्हणं.”

तेव्हा गुरवाची सखू म्हणाली, “काय दिसत नाही.”

तेव्हा सुंदरा म्हणाली, “ दिसतेय की पण विचारायची एक पद्धत असतीया. कुणासाठी शिवतीस ग.”

तेव्हा तानुबाई म्हणाली, “ माझ्या लेकीसाठी.”

तेव्हा गुरवाची सखू म्हणाली, “तर.. लेकीलाच दे. तिचं तिथं खाऊन संपना एवढं असताना हीची पोर मुलखातनं राबून आणत्यात. व ही लागली लेकीला वाकाळ द्यायला.”

तेव्हा तानुबाई म्हणाली, “ काय सांगू जावई म्हणाला म्हणून, नाहीतर मला कुठली हौस. आलिया. तरुणपणात शिवल्या होत्या वीस पंचवीस वाकळी. आता नाही जमत. म्हटल कवा मागत नाही. आता मागितलीया तवा देऊया एखादी शिवून. “

तेवढ्यात सखू म्हणाली, “ तर तर तो लागला गोड गोड बोलायला, व ही लागली म्हातारी डोलायला तेच्या तालावर. शहरवस्तीला बंगला बांधला. चिमुटभर कुंकू लावायला तरी बोलावलं का तुला. राधानगरीचा चिक्कू कोंबडा त्यो कवा येताना पावाची पिशवी तरी आणतो का तो.”

तेव्हा म्हातारी म्हणाली, “ जाऊ दे तिकड. नाहीतर तेच्या खादिन कुठं माझी झाड व्हायचीत. पोरगी सुखात असली म्हणजे झालं.”

तेव्हा सुंदरा म्हणाली, “ सखू बोलती ते खर हाय. तेच्या घरात नाही काय तेची आई. तिला इत नाही का वाकाळ शिवायला. तुला लई व्याप बघ.”

तेवढ्यात बायजाक्का म्हणाली, “ ते सर्व जाऊ देत लाकडाचं काय करायचं. तेवढं सांग.”

तेव्हा सखूबाई म्हणाली, “ काय करायचं म्हणजे आणायची डोंगरातून नाहीतर काय.”

तेव्हा सुंदरा पण म्हणाली, “आमच्यात काटकीचा एक नार पण नाही.तवा परवा दिवशी सोमवार हाय. जाऊया काय लाकडाला.”

तेव्हा त्या बायकांच्यात चर्चा झाली. व लाकडाला जायचं ठरलं.”

सोमवारचा दिवस उजाडला. तस त्या सर्वजणी आपापली कामे आटोपून डोंगराला निघाल्या. प्रत्येकिन आपल्या घरातील कोयते व दोऱ्या घेतल्या या सर्वजणी डोंगराला निघाल्या. एकमेकींशी गप्पा करत त्या डोंगर चढू लागल्या. चालता चालता सखू तानुबाईच्या सुनेला म्हणाली, “ काय सुने माहेराला कधी गेलतिस का लाकडाला.”

सुनिता म्हणाली, “नाही बाई आमच्या गावाला डोंगर कुठला.सगळा सपाट माळ हाय. ऊसातील रानात खोडव्याबिगर कायपण मिळत नाही.”

तेव्हा बायजाक्का म्हणाली, “डोंगरची मोळी इल काय तुला.”

“न यायला काय झाल. मी आमच्या गावाला नदीच्या रानातनं वाड्याची वज्जी व उसाच्या मोळ्या वडल्यात. ऊसाच्या मोळ्या पण वडाय जाईते की. मी काय वज्ज्याला हलकी नाही.”

सुनिताच उत्तर ऐकूण बायजाकका म्हणाली, “ पोरगी घट्ट हाय. शंकर्याचा संसार लई चांगला करील.”

इतक्यात सुंदरा म्हणाली, “ तुझा नव्हरा लई साधा माणूस, कोण पण फसवल बघ तेला. तवा डोळ्यात तेल घालून संसार कराय पाहिजे बघ तुला. नाहीतर ही तानी लई जावई जावई करतेय. कधी नाही विचारणार जावई तिला. पण तुला जरा आधार हाय तिचा.”

सुनिता म्हणाली, “ तिच्या जिवावर तर पोर टाकून मला बाहेर पडता येत.”

अशा गप्पा मारत त्या डोंगर चढून गावमिरीच्या रानात आल्या. गवमिरीच रान सपाट असल्याने तिथं भाताची शेतं केली जायची. रानगव्यांच्या मुळे नुकसान होत असे. त्यात मोरांचा वावर असल्याने तर भात पिकाची चांगलीच मळणी व्हायची. गावमिरीला लागून असलेल्या जंगलाच्या रानात गेल्या. व लाकडाच्या मोळ्या काढल्या. व घेऊन आल्या. अस त्यानी आठवडा भरात भरपूर जळण गोळा केलं. हे तुळजाईच्या तुक्यान बघितलं. व त्यानं वन खात्याला चहाडी केली. एकदा जळणाला गेल्या असताना. त्या जळण काढू लागल्या इकडून तिकडून त्यांनी जळण जमा कराय सुरवात केली.

सखूबाई झाडावर चढण्यात तरबेज असल्याने तिन झाडावर चढून वाळलेला मोठा ढापा पाडला. आपल्या वज्ज्याची जोडणी केली. व सुनीताला म्हणाली, “ तू लाकड तोडून मोळी बांध. मी तुला पण एखादा ढापा बघते. अशा तऱ्हेनं त्यानी आपली वज्जी तयार केली. वज्जी केल्यावर त्या एका झाडाखाली जाऊन विसावल्या. आपापल्या भाकरी सोडल्या. एकमेकींना सांबार व कालवण वाटून त्यानी भाकरी खाल्या. व तेथील जवळच्या झरीच पाणी प्यायल्या. रानातली बोर, करवंद, तोरणं गोळा करून ते खात आपल्या वज्जा जवळ आल्या.सूनितांन त्यातली थोडी करवंद आपल्या मुलीसाठी पदरात बांधली.”

 बघून सुंदरा म्हणाली, “ काय नव्हऱ्याला नेऊन देतेस वाटत.”

तर सुनिता म्हणाली, “ नाही पोरसनी घेते.”

तेवढ्यात सखू गुरविन म्हणाली, “लई पोर पोर करू नकोस, स्वतच्या पोटाला देखील खात जा. या जगात कोण बी कुणाचं नसतं. माझं वय बघितलंस नव्हं. तुझ्या सासुबरोबर नांदायला आले. तवापासन हा वनवस हाय बघ. आदी सासूच्या राज्यात राबूनच मेले. व आता पोरग्याच्या राज्यात तरी डोंगराची मोळी चुकली नाही बघ.”

“ मी पण माझ्या पोरासनी तुझ्यासारखी जपते. या रानातनं पिशव्या भरून करवांद नेईते. पण आता लगीन झाल्यापासून बघितलस नव्हं, दोन दोन सूना असून आम्हा म्हातारा म्हातारीला राबाय लागतेय. मी मरायच्या आधी माझा नव्हरा कलमडला तर बर. नाहीतर त्याच वाळवान लागल माझ्या मागं.”

“बरं घ्या आता मोळ्या व चला लागूया गावच्या वाटेला.”

तेव्हा सुनिता म्हणाली, “ शेवटला देवान आईपण दिलंय नव्हं. तू अस बोलतीस. व पदराआडनं सांबार नेऊन लेकाला देतीस नव्हं. “

तेव्हा सखू म्हणाली, “ व्हय बाई खर हाय तुझं. कवा वनवास संपतोया देवा जोतिबाला ठावं.”

असे म्हणून वज्जी घेऊन त्या गावच्या वाटेला लागल्या. गावमिरीच्या शिवरातून त्या खाली उतरल्या. व विश्रांतीसाठी थोडावेळ मेसकाट्यांच्या दाटीच्या बेटाच्या जागेवर बसल्या.

इतक्यात तपासणीला निघालेला वनरक्षक त्यांना गाठ पडला. व त्यांना बघून म्हणाला, “ लाकड कुठून आणल्यासा मला माहीत आहे. खूप दिवस शोधतोय तवा आज सापडल्यासा मुद्देमालासह.”

तेव्हा सुनीता हळूच म्हणाली, “आता काय करायचं ग.”

सकू म्हणाली, “ गप्प बस भिऊ नको.“

तेव्हा तो आपल्या तोऱ्यात जास्तच बोलू लागला.या सगळ्या त्याच्याकडं पाहू लागल्या.”

त्यात बायक्का म्हणाली, “ एक वार माफ करा साहेब. आम्ही गरीब माणसं आहोत. पोटासाठी एवढं डोंगर कट्टा चढताव काय करावं.”

तेव्हा सुंदरा म्हणाली, “ एवढ्या डाव सोडा साहेब आम्ही काय वल्ली लाकड नाही काढलीत. वाळलेल ढाक पाडल्यात. तवा आम्हाला सोडा.”

तेव्हा तो दोनचार शिवा हासडत मोळीतील कोयते काढून घेऊ लागला.”

 तशी सखू म्हणाली, “ पाया पडते साहेब कोयत तेवढे काढून घेऊ नका.”

“तुमचे कोयते काढून घेतल्या शिवाय तुमची मस्ती उतरायची नाही.” तो म्हणाला.

कितीतरी वेळा गया वया केली तरी तो ऐकायला तयार नव्हता. व जास्तच अरेरावी करायला लागला.

ते पाहून सखू म्हणाली, “ लई सरकारच जंगल सरकारच जंगल म्हणतोस. सरकार कुणाचं गा आम्ही निवडून दिलेलच नव्ह. चार फुकण्या कांडग्या पाई गरीबाच कोयत काढून घेऊन बायकांवर पुरुषार्थ दाखवतोस व्हय रं.”

तेव्हा तो म्हणाला, “ एक तर चोरी व वरती बरी चाललीय शिरजोरी.”

तेव्हा सुंदरा म्हणाली, “ मगाठावण ओरडुन सांगताव की आम्ही वाळलेली लाकड काढल्यात. तुला एक तरी वल लाकूड दिसतय का. आम्ही गरीब मानस गावात धड घर नाही की शिवारात धड शेत नाही कुठं जावाव.”

तेव्हा तो म्हणाला, “ जावा की मसणात.”

तेव्हा बायजा म्हणाली, “ हे बघा मसणात तर सगळीच जात्यात. तू पण जाशील.”

शेवटी सखू म्हणाली, “ हे बघ आम्ही आता गावमिरीत हाय तू काय आम्हाला जंगलातली लाकड काढताना पकडलास काय. आमचं म्हणणं हाय की आम्ही जंगलातील लाकड काढली नाहीत. जा आता काय म्हणणं हाय तुझ.”

तेव्हा तो म्हणाला, “मग कुठली काढल्यासा सांगा.”

तेव्हा ती म्हणाली, “ ते तुला विचारायचा संबंध नाही. व एवढी रखवाली करतोस रात्रीची सागवानाची लाकड व चंदनाची लाकड कुठं पळून नेत्यात त्यांनां पकड की. तेव्हा पडत असशील डाराडूर घोरत. व आम्हा बायकांना बघून शड्डू ठोकतोस व्हय र.”

तेवढ्यात सुंदरा म्हणाली, “ मला काय ठाव नाही त्या लाकडविक्या तुक्यासंग तुझ काय संधाण हाय ते. जंगलातली सागवानाची लाकड कुठं जात्यात ते माहीत नाही व्हय आम्हाला. गुमाण कोयत दे नाहीतर उभा इतच जाळताव तुला..”

तेव्हा तो म्हणाला, “ सरकारी अधिकाऱ्याला अस बोलण गुन्हा हाय.”

तेव्हा सखू म्हणाली, “ होय गुन्हा हाय खर तर कायदा तुम्हाला पण लागू हाय. तुम्ही इकता ते चालत. व आम्ही पोटासाठी कांडग्या काढताव ते चुकीचं.”

हे बोलणं ऐकूण हुज्ज्जत घालत्याला त्यो वनरक्षक ओशाळला. व त्यांचे त्याने कोयते परत केले. व निघून गेला.”

तेव्हा सुनिता म्हणाली, “ आता तो आपली तक्रार करणार.”

सखू म्हणाली, “ सुने हा साधापणा सोड. बघितलंस काय कसा फुगलेल्या बैलागत आलता. व गेला कसा भिजलेल्या उंदरागत याला एकीच बळ म्हणत्यात.”

बायजा म्हणाली, “ आता काय या वर्षाची जोडणी झाली. उद्यापासनं खोडव्याला जायचं. इकडली वाट जगला वाचलाव तर पुढल्या वर्षी.”

लाकडाच्या मोळ्या घेऊन त्या घरला आल्या. त्यानी आता सुटकेचा निःश्वास टाकला होता. संध्याकाळ झाली. सांजेच्या जेवणाला सुनिता लागली. इतक्यात शेजारील मंगलाची पोरगी सांगत आली. तुम्हा लाकड आणायला जात्याली चाडी तुळजाबाईच्या तुक्यान केली. मगाशी मी दामू अण्णाच्या दुकानात गेले. तेव्हा संगप्पा आजाला तो सांगताना ऐकलं.

तेव्हा सुनिता चिडली. व तिने हातातलं काम सोडलं. व तिने सखुला सांगितलं. तशी सखू चिडली. व तिने लाकडाला जाणाऱ्या बायकांना बोलावलं. व हे सांगितलं. तशा सगळ्या बायका चिडल्या. व व एक एक लाकूड घेऊन तावा सरशा तुळजाईच्या घरात शिरल्या. व तुळजाईच्या सुनेला त्यानी विचारलं. ‘तुक्या कुठं हाय?’ तेव्हा ती म्हणाली, “ काय काम हाय?”

तेव्हा सखू म्हणाली, “ त्याची पूजा बांधायची हाय.”

इतक्यात त्यांना चुलवानाला बसलेला तुकाराम दिसला. त्यानी आत जाऊन त्याला जाब विचारला.

तसा तो म्हणाला, “ तुला कुणी सांगितलं म्या.. म्ह.. टल म्हणून.”

तेव्हा ती म्हणाली, “ त्या ऑफिसरन सांगितल जातोस काय विचारायला लेका.”

तुझ्या बाबन डबोल करून ठेवलंय तस आमच्या सासऱ्यान नाही. तुझ मड बसवलं ते.” असे म्हणत. त्यानी तुक्याला बडवायला सुरुवात केली. तस त्याची बायको मधी पडली. तशी तिला धरत सुनिता म्हणाली, “ तू गप्प बसलीस तर बर नाहीतर तुला पण निपाणी दाखवीन.”

शेवटी तुक्या बोंबलायला लागला. तवा तुळजा म्हणाली, “ सखे सोड बाई तेला. तुझ्या पाया पडते.”

तेव्हा सखू म्हणाली, “ म्हातारे तुझ्याकडं बघून याला आता सोडताव जर याने असा परत चमचा ढवळला तर डोचक्याची पाक केस निघतील तेच्या.”

शेवटी त्या सगळ्या त्या घरातून बाहेर पडल्या. व आपापल्या घरला निघून गेल्या.

अशा प्रकारे डोंगरची मोळी पेठतील लोकांच्या मनोरंजनाचे कारण बनली.

लेखक : निशिकांत हारुगले


रविवार, १२ जून, २०२२

८) नर्स बाई

८) नर्सबाई

लेखक : निशिकांत हारुगले.

         एम. ए. बी.एड.




पूर्वीच्या काळी डॉक्टरकीचे काम वैद्य लोक करत असत. राजेरजवाडे असोत. वा सामान्य माणसं निसर्गात मिळणारा झाडपाला हिरडा, बेहडा, तुळस या सारख्या औषधी वनस्पतींचा वापर करत असत. पुढे आधुनिक जगात वेगवेगळ्या रसायनांचा शोध लागत गेला. व झाडपाल्यांच्या औषधांना आयुर्वेदिक गोळ्यांचे रुप प्राप्त झाले. व उपाय म्हणून वेगवेगळ्या रसायनाने निर्माण गोळ्यांचा वापर होऊ लागला.

भारत सरकारने वेगवेगळ्या शिक्षणाद्वारे नवीन डिग्री तयार केली. त्याद्वारे नवीन डॉक्टर निर्माण झाले. पण हे डॉक्टर शहरी भागातच आपले बस्तान मांडून बसले. ग्रामीण भागात पेशंट कमी, त्या मानाने शहरी भागात पेशंट जास्त व इतर सुखसोयी त्यामुळे शिक्षणाला घातलेला पैसा पण वसूल होई. त्यामुळे डॉक्टर ग्रामीण भागात जास्त नसत. त्यामुळे ग्रामीण भागातील लोकांना उपचारासाठी एकमेव आधार असे तो तेथील नर्सबाईचा. व तिच्या जोडीला असणारा मलेरिया अधिकारी किंवा कुष्टरोग तंत्रज्ञ. हे त्रिकुटच ग्रामीण भागात जास्त राबताना दिसते.

नर्स व तिच्या बरोबर फिरणारा डॉक्टर पाहिला की त्यांच्या बाबत माणुसकी सोडून चर्चा करणारी माणसे आपण पाहतो. पण कोळशाच्या खाणीत जसे हिरे असतात. तसे आपल्या काळ्या केसांचे पांढरे पण होई पर्यंत प्रामाणिक राबणाऱ्या नर्सा अनेक आहेत.

अशा या क्षेत्रात राबणारी एक नर्स तिची ही कहाणी. माधुरी ही एक नर्स पेठत असणाऱ्या केंद्रावर तिची नेमणूक झाली. दिसायला देखणी , पश्चिम महाराष्ट्रात एका गरीब मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेली, व्यवसायाने ती नर्स होती. प्रतिकूल परिस्थितीमुळे ती या व्यवसायात पडली होती. अशा या नर्सची नेमणूक पेठच्या गावात झाली होती.

नोकरीवर रुजू झाल्यानंतर गावातील लहानापासून वृधापर्यंत सगळ्यांचे आरोग्य तपासणी , नसबंदीची कामे व इतर नेमलेली कामे करण्याची जबाबदारी तिच्यावर होती.

तिच्याकडे नवनवीन पेशंट येत असत. कधी क्वालरा कधी टायफॉइड व इतर त्यांना तपासताना तिची हसून दमछाक होत असे.

एके दिवशी ती गावातून फिरत असताना प्रत्येक घरावर नोंदणी करण्याचं व लहान मुलांच्या पोलिओसाठी नोंदीची ती काम करत चालली होती. गाव व आसपासच्या वाड्या ती फिराय लागली.

पेठतून फिरत एका घरावर ती नोंदणी करताना एक म्हातारी तिला बघून तिला म्हणाली, “ डॉक्टर बाई मला पण औषधं द्या.”

नर्स, “ काय होतंय ते सांगा.”

म्हातारी बाई, “ माझ्या की नाही पोटात तोडल्यासारख होतंय.”

नर्सन निरिक्षण केलं व ती म्हणाली, “ संध्याकाळी लावून द्या एखाद्या पोराला, देते औषध पोटावरील कळीचं.”

एका घरात तर तिला वेगळाच अनुभव आला. त्या घरातील स्त्रीचा नव्हरा नोकरीला बाहेरगावी गेला होता. त्यामुळे तिला करमत नव्हते. दारावर नोंद करताना तिने नर्सेला आत बोलावले. ती बाई नर्सला म्हणाली, “ बाई काय सांगू मला कससच होतंय.”

नर्सबाई “ कससच म्हणजे नेमकं काय होतंय.”

ती बाई, “ काय सांगू बाई मागल्या महिन्यात धनी होतं तवा झोप चांगली लागायची. पण आता झोपच येत नाही. मला करमत नाही.”

नर्स, “ अहो हे मानसिक दुःखन झाल. शारीरिक नाही. यावर माझ्याकडे इलाज नाही.”

अशा प्रकारे ती सर्व गावचा सर्वे करत गावाबाहेर एका मांगाच्या घरात आली. गावच्या खालच्या बाजूला असणारे हे मांगाचे घर म्हणजे दोन तीन सोपे. त्याला ताट बेळ्याच दार त्यावर लिहिणार कसं. म्हणून बाजूच्या भिंतीवर रंगीत खडूने तपासणी नंबर टाकला. व ती म्हणाली, “ घरात कोण आहे का?”

तेव्हा आतून एक बाई बाहेर आली. व त्या नर्सला बघत म्हणाली, “ काय हाय डागतरीन बाई.”

नर्स, “ घरात मुले किती हाईत. “

ती बाई लाजून म्हणाली, “ चार पोरी हाईत मला.”

घरामाग चामड धूणारा तिचा नव्हरा आला. व म्हणाला, “ चार पोरी हाईत, अजून पोरगा झाला नाही.”

माधुरी नर्स तेला म्हणाली, “ आव पोरगा आन पोरगी असा भेद करू नये. घरात नाही खायला आन उगाच ढीगभर पोर कशाला, शिवा आदी तिला. भारताची लोकसंख्या वाढतिया.”

तेव्हा तो मांग म्हणाला, “ वाढली तर वाढूदेत. आम्ही मेल्यावर तिटव धरायला नको का कोण.”

तेव्हा वाद न घालता ती पुढल्या घरावर गेली. अशीच ती नोंद करत पाटलाच्या घरला गेली. दारावर नोंद करत तिन हाक मारली. तेव्हा पाटलाची मुक्ताबाई बाहेर आली. व म्हणाली, “काय काम हाय हो.”

नर्सबाई, “ जरा डोसाच काम आहे. तेव्हा घरात मूल किती आहेत?”

तेव्हा पाटलीन म्हणाली, “ आमच्या घरात होय थोरल्याला दोन गंडे हाईत व धाकट्याला चार पोरी हाईत.”

नर्सबाई, “ दोन मुलांचा कायदा असताना इतकी पोर काढणं गुन्हा हाय. अशान तुमचं रेशन बंद होईल.”

मुक्ता पाटलीन म्हणाली, “ हू मला शहाणपण शिकवत्यात शाळा शिकली नसली तरी अक्कल हाय मला बाई, माझ्या धाकट्याला मुलगा नको.”

नर्सबाई म्हणाली, “ पण मावशी पुढला पोरगा होईल कशावरून. अन् पोरगी झाली तर.”

नर्सच बोलण तोडत ती म्हणाली, “ तुम्हाला काय ठाव पोरग्याच महत्त्व. पोरी पोरी काय कामाच्या आम्ही मेल्यावर वेशीतून रडत यायच्या व बारादिवसाला पातळ नेसायच्या. माझा पोरगा माझ्या मड्यावर लाथेन माती सारू दे. फिटल माझं. माझ्या माहेरच्या देवीला नवस केलाय मी. माझ्या धाकल्याला पोरगा होऊंदे, मी दंडवत घालेन म्हणून. माझी देवी मला पावल्याबिगर रहायची नाही.”

नर्स बाईला काय बोलावं ते सुचेना गुपचूप दारावर नंबर टाकला. व ती पुढल्या दाराला निघाली. मनातल्या मनात म्हणाली, “ देवा परमेश्वरा हीच्या पोराला पुढली पोरगीच होऊ दे.” व ती पुढे मार्गस्थ झाली.

लसीकरणाचा दिवस उजाडला. की तिची तारांबळ होत असे. गावातिल बायकांना दहा बारा वेळा तरी डोसला बुलवावे लागे. पावसाळ्याचे दिवस असले की साथीचे रोग थैमान मांडत. गावात कोंबड्यांना रोग आला तर लोक नर्सबाईकडे धाव घेत असत. आपल्या पोटात चावतय, डोकं दुखतंय, ताप आलाय अशी कारणे सांगून गोळ्या नेत.

पेठच्या गावात मे महिन्यात गरमीत कोंबड्यांचे रोग थैमान घालत आसत. व गोल मटोल आंडी घालणाऱ्या कोंबड्या झिंगायला लागत. तसेच बुळकायला लागत. पेठत राहणाऱ्या ज्ञानु जगतापला पण कोंबड्या पाळायची खूप हौस. गावातील कोंबड्यांच्या पाठोपाठ त्याच्या कोंबडीला पण रोगाने पकडले. त्या पाठोपाठ त्याचा कोंबडा पण झिंगायला लागला. त्याला काय करावे ते सुचेना. शेवटी त्याने नर्स बाईकडून गोळी आणायचे ठरवले. व तो नर्स बाईच्या सरकारी निवासस्थानी गेला. व म्हणाला. की आमच्या आईला ताप आलाय. व त्यावरील गोळी द्या. तेव्हा नर्स बाईने विचारले, “ केव्हापासून ताप आलाय.”

तेव्हा ज्ञानु म्हणाला, “ मघासी शेतातून आली. तेव्हापासून ताप आलाय. व त्यावर गोळी द्या.”

तेव्हा नर्सबाई तेला म्हणाली, “ रक्त लगवी तपासायला पाहिजे. मग औषध देता येईल.”

तेंव्हा तो म्हणाला, “ एवढ्याशा तापाला कशाला पाहिजे रगात, द्या की गोळी एखादी.”

तेव्हा नर्स बाईन आपल्या जवळील दोन गोळ्या त्याच्या हातावर टेकवल्या. तो घरला निघून गेला. दुसऱ्या दिवशी नर्सबाई वाडीच्या गावांना तपासणीसाठी निघाली. तेव्हा वाटेत तिला ज्ञानुची आई भेटली. तेव्हा तिने तिला विचारले. की काल तर ताप होता. व आज कुठं गेला होता. औषध घेतल्यानंतर एक दिवस तरी विश्रांती घ्यायची.”

ती म्हणाली, “ मला बरं नसायला काय झालं. चांगली हट्टी कट्टी हाय.”

तेव्हा नर्स म्हणाली, “ मग ज्ञानु काल तुमचं नाव सांगून कोणाला गोळ्या घेऊन गेला. तेव्हा ती काही न बोलता निघून गेली. सर्वेवरून येताना ज्ञान्याला खेळताना तीनं बघितला. तेव्हा ती तेला म्हणाली, “ ये ज्ञान्या काल आई आजारी आहे. म्हणून खोटं सांगून गोळ्या आणल्यास नव्हं. काय केलंस त्या गोळ्यांचे.”

इतक्यात तिथे खेळत्याला पवाराचा गणू म्हणाला, “ बाई त्यानं ती गोळी आपल्या झिंगत्याल्या कोंबड्याला घातली. त्त्यो बघा कोंबडा झाडाखाली बसलाय.”

नर्सबाई चिडली व तेला म्हणाली, “ व्हय रे गाढवा इथ माणसाना द्यायला गोळ्या मिळत नाहीत आन तुझ आपल बर चाललय. ये आता परत गोळ्या मागायला.तुला दाखवतो.” असे म्हणून ती आपल्या रूमवर गेली.

सरकारी नियमानुसार ऑपरेशन टार्गेट पूर्ण करावं लागतं असे. त्यामुळे ती इकडल्या तिकडल्या पेशंटना गोळा करत असे. पण पुरुष नसबंदी म्हंटल की आपल्या पुरुषत्वावर हल्ला समजला जात असे.

एकदा सरकारी नियमानुसार पुरुष नसबंदीची केस हवी होती.तेव्हा गावातल्या तसेच वाडीतल्या अनेक पुरुषांची चौकशी केली. पण कोण तयार नव्हता. शेवटी एक दोन मध्यमवयीन माणसाना तयार केलं. ती ऑपरेशनला घेऊन गेली. तेव्हा डॉक्टर तिला म्हणाला, “ यासनी कशाला घेऊन आल्यासा यांची काय झाड व्हायचीत , आताच मर्तुकडी दिसत्यात.”

ती डॉक्टरला म्हणाली, “ हे बघा दोन पेशंट पाहिजेत ना मग हे घ्या. नाहीतर माझ्याकडे पेशंट नाहीत.उगाच वाडाचार लावू नका.”

तेव्हा त्या डॉक्टरने त्यांची नसबंदी करायला घेतली. तेव्हा असे जाणवले की, त्यांची आधीच नसबंदी झाली होती. डॉक्टरने तिला चांगलेच धारेवर धरले.

नर्स चिडून म्हणाली, आता मी काय त्यांना तपासून आणायचं राहिलय. आधी पुरुष नसबंदीची केस मिळत नाही. व मिळाल्या तर या अशा आम्ही काय करावं. वरच्यासणी नुसतं बोलता येते. त्या अधिकाऱ्याना म्हणा आधी तुमची नसबंदी करा. व मग आमच्याकडे केसेस मागा. डॉक्टर त्यावर गप्प बसला. व त्या दोघांची नोंद घेतली. व त्याना अनुदान दिले. व रिकामा झाला. सरकारी अधिकारी म्हणजे वार वार बदल्या या ठरलेल्या त्यानं वैद्यकीय अधिकारी म्हंटले म्हणजे बदली नसेल असे होणारच नाही. सरकारी हॉस्पिटल मधील डॉक्टरची बदली झाली. व त्या ठिकाणी एक साखरदांडे नावाचा अधिकारी रुजू झाला. तो जरा रंगेल असल्याने बायकांच्याकडे पाहण्याचा त्याचा दृष्टीकोन विचित्र होता. नेहमीप्रमाणे माधुरी नर्स रिपोर्ट जमा करणेस आली. तेव्हा तिला पाहताच याच्या मनात विचित्र विचार आले. व हा रंगेल चेंडू लागला की गोंडा घोळायला. मुद्दाम एखाद्या सामान्य केसची जास्तच चौकशी करणार. त्यातून लगट करायचा प्रयत्न करायचा. कोणत्या न कोणत्या कामासाठी हा तालुक्याला बोलवायचा. याच्या बोलण्याने नर्स जाम वैतागून गेली होती. तिला अवघडल्या सारखं व्हायचं. पहिलं ज्या सरकारी दवाखान्यात अगदी आनंदात जायची तोच आता जेल सारखा वाटाय लागला होता. त्याच्या या वागणुकीमुळे सगळे डॉक्टर व इतर स्टॉप तिच्याकडे संशयाने पाहू लागला.

तिच्या बरोबर काम करणारा मलेरिया अधिकारी तिला डिवचून बोलू लागला. एकेदिवशी त्या मलेरिया अधिकाऱ्याने तिला खुणावले. तेव्हा तिने त्याच्या एक कानफटात लगावली. तिचा नाजूक हात असा जोराचा बसला की एखाद्या राकट माणसाचा बसावा. त्याने त्याला दिवसाच्या चांदण्या दिसायला लागल्या..तेव्हापासून तो तिच्या पुढ्यात एखाद्या मांजरासारखा राहायला लागला.

आपल्या शुद्ध चारित्र्यावर हा डाग पडतोय. तेव्हा या साखरदांडेचा कारलेदांडा करायचा व याचा एम बी बी एस डिग्रीचा नक्षा उतरायचा चंगच माधुरीने बांधला. एके दिवशी तिने आपल्या नव्हर्याल हे सगळं सांगितलं. व यावर उपाय काय करायचं ते ठरवू लागली. तेव्हा तिच्या ध्यानात आले. की तिच्या नव्हत्याच्या एक राकट मित्र संजय जो भांडखोर आहे त्या द्वारे याला धडा शिकवायच तिने ठरवले.

एके दिवशी तिने संजयला जेवायला बोलवून घेतले. व चांगला मटणाचा बेत केला. जेवता जेवता त्यापुढे विषय काढला. तेव्हा संजय म्हणाला, “माधुरी ताई तो डॉक्टर कधी रिकामा असतो ते सांग.”

माधुरीने आधीच माहिती काढली होती. तिने सांगितले. की तो रोज सकाळी पालीच्या घाटाकडे फिरायला जातो. तेव्हा संजू म्हणाला, “ मग काम फत्ते होणार.”

दुसऱ्या दिवशी पालीच्या राईच्या वाटेला संजू व त्याचा मित्र गाडी घेऊन भगटायला थांबले. गाडीची नंबरप्लेट काढली होती. थोड्या वेळाने धावत घाटाकडे निघालेला डॉक्टर दिसला. संजयचा मित्र मागे जाऊन त्याला म्हणाला, “ नमस्कार साखरदांडे डॉक्टर साहेब”

डॉक्टर म्हणाला, “ नमस्कार.”

तो डॉक्टर आहे याची खात्री पटताच. त्याने संजयला खून केली. तसा संजय मागून आला व डॉक्टरच्या डोक्यात टपली मारली. व रस्त्यावर कोण नाही बघून बाजूच्या झाडीत डॉक्टरला ते घेऊन गेले. डॉक्टर घाबरला, “ तुम्ही कोण आहात.”

इतक्यात संजय थोबाडात एक लगावली. व म्हणाला, “ बायकांच्या लई खोड्या काढतोस, पेशंट असो नर्स असो लई वाघटा सारख्या जिभल्या चाटतोस." असे म्हणून बडिवला. व ते निघून आले.

त्या दिवसापासून त्याचे वागणे बदलले. बायकांकडे तो नजर वरकरून बघायचे सोडाच. माधुरी नर्सबाई न म्हणता नर्सताई म्हणू लागला. थोड्या दिवसांनी त्याने बदली करून घेतली.

थोड्या दिवसांनी माधुरी नर्सेची पण बदली झाली. व ती सुद्धा आपले बस्तान गुंडाळून पेठचं गाव सोडून आपल्या बदली झालेल्या ठिकाणी गेली. व आपल्या आयुष्यातील आठवणी तीनं पेठत ठेवल्या.

लेखक. : निशिकांत हारुगले.


शुक्रवार, १० जून, २०२२

७) बसवाण, बैल, महादेवाचा नंदी

 ७) बसवाण

               लेखक : निशिकांत हारुगले.

                एम. ए. बी. एड.




दख्खनच्या सह्याद्रीच डोंगर कप्यात शेताची खाचर डोलत होती. त्याच्या कुशीत वाहणारी वेदगंगा आपल्या काठावरील अनेक गावांना सुखावत चालली होती. तिच्या कुशीत अनेक वाड्या व गावे गुण्यागोविंदानं नांदत होत्या. पेठेच्या गावाला देखील असाच शिवार होता जसा गावाच्या खालती तसाच तो गावच्या वरती देखील होता. शिक्षणान जरी सुशिक्षित पण आलं असल तरी बरेच जन शेती करत होते. त्या पैकी एक पांडुरंग पवार. हा देखील शेती करी. तशी त्याला लहानपणापासूनच शेतीची आवड, त्यामूळे शेतात राबणारी बैलं म्हणजे त्याचे सवंगडी. लहानपणापासून याच्या बैलगाडीत बस. त्याच्या गोठ्यात खेळ, कधी मातीची बैलं बनव. असा सगळा खेळ खेळत तो लहानाचा मोठा झाला.

पुढे त्याच लग्न झालं. घरची जबाबदारी अंगावर पडली. व ज्या बैलांशी खेळत तो लहानाचा मोठा झाला. तिच बैलं त्याच्या जीवनाचा आधार झाले. घरच्या गाईची पाठी छान बैल तयार केली होती. पण बहिणीच्या नव्हऱ्याला हवी असल्याने त्यान ती देऊन टाकली. आता नवा जोड घ्यायचा तर पैसे हवेत. म्हणून घराच्या शेताबरोबर लोकाची शेत त्यानं कसायला घेतली. व सुगी होताच धान्य विकून आलेल्या पैशात बैलं घ्यायचं त्यानं ठरवलं. पेठेच्या शिवारात अनेक प्रकारची बैल असत. पण पांडबाला आपली बैलं नंबरी हवी होती. म्हणून त्यानं संकेश्वरच्या बाजारातून बैलं घ्यायची ठरवलं. त्या दृष्टीनं त्यानं रुपयांची जमवाजमव केली. व आपला मित्र हरबासोबत तो बैलं घ्यायला निघाला.

बाजाराच्या दिवशी तो तालुक्याच्या स्टँडवर आला. सोबत हरबा पण होता. गडहिंग्लजला चाललेली गाडी त्यांनी पकडली. थोड्या वेळानं गाडी निघाली. पाल घाट लवंडून गाडी चिकोत्रा खोऱ्यात उतरली. पांगीर पाटीवर काही उतारू उतरले. तर काही गाडीत चढले. एक म्हातारा लगबगिन चढला. व हरबाजवळ बसला. व म्हणाला, “गाडी कंच्या गावाला जाती.”

हारबा, “ पाटी वाचली नाही का?”

वाटसरु, “ नाही व मला जरा कमी दिसतं.”

हरबा, “ गडहिंग्लजला जाती. “

वाटसरु, “ तुम्ही कुठं चालल्यासा.”

हराबा, “ आदी तूम्ही कुठं जाणार ते सांगा.”

वाटसरु, “ मी उत्तूरात उतरणार हाय. जरा डुलकी लागती हो मला. उत्तूर आलं की सांगा. नायतर मागल्या वानी नको. गडहिंग्लजातच जाग यायची.”

हरबा, “ मी उठविन म्या चाललोय गडहिंग्लजला.”

तो थोड्या वेळानं घोराय लागला. उत्तूरात आल्यावर त्याला जाग केलं. व त्याला आदी उतरला. व दुसरीकडं बसलेल्या पांडबाला जवळ बसायला बोलावलं.

हरबा, “ काय त्या म्हाताऱ्याचा सूर कशी बायको नांदत असेल देव जाणे.”

पांडबा, “ गप्प लेका तू बी घोरतोस की.”

हरबा, “ माझी तिनची मोटार कुठं व ही दहाची कुठ.”

एकच हास्या पिकला.

गाडी गडहिंग्लजात दाखल होताच. त्यानी पहिल्यांदा उपहारगृह गाठलं. भजी पावाची ऑर्डर दिली. ती येताच नाष्टा आटोपून ती बील भागवून स्टँडवर आलीत. व संकेश्वर पाटी वर आलीत. तिथं अनेक कन्नड बस होत्या. त्याकडे पाहत

पांडबा, “ हरबा यातर सगळ्याच जिलब्या हाईत. कोणत्या बशीत चढायचं.”

हरबा, “ थांब कंडेक्टरला विचारू आधी.”

मग त्यानं दोन चार एस्टींची चौकशी केली. शेवटी त्यांना संकेश्वरला जाणारी बस मिळाली. व तेनी थेट संकेश्वर गाठलं.

संकेश्वरचा बाजार भरला होता. ती चौकशी करत करत. जनावरांच्या बाजारात दाखल झाली. त्याना काय करावे सुचेना सगळेच कन्नड बोलणारे. ते कावरे बावरे होऊन इकडे तिकडे फिरुन बैलं बघू लागले.




त्याने बघून एकजण जवळ आला व कन्नड मध्ये बोलला.

तेंव्हा हरबा , “ ये बाबा मराठीत बोल तुझं कायबी समजत नाही.”

तेव्हा तो म्हणाला, “ काय बसवाण घ्यायचय.”

हरबा, “ होय, बैलच घ्यायची हाईत. पण आम्हाला या लोकांची भाषा समजत नाही.”

“एवढच नव्हे, मी देतो जमवून पण मला हजार रुपये कमिशन पाहिजे.” तो म्हणाला.

हरबा, “ पावणं आम्ही तुम्हाला येड वाटलाव काय. नको आम्हाला तुमच्या कडन बैलं. आमचं आम्हीच बघतो.”

ते दोघे बाजूला गेले. बाजारात हिंडून बैल बघू लागले.काही पाडी दोन दाती तर काही चार दाती , शेपटीचा गोंडा, अंगाच कांड बघत ते निघाले. शेवटी त्यांनी एक बैलजोडी हेरली. बैलं दिसायला वक्राकार शिंगाची करड्या रंगाची. दिसायला झ्याक त्यानं आपल्या भाषेत त्या पाड्यांचा दर विचारला. त्या माणसानं पंचवीस हजार सांगितला. दर जास्त पाहून ते बाजूच्या जोडीला बघू लागले. थोड्या वेळानं ते दोघे एका बाजूला गेले. हरबा, “हे बघ पांडू जर आपल्या दरात जोडी मिळाली तर घ्यायची. नाहीतर निघायचं. थोड्या वेळानं तो मघाचा कानडी हेड्या पुन्हा त्यांच्याजवळ आला. “ हे बघ मामा मला जर सातचे रुपये देत असशीला तर तुम्हाला बैल जमवून देतो.”

पांडबा, “ हे बघ तू जर ती करड्या रंगाची बैल चौदा हजारात जमवून देत असशिल तर तुला पाचशे रुपये कमिशन देईन.”

“काय राव चौदा हजाराला ऐक बैल तरी येईल काय?.”

हरबा, “ मग तुझी बैलच नकोत. चल पांडू जाऊया आपल्या भागात बघू एखादा जोड मुरगुडच्या बाजारात.”

 असे म्हणताच तो त्यांना थांबा म्हणाला, व त्या बैल मालकाकडे गेला कानडीत बोलचाल झाली व पंधरा हजार चारशेला ती बैल ठरवून त्यानं दिली. बैलं घेतल्यावर त्याला पैसे दिले. व मध्यस्तीला पाचशे रुपये देऊन व्यवहार बाजारात नोंद केला. व बैल घेऊन ती बाजारातून बाहेर पडलीत. आता थोडेच पैसे शिल्लक होते .

बाजारातून बाहेर पडताना त्या मध्यस्तान विचारलं, “काय ट्यांपो गाठून देऊ का.”

तेव्हा हारबा म्हणाला, “ नको पावन, इथ भडगावात आहेत पावन आमचं त्यांचा टेम्पो हाय की.”

असे म्हणुन ती गडहिंग्लजच्या वाटेला लागलीत. जवळ पैसे कमी असलेने त्यांनी चालत जायचं ठरवलं.”

थोड अंतर गेल्यावर पांडू म्हणाला, “ मगाशी टेम्पो ठरवला असता व घरी गेल्यावर पैसे दिले असते तर चालले असते की.”

हरी, “ चल गप हा आधी कारडी मुलुख यांचा काय नेम कुठतरी न्यायची व लुटायची.”

“मग आता गावी कस जायचं.” पांडबा म्हणाला.

“ कस म्हणजे चालत वाटेत कुणी विचारलं की सांगायचं पुढल्या गावी चाललोय म्हणून.” हारबा म्हणाला.

चालत चालत ती दोघ गडहिंग्लजला आलीत. एका हॉटेल बाहेर थांबून तेथून थोड्या चपात्या व भाजी घेतली. व थोडं पाणी पण आपल्या जवळील कातडी पाण्याच्या पिशवीत घेतलं. व ती आपल्या वाटेला लागलीत. पुढे वाटेला एका शेतात त्यांनी जेवण केलं. व उत्तूरच्या वाटेला लागलीत वाटेतील ओढ्यातील पाणी बैलांना पाजलं. बैलं चांगलीच धापली होती. त्याना सोक पडला होता. पाणी प्यायल्यावर त्यांना बर वाटलं. ती पुढे वाटेला लागलीत. वाटेत भेटणारी लोक बैलांची चौकशी करत होती. उत्तूरजवळ आल्यावर एका माणसान विचारलं, तो दिसायला काळसर होता.

“ बैलं आणली वाटत.”

हारबा, “ व्हय आणल्यात.”

थोड्या वेळानं त्यानें पुन्हा विचारले.

“ कोणत्या गावाला चालल्यासा.”

तेव्हा पांडबा म्हणाला, “ उत्तूरला चाललोय.”

पुढे ती निघालीत. थोड्या वेळात उत्तुर पार करून पिंपळगाव पाटी आली. आपल्या भागात आल्यामुळे त्यांना बर वाटलं. पिंपळगाव यायला चांगलाच अंधार झाला.

हरबा पांडबाला म्हणाला, “ एकदास आलो आपल्या भागात, या भागात वाटमाऱ्या होतात. आता मांगणूर पार केलं म्हणजे झाल.”

मांगणूर पार करत पाल गाठाय चांगलेच बारा वाजले. कुठून तरी जंगलातून कोल्हेकुई ऐकू येत होती. आता अंधाऱ्या वाटेनं चालन कठीण झाल होत. हारबा पांडबाला म्हणाला, “हे बघ पांडू चालून पाय दुखायला लागलेत. तवा आपण आपल्या पार्वतीकडे मुक्काम करूया.”

पांडबा, “ हे बरं हाय की.”

तेव्हा ती सर्वजण पार्वतीच्या घराकडे निघाली. पालीच्या मध्यावर पार्वतीच घर होत. तिथं गेल्यावर हहारबन पांडबाच्या हातात बैलाची दोरी दिली. व त्यानं पार्वतीच्या दारावर थाप मारली. रात्रीचं बारा वाजता घरावर थाप पडल्याने थापेच्या आवाजाने पार्वतीचा नव्हरा उठला. व दार उघडायला निघाला. तेंव्हा पार्वती म्हणाली, “ काय बाई म्हणावं या बाप्ययाला राती येळच कोण पणं थाप मारलं. रात्रीचं बारा वाजले. भुतावळ उठली असलं. झोपा गप्पवाणी.”

तो पुन्हा माग येऊन अंथरुणावर बसला. तेव्हा दारावर पुन्हा थाप पडली. तेव्हा तो म्हणाला, “ कोण हाय,”

हरबा, “ मी हाय हारबा पेठचा पावणा.”

तेव्हा पार्वती म्हणाली, “ आव, भुताटकी असलं ती, एवढ्या रातीला आमचा दादा कशाला येईल. इथं. “

हरबा, “ ये पारे असली कसली झोप लागली तुला.” पार्वती खाडकन उठली. व अंगावरली वाकाळ बाजूला सारत नवऱ्याला म्हणाली, “ चला बघुया कोण हाय ते.”

पार्वती अन तिचा नव्हरा दार उघडायला गेले. दाराजवळ जाताच पार्वती म्हणाली, “ दादा तू असशील तर दारावर चारवेळा थाप मार व राम म्हण.”

हरबान हसतच दारावर चारवेळा थाप मारून राम म्हणाला. पार्वतीची खात्री झाली. तिनं नव्हऱ्याला दार उघडायला लावलं.

दार उघडताच हारबा तिला म्हणाला, “ पेठत असताना बाच्यामागं रातइरचं पाणी पाजायला जाताना तुला भीती वाटत नव्हती. आन आता कुठून हे खूळ डोक्यात बसलय तुझ्या.”

पार्वती म्हणाली, “ तवा आपला बाबा असायचा संग. तो म्हणजे देव माणूस कसं त्या बरोबर कुठं पण जायलां भ्या नव्हतं वाटत. पण आता….”

अस म्हणत तीन बोलण तोडले.

पार्वतीचा नवरा म्हणाला, “ रात्रीचं कस येणं केल्यासा. सगळ कुशल हाय नव्हं…”

हारबा म्हणाला, “ पांडबाला बैल घ्यायची होती. म्हणून संकेश्वरला गेलतो. येताना चालत अलाव मोजक पैकं होत नव्ह. आदि तो कारडी मुलुख. फसवा वाटमाऱ्या होतात. तवा सगळ्यांना गंडवत आलाव. रात लई झाली.

 तवा तुझ्यात मुक्काम करावं म्हणून आलावं. बरं आता येळ नको बैल तेवढी गोठ्यात बांध व आम्हाला कायतरी वाढ बाय. कावळ कोकलायल्यात पोटात. पांडू हाय बैल घेऊन दारात.”

पार्वतीनं नव्हऱ्याला मांगराच दार उघडायला सांगितल. पांडबान बैल बांधली. त्यांना पाणी पाजून वैरण घातली. बैल बघून पार्वतीची म्हस नाचाय लागली. ती घाबरली होती. तशी पांडू व पार्वतीच्या नव्हर्यान बैलं आकडूनच बांधली. व दोघ घरात आली. हरबा व पांडू न्हाणीघरात जाऊन हातपाय धुऊन आलीत. तोपर्यंत पारून चुलीवरच्या शिक्याच्या थाबड्यात बघितलं. त्यात एक भाकर होती. तिन गोबर गॅस पेटवला. व दोन भाकरी टाकल्या. त्याच तव्यात झूणका केला. व ताट तयार करून घोंगडं अंथरले. व त्यांना वाढलं.

लागलीच थोडा असणारा भात व वरण्याच्या दाण्याचं कालवण पण वाढलं. ती दोघं जेवू लागली. त्यांना पाणी देण्यासाठी ती डेरक्याजवळ गेली. फळीवरचे तांबे काढून डेरक्यात बुडिवलं. तसा डूबुक डूबुक असा आवाज झाला. डेरक्याला पांढर कापड गुंडाळल होत. त्यामुळे त्यातील पाणी थंडगार होत.

पाण्यानं भरलेले तांबे देत पार्वती. पांडबाला म्हणाली, “ दादा जोडी मस्त हाईत. मग पैली जोडी काय केलीस रं.”

“ काय सांगू पार्वती दाजिला बैलं हवी होती. म्हणून घरचा जोड दिला. व आता सोसायटीचे प्रकरण व धान्य विकून आलेल्या पैक्यात हा सगळा डाव मांडला. आता बघुया आता ही बैल कशी लागत्यात.” पांडबा म्हणाला.

बोलत चालत इकडील तिकडील गप्पा मारत त्यांनी जेवण केलं.नंतर पारूच्या नव्हर्यान घोंगड अंथरलं. व ती सगळी झोपी गेली.

पारून भांडी उचलून बाजूला एका बुट्टीत घालून ठेवली. व ती पण आतल्या माळीत अंथरुन घालून झोपली.

तांबड फुटायला सुरुवात झाली. डालाखालची कोंबडी आरवू लागली. पार्वती उठली. न्हाणीघरात डेर्याखाली तीनं जाळ घातला. व बाहेरील हौदातन पाणी आणून त्यात भरलं. तिचा नव्हरा पण उठला. व न्हाणीघरात डेर्याखाली जाळ घालत शेकत दात घासू लागला. तिन मग उठून मांगर गाठला. तिला शेण काढायचं होत. बैल बघून तिनं नव्हऱ्याला हाक मारली.

“ आव इकडं या बैल बील मला मारल.”

तसा तिचा नव्हरा लागलीच आला. व बैलांचा रात्री त्याला अंदाज होता. त्याला उभा करून तिन शेण काढल. नंतर धार पण म्हशीची काढली. नंतर तिच्या नव्हऱ्यान जनावरांच्या पुढ्यातील काडसर काढून त्यानं पाणी पाजलं व वैरण घातली. तोपर्यंत पाणी तापल. पारुनं अंघोळ केली. व ती स्वयंपाकाला लागली. तिन चूल पेटवली. व बुड भांड्याला घेऊन भाताचं आधन ठेवलं. व वायलावर चहा टाकून ती भांडी घासायला गेली. थोड्या वेळानं पांडबा व हरबा उठले. त्यानी आपल आवरलं. ते दोघे जेवणखोलीत आले. पार्वतीनं त्यांनां पाठ दिला. ते त्यावर बसले. पार्वती चपात्या करत होती. तिन चहा आन चपाती दिली ती त्यानी खाल्ली. व ते म्हणाले, “ पारू आता निघताव.” तस पार्वती म्हणाली, “ असं कसं राती पण सरळ जेवण नाही. आता जेवूनच जा.” पार्वतीनं जेवणं केले. ती दोघं जेवली. व रातीच्या विश्रांतीन बैलं पणं तरतरीत झाली होती. आता त्यांनी जायचं ठरवल. त्यानी निरोप घेतला व तालुक्याच्या वाटेला लागली. घाट उतरून गारगोटी पार केली व नदीच्या शिवारानं त्यांनी गाव गाठलं. दारात आल्यावर पांडबाच्या बायकोन बैलाना ओवाळले. त्यानंतर पांडबान बैलं गोठ्यात नेऊन बांधली. नंतर ते दोघे हातपाय धुवून आले. पांडबाच्या बायकोन त्याना जेवण वाढले. त्यांनी जेवण केलं. नंतर थोडावेळ गप्पा मारून हरबा घरी जायला निघाला. 




गावातली लोकं येऊन बैलांची चौकशी करू लागले. बैलं चांगली लागली. कष्टाळू असल्याने पांडबान आपल सगळ कर्ज फेडलं. पण तो बैलांची खूप काळजी घेत असे. बैलांकडून चांगली राबनुक करुन जरी घेतली. तरी तो त्यांच्या सेवेत काही कमी पडू देत नव्हता. पांडबाची बैलं बघून जळणारे अनेकजण होते. त्यात गजा पाटील हा देखील होता. एकदा त्यानं दसऱ्याच्या शिलंगणाला पांडबाची कळ काढली.

शिलंगण असल्याने पांडबाने बैलं सोडली. तो व त्याचा पोरगा बैलं धुवायला व पवनी पाडायला नदीला गेलीत. अमृतमहल माटी करड्या रंगाची बैल खाऊन टमटमित दिसत होती. त्यांच्या वाटोळ्या शिंगांना लावलेला रंग व त्यावरील नक्षी खूप छान दिसत होती. बैलं घरी घेऊन जाताना वाटेत. गजा पाटील आपली खीलार बैलं घेऊन जाताना दिसला. सखारामला बघून म्हणाला, “काय सखाराम लावायची का शर्यत.”



तेच बोलण ऐकूण पांडबा म्हणाला, “ तेला काय इचारतोस. मालक अजून मी हाय. मी काय बैलं शर्यतीसाठी बाळगली नाहीत. माझा प्रपंच चालवतात ती. तूझ काय जातय म्हणायला, दहजणांच डबोल लाटून नाही बसलो मी भुजंगावाणी. तू काय एकाच्या दहा जोड्या घेशील बैलांच्या. तस माझं नाही. “

तसा गजा पाटील तेला म्हणाला, “तू भित्र्या लढाईच्या आधीच शेपूट ढेंगत घालतोय व्हय र.”

पांडबा, “ तू काय म्हणायचं ते म्हण.”

असे बोलून तो घरी निघाला. वाटेत शेताला निघालेला हरबा त्याला भेटला. गजाचं तिरक बोलण त्यानं हरबाला सांगितलं. तसा हरबा म्हणाला, “ बघवत नाही तेला खोटा पैसा हाय, तालुक्याच्या काय चोर बाजारात देखील खपणार नाही. तेच्या नादाला लागायच नाही.” अस बोलून हरबा शेताला गेला. पांडबान बैल गोठ्यात बांधलित. त्यांना चांगल सजिवल. त्याच्या बायकोने पुरणपोळीचा नैवेद्य खायला बैलांना दिला. नंतर पांडू व सखान जेवण केलं.

संध्याकाळ झाली. शिलंगणाच सोन लुटायला बैलगाड्या निघाल्या. पांडबाच पोरग म्हणाल, “काय नाही आज मी बैल घेऊन जाणार. त्यानं बैलं सोडली. तशी पांडबाची आई तेला म्हणाली, “ पांडू तू जा बरोबर, तरण पोर आहे, सळसळत रगात शांत बैलं न्यायचं नाही.”

तेव्हा पांडबा म्हणाला, “ हे बघ सखा आपण शेतकरी माणस, बैल जास्त दबवू नकोस. बैल म्हणजे महादेवाचा नंदी, बसवाणं महादेवान पाठीवलय तेला. त्याची सेवा आपला धर्म. बैल लई दबवू नकोस. देवाच्या पायावर घालून आण. महादेवान आपल्या सेवेला पाठीवले त्याला. महादेवान नंदीला पाठीवल की जा व माणसाला सांग दोनवेळ आंघोळ कर व एकवेळा जेव. पण नंदी सांगत आला. दोन वेळा जेव व एकदा अंघोळ कर. म्हणून महादेवान त्याला शिक्षा केली. दुसऱ्या वेळच्या माणसाच्या जेवणाची तयारी तू कर. तेव्हापासून नंदी शेतात राबतो. व माणसाला मदत करतो.म्हणून आपण त्याला दुखवायचं नाही.”

असं म्हंटल्यावर सखाराम बर बरं म्हणाला. व तेनं बैलं सोडली. सखाच्या बायकोन दृष्ट काढून बैलांना ओवाळले. त्यांवर मायेचा हात फिरवला व कानाजवळ नेऊन बोट कडाकडा मोडलीत. सखाराम बैल जुंपून देवळाकडे आला. देवळाला वेडा घालून त्यानं बैल ऊभी केली. देवाच्या पाया पडून अंगारा घेतला. आपल्या व बैलांच्या कपाळाला लावला. त्याचे मित्र पण गाडीत चढले. इतर बैलगाड्या पाठोपाठ शीलंगणाला निघाला. गावा बाहेर येताच गजा पाटलाची गाडी पण होती. त्याच पोरगं व तो बैलं दबवत होते. त्याची खिल्लार जोडी पळण्यात लई पटाईत होती. मुख्य सडकला आल्यावर गजा पाटील सखारामला म्हणाला, “ काय सखा लावायची का शर्यत.”

तेव्हा सखा म्हणाला, “ नाही मी शिलंगणाला आणल्यात.”

तेव्हा गजा पाटील म्हणाला, “बुळग्या हरलो म्हण की.”

सखारामचे मित्र म्हणाले, “ चल की लावूया बघू तरी.”

शेवटी शर्यत लागली. पांडबान पत्री न मारल्यान बैलांना डांबरी रस्त्यावर जोरात पळता येईना. गजाची गाडी पुढे निघाली. गजा म्हणाला, “ बघितला का खिल्लारांचा खिल्लारपणा इकडून तिकडून नाही आणली म्हसवडच्या बाजाराची हाईत. तस सख्यानं बैलांना दोन चाबूक लगावले. तशी बैल पळू लागली. डांबरी रस्ता संपला. व भोर्डीच्या माळाचा कच्चा रस्ता लागला. चडाचा टेक असल्यानं व बुरंबाट रस्त्यानं बैलानी जोर धरला. डोंगरच पयांन वडून सरावलेली बैल धावू लागली. व शर्यतीला आणलेली गजाची बैल माग पडली. वाट वळखीची असल्यानं डिरक्या फोडत कृष्णाकाठी बैलं पळायला लागली. टेक पार करून अमृतमहल माटी बैलांनी गजाच्या बैलांना माग सारत भोर्डीचा माळ गाठला. शर्यत जिंकून शिलंगणाच सोन लुटून बैलं घरला आलीत. पांडबाला समजल्यावर त्यानं सख्याला गोरणीत घालून चाबकाने बडवला.

सख्या म्हणाला, “ बा चुकलो मी, पुन्हा नाही करायचा असं.”

 शिलंगण झाल. भात कापणीची धांदल सुरू झाली. भाताच्या मळण्या निघू लागल्या. शर्यतीत झालेल्या हारीन पाटील चांगलाच भांबावलेला होता. गावात सगळीकडे चर्चा सुरू झाली होती.

एके दिवशी पांडबाने हरबाची मळणी काढून बैल हरबाच्या मांगरात बांधली. व बैलांना वैरण आणायला गेला. इतक्यात पाटील उसाच्या फडातून आला. लपत छपत येऊन त्यानं कडच्या बैलाला कायतरी खायला घाटल. ते खाल्यावर बैल ओरडू लागला. तसा पाटील पळाला. बैलाचा आवाज ऐकून पांडबा व रानातील माणस तिथं आली. बैलाच्या तोंडाला फेस आला. व जाग्याला बैल मटकन बसला. व तळमळूनं बैलान प्राण सोडला. काय पायाखालच झाल का म्हणून इकड तिकड बघितलं. तर काही नव्हतं शेताला निघालेल्या लक्ष्मीला पाटील गडबडीने जाताना दिसला. ती कालवा ऐकूण तिथं आली. व म्हणाली, पांडूदा मी गजा पाटलाला उसाच्या सरितन जाताना बघितला. मेल्याचच काम असणार हे. इकडं तेच शेत का भात काय कराय आलता मेला.”

पांडबाला रडू आलं. दुसरी बैलगाडी आणली. व बैलाला नेऊन शेतात पुरलं. घरी कळल्यावर पांडबाच्या बायकोन शिव्यांची लाखोली वाहिली. तेची आई हात पाय घासत म्हणाली, “ माझ्या बसवणाला इक घालणाऱ्याच मड बसू दे. आई लक्ष्मी बघून घेईल. त्याच्या रक्ताचं शिंपण होईल.” पश्चिमेला पुढा करून तिन माहेरच्या देवीला नमस्कार केला. व म्हणाली, “बघून घे ग आई.” दोनचार दिस कुणाला आन गोड लागलं नाही. सगळे लोक पाटलाला शिवा देवू लागले. दिस सरू लागले. पाटील एके दिवशी शेताला गेला होता. त्याला झटका आला. व पाण्याचा एक थेंब पण न मिळता जाग्याला मेला. काही दिवस गेले. हरबा पांडबाच्या घरी आला. व म्हणाला, “ एक बैल मेला म्हणून दुःखी होऊ नको. त्याच आयुष्य तितकं. चल जाऊ संकेश्वरला आणि या बैलाच्या जोडीला दुसरा बैलं घेऊया. “ पांडबांन जोडणी केली व दुसऱ्या दिवशी शिदोरी घेऊन ते दोघे पुन्हा तालुक्याला आले. व गडहिंग्लजची गाडी धरली. व बैल आणायला ते दोघे संकेश्वरला निघाले.

लेखक : निशिकांत हारुगले.


शनिवार, २१ मे, २०२२

रक्ताच नातं

 ६) रक्ताच नातं

लेखक : निशिकांत हारुगले.

एम. ए. बी.एड.


सुगंधा तशी पेठेच्या माळावरल्या वाडीत जन्मलेली घरची परिस्थिती बेताची असलेने व मुलीची जात असल्याने तिच्या शिक्षणावर म्हणावा तितका खर्च तिच्या बापानं केला नाही. त्यामुळे घराजवळच्या पोरीसंगे खेळण्या बागडण्याच्या वयात तिला शेतात राबाव लागत असे. कधी कधी लाकूडफाट्यासाठी डोंगरात देखील जावे लागे.

 राबत कष्टतच तिचं बालपण गेलं. वयात आल्यावर इकडून तिकडून स्थळ तिला येवू लागली. पण मुलाकडील मागणी जास्त असे. व घरची परिस्थिती नाजूक असलेने मंगळसरीला लागणारे पैसे देखील तिच्या बापाने कर्जाऊ घेतले. सुगंधेच राबन व लाघवी बोलणं यामुळे शामा कुंभाराच्या बायकोन आपल्या माहेरच्या गावाकडून स्थळ काढल. 

शामा कुंभाराची बायको ही दूधगंगा काठची असल्याने तिनं ऐनी कडल्या वाडीतील एक स्थळ काढल. नव्हरा दिसायला सावळा होता. पण देखणा शेतकरी होता. त्याची परिस्थिती बेताचीच असलेने त्याची मागणी पण जास्त नव्हती. तो कष्टाळू असलेने सुगंधेला सुखात ठेवल म्हणून तिने ते स्थळ काढले.

शेवट पै पाहुण्यांनी ठरवून सुगंधेच लग्न जमवून गावातली गणपतीच्या देवळात अक्षता टाकून एकदासी सुगंधेला उजवली.

सुगंधा आता सासरी नांदु लागली. घरची शेती करत थोडीफार बाहेरची शेती पण ते करु लागले.सुगंधेची सासू हौसा ही खूप साधी होती. मात्र तिचा दीर खूप शिकला असल्याने तो मास्तर झाला होता. जाता येता तो सूगंधेच्या नव्हऱ्याला बोलत असे. सुगंधेला खूप वाईट वाटत असे. शेवटी तिला राहवल नाही. व ती नव्हर्याला बोलली, “दुसऱ्याच्या जीवावर कधी संसाराचा गाडा हाकता येत नाही, आपलं राबन कधी चुकतंय का? हा बैलोबा जरी मास्तर असला तरी आपल्याला कधी उपयोगात पडणार नाही. आपण राबायच व याच्या हातात सत्ता हे काय बरोबर नाही. आपल्याला त्याची पै पण नको. तवा आपण वेगळं झालेलं बर.”

 तिन वेगळं मागताच तिच्या दिरानं भांडण उकरून काढले. एके दिवशी सुगंधा म्हसीची धार काढत होती. तिचा दीर बाहेरून टाचा आपटतच घरात आला. व आईजवळ येऊन म्हणाला, “ वाटणी पाहिजे म्हणते ना, घे म्हणावं तिला वाटणी. लई परपंजा करुन दावती मला, कर म्हणावं. उद्याच बोलवतो पंच व करतो वाटणी. सुगंधा हे सारं धार काढताना ऐकत होती. नव्हरा घरात नसलेने तिनं गप्प बसायचे ठरवले. तिचा नवरा दुसऱ्याच्यात कामाला गेला होता. संध्याकाळी घरी आल्यावर सुगंधेचा नव्हरा न्हाणी घरात हातपाय धूवाय लागला. तेवढ्यात बाहेर गेलेला तिचा दीर मारुती आला. व आईजवळ जाऊन मोठ्यानं बोलाय लागला.

उद्याच पंच बोलवतो. कर म्हणाव वाटणी. माझी बायको माहेराला गेलीय बाळंतपणाला तवा मी तयार हाय. माझ काय पडत नाही.”

सुगंधेचा नव्हरा धनाजी न्हाणीघरातून हातपाय पुसतच बाहेर जोत्यावर आला. भावाला बडबडताना बघून तो म्हणाला, “हे बघ मारुती तुझ्या वागण्यात व बोलण्यात खूप अंतर हाय. गावच्या चारचौकडीच ऐकतोस व घरात येऊन नको तसं बोलतोस. नोकरीला लागल्यापासून एक पाई देखील दिली नाहीस घरात व कसल्या लाखाच्या कोटीच्या गप्पा मारतोस.”

तवा मारुती गप्प बसला. दुसऱ्या दिवशी पंच बोलावण्यात आले. व वाटणी करण्यात आली. पंचामधिल तिघे मास्तरच्या सलगितले होते. त्यानी वाटणी करताना गावातलं घर मास्तरला दिलं. व गावाबाहेर असणारा गोठा व त्या मागची पाच गुंठे जागा सुगंधेला दिली गेली. शेताची वाटणी करताना तगाच काळवाटाची जमीन मास्तरला दिली. त्यातील एक दहा गुंठे ओपा फक्त धनाजीला दिला. त्या बदली गावच्या वरील जमीन धनाजिला दिली. वैरणीचं रान धनाजीला पसंत न पडलेने पंचातील गणू अण्णाला तो म्हणाला, “ गणू आण्णा घराच्या वाटणीत मला डावी बाजू दिल्यासा मी काही बोललो नाही. शेत देताना देखील डाव उजवं केला. तरी मी काही बोललो नाही. आता पेंडीच्या वावराची सरळ वाटणी झाली पाहिजे. तेव्हा गणू अण्णा म्हणाला, “ मगाठावनं मी गप्प होतो. बाकीच्यांच ऐकलं आता नाही, आता पेंडीच्या वावरातल रान जरा जादा आम्ही धनाजीला देणार. शेवटी वाटणी झाली.

मास्तर मात्र डूरक्या बैलासारखा धनाजिकडे बघत म्हणाला, “घे वावर नाहीतर त्यात काय पेंडिच कापणार नव्ह. पयानाच्या चार काड्याशिवाय काय मिळणार आहे त्यात.”

शेवटी स्टॅम्प करण्यात आला. व समदी वाटणी झाली. म्हाताऱ्या हौसेला मात्र अन्न गोड लागणा झालं. धनाजीला दिलेली वाटणी तिला पसंद पडली नाही. नव्हरा मेलेला म्हातारं झाड काय म्हणलं. शेवटचं दिस आलेत तसे कंठायचे

घरातील सुगंधेच्या लग्नात आलेल्या चार भांड्यावर तांदळाच्या काही दाण्यावर व शेरभर चटनिवर सुगंधेला वाटणी देण्यात आली. घरातील मुर्हा म्हस जी मास्तरन कोकणात असताना घेतली होती. ती पण मास्तरन घेतली.

सुगंधा मात्र शांत राहिली व आपल्याला दिलेल्या घरात तिनं आपला संसार मांडला. त्यापूर्वी गावातील आपल्या साखळीच्या माणसांच्या मदतीने ते घर शेकरुन घेतले. सारवण सूरवण करून आपला संसार थाटला. तिचा नवरा व ती आपले शेत बघत दुसऱ्याच्या शेतात राबत. ते आपला संसाराचा गाडा हाकू लागले.

सुगंधेला बघून तिचा दीर इतर बायकांना म्हणत असे की कर् म्हणावं परपंजा उपाशी राहून. तेव्हा सुगंधा म्हणत असे, “ तूझ्या ताटाखालचं मांजर होऊन राहण्या पेक्षा उपाशी राहून ध्याड काढेन मी.”

 तो तिच्याकडे डोळे मोठे करून बघत असे. सुगंधेची वाटणी झाल्याचे तिच्या माहेरी समजले. तेव्हा तिचा बाप तिला भेटायला चांगल मणभर तांदूळ व शीधा घेऊन आला. वाटणी चुकीची झाल्याची लक्षात येताच तो जावयाला म्हणाला, “ काय हो पावनं कोणती कोल्ही आणला होता वाटणी करायला.”

तेव्हा धनाजी म्हणाला, “ मामा झाल ते झाल वाटणी म्हंटल्यावर जरा इकडं तिकड व्हायचंय मी मला दिलेल्यात समाधानी आहे. पुढं राबून आपण मिळवायचं.”

जावयाचं बोलण एकूण सुगंधेचा बाप आपल्या बरोबर आणलेले पैसे देत म्हणाला, “ हे बघा जावईबापू यातून एक म्हैस घ्या. व चालवा आपल रहाटगाडगं. माझ्याकडून जमेल तितकी मदत मी करेन.

त्या दिवशी मुक्काम करुन सुगंधेचा बाप सकाळी जावई व मुलीशी हितगूज साधून तो आपल्या गावाला गेला.

सोसायटीचे एक प्रकरण करून व मामाने दिलेले पैसे याच्यावर दोंन म्हशी घ्यायचे धनाजीनं ठरवल.

घरला लागूनच मागील बाजूला त्यानं एक छप्पर काढलं. दोन-चार मेडक्या लाऊन त्यावर बांबू टाकून पत्रे अंथरले. व डोंगराच्या चीव्याचा कुड केला. व छानसा गोठा तयार केला. नदीच्या वत्ताडाचा बुरुंब टाकून त्यावर फरसी घातली. व दर वाजा तयार केला. आपला मित्र गजा चव्हाणाला घेऊन तो मुरगूड व निपाणीचा बाजार फिरून आला. इकडल्या तिकडल्या बाजारात चौकशी करून म्हशीचे दर काढले. ते चांगलेच भडकलेले होते. असा एक आठवडा गेला.

एके दिवशी सुगंधा आपल्या शेजारच्या तारुबाई संग भांगलानिस गेली असता. भांगलताना तिनं तारुबाईपुढे विषय काढला. तवा तारुबाई म्हणाली, “तुझ्या नव्हर्याला सांग कशाला मुरगूड निपाणीच्या बाजाराला जातोस. त्या मोठ्या म्हशी तुला परवडायच्या नाहीत. तू ऐनीचा डोंगर उतर व सरळ कोकण्या कडगावच्या बाजाराला जा. तिथं येणाऱ्या थकिव कुडाळ मुलखाच्या रेड्या बघ. तुला परवडेल. 

आता आमच्या घरातील म्हस बघितलीस नव्ह माझ्या नव्हऱ्यान जवा आणली. तवा तिच्या आंगावर चिमुटभर मास नव्हतं. आमच्या हळदीच्या पावण्यानं बघितली. तेव्हा म्हणाला, “ पावणी बाई झूल नाहीतर वाकळ घाल मग दिसल गबगबीत. तुझ्याच भागातील तवा रोडकीच असायची. पण आता तिचं म्हस दोन दारातून जाणार नाही. 

परवा आलता पावणा व म्हशीकडे बघून म्हणाला, पावणीबाई म्हस झ्याक केलीस. तवा मी पण म्हणाले, “ ठेवता नव्ह नाव मला व माझ्या म्हशीला. तुम्हा डोंबाऱ्यांचा संसार आम्हीच कडगाव भागाच्या पोरी करताव. व आमच्या भागातील म्हशींच दूध पिऊन तुमची पोर मोठी झाल्यात. तवा तो थोबाडीत मारल्यासारखा गप्प बसला.”

तवा सुगंधा म्हणाली, “होय अक्कासाब तुमच्या सारखच करते. आमचा करंबळीचा पावना हाय. त्यालाच गाठाय सांगते तो देईल एखादी छानशी रेडी घेऊन.”

तारुबाई म्हणाली, “ हे बघ पहिल्यांदा नव्हरा जातोय. म्हस आणायला. तवा तू त्याच्या हातावर दही साखरेची चिमट ठेव त्याच्या हातावर जाताना, निष्णपच्या देवीचं नाव घे म्हणावं तिच्या खोऱ्यात जाणार हाय. यावर तिचा आशीर्वाद असुदेत. असे म्हणुन चुलीतला राकूंडा अंगारा म्हणून लाव कपाळाला. अन बघ सांजपतोर तुझ्या गोठ्यात म्हस उभा राहते की नाय ते.”.

संध्याकाळ झाली. दिस बुडाला कुलकरी उडाला. सुगंधा घरी आली. घरात आल्यावर तिने आपल्या नव्हर्याला सर्व काही सांगितलं. व आपल्या माहेरी जाऊन बाबाला घेऊन करंबळीला जावा व तेथील आपल्या पाहुण्याला घेऊन बघा एखादी म्हस मिळते का?

दुसऱ्या दिवशी सकाळी उठून आपल आवरून तडक धनाने सासुरवाडी गाठली. सासऱ्याला घेऊन तो थेट करंबळीला गेला. पाहुण्याच्या ओळखीने त्यानं म्हस बघितली. दोन चार म्हशी बघितल्यावर त्याने त्यातील दोन लहान रेड्या ज्या नुकत्याच व्याल्या होत्या. त्या घ्यायचे ठरवले. दरात योग्य पडल्याने त्याने त्या घेतल्या. व एका छोट्या टेम्पोत घालून घरी घेऊन आला.

घरात आणल्यावर सुगंधाने हळदीकुंकू लावून ओवाळले. त्यांना पाणी पाजलं व वैरण घातली. एकीला दोन मिळाल्याने ती खुश होती.

त्या दोन्ही म्हशी चांगल्या लागल्या. त्या म्हशींच्या जोरावर त्यांनी सुधारणा केली. सुगंधेला मिळालेलं डोंगरातील जे रान मिळालं होत . ते त्यांनी बसवून त्यात चांगल पिक घेतले. डोंगरातून जाणाऱ्या ओढ्याला समांतर फाटा पाडून त्या द्वार त्यांनी चांगले पिक घेतले.

डोंगरी पाण्यानं माळधावणीच रान चांगलंच तगाच झालं. त्यातून चांगल पीक यायला लागल्याने त्यांनी हळूहळू घरदार सुधारले. या धामधुमीत सुगंधेला दोन मुलं पण झालीत. सुगंधाचा संसार सुरळीत चालला. 

पण सुगंधेच्या दिराला तिची झालेली प्रगती आवडत नव्हती. एकदिवस डोंगरातून पयान कापताना त्यानं भांडण काढल. त्या दिवशी सुगंधा व तिचा नव्हरा पयान कापायला गेली होती. इतक्यात तिथं मास्तर व त्याची बायको तिथं आली. सुगंधा व तिच्या नव्हर्याला पयान कापताना बघून तो म्हणाला, “ हे बघ दादा मला वावराची वाटणी पसंत नाही. मला पेंडीच रान कमी आलय. तवा.”

त्याच बोलण तोडत धनाजी म्हणाला, “ हे बघ मारुती तू जे रान मागितल ते मी तुला दिलं. चांगल रान घेऊन मला माळ दिलास. व सगळी वाटणी तुझ्यासारखी झाली. व आता मेलेल मड उकरून काढू नकोस. “

तेव्हा मास्तरची बायको सुगंधेला पहात म्हणाली, “ हीच्या अंगात सगळ पाणी आहे. हिनच वाटणी केली. त्यावेळी मी नव्हते. नाहीतर दाखवला आसता हिला माझा हिसका.”

सुगंधेला जावेच बोलण आवडल नाही. ती म्हणाली, “ हे बघ उगाच तुझा तोरा मिरवू नकोस. गप्प बसते म्हणून नाटकं करू नकोस. वाटणी करताना तगाच चांगल रान घातलं तुझ्या घशात. गावातील घर दिलं. व आम्ही गोठा पत्करला. तवा तू कुठं ग गेलतीस. व आता मी राबून खातोय ते बघवत नाही काय तुला..”

सुगंधेकड बघत मास्तर म्हणाला, “ माझ्या बायकोला कायपण बोलायचं नाही.”

सुगंधा, “ तर तुझी बायको राजाची लेक ना. माझ्यापुढे तुझं शहाणपण नको. चार पोरासनी शिकवतोस तुझ्या पईट आम्ही मिंद नाही. आता उगाच तोंड पिसळवू नको. राबाय नको दाणागोटा काय फुकट पिकत नाही. बायको फिरती टळो करुन लोकाची दारं पुजती.”

मारुती, “ उगा माझ्या तोंडाला बबाईमासान लागायचं काम नाही.”

मास्तराची बायको, “ तुझ्या जीवावर नाही फिरत. उगीच नको ते बोलू नको.”

शेवटी त्या दोघांचं भांडण मोठ झाल. शेवटी रागाच्या भरात धनाजीन मास्तरच्या दोन कानफाटात लावल्या. शेवटी आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी भांडण मिटवलं.

त्या दिवसा पासून मास्तर गप्प राहू लागला. धनाजीला व सुगंधेला वाईट वाटत होत. दिस झपाझप जात होते. त्या दिवसापासून मास्तर शांतच राही. आपल घर, शाळा व आपले शेत यातच तो लक्ष देऊ लागला. त्याच मन त्याला खात होत. वाटणी करताना आपण चुकीची वाटणी केली.

एके दिवशी मास्तर आपल्या रानातील गव्हाला पाणी पाजत होता. तवा सुगंधा व तिचा नव्हरा शेजारच्या मालूच्या रानात काडसर कापत होती. मास्तरन लाकड तोडून ठेवलेली होती. ती न्यायला शिरपा बैलगाडी घेऊन आला होता. वावरात गाडी आणण्यासाठी महादू पाटलाच्या रानातून शिरपान गाडी घातली. गाडी भरली. व परत जाताना महादू पाटलाने गाडी अडवली. व तो मास्तरसंगे भांडू लागला.

बघता बघता मास्तर व महादुची हमरी तुमरी लागली. व. महादू पाटलाने मास्तरची गळपट धरली. व मास्तरला खाली पाडलं. महादू वांड असलेने कोण त्याच्या नादी लागत नसे. सगळ्या शिवारात लोकं भांडण बघत होते. 

भांडण लागल्याचा सांगावा मिळताच मास्तराची बायको तिथं आली. तिची व महादूची हुज्जत लागली. तस महादून आपल्या बायकोला हाक मारली. ती तरतरतच खालच्या ओप्यातून आली. तिनंन मास्तरच्या बायकोला मारायला सुरुवात केली. भांडणाला चांगलंच तोंड फुटल.

बघ्यामध्ये असणाऱ्या पांडू ढेकळ्याला ते बघवलं नाही. तो धावत खालच्या शिवारात गेला. सुगंधा व धना असणाऱ्या ठिकाणी आला. व धापा टाकतच बोलला.

“ वरती रस्त्याला महादूच्या वावरात मास्तर व महादूची भांडण चालल्यात. मास्तर व त्याच्या बायकोला लई मारलय.”

धनाजी व सुगंधेला रहावलं नाही. ती तडक काम टाकून धावतच वरच्या रानाकडं आली. गाडी अडवलेल्या ठिकाणी आल्यावर धनान महादुला आपल्या भावाच्या अंगावर बसलेला पाहुनी तो चिडला. व त्यान महादुला ढकलला. व गाडीतल्या गेचक्याच लाकूड काढलं व महादूच्या अंगावर धावून गेला. तसा त्यानं दोन चार लगावली. 

सुगंधानन महादुच्या बायकोला चांगलीच हिसकली. व ती म्हणाली, “ बैलगाडी अडवायला तुला तालेवारणीन काढली काय. मेल्यावर काय मड्यावरून घेऊन जाणार हाईस काय. एवढ्याशा वाटपाई माझ्या दिराला मारायला आम्ही काय मेलो नाही. बघतेच कसा वाट अडवतोस ते.”

महादू म्हणाला, “ माझ्या वावरातून गाडी न्यायची नाही.”

तेव्हा धनाजी म्हणाला, “ तुझ्या वावरातन गाडी न्यायची नाही. तर मग माझ्या वावरातन पयानाच्या गाड्या वडताना लाज नाही वाटली. व आमची लाकडाची गाडी अडवतोस व्हय.”

शेवटी महादू व महदुच्या बायकोन गाडी सोडली. व ती गप्प बसली.

त्यावेळी मास्तरन आपल्या भावाला गच्च मिठी मारली. व तो ढसा ढसा रडू लागला. त्या दिवसापासून दोन्ही भावात गोडवा निर्माण झाला. व पुन्हा दुरून का असेना स्नेहबंध निर्माण झाला.

लेखक : निशिकांत हारुगले.


गुरुवार, १२ मे, २०२२

शिकार

 ५) शिकार

लेखक : निशिकांत हारुगले.

एम. ए. बी.एड.



पेठच्या गावच्या वरील बाजूस हिरव्यागार डोंगराची राई होती. त्याच्यावर जंगल. सह्याद्रीच्या दूधगंगा डोंगररांगेत येणारा हा भाग निसर्ग संपन्न असा होता.

घनदाट अरण्यात या भागात गवे, रान कोंबडे, मोर, वाघट,असे अनेक प्राणी आहेत. फिरायला गेल्यावर मोरांचे थवेच्या थवे दृष्टीस पडत.

अशा या पेठच्या डोंगरात भुदरगडाच्या पायथ्याशी अनेक लहान वाड्या, हिरव्यागार दुलई पांघरलेल्या डोंगरात पायऱ्यांची उतार शेती असणाऱ्या भागात एक वाडी होती. इथल्या लोकांना शिकारीचा खूप नाद. डोंगरात जरी ही गाव असली. तरी डोंगरातील झर्याच्या पाण्यावर हिवाळी गहू, हरभरा घेत. पावसाळ्यात भात, नागली ठरलेली असे. या वाड्यावर जन्मलेली पोर पेठला शिकायला जात. शाळा शिकत डोंगरातून उड्या मारत ही लहानाची मोठी होत. मोठं झाल्यावर रोजगार धंद्याला काही गावाबाहेर जात. तर काही गावात राहून मिळेल तो कामधंदा करून आपला उदरनिर्वाह करीत.

बाहेर गेलेले असोत. किंवा घरी राहणारे सगळ्यांचा आवडता छंद म्हणजे शिकार. अशा या गडतटा खाली वसलेल्या गावात अनेक महाभाग पाहायला मिळतात. अशा या महाभागांच एक टोळकं तयार होत असे. अशा एका वाडीतलं टोळकं. यात शिंप्याचा गजा, दुसरा नाव्ह्याचा बाजीराव, तिसरा पाटलांचा तुकाराम व सुर्यवंश्यांचा महादेव. असे जोडगोळीतले मित्र राहत होते. या चौकुळात मुख्य प्याद होत. ते म्हणजे नाव्ह्याचा बाजीराव. पण त्याला बाजाच म्हणत. याने कशी बशी सातवीपतूर शाळा शिकली असल. पुढे शाळेला जा म्हंटले की याची स्वारी घरातून शाळेला म्हणून निघे. व पेठच्या अर्ध्यावाटेवरून हे मागं फिरत व डोंगरातून गडतटाच्या खोर्यात फिरायचे. यांची शाळा म्हणजे जंगलातील सफर. फिरत फिरत हे डोंगरातील करवंदे,बोरं, तोरणं, बिब्ब्या, कटक्या खात उंडारत फिरत. सवंगड्यांशी खेळत त्यांचे दिवस गेले.

एक दिवस बाजीच्य बापाला कळलं. की पोरगं शाळेत जात नाही. तेव्हा तो तेला म्हणाला, “ तू शाळा शिकू नकोस हं, हाय पुढे तुझ्या एका हातात वस्तारा व दुसऱ्या हातात कात्री. गावाच्या माणसांची भादरायचीच तस म्हशी व रेडकांची पण भाद्रायची. तू लेका भादरतच मरणार. पूर्वजांचा वारसा चालवाय नको.”

तेव्हा बाजी बोलत असे, “ बा राजासारखा राजापण कुणापुढे झूकतोय माहीत आहे ना.”

तेव्हा बाजाचा बा म्हणाला, “ तर तू देव हाईस नव्हं.सगळ्या गावची केसरच काढ. आम्हाला तवा शाळा कसली ती ठावूक नव्हती. म्हणून आम्ही या फंदात पडलाव. तवा तूपण हाच कित्ता गिरव.”

तेव्हा बाजी म्हणायचा, “ उपाशी तरी मरणार नाही ना.”

तवा तेचा बा काठी घेऊन पाठी लागायचा.तेव्हा हा परसदारी पळून जायचा.

शिंप्याच्या गजानं पण बाजीच्या नादान शाळा सोडली. तसा तो चौकुळात असायचा.पण घरातील सर्व काम करून घर सांभाळून तो संगत करी. शाळा सोडल्यावर त्यानं बापाकडून आधी कपडे शिवायला शिकला. सुरवातीला कपडे शिवताना जरा चूकायचा मात्र नंतर त्याचा हात चांगलाच बसला होता.कधीतरी चुकून तक्रार यायची.

एकदा गावातल्या हौसा म्हातारीनं चोळी शिवायला टाकली. त्यान चोळी मस्त शिवली. चोळी शिवताना त्याला वाटल. म्हातार माणूस तरुणपणात कधी मिरवायला मिळालं नाही.म्हातारपणी तरी नटूदेत. म्हणून यानं तिच्या खांद्यावर दोन चार चुण्या पाडत फुगं पाडल. त्याला वाटल म्हातारी खुश होईल. पण तिसऱ्या दिवशी म्हातारी भांडत दुकानात आली. व गज्याला म्हणाली, “ गजा भाड्या मला काय नवरी म्हणून दाखवतोस व्हय र .या वयात कशाला पाडलास माह्या दंडाला फुग्. सर्व बायका म्हातारपणी म्हातारचळ लागलय म्हणत्यात. तवा ते उसवून परत चांगली शिव.”

असं म्हंटल्यावर तो म्हातारीला म्हणाला, “ तूझा नव्हरा काय म्हणाला काय तुला?”

तेव्हा म्हातारी म्हणाली, “ तो काय बोलतोय .मीच पोसते तेला. पडला असल दारू पिऊन.”

गजा म्हणाला, “ कोण नाव ठेवतं ते सांग.”

म्हातारीनं गल्लीतल्या बायकांची नाव सांगितली.”

तेव्हा तो म्हणाला, “ म्हातारे काळजी करू नको.पुढच्या चार महिन्यात त्यांची तोंड बंद करतो.”

व म्हंटल्याप्रमाणे या गजान त्यांची तोंड बंद केलीत. गावात दुसरा शिंपी नसलेने त्याच्या जवळच लोक शिवायला येत असत. त्यामुळे त्यानं फुग्याची फॅशन गावात फेमस करून टाकली. बाया आपल्या दंडाचे पडलेले डीझाइन सगळ्यांना दाखवत कौतुक करू लागल्या.

चौकुळतला पाटलाचा तुकाराम तसा दिसायला देखणा घरच्या शेतीमुळे याच्याकडे लोकांचा राबता असायचा. याला काही काम लावत नसत. हा खादडायचा व उंडरायचा. तो आळशी असल्यानं सगळी त्याला पाटलाचा गवारेडा म्हणायचे. मोठं झाल्यावर सुदरेला म्हणून त्याचा बाप दिवस ढकलत होता. या सगळ्यात जास्त शिकलेला म्हणजे सूर्यवंश्याचा महादू. तो चांगला मॅट्रिक पर्यंत शिकलेला होता. पण यांच्या नादान जंगलात फिरायची सवय होती. एके दिवशी बापानं मरेपर्यंत मारला. त्याची आई अडवायला गेली. तेव्हा तिलाही दोन-चार लाता बसल्या. शेवटी त्यानं गाव सोडलं. व मामासंगे मुंबईला गेला. तो आता सहा सहा महिने झाल्याशिवाय इकडे फिरकत नसे.

बघता बघता पोर वयात आलीत. तेव्हा त्याच्या बापानी त्यांचे दोनाचे चार करायचे ठरवले. कसंबसं या चौकडीचे चाराचे आठ झाले. जो तो आपल्या आपल्या संसाराला लागला. स्वतःचा घर संसार सांभाळत एकमेकाशी भेटी गाठी करत यांचे संसार सुरू झाले.

उन्हाळा आला. मुंबईला गर्मी वाढल्याने महिन्याभराची सुट्टी काढून महादू गावाकडे यायला निघाला.त्यानं मुंबई पाटगाव गाडी धरली. व दुसऱ्या दिवशी तो गावात हजर झाला.गावात आल्यावर सगळे विचारू लागले, “काय मुंबई कवा आली.”

महादू सांगे, “ आताच आलोय.”

प्रवासाने दमल्यामुळे त्या दिवशी महादू घराबाहेर पडला नाही. दुसऱ्या दिवशी उठून आपले सर्व आटोपून तो गावात रपेट मारायला गेला. गावातील मित्रांना व इतर लोकांना भेटून तो शेवटी गजा शिंप्याच्या दुकानात आला.

त्याला बघून गजा म्हणाला, “ तुझं आपल बर हाय बघ महादू, जीवाची मुंबई करतोस म्हणे. भारी बाबा नाहीतर आम्ही इथे कापतोय कापड.”

महादू म्हणाला, “ कसली जीवाची मुंबई. राबराब राबायच. व तिथंच खर्च व्हायचं. आपण जास्त शाळा शिकली नसल्यानं मिळल ते काम करावं लागतंय बघ. तुमच्यासारखे हाय व्हय आमचं. नोकऱ्या नाही मिळाल्यात की हाय सुईदोरा तुला. व बाजाला वस्तरा. तसं आमचं नाय. शेवटी हाय नांगर व खुरपं पुजलेली पाचवीला.

तेव्हा गजा म्हणाला, “ तुला काय नको म्हंटल व्हय सुईदोर घ्यायला..” “लेका मी सूईदोरा घेतला तर तूझ्या पोटावर पाय येईल.”

“ बर ते सगळं जाऊ देत. आपण आज शिकारीला जाऊया. खूप दिवस झालेत शिकार करुन.” महादू बोलला.

“ जाऊया की.” गजा उत्तरला.

“बाजी व तुक्याला पण बोलतो.” महादू म्हणाला.

तवा गजा म्हणाला, “ चाललं की नाहीतर तू नसल्यामुळे आम्हाला पण शिकारीला जायला अवघड वाटत. तुझ्यासारखा नेम इतरांना जमतच नाही बघ. आम्ही जरी गेलो तरी एखाद्या कवड्यावरच समाधान मानावं लागत बघ. मागच्या महिन्यात दिवसाचं भगटायला त्या तुक्याला घेऊन गेलो होतो. त्याचे डोळे आधी सरळ बघतोय कुणीकड व नेम धरतोय कुणीकड. हे समजतच नाही. मागं रानकोंबडी टिपायला सांगितली. तर यांन नेम धरून कुठ बार काढला कुणास ठाऊक. कोंबडीला सोडून गव्हाला पाणी पाजयला गेलेल्या तान्याला छरा लागला. तो अजून पाय वाकड करीत चालतोय. त्याची बायको येता जाता शिवा देते बघ. तेव्हापासून कोणपणं शिकारीला गेलं नाही बघ.”

महादू म्हणाला, “ ते काही नाही आज जायचं शिकारीला. तू बत्ती तेवढी तयार कर . मी तुक्या व बाज्याला तयार करतो. आज रातीला आपण शिकारीला जायचं.”

तिथून महादू निघाला. त्याने आपल्या मित्रांची गाठ घेतली. रात्री शिकारीला जायचं ठरवलं. शिकारीला जायचं म्हणून तुकाराम व बाजी सुध्दा खुश झाले.

संध्याकाळी सर्वांनी शिकारीला जायसाठी लागणार साहित्य ठरलेल्या ठिकाणी नेऊन ठेवलं. यांचं ठरलेलं ठिकाण होत महादुचा गोठा. जो गावापासून जरा बाजूला शेतात होता.गावापासून जरा दूर असलेने कुणाला कळत सुध्दा नव्हतं.

या सर्वांचे पार्टी करायचे ठिकाणही महादुचे घर असलेने कुणाला कळत नव्हते. रात्री लवकर आठ वाजता जेवण करून ते सर्व महादूच्या गोठ्यात जमणार होते.

महादू घरात आला. शिकारीच साहित्य शोधू लागला. त्याच साहित्य त्याच्या बायकोने सारवान काढताना वरती माळ्यावर ठेवले होते. ते शोधायला तो माळ्यावर चढला.शोधताना त्याला कनुगल्याच्या कोपऱ्यात त्याचे गंबुट सापडले. ते सुस्थितीत असल्याचे बघितल्यावर त्याने ते चौकोणी फळी काढलेल्या ठिकाणातून खाली फेकले. शिकारीची कपडे शोधताना त्याला ती बोचक्यात सापडली. ते काढताना त्यानं बायकोला दोन -चार सुनावतच काढली. तो म्हणाला, “ कुठं हे आडग पदरात पडल शिकारीची कापड बोचक्यात ठेवतय.” त्याच बोलणं एकूण त्याची बायको जेवण खोलितून म्हणाली, “ हे आडगं हाय म्हणुन संसार चाललाय. नाहीतर तुमचे मुंबईचे पैसे या घरातील तेलासाबनाला तरी पुरले असते का.” तिचा आवाज ऐकून तो गपचूप आपली कपडे घेऊन खाली उतरला. व बायकोला म्हणाला, “ लई शहाणी हायेस, जेवणं कर लवकर, मी शिकारीला जाणार हाय,”

तसी त्याची बायको पुटपुटत कामाला लागली. रात्री आठ वाजता ती सर्व महादुच्या गोठ्यात जमा झाली. महादूनं शिकारीचे कपडे घातले. त्याचे गुडघ्यापर्यंतचे गंबुट व इंग्लिश कॅप त्याने खास मुंबईवरून आणून ठेवली होती. प्रत्येकाने आपापल साहित्य घेतले. तुक्यानं बत्ती पेटवली. महादून मुंबईवरून आणलेली ऐव्हरीडेची बॅटरी घेतली. व ती सर्व जंगलाच्या वाटेला लागली. बॅटरी वर असणार रानमांजराच चित्र बघून तुक्या म्हणाला, “ आज काय रानमांजर मारायचं काय?” तेव्हा ती हसत जंगलाच्या वाटेला लागलीत.

अंधाऱ्या रात्री ब्याट्री व बत्तीच्या प्रकाशात ती सर्वजण जंगलाकडे निघाली. रातकिड्यांची किरकिर चांदण्याच्या प्रकाशात कुठेतरी घुबडाचा घुत्कार ऐकू येत होता. बत्तीच्या प्रकाशात इकडच्या तिकडच्या गप्पा मारत ते निघाले. कुठेतरी काजव्याचं लखलखन दिसत होत. ही सर्व मंडळी शिळेचं वताडाचा उगम ओलांडून वाघझरीला पोचले. उन्हाळ्यात सगळे पाणवठे आटतं तेव्हा तहान भागवणेसाठी प्राणी वाघझरीला येत. महादुने आज निश्चय केला होता. की आज एकतरी शिकार मारायची. ते त्यांच्या निश्चीत असणाऱ्या ठिकाणी. म्हणजे वाघझरिवर असणाऱ्या आंब्याच्या झाडावरील मचानावर गेलीत. तिथं गेल्यावर त्यांनी बत्ती विझविली. व शांतपणे सावजाची वाट बघायला लागलीत. इकडे तिकडे पाहायला लागलीत. थोड्या वेळानं वेताच्या बेटाच्या झाडिकडून सळसळ ऐकू येऊ लागली. तुकारामान बॅटरीचा झोत पाडला तर त्यांना एक वाघीण तिच्या पिलांसवे पाणी प्यायला आली होती. तिच्या तोंडाला रक्त लागल होत. त्यावरून तिने कुठल्या तरी प्राण्याचे काम तमाम केले होते. कारण वाघाट आपल्या अंगावर कुठलही रक्ताचं डाग वा घाण ठेवत नाहीत. शिकार करताना तिला खूप त्रास झाला असणार त्यामूळे ती खूप दमली होती. थकावट भागवनेसाठी ती तेथें पाणी प्यायला आली होती.

तिचा अवतार पाहून शिंप्याचा गजा म्हणाला, “ यांच आपल बर हाय की शेतात राबाय नको, याच पैसे द्यायचे, त्याकडून उधारी वसूल करायची असं काही टेन्शन नाही बघ. टाकली झेप केली शिकार लागली गटम गटम करायला. नाहीतर आम्ही मानस नुसती हा काय करतोय तो काय म्हणतोय, याच्याकडे किती पैसे, त्याकडे किती याचाच विचार करत असतो. यातच सगळी जिंदगाणी जातिया..”

 हे बोलण ऐकून नाव्ह्याचा बाजी म्हणाला, “ मग आता देवा पांडुरंगाला हात जोड. व म्हण, पुढला जन्म वाघाचा मिळूदेत म्हणून. म्हणजे तू व तुझी दूनिया या जंगलातच फिरत जाऊ देत. काय बोलतोस त्यांचं जीवन सोपं हाई व्हय. पावसाळ्यात इकडं तिकडं निवारा शोधताना व चिल्टानी फाडून खाल्ला म्हणजे समजलं. शिकार काय रोज मिळतीय काय. त्याना काय कमी श्रम कराय लागत नाही.

इतर प्राणी त्यापुढे येऊन उभा राहत नाहीत. की वाघोबा दादा भूक लागली असल तर मला येऊन खा. माणसाचा जन्म मिळालाय म्हणून चमचमीत खातोस नाहीतर बसला असतास सडत एखाद्या गुहेत.”

त्याच हे बोलण ऐकूण तुकाराम हसायला लागला. ते पाहून गजा म्हणाला, “ तुला काय झालंय बत्तीसी काढायला. तोंड बंद कर ते ब्याटरीच्या उजेडात तरी पांढरं दिसतील काय ते दात.”

तसा तुकाराम म्हणाला, “ हे आपल बर हाय की तुझ बोलणारा राहिला बाजूला व ऐकनार्यालाच लागलाय कावयला.”

तेव्हा त्याचं हे बोलण ऐकूण महादू म्हणाला, “ ए गप्प बसा तुम्हाला इथं शिकारीला आणलय की गप्पा मारायला.”

तेंव्हा बाजीराव म्हणाला, “तू लेका एवढं मुंबई करून आलास.जरा खायला मिठाई तरी आणलीस काय.”

महादू म्हणाला, “ मला वाटलच होत, तू हावऱ्या कसा काय बोलला नाहीस. चींगट्या कवा खरकट्या हातानं कावळा मारत नाहीस. व मला बोलतोस व्हय. आणलीय बघ तुझ्या शेजारच्या पिशवीतत हाय. तुम्हाला कवा चुकवून खाल्लया काय मी. तुम्ही कवा येवढं मुंबई करून आलोय . प्रेमानं कवा बोलत्यासा काय. तुमची सर्व जोडणी करायची. तुम्ही मात्र आयत्या बिळात नागोबा होऊन बस्त्यासा. आता शांत बसा. आलोय कशाला व करताय काय.”

थोडा वेळ वाट पाहिली पण कोणतंही सावज आलं नाही.

दोन चार तास झाले.

शेवटी महादू म्हणाला, “ हे बघा बराच वेळ झाला. काहीच सापडलं नाही. तवा त्या पिशवीतील मिठाई खावा. व बाजा तू आणि गजा खालच्या बाजूच्या डोहात बसलेली रानातली उठवा. मी त्यातील एखादं टिपतो. तेव्हा सांगितल्याप्रमाणे त्यांनी मिठाई वर ताव मारला. बाजा व गजा काठी आणि खूरपे घेऊन झाडावरून खालती उतरली. व खालच्या डोहाच्या बाजूला गेलीत. तिथं वटाडाच्या खालच्या बाजूला मोठा डोह होता. पायवाटेने पुढे पानमलळ्यातून ते डोहाजवळ आलीत. व तिथे आल्यावर बाजीरावाने वाघाचा आवाज काढायला सुरुवात केली. तशी ती रानातली सावध झालीत. गजान तोपर्यंत दगड मारायला सुरुवात केली. तशी ती रानातली जंगलाच्या चढणीच्या वाटेला लागलीत. त्यामागे हुर्रे हुर्रे असा आवाज करत ते हकलाय लागलीत.

तशी ती वटाडाच्या वाटेने वाघझरीला निघाली. ती जाताना पाहून गजा म्हणाला, “ आज एकाधी चांगली शिकार साधतीया.” वाघझरीला येत्याली रानातली त्यांच्या पायाच्या आवाजाने दगडातून खडखड आवाज येत होता. म्हादूने नेम धरला. व एका रानातल्यावर आवाजाच्या रोखाने नेम धरून चाप ओढला. छरा बंदुकीतून सुटला. आवाजाने बिथरून ती इकडे तिकडे पळू लागली. व एका रानातल्याच्या पायात जरा लागला. ते झुडपातून उलट पळाल. ते सरळ गजाच्या दिशेनं निघालं. तसा गजा आडवा पळाला. तो वाचला.त्यातून एक काठी लगावली तसा त्याचा वेग मंदावला. पण जातांना त्याची धडक बाजाला बसली. तो खाली पडला. तरी त्याने त्यातून सावरून त्याला खुरपं मारल. पण ते त्याचा नेम चुकुन पळालच. योजना फसली. सगळे नाराज झाले. बाजीरावाला धडक बसल्याने त्याचा पाय खुब्यातून दुखू लागला . ती पुन्हा माचावर आलीत. माचावर बराच वेळ बसली पण काही शिकार येईना. शेवटी फेराफेराने जागरण केली. तरी देखील शिकार नाही आली. मध्यरात्र उलटुन गेली. दोनच्या सुमारास एक वाघा सारखा प्राणी आला. त्याचा आवाज ऐकूण तुकारामान बॅटरीचा प्रकाश झोत पाडला. तो एक छोटा चीत्ता होता. ते बघितल्यानंतर. तुकारामान बॅटरी बंद केली. चीता आवाजाच्या व झाडाच्या रोखाने निघाला. त्याच येणं पाहून तुका घाबरला. व इतरांना म्हणाला, “ अरे तो चित्ता इकडचं येतोय.”

तसा महादू म्हणाला, “ तो काय खातोय तुला.”

“ तस नाही रं तो झाडावर चढला तर काय करायचं.त्याला कस टोलवायचं.”

तवा शिंप्याचा गजा म्हणाला, “ ही काठी काय पुजायला आणली काय. येऊदेत वरती द्यायचं ढकलून खालती.”

“ मगाशी काय भारी उपयोग केलास बघ. जरा वाचलो नाही तर माझीच शिकार झाली असती.” बाजीराव म्हणाला.

तवा गजा म्हणाला, “ जरा ठोका कमी पडला रं नाहीतर त्याचं डोकच फोडीतो.”

बाजीराव म्हणाला, “ गावात कुणाला शिकारीला जातोस म्हंटलास तर हसतील लेका तुला बघितली काठी कशी फिरवलीस ते.”

इतक्यात तो चित्ता झाडावर चढू लागला. ते बघून तुकारामाने वाघाचा आवाज करत डहाळी जोरात हलवली.तस तो चीता घाबरून पळून गेला.पहाट व्हायला लागली तशी ही सगळी हिरमुसली. व घराच्या वाटेला लागली. उजडायला ती गाव शिवारात आली. तवा रानकोंबडी त्यांना गावाच्या शिवारात दिसली. तसा नेम धरुन चार कोंबडी त्यानं टिपली. त्यांना उचलून घेत तुकाराम म्हणाला, “ महादू असताना शिकारीच कधी रिकाम जाणं घडलं होय.”

यावर गजा म्हणाला, “ काही का असेना दुधाची तहान ताकावर भागवून. घेऊया.”

तेव्हा महादू लंगड्या बाजीरावाला सावरत गावाकडे निघाला. शिकार झालेले कोंबडे चांगलेच रानातील पिकाच्या लोंब्या खाऊन माजले होते. गप्पा मारत ते घरला चालले.



महादू म्हणाला, “ एवढी जीवाची मुंबई केली. पण आपल्या या भुदरगडाच्या दऱ्या खोऱ्यात असणारी गंमत कुठच नाय बघ. तुमच्या सारखे सवंगडी व जीवाला जीव लावणारी माणसे कुट मिळतात. बाजीरावाला हिम्मत देत महादू म्हणाला, “ घाबरु नकोस मी मुंबईवरून आणलेलं आयुर्वेदिक औषध जे दाजीला दिल होत. त्यातील एक बाटली घरात हाय. ते लावलं की लागशील दोन दिवसात उड्या मारायला. बोलत चालत ती गावात आली. त्यांना बघून जो तो कौतुक करत होता. बाजाची बायको मात्र म्हणाली, “ काय शिकार करायला गेलता की शिकार व्हायला.”



तवा बाजी म्हणाला, “ अगं शिकार करायची म्हणजे लहान सहान अपघात व्हायचे. शिकार म्हणजे जोखमीच काम.”

ती म्हणाली, “ होय तर आता दोन चार दिवस दुकान बंद ठेवावं लागलं.”

तवा तो म्हणाला, “ दोन चार दिवस दुकान बंद ठेवायला मला काय पाळणा करून आणला नाय.”

मारलेली शिकार वाटून घेतली. व घरच्यांसकट सगळ्यांनी मनमुराद आनंद लुटला.

आपल्या सवंगड्यासवे मज्जा मारत महिना आनंदात घालवून महादू पुन्हा मुंबईला जायला निघाला. तेव्हा गावच्या स्टँडवर त्याचे मित्र सोडायला आले. महादू गाडीत आपल् लगेज घेऊन चढला. थोड्या वेळाने गाडी तालुक्याला मार्गस्थ झाली. बाकीचे तिघे त्याची आठवण काढत घरला निघाले. त्यांच्या मनात महादू पुन्हा दसऱ्याला गावी आला की शिकारीला जायचं हा विचार घोळू लागला. मनात मनोराज्ये रचत सगळी आपापल्या कामात मग्न झाली.

बाजीराव पुन्हा आपल्या दुकानात वस्तरा चालवू लागला. तर गजा आपल्या दुकानात कपडे शीवण्यात मग्न झाला. तर तुकाराम आपले घर शेत व जनावरे सांभाळण्यात गुंतला.

महादू मात्र आपल्या गावच्या आठवणीत शहरातील धावत्या जगात आपले दिवस ढकलू लागला. पुन्हा कधी सुट्टी मिळेल. व मी गावी जाईन या आठवणीत तो दिवस घालवाय लागला.

लेखक : निशिकांत हारुगले.


मंगळवार, ३ मे, २०२२

देवाक नदीची जत्रा

llदेवाक नदीची जत्राll

लेखक : निशिकांत हारुगले

 एम.ए.बी.एड.




ग्रामीण भागात कोणतीही घटना घडूदेत. पहिल्यांदा देव देवताळ तपासून पहात. अंगारे धुपारे देव देवरशी व उतारे यांची उतारा उतर घडे.

वेदगंगेच्या काठावर भुदरगड खोऱ्यात अनेक गावे वसलेली आहेत. या गावात साट लोट करून लग्न वर्हाडाचे संबंध जुळलेले आहेतच. पेठेच्या गावातील जना पाटलीनीन आपली पोरगी कडगाव फाट्याला दिली होती. तिचा नवरा बागायतदार होता. तशी त्याची थोडीफार जमीन पाण्याखाली असल्याने त्याला बागायतदार म्हणत असत. शेतात राबून ऊसाला पाणी देऊन येणार्या पिकाचे कारखान्याला घालवल्यावर मिळणाऱ्या टनाचे पैसे मोजत तेही या वर्षी ऊस गेला की पुढल्या वर्षी ऊस तोडणीसाठी आला की पैसे मिळत. त्यामुळे पैशाची उलाढाल करावी लागायची.

जनाबाईची लेक सुनिता तिच्या हाताखाली राबत लहानाची मोठी झाली होती. त्यामुळे ती चांगलीच घट्ट झाली होती.तिला सर्व सूने म्हणत.

तिन तिच्या नवऱ्याला शेत कसे कसतात ते दाखवलं. नाहीतर त्याला साधा शेताचा बांधसुध्दा माहीत नव्हता. मात्र तिचा दीर एकजात बेवडा. घरात काही कामधंदा करणार नाही. पण गावात याच्याकड राब त्याच्याकडे राब, व मिळालेल्या पैशातून दारू ढोसून संध्याकाळी धिंगाणा घाल. त्याला लोक बेवडा शिरप्या म्हणत.

सुनिता व तिचा नवरा खूप राबत असत. त्यामुळे त्यांचे कोणतेही पीक डावे नसे. नेहमी उजवच असे. दरवर्षी प्रमाणे या वर्षीही सूनिताच ऊस चांगला आला होता. मळवातल्या ऊसात सूनिताचा ऊस उठून दिसत असे. मात्र चांगल झाल की त्यावर घाला हा येतोच. अशा प्रमाणे लाईटच्या वायरींच स्पार्किंग झालं. व ठिणग्या पडल्या. व फडाला आग लागली बघता बघता चांगला ऊस पेटला. उत्पादन घटल. ऊसाच चिपाड झालं.

हातातोंडाचा घास देवानं काढून घेतला. सुनिताचा नव्हरा खुळ्यासारखं करायला लागला. सुनितानं समजाऊन सांगितल. पण काही उपयोग झाला नाही. दवापाणी पण केलं. त्यानं चांगलच मनाला लावून घेतलं होत. कारण दोन घरचा संसार त्या एका एकरातील उसावर चालायचा. एक सूनीताचा व दुसरा बेवड्या शिरपाचा..

एके दिवशी सूनिताच्या शेजारची मालाक्का निष्णपला निघाली होती. ती सुनीताला म्हणाली, “सूने येतीस काय निष्णपला माझ्या माहेरची देवी लई जागृत हाय बघ. तिथून पुढे वाडीत माझ्या ओळखीचा एक देवऋशी हाय बघ. तेला विचारुया तुझ्या नवऱ्याबद्दल, त्याच्या मागं काय कटकट लागलीय.”

सुनीताला पण वाटल. व तिन सासुबाईला सांगून मालुबाई बरोबर ती निष्णपच्या वाटेला लागली. सुनिताच्या डोक्यात चालता चालता विचार येत होते. की तो देवऋषी काय सांगेल.

ती गुमान मालुच्या मागणं निघाली. नदीच्या काठान रस्त्याने चालत त्या वाडीवर आल्या. तिथं आल्यावर त्या निष्णपच्या चढणीच्या वाटेला लागल्या. वाटेला देवीला जाणाऱ्या येणाऱ्या लोकांची रेलचेल दिसत होती.

मालू सुनीताला म्हणाली, “ हे बघ सुने आमची देवी अख्ख्या पंचक्रोशीत प्रसिद्ध हाय. नुसती हाक मारली की माग उभी राहती बघ. तिच्याकडून काय मागनं असेल तर मागून घे. नंतर आपण वाडीवल्या देवऋष्याकडं जाऊ.”

तेव्हा सुनिता म्हणाली, “ नवरा चांगला झाला म्हणजे झालं. बाकी काय नको मला.”

बघता बघता देऊळ आल्ं. मंदिरा बाहेर अनेक माणसांची गर्दी होती. काहीजण गाड्या करून आली होती. मालू व सुनिता देवळात गेल्या. देवीला त्यांनी नमस्कार केला. देवदर्शन घेऊन मालूनं चौकावर पूजेचं साहित्य ठेवलं. तांदूळ साखर,कापूराच्या पुड्या सोडून ठेवल्या. गुरवान ते घेऊन आंगारा लावला. तशा त्या गुरवाच्या पाया पडल्या. व बाजूला एका कोपऱ्यात जाऊन बसल्या.

बसल्या जागेवरून सुनिता देवीला हात जोडून म्हणाली, “ आई लक्ष्मी आमच्यावर कृपा असु देत.”

ती देवळाच्या बाहेर पडलीत. व वाडीच्या दिशेला लागलीत. वाडीत भरवस्तीत त्या देवऋषाचे घर होत. त्या तिथं गेल्या. तिथं आतील बाजूस मोठा देवारा सजवलेला होता. तिथे अनेक देवांचे टाक पुजले होते. त्या तिथे गेल्या. गर्दी होती. थोड्यावेळाने त्यांचा नंबर आला. त्या दोघींनी देवऋष्याच्या पायावर लोटांगण घातले. व त्या त्याच्या शेजारी बसल्या.

 बघताच देवऋषी म्हणाला, “ ये मालुबाई आजकाल दिसत नाहीस कुठं.”

तेंव्हा मालू म्हणाली, “ काय सांगू देवा माझ्यामागं एक वनवास हाय होय. अगदी सीतवाणी हाय बघ, आदी लहान असताना आई मेली. नंतर सावत्र आईचा झिंज्या उपटून मार खात मोठी झाले. मागं अठरा विश्व दारिद्र्य म्हणून मला त्या बेवड्याच्या गळ्यात बांधली. तर तो नवरा बर खर सासू नको अशी गत झाली. सासून तर माझा दांडगा छळ केला. शेवटी त्या छळाला कंटाळून मग वेगळा प्रपंच मांडला. आता कुठं सुखान चार घास खाते. दोन पोर हाईत पोटाला चांगल चाललय बघ. पण….”

“पण काय आणखीन.” देव ऋषी म्हणाला. तेव्हा मालू म्हणाली, “ नवऱ्यानं तेवढी दारू सोडाया पाहिजे.”

तेव्हा तो हसला व म्हणाला, “ ते काय माझं काम हाय का जा की डॉक्टरकडं.” तेव्हा ती म्हणाली, “ माझा नाही विश्वास डाक्टर वर.”

देवऋषी बोलला, “ असं कसं म्हणून चालेल, डॉकटर म्हणजे वैद्य माणूस. त्याला नाव ठेवू नयेत. आपली जुनी औषध फक्त नवीन बाटलीत भरून देतात.”

“ते काही बी मला माहित नाही. तुम्हीच करा उपाय.”

तेव्हा त्या देवऋषाने विचार केला. व म्हणाला, “ हे बघ तुझ्या गावाला जाताना वाडी लागलं. तिथं एक वैदू राहतो. दिसायला जक्कड म्हातारा. त्याच्या घरात पूर्वीपासून वैद्यकी चालते. तिथं जाऊन गाठ घे. त्याकडून जे औषध मिळेल ते घेऊन जा, चांगला गुण आहे म्हणत्यात तेच्या हाताला. तिथं माझं नाव सांग. पण जाताना एखादा नारळ व पंचवीस रुपये दक्षिणा घेऊन जा म्हणजे झालं. आग नवीन डॉकटर सुध्दा माहिती घेऊन जातात त्यांच्याकडून.”

“बर माझं आणखीन एक काम आहे. ही आमच्या गावची सुनिता हीचा मागं ऊस पेटला. व नवरा तवाठावणं खुळ्यागत करायला लागला. तवा त्यावर उपाय सांगा.”

तेव्हा तो म्हणाला, “ बाळ सुनिता एखाद्या फुलाच नाव सांग.”

सुनिता म्हणाली, “ आ आ … तांबड फूल.”

देवऋशी म्हणाला, “ हे आणि कोणतं फूल म्हणायचं.”

सुनिता म्हणाली, “ ते हो गणोबाला घालतात ते.”

“ जास्वंदीची म्हण की.” देवऋषी उत्तरला. त्यानं सूनिताच्य पुढ्यात एक पाट मांडला. व म्हणाला, “ शेजारी ठेवलेल्या ताटातील चार तांदळाचे दाणे घे. व इथं ठेव.”

सुनिता ने ते ठेवले. तो जोड्या जुळवू लागला. व बडबडू लागला, “ जर घरच्या देवाच असेल. शेता भातातील असेल तर जुळू दे.”

दाणे जुळले नाहीत. मग त्यानं दुसरा कौल लावला. असे करत करत शेवटी माहेरच्या देवाचा नदीचा सात देवींचा राग निघाला.”

सुनिता म्हणाली, “ पण आमच्या गावात कुठलच सात देवीचं मंदिर नाही.”

तेव्हा देवऋषी म्हणाला, “ हे बघ तुला कधी स्वप्नात पाणी आलतं काय?”

सुनिता म्हणाली, “ परवाच आलत , आमच्या गावची सरल्याका व पोरी धूणं धुत्याल्या नदीवर दिसल्या.”

तेव्हा तो म्हणाला, “ मग तूझ्या अंगावर सात्या असरा आहेत बघ. त्याची सांगड द्यावी लागली बघ. आधी ती दे. मग माझ्याकडं ये.”

तेव्हा सुनिता म्हणाली, “ त्याला आणखी काय काय लागतं.”

तेव्हा मालू म्हणाली, “ हे बघ मला सगळं माहीत आहे. मी सांगते तुला.”

असे म्हणून ती उठली. व सुनिता व मालू देवऋष्याच्या पाया पडल्या. व पंधरा, पंधरा रुपये दक्षिणा ठेवून तिथून बाहेर पडल्या. व वाटेला लागल्या. आता दुपारचे चांगलंच दोन वाजले होते. उतरण उतरून त्या वाडीत आल्या. गावातील लोकांना विचारत विचारत त्या पुढे त्या वैदुच्या घरी गेल्या.तिथं जाण्याआधी त्यांनी किराणा दुकानातून एक नारळ घेतला. व त्या वैद्याच्या घरात गेल्या.

तिथं गेल्यावर मालू म्हणाली, “आम्हाला जोतबा देवऋष्यानं पाठीवले. तुमच्याकडून औषधं घ्यायला.”

तेव्हा तो म्हणाला, “ तुम्हाला कुठल औषधं पाहिजे हाय.”

तेव्हा मालू म्हणाली, “ माझा नवरा दारू लई पितो. तवा दारू सोडायचं औषध हवंय.”

तेव्हा वैद्याने त्यांना जोत्यावर बसायला सांगून तो आत मध्ये गेला व एक पुडी घेऊन आला. व मालुला म्हणाला, “ हे बघ नवऱ्याला न कळता त्याच्या जेवणातून वा पाण्यातून दे. थोडा त्रास होईल. पण आपण औषध द्यायचं थांबवायचं नाही. सोडल दारू. संपल की ये पुन्हा एक दोन पुडीत काम होईल.” मालून ते औषध कंबरेवरच्या कडोसरीत लपवले. व ती सुनीताला म्हणाली, “हे बघ सुने ही गोष्ट तुझ्यात व माझ्यातच. ह्या कानाचे त्या कानाला कळता कामा नये.”

असे म्हणून मालूने त्या वैद्यापुढे पंचवीस रुपये ठेवले. व एक श्रीफळ ठेवून ती त्यांच्या पाया पडली व म्हणाली, “ वैद्यबुवा तुमच्या बोलण्याला यश येऊ देत.” व त्या दोघी गावच्या वाटेला लागल्या. गावात यायला चांगलीच संध्याकाळ झाली. गावात आल्यावर मालू ही आपल्या घरला निघून गेली. व सुनिता आपल्या घरला आली. घरात आल्यावर सुनिता न्हाणीघरात गेली. व चुलिवरल्या डेरक्यातील पाणी घेऊन. तिन हात पाय खळखळ धुतल. व घर लोटायला घेतलं. बघता बघता तीन घर स्वच्छ करून जनावरांचे शेण काढले. चूल शिलगावली. तेवढ्यात शेताला गेलेली तिची सासू व जाऊ आली. सुनिताने चहा केला व त्यांना दिला.

चहा घेत सासुन विचारलं, “ काय म्हंटला ग देवऋषी.”

“ काय नाय माहेरच्या देवाचा राग हाय म्हण.”

“ कोणत्या देवाचा राग गं.”

“ साती असरांचा हाय म्हण. जत्रा करा म्हणतोय.”

तेव्हा सासू म्हणाली, “ म्हणजे हाय सात आठशेला भुर्दंड.”

“ मग कराया नको.”

“ करा की म्या काय नको म्हणतोय पण..”

“ पण काय.”

“ आम्ही पण त्याच नदीच्या काठाला राहता व माझा माहेरपण त्याच व्हळीला हाय. आमची काळ्याची पांढरी झाली पण नाही आम्हाला कवा राग निघाला.”

तेव्हा सुनिता म्हणाली, “सगळ्यांचं काय सारखच असतय व्हय.”

असे म्हणून सुनिता स्वयंपाकाला लागली.

थोड्या वेळानं मालू सूनीताच्या घरला आली. थोडा वेळ गप्प झाली. नदीची जत्रा करायच ठरलं. मालूनं कोण कोणते साहित्य लागणार याची माहिती सांगितली. त्याच टिपण केलं गेलं.

घरला जाताना मालू म्हणाली, “ हे बघ सुने उद्या कडगावचा बाजार हाय. तवा मी सांगितलेलं साहित्य घेऊन ये. मग मी काय करायचं ते सांगते.” असे बोलून मालू घरला निघून गेली.

दुसरा दिवस उजाडला. सुनिता उठून कामाला लागली. संपूर्ण घरकाम करून ती व तिची जाऊ जेवणासाठी बसली. इतक्यात बाहेर मुले घेऊन गेलेली तिची सासू आली. व तिला म्हणाली, “ हे बघ सुने दूधाच आलेलं बील मी कपाटात ठेवलंय. तवा त्यातील पैसे घे. व कडगावच्या बाजारातून तुला सांगितलेलं साहित्य व बाजार करून ये. व जाताना धृपदेला पण घेऊन जा. म्हणजे एकीला दोघी असलेल्या बऱ्या.” असे म्हणून ती कडेवरील बाळाला खेळवाय लागली.

थोड्या वेळानं धुणं भांडी आटोपून सुनिता व तिची जाऊ धृपदा नवी साडी नेसून त्या कडगावच्या बाजाराला निघाल्या. कडगाव जवळ असलेने चालत चालत कुठेतरी झाडाखाली थांबत कशाबशा त्या दोघी कडगावच्या पेठत आल्या. संपूर्ण बाजार फिरून झाल्यावर त्यांनी थोड माळवं विकत घेतलं. व त्या पुढे सरकल्या. बाजारात एके ठिकाणी झाडाखाली बसलेल्या बुरडाजवळ आल्या. सुनिताने बुरडाला उतार्याच्या शिबड्याचा भाव विचारला.तर तो म्हणाला, “ पंचवीस रुपये.”

तशी धृपदा म्हणाली, “ काय मामा तुला काय आणि पोरी वाटलाव तवा असा कसा भाव सांगालाईस ऐकू येतय नव्ह. आम्ही शिबड्याचा भाव विचारतोय दुर्डीचा नाही.”

तेव्हा तो म्हणाला, “ मी पण शिबडयाचाच भाव सांगतोय.”

तवा सुनिता बोलली, “ शिबड्याला पंचवीस, त्याच्यासंग तुझा पण भाव सांगतोस काय.”

तेव्हा तो बुरुड म्हणाला, “ मला म्हाताऱ्याला कोण विकत घेतय. परवडत असल तर घे नाहीतर हो पुढे.”

शेवटी सूनितान भाव वरखाली करून शेवटी त्याला म्हणाली, “ दहा रुपड्यांला देते बघ.”

तवा तो म्हातारा म्हणाला, “ दहा रुपयाला गुढीची काठी पण येत नाही. व शिबड कस देऊ. मुलुख महाग काठी नानिवळ्याच्या व्हळीसन आणली. आणि मला काय बाई विसाच्या खाली द्यायला परवडत नाही.”

तेव्हा द्रुपदा म्हणाली, “ नानिवळ्यासन काठी आणायला वेदगंगेच्या शिवारात काय दुष्काळ पडलाय काय.”

तरी देखील म्हाताऱ्या एक रुपया कमी केला नाही. तेव्हा सुनिता म्हणाली, “ राहु देत चलं धुरपा आपल्या शेजारच्या रामू आजाकडून घेऊया वळून.” असे म्हणून त्या पुढे निघाल्या. त्यांना जाताना पाहून म्हातारा ओरडुन म्हणाला, “ ये बाई घे.” अस म्हणून त्यानं ते शीबड दहा रुपयाला विकलं. तशी धुरपा म्हणाली, “ मगाशी कशाला आडवेडं घेत होतास, तुझा काय म्होतुर होता काय, म्हणत्यात ना नाक दाबल्या शिवाय तोंड उघडत नाही.”

तेव्हा तो म्हातारा म्हणाला, “ धंदा करायचा म्हणजे असं वागावच लागत. मी जर मगाशी दहा रुपये म्हणलो असतो तर तू पाच रुपयाला मागितलं असतस.म्हणून लेकी वीस रुपये म्हणालो.”

शेवटी शिबड घेऊन त्या पुढे कोंबडी बाजारात आल्या. एका बाजूनं भाव विचारत त्या निघाल्या. कुठे शंभर तर कुठे एकशे वीस असा दर छोट्या पिलांचा ऐकूण त्या थक्क झाल्या. शेवटी त्या दोघी एका घेवारनीजवळ आल्या. तिच्या जवळील पिले जरा मोठी वाटली तवा सूनिताने भाव विचारला. तर ती बाई म्हणाली,” दीडशे रुपये जोडी.” तेव्हा सुनिता म्हणाली, “ काय किलोभर तरी मटण पडल काय तेच.”

तेव्हा ती म्हणाली, “ किलोभर मटणासाठी घ्यायच नसत देवकाची किंमत लावायची नसतीया.” तेव्हा धृपदा म्हणाली, “ व्हय देवकाची किंमत लावायची नसतीया पण तू आता कोंबडीच्या बारक्या पिल्लांना पण जर बकऱ्याची किंमत लावालियास तर कस होईल. सोन्याचा मुलामा लावलीस काय त्या पिल्लांना.”



शेवटी सूनिताने घासाघीस करून एकशे एक रुपयाला ती दोन कोमडा व कोमडीची पिल्ली (सांगड) घेतली. अशा तर्हेने त्या बाजार करून घरच्या वाटला लागल्या.

घरात आल्यावर त्याने सगळा बाजार व्यवस्थित लावला. व जत्रेला आणलेली सांगड कोंबडीची पिली त्यांनी डालग्याखाली झाकली. दुसऱ्या दिवशी सूनितेनं आपल्या माहेरी निरोप धाडला की ती मंगळवारी नदीची जत्रा करायला येणार आहे म्हणून.तेव्हा सगळी व्यवस्था लावायला सांगितलं. मंगळवारचा दिवस उजाडला. सूनितानं आपल्या घरातील सर्व कामे आटोपली व तिने आपल्या मुलांना बोलवले. व आपण मामाच्या गावाला जायचं आहे. जत्रा करायची आहे. तेव्हा आज शाळेला जाऊ नका. मी गुरुजींची परवानगी घेतली आहे. तवा ती मुले खुश झाली. व सारे काही आटोपून तिने आपल्या मुलांना व आपल्या जावेच्या मुलांना घेऊन सासऱ्याला घेऊन ती माहेरच्या वाटेला लागलीत जाताना तिने प्रत्येकाच्या हातात काहीना काही वस्तू दिल्या.तिचा नवरा नंतर येणार होता. थोडं साहित्य दुर्डीत बांधल. ती आपल्या डोक्यावर घेऊन ती सर्व लटांबर घेऊन निघाली. तिचं गाव थोड्याच अंतरावर होतं. गावाला जाणारी वाट शेतातून जात होती. शेतातून जरा चालत उठत बसत ती सर्व झाडाखाली विसावा घेत. माहेराला आली. पोचल्यावर वेशितंच तिला पारू जाधवीन शेताला राकुंडा टाकायला निघालेली भेटली. सुनीताला बघून म्हणाली, “ सुने आज अचानक कशी काय उगवलीस .”

तेव्हा सुनिता म्हणाली, “ त्या लाईटीच मड बसवलं. तारांच्या स्पार्कींगन ठिणग्या पडून आखंड फड जळला. नव्हरा खुळ्यागत करायला लागला. तवा देवऋष्याला विचारलं, तवा नदीचा राग निघाला. म्हणून जत्रा करायला आलो. बघ.”

तेव्हा पार्वती म्हणाली, “ लई वाईट झाल बघ. तुझा फड पेटला खरं. जनीला माहीत असून एक शबुद बोलली नाही बघ म्हातारी. आता तू म्हंटल्यावर आम्हाला ठाव.”

“ पण तुला सांगते तुला जत्रा भराय यायची नाही. तवा तू संध्याकाळी आंबककाला बोलावं. ती तुला सांगेल काय करायचं ते. मी जाते शेताला.” ती आपल्या वाटेला लागली. सुनिता गावात आली. वाटेत दिसणाऱ्या प्रत्येकाशी बोलत चालत शेवटी ती आपल्या माहेरच्या घरात आली. तिन आल्यावर आपल्या भावजयीला डोक्यावरील बुट्टी उतरायला सांगितली. बुट्टी उतरल्यावर भावजयीन पाणी दिलं. मुले हात पाय धुवायला न्हाणीघरात गेली. हातपाय धुतल्यावर सर्वांनी चहा घेतला. मुले परस दाराला खेळायला गेली.

 थोड्या वेळाने सूनिताची आई जी दुकानाला गेली होती.ती परत आली. तिन सुनीताला पाहिलं. व म्हणाली, “आलीस व्हय लई बर झालं. मी अंबककाला बोलले संध्याकाळी येईल ती, सगळं ठीक हाय नव्हं, पोर कुठं हाईत.”

तवा सुनिता म्हणाली , “ पोर होय, हाईत परडला खेळत्यात. व तू कशी हाईस. आबा कुठं दिसत नाहीत मी सांगावा पाठवलाय नव्हं.”

तेव्हा जना म्हणाली, “ तुझ्या बाला काय एकच काम हाय का सगळा व्याप, ऐतीलच थोड्या वेळात. जावईबापू कुठं हाईत. मामंजीला पाणी दे म्हणावं. व चहा टाक.”

“ते झाली आमचं बहिणीनं केव्हाच चहा दिलाय.” सुनिता म्हणाली.

तशी ती न बसता तीनं पिशवीतील सांगड बुट्टीखाली झाकली. व वहिणीकडून पोतिरा घेऊन चुलीला मारू लागली.तेव्हा वहिनी म्हणाली, “ वनसं मी मारते की.”

तस ती म्हणाली, “ हे बघ सांजपतूर काम व्हाय पाहिजे. मी करते तू कर दुसर काम. तसा तिनं पोतिरा देऊन चुलीला हळद कुंकू लावलं. व चुलीत विस्तू पेटवला. व आपल्या मुलग्याला संजाला हाक मारली. व अंबककाला बोलवण पाटीवल. पोरग गाडी कशी चालवतात तस ब्रुम ब्रुम् करत पळाल. तो पर्यंत तिचा नव्हरा पण पोचला होता. त्याला चहा पाणी भावजयीन दिलं.

इतक्यात अंबकका घरामधे आली. हिरवगार लुगडं व कपाळाला लालभडक पंढरपुरासन आणलेलं कुंकू, गळ्यात चीत्ताक व घनसर मंगळसूत्र असणारी ही आंबक्का चालायला लागली की मासोळ्या छमछम वाजायच्या. अंबिका मुरका मारतच आत आली. तिला बघून सुनिता व तिचा नव्हरा दोघे पाया पडलीत.

आंबक्का सुनिताच्या नव्हऱ्याला म्हणाली, “ हे बघा जावईबापू हात फिर तिथे लक्ष्मी वस म्हणत्यात. फड पेटला नव्ह पेटूदेत. अशी डोचक्यात राख घालून चालत नाही संसार म्हंटला की चढण बुडण आलच. तवा मागलं सगळ विसरायचं व पुढली वाट धरायची. एका वर्षी बुडल म्हणायचं. पुढं तरी तारल नव्हं. ज्यान जन्माला घातलं. तेला काळजी नाही का? तो ज्याचा त्याचा शेर घालूनच पाठवतो झालं गेलं गंगेला मिळालं अस म्हणायचं व पुढली वाट चालायची.”

सुनिताचा नव्हरा गप पाटावर बसून ऐकत होता.

सुनिता म्हणाली, “ आता तूच सांग चांगल्या शहाणपणाच्या गोष्टी, आमचं ऐकतय कोण.”

अंबिका म्हणाली, “ सुने चल बघता बघता सांज होईल.” असे बोलून त्या जत्रेच्या तयारीला लागल्या. सुनिता आंबकका व सूनिताची भावजय यांनी सर्व जेवण केलं. व एका हऱ्यात भरलं. मुंज्याचा निवद, उतराच शिबडं देखील तयार केलं. तोपर्यंत चांगलच सांजेच सहा वाजले होते. म्हातारीनं शेजारच्या मालुबाईच्यातील बत्ती पण आणली होती. तेवढ्यात म्हातारा घरात आला होता. शेतातून आल्याने त्याच आंग घामानं चांगलच थबकत होत. न्हाणीघरात जाऊन त्याने सगळं आंग धुवून घेतल. अंगातील मळकी कापड काढून टाकली. व दुसरी चढवली. व तो जावयाजवळ जाऊन बसला. इकडल्या तिकडल्या गप्पा झाल्या. म्हातारीनं भावकीतल्या बायाना व शेजारच्या बायांना हळदीकुंकू लावायला बोलवले. अंबककाने सर्व मांडणी केली होती. थोड्या वेळाने सर्व बायकांनी हळदी कुंकू लावले. व बाया एकमेकींना लावू लागल्या. इकडे अंबक्का घुमायला लागली. तशी मालू म्हणाली. “ अंगात आलं वाटतं.”



आंबक्का आंगात काढून बडबडू लागली. तिचे ते डोलने पाहून सूनीताची पोरं कावरी बावरी होऊन बघत व बाहेर जाऊन हसत. थोड्या वेळाने सर्व तयारी झाली. सुनिताच्या नवऱ्यानं तिच्या अंगावरुन उताराच शिबड उतरून तो वाटेला लागला. पाठोपाठ इतर जणांनी पण बाकीचं सामान उतरून घेतला. व नदीच्या वाटेला लागलीत. सुनिताची व तिच्या दिराची पोर पण माग लागली होती. चांगलाच अंधार पडला होता. सूनिताच्या बापानं बत्ती पेटवली. तशी बत्तीच्या उजेडात सगळी चालायला लागलीत. अंधार पडल्यामुळे दिवसांची हिरवीगार दिसणारी झाड रात्री काळी दिसत होती. आधुनमधून काजवे चमकत होते. रातकिडे किरकिरत होते.अंधारातून पायाकडे बघत मुलांना घेऊन नदीवर आलीत.सर साहित्य ठेवून दोघांनी चूल मांडली. सूनिताच्या नव्हऱ्यान आपल्या हातातील शीबडं नदीच्या वाहत्या पाण्यात सोडलं. ते हळूहळू पुढे पुढे जाऊ लागल. सूनिताच्या नव्हऱ्यान चुळ भरली. व तो नदीच्या काठावर आला. सूनीताच्या बापानं सात खडं पुजलं. व श्रीपती व गण्याला मुंजाचा नीवद उंबरणीखाली ठेवायला सांगतलं. ते तिकडे जाऊन ठेऊन आले.



 सूनितेच्या आबान पोरांना कोंबड्यांची सांगड आणायला सांगितली. तसं सुनीताच्या पोरान सांगड आणून दिली. सांगडीतल्या पिल्लानी चावचाव करायला सुरुवात केली. व फडफड चालवली. त्यांचं पाय सोडलं. पिलांना पायाखाली धरलं. व हणमाला खुरपे द्यायला सांगितलं. तस हाणमा खुरपे घेऊन आला. खुरपे घेऊन म्हातार्यांन त्या तलंगेच व कोमड्याच काम तमाम केलं. व त्यान नदीकडं पुढा करून म्हणाला, “ वाकडं तिकडं देवा तुला साकड. कसपण घे, गोड मानून घे. व माझ्या लेकीला सुखी ठेव.” व तो म्हातारा नदीच्या पाया पडला. सगळी मंडळी जेवणाच्या तयारीला लागली. सूनितेची मूल लहान असल्याने बाजूला बसून सगळ्यांची गंमत पाहत होती.

सुनिताच पोरग संज्या सुशाला म्हणाला, “ आर, हे सगळ देवाक माणसांनी केलं. त्यांच्या चैनीखातर.”

शेजारी बसलेला सुशा म्हणाला, “नाहीतर काय त्या कोंबडीच्या पिलांचा जीव जाणार. व यांना म्हणे सुख मिळणार. “

इतक्यात शेजारी बसलेला धृपदेचा बाजा म्हणाला, “ तुम्ही कशाला बडबडता आपल्याला खायला मिळतंय नव्ह. गप्प बसा अशा गप्पात मुले रंगून गेली. इतक्यात बाजाच लक्ष हाणमादाकड गेलं. तो शेजारच्या सुशाला म्हणाला, “ ते बघ तो हणमादा रडतोय.”

तेव्हा सुशा म्हणाला, “ काय काका पेंडीच वज्ज पटापट कापत्यासा व आता साधा कांदा कापताना रडतासा.”

तेव्हा हणमादा म्हणाला “ लेका ये इथं कांदा कापायला म्हणजे कळल तुला, बायकांची काम बायकांनी करावीत. तिथं पेंडी कापणारा गडीसुधा चालत नाही. गप बसतोस काय तिथं .”

तसा सूशा गप्प बसला.

थोड्या वेळात कोणतरी बॅटरीचा उजेड पाडत येताना दिसले. थोड जवळ आल्यावर पोरासनी दिसलं, शिंद्यांचा नागुअण्ण व संजाचा काका म्हणजे सुनीताचा दीर येताना दिसली. संजाच्या काकानं जरा चांगलीच घेतली होती. तो धडपडत कसा बसा त्यांच्याजवळ आला. नागू अण्णा कडे बघत सुनीताचा बाबा म्हणाला, “ काय नागूआण्णा उशीर केलास.”

तवा नागुआण्णा म्हणाला, “ काय करू मामा माझ्या माग काय एक कटकट हाय. एकातन बाहेर पडावं तर दुसर दत्त म्हणून उभा. शेतातून येऊन बघतोय तर पोरग्यान म्हस सोडली नदीच्या पल्याड गेलती. तिला घरात आणून बांधतो. तवर शेजारी पुष्प्यान बायकोला चेचली. त्यांची भांडण सोडवून रिकामा झालो. तोवर म्हातारी कट्टीवरन घसरली. तिला दवाखान्यातन आणली. आन इकडं आलो बघ.”

इतक्यात संजाचा काका म्हणाला, “झाल काय नाही जेवण.”

तेव्हा नागूआण्णा म्हणाला, “ पावनं झेपत नाही तर घेता कशाला. मगाठावण त्या म्हशीनं दंबवल. व येताना या बाबांन मी होतो म्हणून बर. नाहीतर कुठतरी पडल असत वाट कडला. रस्त्यानं कुठं धड चालतंय व्हय याला काकतच घ्यायचं राहीलतं बघ. कसा बसा आणलाय हेला.” तेव्हा एकच हशा पिकला. थोड्या वेळानं जेवण तयार झालं. निवद दाखवला. व सर्वजण जेवायला बसलीत. कवळ्या कोंबड्याचा व तलंगेच्या रश्यावर सर्वांनी ताव मारला.जेवताना मुलांचं लक्ष मात्र समोर बसलेल्या बेवड्या काकाकडं लक्ष होत. तो चांगलाच फतकल मांडून बसला होता. त्याचा हात कधी जेवत्याल्या पत्रावळीत तर कधी बाजूच्या मातीत जात होता. तो तसाच घास ढकलत होता.

तेची तऱ्हा बघून नागूआण्णा म्हणाला, “ जेव की नीट, काय माती खातोस कशाला आलया जन्माला देवाला ठावं.”

त्याची ही तऱ्हा पाहून सूनीताच्या नव्हऱ्याच्या डोळ्यात पाणी आलं. व तो म्हणाला, “ काय सांगू नागू अण्णा याच्या दारुमुळं सगळ्या संसाराची माती व्हायला आलीय. नाहीतर यांच्यासारखा माणूस नाही.” अस म्हणत त्याने आपल्या बेवड्या भावाला घास भरवायला सुरुवात केली.”

ते बघून नागू अण्णा म्हणाला, “ इथच चुकतंय बघा तुमचं, चांगल मुंगणीच्या शिवारातल्या झाडाला बांधाय पाहिजे, रातसारी डोंगळ्यानी खाल्ल म्हणजे समजल.”

असे बोलत चालत त्यांनी जेवणावर ताव मारला. व शेवटी ती सर्वजण आटोपून शिजवलेली भांडी रीती करून व साहित्य घेऊन घरच्या वाटेला लागलीत. इकडल्या तिकडल्या गप्पा मारत ती सर्व जण घराकडे निघाली. पोचल्यावर त्यानी घरात जाण्यापूर्वी दारात सगळ्यांनी आपापल्या हातपाय धुतले. व घरात गेलीत.

दुसऱ्या दिवशी सुनिता सर्व आटोपून सासरी जायला निघाली. सर्व मोठ्या लोकांना नमस्कार केला. आईला कडकडून भेटली. व पुन्हा दुर्डी आपल्या डोक्यावर घेतली. दूर्डी घेताना जड लागली. तेव्हा ती म्हणाली, “ आई दुर्डित काय ग.”

तर जना म्हणाली, “ जरास तांदूळ बांधल्यात हावळं, पोरसणी चार आंबोळ्या करून घाल.”

तेव्हा सुनिता म्हणाली, “ कशाला उगाच बांधलस तिकड काय मिळतं नाहीत व्हय.”

तेव्हा म्हातारी म्हणाली, “ तसं नाही लेकी माहेरच्या दाण्याला प्रेमाचा गोडवा असतोया. दिवून च्या दिवून तुला एका शेतकऱ्याच्या गळ्यात बांधली. आम्हावाणी तुझं पण हाड या वेदगंगे काठच्या तांबड्या मातीसंग झुजतच जायचं. तवा आईच्या मायेनं दिल्यात ते घेऊन जा.”

 असं म्हंटल्यावर सूनिताचं डोळ पाणावल. ती म्हणाली, “ शेतकरी नव्हता जरी असला तरी सुपारीच सुदिक व्यसन नाही बघ. मी सुखात हाय बघ.” अस म्हणत तीन दुर्डी डोक्यावर घेतली. भावजयीन जाताना हळदीकुंकू तिच्या हातावर दही साखरेची चिमट ठेवली. ती घेत सुनिता व तिचा नवरा मुलांबरोबर चालती झाली.

वाटेत त्यांच्या गप्पा रंगल्या होत्या. बेवडया भावान घातलेला गोंधळ त्यामुळे त्याला गावी रात्रीचं पाठवलं होतं. आपल्या दिराच्या पोरांकडे बघत सुनितानं मनात ठरवल. मालूच्या नव्हऱ्यासारखं धृपदेच्या नव्हर्याची पण दारू सोडवायची.असा निश्चय करून ती गावच्या वाटेला लागलीत.

लेखक : निशिकांत हारुगले.

कथा वाकाटखोर्याची भाग २५

 २५)दादाची सायकल लेखक :  निशिकांत हारुगले. व्यंकू आता खूप मोठा झाला होता. तो कॉलेजला जात असे. घराच्या गरीब परिस्थितीमुळे वज्रेला शाळा सोडावी...